शनीच्या चौथर्यावर महिला पोचल्या. नंतर सनातनी विचारांच्या लोकांना त्यांचे हे कृत्य सहन झाले नाही आणि मजेशीर वक्तव्ये दोन्ही बाजूने येऊ लागलीत. ह्यातून नक्की काय मोठा अनर्थ घडलाय याचा उहापोह आपण इथे करणार आहोत. शनीच्या चौथर्यावर चढणाऱ्या महिला दोन प्रकारच्या मानसिकता असलेल्या असू शकतात.
त्यातील प्रकार पहिला म्हणजे ह्या महिला पूर्ण निरीश्वरवादी असतील, त्यामुळे शनीच्या चौथर्यावर गेलो तरी शनीने आमचे काहीच वाकडे केले नाही असे त्यांना सिद्ध करायचे असेल. त्या जर असे करीत असतील तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे. एखादी बाब अंधपणे न मानता जिज्ञासुपणे पडताळून पाहण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे. आणि तसे केलेच पाहिजे.
दुसरा मुद्दा असा की त्या स्वतः निरीश्वरवादी असतील तर ईश्वरवाद्यांच्या धार्मिक भावनांशी त्यांना खेळायचा अधिकार नाही. पण एखादा जर खरेच खड्ड्यात पडत असेल तर त्याला वाचविण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले तर त्यात त्यांचा काहीही गुन्हा नाही असे माझे मत आहे.
तर त्यासाठी आधी शनि हे तत्व नक्की काय भानगड आहे ते आपण समजावून घेऊ. शनि हा आकाशस्थ ग्रह आहे. तो जरी पृथ्वीवर एका पाषाणाच्या स्वरुपात पुजला गेला तरीही त्याचा आणि आकाशातील शनीचा काहीही संबंध नाही. महिला नुसत्या त्या चौथर्यावर काय अगदी त्या पाषाणावर जाऊन बसल्या तरी शनि त्यांचे काही वाकडे करू शकत नाही. हेही तितकेच खरे आहे. शनि हे दुसरे तिसरे काही नसून ते कालमापनाचे एक एकक आहे. शनि १२ राशी पूर्ण फिरण्यास ३० वर्षे घेतो. शनीची साडेसाती ही फार कुप्रसिद्ध आहे. जेव्हा शनि एखाद्याच्या राशीला १२-१-२ ह्या स्थानी असतो तेव्हा त्या व्यक्तीची साडेसाती आहे असे म्हणतात. अशी साडेसाती ३० वर्षांनी येते. साडेसातीची ७.५ वर्षे सोडली तर राहिलेली २२.५ वर्षे शनि अजिबात कोणाला त्रास देत नाही. उलट ३-६-१०-११ ह्या स्थानी शनि असताना प्रचंड भरभराट करून देतो. पण नेमके ह्याच २२.५ वर्षात माणसाला काही सवयी लागतात. आपलेच खरे, आपण म्हणू ती पूर्व दिशा असे तो वागू लागतो. ईश्वर-परमेश्वर त्यावेळी त्याला अजिबात आठवत नाही. मस्त भोग भोगत तो माणूस जीवन जगत असतो. पण विश्वात स्थिर आणि वाढत जाणारे कधीतरी मावळते हा जसा नियम आहे तसे नेमके साडेसातीत होते. आजूबाजूचे लोक इच्छेविरुद्ध वागायला लागतात. लोक सोडून जातात किवा तुम्ही तरी त्यांच्यापासून दूर जाता, जवळचे लोक तुमचे वर्चस्व जुमानत नाहीत. हे निसर्ग नियमाने होणार असतेच फक्त निमित्त शनीचे होते आणि ह्या आधी सुखात जगणाऱ्या महाशयांचा संयम संपायला सुरुवात होते. संयम सुटला कि बेताल वागण्याचे उलटे फटके बसायला सुरुवात होते. तसेच परम संयम, सयंत व संत स्वभाव असलेला मानव हा फार दुर्मिळ किवा निव्वळ अशक्य आहे त्यामुळे प्राप्त साडेसाती असह्य होऊन माणूस साडेसातीच्या तडाख्यात सापडतो. संयम सोडून प्रतिक्रिया देतो. साडेसाती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अपरिमित संयमाची परीक्षा असते.
निसर्ग आधी माणसाला बलवान व उन्मत्त बनवतो आणि तसा बनल्यावर मग त्याला ठोके मारून जाग्यावर आणतो. ह्या प्रक्रियेत जो टिकाव धरून राहतो तो पुढे जातो.
हे सगळे होत असते त्यासाठी काळाचे अचूक निरीक्षण करण्याची नितांत गरज असते. असे निरीक्षण करून त्याचा नोंदी करून ठेवल्या, त्या आठवल्या कि साडेसाती म्हणजे काय याचे आकलन सोपे होते. एखादे पातेले गरम आहे म्हणून त्याला हात लाऊ नकोस असे आपल्याला सांगितले असले तरी दोनचार वेळा हात भाजून पक्का धडा मिळाला कि मगच माणूस त्या गरम पातेल्याला हात लावायला घाबरतो. तसे ह्या शनि साडेसातीचे आहे. इथे मिळालेला धडा हा पक्का कोरून ठेवण्यासाठी तो इतका जोरात आणि परत परत दिला जातो कि पुढची १० वर्षे तो विसरणे अवघड असते. ही त्या माणसाला सुधारण्याची प्रक्रिया निसर्गाकडून आपोआप होत असते. पुढे असा प्रश्न निर्माण होतो कि जी लहान मुले आहेत त्यांनी त्यांचे २२.५ वर्षांचे आयुष्य ओलांडलेलेच नसते, मग त्यांना संयमाची परीक्षा द्यावी लागते? तर निरीक्षण असे सांगते कि लहानपणी साडेसाती फारच सौम्य जाते. फारच खटपटे मुल असेल तर हात पाय मोडणे यावर भागते. पण धडा हा मिळतोच. अगदीच तान्हे बाळ असेल तर आईवडीलांच्या कृत्यांचा परिणाम गृहीत धरावा लागतो. त्यांचे वर्तन हे मुलाला मिळणाऱ्या फलाशी संबंधित असते.
जसे विज्ञान हे निरीक्षण व नोंदींनी सिद्ध होते तसेच शनीचे हे विज्ञान आहे. याउपर निरीश्वरवाद्यांना (अगर असले काहीच न मानणार्यांना) त्यांचे काय विज्ञान आहे ते मानायचे स्वातंत्र्य आहेच आहे.
तर असा हा पहिला महिला-पुरुष वर्ग आपण पहिला.
दुसरा महिला वर्ग असाही असू शकतो कि त्या शनीला खूप मानतात. साडेसातीचे गंभीर परिणाम त्यांना माहित आहेत. त्या परिणामांपासून स्वतःला किवा आपल्या कुटुंबाला दूर ठेवण्यासाठी त्या शनीच्या चौथर्यावर चढून गेल्यात. त्यांनाही एखाद्या देवाची उपासना करण्याचा पुरुषांच्या इतकाच हक्क आहे आणि त्या मागण्यासाठी त्या झगडत आहेत. असे असेल तरी स्थिती तीच राहते. शनि मुळात संयमाची परीक्षा घेणारा असल्याने त्याच्या नुसत्या जवळून दर्शनाने फार मोठे लाभ पदरात पडतील असे दिसत नाही. दर्शनाचे द्या सोडून पण असे असेल तर शनीच्या प्रतिकूल काळात जप, दान पूजन का सांगितले जाते? का हि सुद्धा बनवेगिरी आहे? हा पुढचा प्रश्न मनात उपस्थित होतो.
त्याचे कारण असे आहे कि, तो एक उपचार असतो. तुम्ही एखादी चुकीची कृती केलीत पण त्याची जाणीव जर मनाला झालीच नाही तर ती कृती तुम्ही पुन्हा पुन्हा करता. पण दान, पूजन मंत्र-जप केल्याने आपला काळ प्रतिकूल आहे, आपण जे कृत्य करतोय ते चुकीचे होते याची जाणीव माणसाला होत राहते व ते करण्याचे टाळण्यासाठी तो जागृत राहतो हा जप, दान मंत्र, पूजन यांच्यामागील उदेश आहे. जाणीव नसेल तर कितीही जप, दान, पूजन केले तर त्याचा उपयोग शून्यच आहे. हे ओघाने पुढे येतेच.
तर अश्या प्रकारे शनीच्या चौथर्याचे प्रकरण गाजत आहे.
पुढे आणखी गंमत अशी कि प्रत्येक मंदिरात लाखोने भाविक जातात. पंढरीच्या विठोबाचरणी भाविकांच्या स्पर्शाने खड्डा पडायला लागला आहे. अनेक मूर्तीवर अभिषेक घालून दरवर्षी कित्येक मूर्तींचे पाषाण काही मिलीमीटरने घासून कमी होतात. मंदिरात दिलेल्या बळीच्या रक्ताच्या पाटात घसरून अडीचशे लोक मेल्याची घटना सहज घडून जाते. त्यात हे शनीचे प्रकरण विचारात घेतले तर तिथे दिवसभर तेल घातले जाते. शनिशिंगणापूर मंदिर परिसर तेलाने इतका निसरडा झालेला असतो कि कधी गर्दी होऊन घसरा-घसरी आणि चेंगराचेंगरी होईल हे सांगता येत नाही. शनिला तेल वाहतात कारण ते चिकट असते, साध्या पाण्याने ते निघत नाही. पूर्वी साबण नावाचा प्रकार नव्हता तेव्हा तेलाचा चिकटपणा हा शनीचा त्रास देण्यासाठीचा गुणधर्म समजला जायचा-१. तर असे हे तेल आणि त्यात जाऊन घसरून कुणी पडावे-२.
आपल्याकडे लेकाला दोन घास जास्त खायला लावायचे आणि ते घास लेकीच्या ताटातून द्यायचे हि परंपरा आहे त्यामुळे मुली आधीच फार सशक्त असतात. त्यात गर्भारपण, आजारपण असेल तर ह्या तेलाच्या गोंधळात महिलांनी पडू नये इतकेच वाटते. शनीची उपासना मनातल्या मनात केली, त्याच्या चांगल्या आणि वाईट स्थितीत त्याने आपल्या पतीला, मुलाला किवा तुम्हाला स्वतःला कशी फळे दिली ह्याचा अभ्यास व निरीक्षणे करून ठेवलीत तर ती शनीची विधायक भक्ती होईल असे वाटते. साडेसातीत काय करावे काय टाळावे ह्याचे स्वतःला आणि तुमच्या कुटुंबियांना मार्गदर्शन तुम्ही महिलाच फार उत्तम प्रकारे करू शकता, कारण घडवायची जबाबदारी तुमचीच आहे.
टिपा:
१) साबण किवा साबणीकरण गुणधर्म असलेला कुठलाही पदार्थ पूर्वी हात धुवायला वापरल्याचे पुरावे नाहीत. रिठे किवा शिकेकाई हे केस धुवायला वापरले जात होते हे ऐकून माहित आहे. इतकेच काय शौचास जाऊन आल्यावर लोक हाताला माती चोळून मग हात धूत. हाताचे तेल काढण्यासाठी आत्ता जसा साबण वापरला जातो तसा पर्यायी पदार्थ पूर्वी नव्हता.
२) शनीला तेल जाळत नाही तर ते त्याच्या अंगावर ओततात. अपवादाने काही ठिकाणी (शनि शिंगणापूर येथे जाळतात कारण एकतर इथे भयंकर मोठ्या प्रमाणात तेल ओतले जाते ते जाळून टाकल्याने चिकचिक व संभाव्य अपघात टाळावेत हा उद्देश असावा.)
१) साबण किवा साबणीकरण गुणधर्म असलेला कुठलाही पदार्थ पूर्वी हात धुवायला वापरल्याचे पुरावे नाहीत. रिठे किवा शिकेकाई हे केस धुवायला वापरले जात होते हे ऐकून माहित आहे. इतकेच काय शौचास जाऊन आल्यावर लोक हाताला माती चोळून मग हात धूत. हाताचे तेल काढण्यासाठी आत्ता जसा साबण वापरला जातो तसा पर्यायी पदार्थ पूर्वी नव्हता.
२) शनीला तेल जाळत नाही तर ते त्याच्या अंगावर ओततात. अपवादाने काही ठिकाणी (शनि शिंगणापूर येथे जाळतात कारण एकतर इथे भयंकर मोठ्या प्रमाणात तेल ओतले जाते ते जाळून टाकल्याने चिकचिक व संभाव्य अपघात टाळावेत हा उद्देश असावा.)
No comments:
Post a Comment