Sunday, 10 April 2016

कुलदैवताच्या जागी विष्णू आला!

मागील लेखात आपण पहिले कि, सावरकरांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अष्टभुजादेवी हे कुलदैवत मंदिरात विसर्जित केले. जसा काळ असतो तसे माणूस वर्तन करत असतो. त्या काळात कुलदैवताचे मोठे महत्व होते. छत्रपती शिवाजी यांनी केलेली कुलदेवता उपासना प्रख्यात आहे. त्यातच आपली कुलदेवी, देव हे उग्र व रागीट आहेत हेही आपण पहिले. देवीचे बोळवण (बोडण) केले नाही तर ती घरात कसा उच्छाद मांडते हे आपण पहिले आहे. शिवाय जुन्या लोकांना ह्या कुलदेवी-कुलदेव विषयक प्रश्न तुम्ही सहज विचारून बघा. सगळे जुने लोक तेच तेच सांगत असतात. देवी फार कडक आहे, ओल्या झाडाला आग लावू शकते, असे गूढ शब्द, विचित्र देवदासी, वाघ्या मुरळी प्रथा आपण आजही अनुभवतो आहोतच. चांगला शिकला सावरलेला मुलगा ज्याला ब्रिटीश दरबारी सुखवस्तू नोकरी सहज मिळू शकते, तो तिकडे काळ्या पाण्यावर खितपत पडला आहे म्हटल्यावर कुटुंबियांची अशी मानसिकता होणे साहजिक होते. पण स्वातंत्र्याचे वेड हे वेडच असते. जेव्हा स्वातंत्र्य नसते तेव्हा त्याची किंमत कळते. आज आपण जी स्वातंत्र्याची गोड फळे खात आहोत ती सावरकरांनी त्यांच्या कुलदेवीसमोर केलेल्या प्रतिज्ञेची फळे आहेत नाही का? तर ह्याच विषयाचा आपण विचार करू.
वैदिक ब्राम्हण समाज अफगाण प्रांतातून भारतात आला असे शोध सध्या लागत आहेत. मूलनिवासी लोक हे मातृ-पितृ पूजक लोक होते असेही सांगितले जाते. त्यातील मातृ-पितृ पूजा हा कळीचा विषय आहे. कोणीही कोणाला आई वडिलांशी संबंधित शिवी दिली कि राग अतिशय वाढतो. राग हा मनाचा शत्रू आहे. राग आला कि सूड-प्रतीसूड यांचे चक्र सुरु होते. तू असे केले म्हणून मी असे केले अशी शृंखला चालूच राहते. प्रत्येकाचे काहीतरी तत्वज्ञान असते. ह्या देशावर आक्रमण करणारा म्हणतो कि, मी ज्या भूमीतून आलो तिथे काहीच पिकत नाही मग मी काय उपाशी मरु का? ह्या देशातला मूलनिवासी म्हणतो मी आधी इथे आलो आता हि जागा माझी आहे तिथे तू येऊ नकोस. हे असे जगण्या मरणाचे लढे अनंतकाळ चालू आहेत. 
लढणारे लढतात आणि मरतात पण ज्यांचा काही संबंध नाही ते (कर्म स्वरूप वर्ग ह्यात कायम त्रास सहन करत राहतात) जसे आपली भूमी हि आज शोषली जात आहे, जिथे एका किलोमीटर वर्गामध्ये  १०० लोक पूर्वी राहत होते  तिथे १ लाख लोक राहत आहेत. जिथे एका पुरुषास एक स्त्री असे गुणोत्तर होते ते आता एकास ०.८ इतके कमी झाली आहे. अशा युद्धाचे दूरगामी परिणाम आपल्यावर होत आलेले आहेत. ह्या युद्धात टोकाचा प्रतिकार करण्याची वृत्ती निर्माण होण्यासही आपली कुलदैवते आपल्याबरोबरच निर्माण झाली. देवाने सृष्टी निर्माण केली कि मानवाने देव निर्माण केले हा वाद "कोंबडी आधी कि अंडे आधी" असा निरुत्तर करणारा आहे म्हणून तो तूर्तास बाजूला ठेऊ. परकीय आक्रमणांचा इतिहास तसा फार जुना आहे. अशी अक्रमणे पुरातन काळापासून होत आलेली आहेत व त्यातून आपली एक ठराविक उत्क्रांती होत आलेली आहे. ह्या उत्क्रांतीत स्त्री-पुरुषात लढाऊ बाणा निर्माण होण्यासाठी अशी उग्र कुलदैवते निर्माण झाली. त्यांचे सशस्त्र उग्र रूप, त्यांचा मांसाहारी नैवेद्य हे शरीरात शौर्य व युद्धजन्य क्रौर्य निर्माण होण्यासाठी आहेत हे न सांगता कळते. नुसते पुरूषच नाही तर स्त्री देवता सुद्धा अस्तित्वात आल्या. प्रसंगी आपल्या संततीला युद्धाच्या मैदानात पाठवण्याचे अवघड काम स्त्रीने करावे हा यामागील उद्देश आहे. स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळावे असा दुसरा उद्देश होता. स्त्री ही किती पुरातन आहे यावरून स्त्री दैवते किती पुरातन होती याची कल्पना येऊ शकते! आई जशी माया लावते तसे ती न्याय मिळवण्यासाठी आपल्या संततीला युद्धाच्या यज्ञात अर्पणही करू शकते. समोरासमोरील तलवारीच्या युद्धात असे क्रौर्य, सूडबुद्धी, स्वातंत्र्याची आस हे आवश्यक होते. 
प्रत्येक प्राण्याला त्याचे स्वातंत्र्य परम प्रिय असते. त्याला स्वतःच्या पद्धतीने खायला प्यायला, जिथे वाटेल तिथे फिरायला, स्वतःला आवडते ते आचरण करणे प्रिय असते. त्यात कसली अडकाठी आली कि त्याच्या स्वातंत्र्यावर घाला येतो व तो माणूस चवताळून उठतो. पिंजऱ्यात कुठलाच प्राणी सुखी नसतो, भले तो सोन्याचा पिंजरा का असेना हे आपण लहानपणी शिकलो. परकीय आक्रमणात हेच मातृभूमीचे (म्हणजे इथल्या प्रत्येक मानवाचे) स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इथला माणूस त्याविरुद्ध शतकानुशतके लढत राहिला आहे व त्याला प्रेरणा देत आलीत ती आपली कुलदैवते! इथल्या मानवाने हार मानली नाही. अतिशय सूक्ष्म, मूलगामी आणि जनुकीय बदल आपल्यात त्या त्या स्थितीत होत आलेले आहेत त्यामुळे आपण असे बनलो आहोत. आपली दैवते अशी बनली आहेत.
काळ मोठ्या झपाट्याने बदलला तो ब्रिटीश काळात! ब्रिटिशांनी शिस्तबद्ध बंदुका धारण केलेले कवायती सैन्य आणले तेव्हा आपली हि अंतर्गत हमरी तुमरी थांबली. यात ब्रिटीश फार मोठे देव होते असे सांगण्याचा अजिबात उद्देश नाही. उलट आज आपली लोकशाही ब्रिटीश लोकशाही पेक्षा करोडो पटींनी मोठी लोकशाही आहे आणि व्यवस्थित प्रगती करीत आहे हे खरेच कौतुकास्पद आहे. ह्या लेखाचा उद्देश आपली कुलदैवते त्यांची न्याय अन्याय विषयक भूमिका याविषयी आहे. म्हणून ब्रिटीशांच्या राज्याचा विचार इथे करीत नाही. जसे काळ बदलला तसे विचार बदलत गेले. ब्रिटीशपूर्व काळातही अनेक मोठी साम्राज्ये होती. अनेक शांतता पर्वे येउन गेली. तेव्हा बाह्य नव्हे पण अंतर्गत युद्धे थोडीफार होत होती. 
अशा शांततेच्या काळात आपली उग्र दैवते, त्यांच्यातून येणारी युद्धखोर वृत्ती यांची गरज समाजातील पुरोगामी घटकांना वाटेनाशी झाली. शिवाय जे माणसात अंतर्गत बदल घडले होते त्याचे काही कौटुंबिक व सामाजिक दुष्परिणामही होत होते. कुलधर्म-कुलाचार का व कशासाठी करायचे. हे कर्मकांड कशासाठी? असेही प्रश्न समाजातील एक पुढारलेला वर्ग स्वतःला विचारू लागला होता. बर नुसते बोलून किवा विचार करून ठीक पण हे कुलधर्म कुलाचार केले नाहीत तर भयंकर दुष्परिणाम होतात असाही एक समज दुसरीकडे भीती दाखवत होता. त्याचे काय करायचे? 
अशा स्थितीत एक सौम्य दैवत पुढे असणे गरजेचे होते. त्यातून विष्णू ह्या दैवताची निर्मिती झाली. त्याचा मार्ग हा साधा भक्तिमार्ग. त्याला मांसाहार चालत नाही. एकादशीचा उपवास करून चित्त शुद्ध ठेवायचे. वारी करायची असे त्याच्या भक्तीचे स्वरूप. याबरोबर ह्या दैवतासारखे असलेल्या देवांचे भक्त वाढत गेले. अनेक संत ते स्वामी, बाबा बुवा तयार झाले. त्यांनी समता शांती इत्यादी संदेश दिले. 
वरवर पाहता समाज बदलला, कायद्याचे राज्य आले. युद्धे फक्त सीमेवर लढली जातात. त्यासाठी फक्त काही लाख सैनिकांची आवश्यकता असते. पण जो माणूस इथे राहतो तो अजून जुन्या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन म्हणजे ती युद्धात पळवून आणायची वस्तू असाच अजून आहे. त्यामुळे शत्रूची नांगी ठेचली जाते, चांगला सूड उगवला जातो असा पुरुष मानसिकतेचा भाग ह्यामागे आहे. पूर्वी पिके, संपत्ती जशी लुटली जात होती तसा हा प्रकार आहे. 
बरेच गुन्हे आजच्या कायद्याच्या राज्यात आपल्या समाजाच्या ह्या अज्ञानामुळे घडतात असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. हुंडा मागणे, स्त्रीभ्रूण हत्या, चोरी, अल्पवयीन विवाह, विचित्र प्रथा असे गुन्हे हे गुन्हे आहेत हेच समाजातील अनेकांना माहित नसते ही एक गंभीर पण गमतीशीर बाब आहे. कुलदैवत ओल्या झाडाला आग लावते म्हणजे काय हेही ह्यातच दडलेले गूढ आहे. गुन्हेगारीचे मानस शास्त्र हा एक संपूर्ण वेगळा व विस्तृत विषय असल्याने तो इथेच थांबवतो त्यावर आपण इतरत्र चर्चा करूयात. 
पूर्वी समाज देव-धर्म ह्यांच्या नियमांनी चालत असे. तसे आता राहिलेले नाही. पण जुने दैवत सोडून देणेही उचित आहे असे वाटत नाही. विधायक मार्गाने प्रगती आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास हीच कुलदैवते तितक्याच दमदारपणे तुमच्या पाठीशी उभी राहतात. पण तो अनुभव स्वतः घेणे आवश्यक आहे. पूर्वी स्त्रीची मानमर्यादा राखण्यासाठी कुलदेवी उपासना केली जात असे तशीच मानमर्यादा ठेवण्यासाठी देवीची उपासना आपण आत्ता का करू शकत नाही. म्हणजे देवळात जाऊन पूजा करून आले कि बाहेर स्त्रियांना त्रास द्यायला आपण मोकळे झालोत का? मग ती देवळात केलेली पूजा म्हणजे तुमच्या शरीराने केलेले कृत्य आहे ते मनाने व बुद्धीने केलेले नाही असे झाले. आपण हि दैवते तेव्हा तशी का होती व आता कशा स्वरुपात पुजली पाहिजेत हे समजून घेतले तर आपली पुरातन कुलदैवते सोडून आपल्याला ज्यांचा कार्यकारण भाव माहित नाही किवा जी कशासाठी उभी केली गेली हेही माहित नाही अशा दैवतांना अंगीकारणे म्हणजे स्वतःची अंधळेपणाने फसवणूक करण्यासारखे नाही का? नुसता देव बदलून मानसिकता बदलते का? जर उग्र दैवते त्रास देत असतील व तुम्ही त्यासाठी ती सोडत असाल तर नक्कीच असे देव अस्तित्वात होते म्हणूनच तर त्यांना सोडायची वेळ तुमच्यावर आली ना? अशी दैवते नसतीच तर सोडायची गरजच नव्हती.








 

No comments:

Post a Comment