Thursday, 7 April 2016

हस्तरेषा, ज्योतिष्य हे शास्त्र नाही का?

एखादे तत्व शास्त्रीय आहे असे आपण केव्हा म्हणतो? जेव्हा त्याची शास्त्रीय सिद्धता होते तेव्हा. जसे एखादा विषारी पदार्थ खाल्ल्यावर माणूस मरतो, किवा एखादे रक्तदाब कमी करणारे औषध खाल्ल्याने रक्तदाब खरेच  कमी होतो. तेव्हा ते औषध सिद्ध झाले असे म्हणता येते. त्याला क्लिनिकल ट्रायल असे म्हणतात. तसेच इतर शास्त्रात देखील असे सिद्ध होणे गरजेचे असते. जसे सोनोग्राफी करताना फक्त काही कंपने शरीरात सोडली जातात व परत मिळवली जातात व त्यावरून शरीरातील अवयवांचे चित्र तयार होते. शरीर कुठेही कापावे लागत नाही. एक्स-रे, दूरध्वनी इत्यादी तंत्र अशाच प्रकारे चालतात. हे वैज्ञानिक चमत्कार आहेत. ते कसे साध्य केले जातात त्याचे शास्त्र आहे. शास्त्राची सिद्धता करताना निरीक्षणे व परिणाम हे नोंदवून ठेवावे लागतात. नंतर अमुक एक शास्त्र हे सिद्ध झाले असे आपण म्हणतो तेव्हा एका ठराविक टक्क्यांपेक्षा अधिक टक्के जर परिणाम अचूक आले तर ते शास्त्र सिद्ध झाले असे म्हणतात. 
दुर्दैवाने ज्योतिष्य किवा हस्तरेषा विषयक शास्त्र ह्याबाबत असे निरीक्षण नोंदवणे किवा परिणाम ह्यांची नोंदणी झालेली नाही. साधारणतः नऊ महिन्यात मुल जन्माला येते हे आपल्याला अनुभवाने माहित आहे म्हणून त्याची नोंद कोणी ठेवत नाही तशातलाच हा प्रकार आहे. ज्योतिष्यशास्त्र, किवा हस्तरेषा ह्यांचा अभ्यास हजारो वर्षे चालत आलेला आहे. फार पूर्वी अशी निरीक्षणे नोंदवणे किवा त्यांना आव्हान देणे हा प्रकार घडलेला असू शकतो. पण नंतर एकदा का तो नियम सिद्ध झाला कि कोणी नवीन निरीक्षण करायच्या भानगडीत पडत नाही किवा आव्हानही देत नाही. चार्वाक, आयतक इत्यादींच्या काळात निरीश्वर व भोगवादी विचारसरणी वाढीस लागली त्यावेळी बहुदा ज्योतिष्य, दैव ह्यांना आव्हान दिले गेले असावे. नियती असते का? कि सगळे जीव अनियत जगत असतात असाही प्रश्न विचारला गेला असावा व आजही विचारला जातो. 
ह्या प्रश्नांची उत्तरे देणास एकही समर्थ ज्योतिषी समोर उभा राहत नाही कारण कोणीही कसलीही निरीक्षणे नोंदवून ठेवत नाही. अमुक एक ग्रह खराब आहे, गुरुबळ नाही, साडेसाती आहे, अमुक नक्षत्र शांती आहे असे साचेबद्ध उत्तर सगळे ज्योतिषी देतात. हा आपल्या भारतीय लोकांचा एक दुर्गुण म्हणावा लागेल, कारण एकतर आपण जे रोज काही करतो, अनुभवतो त्याची निरीक्षणे कुठेही नोंदवून ठेवत नाही. त्यांची तुलना/अभ्यास करत नाही. आपली निरीक्षणे एकत्रित करीत नाही. एकमेकांना वाटून त्याचे ज्ञान वाढवत नाही. असे असेल तर आपण कुठलेच नवीन शोध लावू शकत नाही. आपण फक्त पाश्चिमात्य लोकांनी शोधलेले शोध वापरतो आणि त्यांची वाहवा करत राहतो. आपण जे शोधले आहे ते विसरून जातो. 
आता गम्मत बघा, जो धडधाकट असतो तो डॉक्टरकडे कधी जात नाही. जो अशक्त, वयोवृद्ध असतो तोच जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्रात जेव्हा एखादा माणूस काही अडचणी नसतात तेव्हा तिकडे ढुंकूनही पाहत नाही पण जेव्हा प्रतिकूल ग्रहस्थिती निर्माण झाल्यावर नाही नाही ते उपाय करत फिरतो. ज्योतिष्यशास्त्रीय अभ्यासक लोकांनी असे धडधाकट आणि आजारी अश्या दोनही प्रकारच्या लोकांना कायम नजरेखाली ठेवायला हवे, आणि योग्य वेळी "अब आया उंट पहाड के नीचे" ह्या तत्वाप्रमाणे त्यांचाही अभ्यास व सर्वांगीण निरीक्षणे करायला हवीत. 
औषधे खाऊन जिवंत राहणे आणि ज्योतिष्य पाहून जीवन जगणे ह्यात फार मोठा फरक आहे. जो ज्योतिष्य बघून जीवन जगतो त्याला औषधे खायची गरज नसते. त्याचे ध्येय निश्चित असेल तर तो अधेमधे ज्योतिष्यविषयक सल्ला विचारायला येऊ शकतो. एखादा अट्टल चोर, खुनी गुंड हा कधी ज्योतिष्याला विचारून चोरी करायला जात नाही. त्याची चोरी करायची एक मानसिकता (वेड) असते. शिवाजींना स्वराज्याचे वेड होते, अनेक मोठमोठे क्रांतिकारी ह्यांना अशीच अनेक वेडे होती. त्यांनी ज्योतिष्यांना विचारून त्यांचे कर्म केले नाही, उलट नंतर ज्योतिष्यांनी त्यांचा अभ्यास करायचा प्रयत्न केलाय. सलमान खान ह्या महाभागाने आजच कोर्टात "मी फक्त पाणी पिउन गाडी चालवत होतो" असे लेखी दिले आहे, त्यावरून मी त्याची जन्मकुंडली सहज तपासली. फारच भयंकर!! एकाला खलास केले, अनेकांना जखमी केले, तरीही हा माणूस अजुनही पैश्याच्या गुर्मीत जगतोय आणि आपली सिस्टीम त्याला सहन करतीय. तो मस्त गावभर फिरतोय. कोणी त्याची कुंडली उघडली नाही. असे चोरांचे दिवस किती सहन करणार आपण? आपणच त्याला पैसे मिळवून दिले आणि तोच आपल्याला रस्त्यावर चिरडतो. थोडीही माणुसकी त्याच्यात नाही. हा जसा सलमान तसेच आपले राजकारणी लोक !!. ज्या छगन भुजबळला लोकांनी आपला आपला म्हणून मोठा केला त्यानेच जनतेचा केसाने गळा कापला. कोणीही ह्या लोकांच्या कुंडल्या का खोलत नाहीत. अरे तरुणानो पुढे या, शिका निरीक्षणे करा, ती नोंदवा. सिद्ध करा ज्योतिष्य. बरेच काम आहे इकडे. नाहीतरी तुमचे आईवडील कष्टात जगले आणि तुम्हाला शिकवत आले आहेत. तुम्ही शिकता ते परदेशी विद्या. पण त्यातून काही होत नसेल तर इकडे या आणि संशोधन करा. अवघड वेळ आली कि ज्योतिष्यासमोर हात करून बसण्यापेक्षा स्वतः शिका आणि मोठे व्हा. असे मोठे झालात तर नक्कीच तुम्ही सर्वश्रेष्ठ असाल.

No comments:

Post a Comment