Saturday, 30 April 2016

कुलधर्म-कुलाचार

प्रत्येक कुटुंबाचे काही कुलधर्म-कुलाचार ठरलेले असतात त्यांची आपण माहिती करून घेऊ,
आडनाव, गोत्र, वंश, देवक: महाराष्ट्रातील बहुतेक ९६ कुळी आडनावे इतर जातीत आहेत त्यांचाप्रमाणे गोत्र, वंश, देवक व आराध्यवृक्ष व कुलदैवत हे ठरतात. 
ही माहिती ब्राम्हण समाजासाठी खालील दुव्यावर मिळते,
इतर मराठी समाजासाठी खालील माहिती ग्राह्य ठरते, (सौजन्य विकीपेडिया) 
त्या त्या विशिष्ट कुटुंबांमध्ये, ज्याची नित्य आराधना, पूजा केली जाते, ते त्या कुटुंबाच्या कुळाचे कुळदैवत किंवा कुलदैवत समजले जाते. विवाह वा मुंज अशा महत्त्वाच्या प्रसंगी होणाऱ्या कुळाचाराच्या वेळी, वा सणावारी किंवा दैनंदिन करावयाच्या पूजेच्या वेळी, प्रत्येक वेळेस 'कुळदेवतेची' पूजा करण्याची परंपरा आहे. 'कुळदैवत' हे,'देव' वा 'देवी' यांपैकी काहीही असू शकते. बहुतेककरून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे 'कुलदैवत' असते. माहूर, व त्याचे आसपासच्या सुमारे १००-१५० किलोमीटर परिसरातील राहणाऱ्या लोकांचे 'कुलदैवत' माहूरची रेणुका, कोल्हापूर परिसरात राहणाऱ्यांचे अंबा, तर दक्षिणेकडून येथे आलेल्यांचे बालाजी हे कुलदैवत असू शकते. 'कुळदैवत' हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. शिवाजी महाराजांची कुळदेवता तुळजापूरची भवानी होती हे तर सर्वश्रुतच आहे. 
आपले कुलदैवत कसे शोधायचे ह्यावर आपण चर्चा वेगळ्या लेखात करू,
महाराष्ट्र इतिहास (थोडक्यात): पूर्वी महाराष्ट्रात ज्या वसाहती झाल्या त्या जातीविरहित होत्या. कारण शेती आणि शेती संबंधित व्यवसाय हे जगण्याचे एकच साधन होते. तेव्हा बरेच लोक अनेक प्रदेशातून विशेषतः अगदी आफ्रिकेपासून सिंधू व पुढे गुजरात मार्गे महाराष्ट्र कर्नाटकात व अगदी केरळ पर्यंत स्थाईक झाले. ह्या लोकांनी ज्या देवी-देवतांच्या उपासना केल्या तीती त्यांची कुलदैवते आहेत. ही कुलदैवते फार प्राचीन काळापासून पुजली जात आहेत. जाती व वर्ण कसे निर्माण झाले हा पुढच्या काळातील प्रश्न आहे तो आपण सध्या बाजूला ठेऊन पुढे जाऊ. 
माझे कुलदैवत कुठले? : बहुतेककरून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे 'कुलदैवत' असते. माहूर, व त्याचे आसपासच्या सुमारे १००-१५० किलोमीटर परिसरातील राहणाऱ्या लोकांचे 'कुलदैवत' माहूरची रेणुका, कोल्हापूर परिसरात राहणाऱ्यांचे अंबा, तर दक्षिणेकडून येथे आलेल्यांचे बालाजी हे कुलदैवत असू शकते.  (परत सौजन्य विकीपेडिया). 
आता साधे बघा, की दोनशे वर्षापूर्वी आपल्या समाजाला बैलगाडीशिवाय काहीही माहित नव्हते तेव्हा आपले पूर्वज दरवर्षी आपले कुलदैवताच्या मूळस्थानी जाऊ शकत असतील का? अंतरे अगदी पुण्या-मुंबईपासून तुळजापूर किवा जेजुरी ही शंभर किलोमीटरपेक्षा जास्त आहेत. ही अंतरे पायी कापणे शिवाय अतिशय उन्हामध्ये पदरी काहीच पैसे नसताना किवा असले तरी लुटणारे वाटोवाटी बसलेले असताना शिवाय पती अजिबात सहकार्य करीत नसताना ह्या बायका कशा पार पाडीत असतील? (इथे पुरुष वर्गावर नाहक आरोप केला जातोय अनेक तुळजाभवानी आणि खंडोबाचे निस्सीम भक्त हे पुरुषच आहेत व तसा प्राप्त इतिहास आहे) असो. तर सांगायचा मुद्दा हाच की कुलदैवताचे मूळ देऊळ जरी माहूर, तुळजापूर, जेजुरी अशा ठिकाणी असले तरी प्रत्येक गावाच्या पंचक्रोशीत त्या त्या कुलदैवताचे जागृत देऊळ हे असतेच असते. त्यामुळे काही लोक त्यालाच आपले कुलदैवत मानतात आणि ते काही चूक नाही. म्हणून आपले कुलदैवत शोधयाचे असल्यास आपले मूळ गाव कुठले? तेथील आपल्या आडनावाचे/समाजाचे लोक कोणत्या जवळच्या देव-देवीची पूजा करतात हे शोधणे महत्वाचे आहे. 
घरात असलेले टाक यावरूनही आपले कुलदैवत कुठले हे समजू शकते. सोनाराकडे जाऊन आपले टाक कोणत्या देवाचे आहेत हे जाणून घ्यावेत. घरात परडी, माळ, पोत, दिवटी, बुधली असेल तर हमखास तुळजापूर-भवानी किवा यल्लमा हे कुलदैवत असते. घरात कोटंबा (तांब्याचे चौकोन व बुडाकडे लहान होत जाणारे पात्र-ह्यात भंडार ठेवतात) असल्यास जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत आहे हे समजून चालावे.
ज्यांना आपले कुलदैवत माहित नाही त्यांनी तुळजाभवानी व जेजुरी खंडोबा हे कुलदैवत समजून चालावे. तुळजा नावातच त्वरिता, त्वरजा म्हणजे लगेच प्रसन्न होणारी व त्वरेने मदतीला धावून येणारी असल्याने हे करणे योग्यच आहे. 
कुलधर्म कुलाचार म्हणजे काय?: ह्यात आपल्या देवासंबंधित ज्या उपासना व कृती करतो त्या प्रामुख्याने येतात. 
नवरात्र: नवरात्र हा सगळ्यात महत्वाचा कुलधर्म कुलाचार आहे, प्रत्येक स्वतंत्र राहणाऱ्या मुलाने हा आपल्या घरी करायला हवा. तसेच नवरात्राचा लोप करता येत नाही. सोयर-सुतक इत्यादी आले तरीही जितके दिवस मिळतात तितके दिवस नवरात्र करावे. पूर्ण नवरात्र अशौच असेल तर ज्याला असे सोयर-सुतक नाही अशाकडून (किवा ब्राम्हणाकडून) घटस्थापना आणि उद्यापन करून घ्यावे, सवाष्णभोजन, सप्तशती पाठ इत्यादी करू नयेत, व फक्त दुधाचा नैवेद्य करावा. उपोषण करण्याचा कुलाचार कोणीतरी एकाने करावा. उपोषण किवा ९ दिवस अनवाणी राहणे यापैकी एक हे केलेले चालू शकते. त्यातले त्यात उपोषण हा एक अधिक चांगला उपासनेचा प्रकार आहे. नवरात्र सुरु झाल्यानंतर अशौच आले तर राहिलेले दिवस वरीलप्रमाणे करावेत. 
कुलदैवत वारी: ही दरवर्षी मूळ कुलदैवताच्या जागी जाऊन करायलाच पाहिजे असा एक गैरसमज पसरत चालला आहे. आता वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत म्हणून हे करायला काही हरकत नाही पण तो एक पायंडा पडला तर पुढच्या पिढ्या करू शकतील कि नाही याचाही विचार व्हायला हवा. 
सहसा घरात विवाह, मुंज, जन्म आणि मृत्यु असे काही झालेले असता देव (टाक,माळ,परडी इत्यादी) नवीन करावे लागतात व ते मूळ कुलदैवताच्या जागी जाऊन देवाच्या चरणी स्पर्ष करून आणावे लागतात ह्याला देवभेट असे म्हणतात व ह्या एकूण प्रक्रियेला देव उजवणे असे म्हणतात. पूर्वी दरवेळी शक्य नसल्याने ४-५ वर्षातून एकदा अशी वारी केली जात असे. सोयर-सुतकातील देव हे प्रभावहीन असतात म्हणून ते जास्त दिवस घरात ठेऊ नयेत. आर्थिक कारणांमुळे शक्य नसल्यास जवळच्या कुलदैवताच्या मंदिरात देवभेट आणि देव उजवलेले चालू शकतात. 
अशी वारी केल्यावर देव आपल्या बरोबर घरी येतात, त्यामुळे जाताना व येताना कलह करू नये. घरी आल्यावरही आनंदी राहावे. ह्या देवी-देवतांचा गुण उग्र असल्याने त्या आपल्या घरी फार दिवस राहिल्या व त्यांना काही गोष्टी खटकल्या की घरात कलह वाढतो. म्हणून ह्या देवांची बोळवण (अर्थात बोडण-बडन) करायची पद्धत आहे. देवीसाठी एक सवाष्ण व एक कुमारिका स्त्रीस जेवायास बोलवावे, सवाष्ण स्त्रीची ओटी भरावी व कुमारीकेस आवडती भेट द्यावी. परडी असल्यास ती मागावी. असा रिवाज आहे. 
खंडोबा, म्हस्कोबा यांसाठी तळी भरावी. कित्येकदा ती मंदिरातच भरतात. काही लोक घरी भरतात. त्यासाठी ३ किवा ५ पुरुष असावेत. भंडार-खोबरे, पान सुपारी हे एका ताटात घेऊन पाच जन गोल बसावेत. हे ताट उचलून "सदानंदाचा येळकोट" म्हणून ताटाखाली पानसुपारी ठेवावी. खंडोबा मंदिराच्या दिशेने भांडार-खोबरे उधळावे. सर्वांना भांडार लावावा, व पान सुपारी खोबरे द्यावे, परत एकदा तळी उचलावी. सर्वांना काही खायचे पदार्थ वाटावेत. 
कुलदैवताची वारी करण्याचा दुसरा उद्देश हा असतो कि राहिलेले नवस, संकल्प हे ह्या वेळी पूर्ण करून घेता येतात. 
नवस बोलणे: कुलदैवताचे नवस त्याच्या मुळ ठिकाणाशी संबंधितच बोलावेत असे काही नाही. उलट असे करू नये. कारण तिथे जाऊन ते पूर्ण करण्याची संधी मिळते न मिळते हे बर्याचदा ठाऊक नसते. आणि एकदा बोललेला नवस कालांतराने त्रासदायक ठरू लागतो. नवसपूर्ती करायला जितका उशीर होतो तितका त्रास वाढत राहतो. साधारणतः एका वर्षाच्या आत बोललेला नवस पूर्ण करावा. म्हणून आपल्या घराच्या जवळच्या देवळात जरी नवस बोलला आणि पूर्ण केला तरी चालू शकतो. आपली कुलदेवी आणि जवळच्या मंदिरातील देवी एकच आहे हे समजून घेणे महत्वाचे असते. वाघ्या सोडणे, किवा मुरळी वाहने असे कालबाह्य नवस बोलू नयेत. त्यापेक्षा सोन्याचे अलंकार, नैवेद्य अर्पण करण्याचे, २१ प्रदक्षिणा घालण्याचे असे नवस बोलावेत. 
भाग बांधणे: मी देवासाठी अमुक करेल म्हणून कापडात आपल्याला शक्य तितके पैसे बांधून देवघरात ठेवणे ह्याला भाग बांधणे असे म्हणतात. नवसाचे विस्मरण होऊ नये म्हणून त्यात कागदाच्या चिठ्ठीवर नवस काय हेही लिहून ठेवणे उत्तम.
तर असे आहेत आपले साधे सरळ कुलधर्म कुलाचार!
बऱ्याचदा आपण कुलदैवत किवा अन्य मंदिरात जातो आणि तिथे बाहेर विक्रीस ठेवलेल्या अनेक वस्तू कुतुहुला पोटी विकत आणतो. जर त्या आणल्या तर देवघरात ठेऊ नयेत. इतर ठिकाणी शोभेची वस्तू म्हणून ठेवल्यास हरकत नाही. कारण त्यामागे काय शास्त्र व कारण आहे हे आपल्याला माहित नसते. शिवाय नवनवीन प्रथा आत्ता शक्य आहेत म्हणून सुरु करू नयेत. कारण तो एक पायंडा पडतो, आणि पुढच्या पिढीला ते सगळे करणे जमेलच असे नाही. शिवाय बऱ्याच वस्तू अशा असतात कि जेव्हा पुढची पिढी त्यांची कुठेतरी चौकशी करते तेव्हा भलतीच माहिती हाती येते. उदाहरणार्थ तुम्ही खंडोबाचा कोटंबा किवा देवीची परडी हौसेने विकत घेतली आणि ते पुढच्या पिढीच्या हाती लागले  तर ते  मागायचे काम त्यांना करावे लागणार!
कुलदैवत कसे शोधायचे हे आपण पुढे इतरत्र पाहूया, ह्या लेखावर काही शंका असल्यास अवश्य विचारा.
टीप:
विवाहानंतर जागरण व गोंधळ करणे हाही आपल्यातील एक महत्वाचा कुलाचार आहे, त्याचा संबंध वरील बोळवणाशीच (किवा बडन किवा बोडण)आहे. विवाहात देव करून घेतल्यावर कुलदैवत आपल्या घरी येते त्यांना तृप्त करवून, त्यांची स्तुती करण्याचा व महती गायनाचा हा सोहळा आहे, हा माझा थोडा सांगायचाच राहिला. जागरण गोंधळ हे वाघ्या मुरळी, देवदासी करतात. पण आजकाल सगळेच लोक हे करू लागलेत शिवाय भरपूर पैसे घेतात. पुरोहित वर्गांची लुटालूट आणि जागरण गोंधळ ह्यांचे मोठे खर्च ह्यांचे कारण काय आहे? महागाई वाढली आहेच आहे. पण नित्य कुलधर्म कुलाचार करणाऱ्या लोकांची संख्याही रोडावली आहे, त्याऐवजी हॉटेलमध्ये लोक पैसे खर्च करतात पण जागरण-गोंधळ यातील नाच गाणी लोकांना जुनाट वाटतात. सगळ्यांनी सुधारित व्हावे पण खोटेपणा करून का? आपले हे सांस्कृतिक विधी व त्याचे मानसशास्त्र ह्याची जाण ठेवायला हवीच ना! मोठ्या हॉटेलात पार्टी दिली कि नुसते अन्नाचे पैसे यापेक्षा कितीतरी जास्त पैसे उकळले जातात.



No comments:

Post a Comment