Monday, 11 April 2016

ज्योतिष्य म्हणजे मिनिटामिनिटाचे भविष्य सांगणे नव्हे

बरयाचदा लोक त्यांची जन्मवेळ मिनिट सेकंदाच्या अचूकतेने सांगतात. त्यांची अपेक्षा हीच असते कि त्यावरून निघालेली कुंडली ह्यातून त्यांच्या जन्मात घडणारया प्रत्येक गोष्टीचे अचूक व तंतोतंत भविष्य ज्योतिष्याने सांगावे. तर असे काही नसते रे बाबांनो! असे मिनिटामिनिटाचे भविष्य व गणित करता येऊच शकत नाही हे माझे निरीक्षण आहे. जे कोणी असे सांगत असतील त्यांना एकतर वाचाशक्ती इत्यादी चमत्कारी प्रकार सिद्ध असू शकतात किवा त्यांना ज्योतिष्य शास्त्राचे अगाध ज्ञान असू शकते. त्यातील वाचाशक्ती विषयाचे मला फारसे माहित नाही म्हणून इथेच तो विषय थांबवतो. 
तर जन्मकुंडली किवा प्रश्नकुंडली यांची अचूकता २ तासांची असते. एक लग्न हे अंदाजे २ तासांचे असते, म्हणजे २ तासांच्या अंतराने कुंडलीतील ग्रह त्यांचे स्थान बदलतात. उदा. एकाचा जन्म मेष लग्नावर झाला असेल तर त्यानंतर २ तासांनी जन्म झालेला माणूस हा वृषभ लग्नाचा असू शकतो. ह्या २ तासात लग्नाचे अंश जरी बदलत असले तरी ग्रहांचे अंश आणि त्यांच्या अंशात्मक युत्या त्याच राहतात. उदाहरणार्थ सूर्य मेष राशीला १२ अंशांवर आहे तर लग्न कितीही बदलले तरी सूर्य १२ च अंशावर राहतो, किवा शनी मंगळ ह्यांचे अंश १२ व १३ असतील म्हणजे त्यांची अंशात्मक युती होत असेल तर ती एक-दोन दिवसात तशीच राहते, बदलत नाही. जोवर मंगळ हा शीघ्रगती ग्रह पुढे जात नाही तोवर हि युती टिकून असते. मंगळ साधारणतः दीड दिवसात एक अंश इतके अंतर कापतो तर शनि एका महिन्यात एक अंश पुढे सरकतो. म्हणजे शनि मंगळ युती तुटायला ३-४ दिवस लागतात. चंद्ररास ही अडीच दिवसाने बदलते. 
थोडक्यात सांगायचा मुद्दा हा कि २ तासात लाखो मुले जन्माला येतात त्यांची सर्वांची कुंडली व त्या अनुषंगाने त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ह्या सारख्याच असतात असे होत नाही. तरीही जुळी मुले ह्यांचे चेहरे, शरीर, आयुष्यातील घटना ह्या बऱ्याच प्रमाणात सारख्या घडतात त्याला आपण जुळ्याचे दुखणे म्हणतो. 
कुंडली म्हणजे गणित करून तंतोतंत जुळणारे भविष्य कथन करणे असे नसते. कुंडली हा एक ठोकताळा असतो. फार पूर्वी नुसते हाताने तपासून आतील हाड मोडले आहे का ते गाववैद्य सांगायचे. पुढे एक्स-रे ने अधिक माहिती मिळू लागली. आता एम. आर. आय. करतात. पण जो अनुभवी डॉक्टर असतो तो नुसते हाताने तपासून किवा साधा एक्स-रे बघून हाड मोडले आहे हे सांगतो, त्याला एम. आर. आयची गरज नसते. नुसते हाताने दाबून (चोळून) मोडलेले हाड पूर्वी जोडले जात असे. त्यालाच आता क्लोजड फिक्सेशन असे म्हणतात. तसेच कुंडलीचे आहे. कुंडली पाहणारे अनुभवी जे मोडलेले नाही ते पाहत नाहीत पण जे मोडले आहे ते त्यांच्या नजरे समोरून सुटू शकत नाही. 
कुंडली मांडण्यातील खरे कौशल्य पूर्वीच्या काळी ग्रहांच्या गतीचे अचूक गणित करण्यात होते. ते आता कम्प्युटरच्या मध्यमातून फार सोपे झालेले आहे. पण मांडलेल्या कुंडली वरून नक्की काय गडबड आहे हे कम्प्युटर सांगू शकत नाही. त्यासाठी मानवी बुद्धीच्या तर्काचीच गरज लागते.
एक्स-रे तपासणाऱ्या डॉक्टरला एखादे हाड मोडलेले असताना माझी बाकीची हाडे किती बळकट आहेत ते जरा सांगा म्हणून तुम्ही अडून बसलात तर तो तुम्हाला रामराम करेल यात वाद नाही. बरेच लोक ही अशीच कामे करतात. इथे नोकरी गेलेली असते किवा नवरा बायकोचे वितुष्ट सोडचिठ्ठी पर्यंत गेलेले असते तेव्हा मला गर्भश्रीमंत होण्याचा राजयोग कधी आहे हा प्रश्न ते विचारत असतात. त्यांचेही काही चुकत नाही. कारण आधीच ज्योतिष्य हे दोष हुडकण्याच्या ऐवजी, स्तुती व स्वप्नरंजन करण्यासाठी भरपूर वापरले गेलेले आहे त्यामुळे या शास्त्राची बदनामी झालेली आहे. शिवाय राजेशाहीच्या काळात एखाद्या राजाला जर त्याचे दुर्दैवी भविष्य सांगितले तर त्याने तरवारीने मुंडके उडवायची भीती. काहीच सांगितले नाही तर उपाशी मरायची पाळी. त्यामुळे निस्पृह आणि रोखठोक भविष्य सांगणे हे कमी आणि वाढीव गोष्टी त्यात टाकत राहणे हे होत गेले. 
क्रिकेट विश्वचषक २०१६ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना भारत जिंकणार, तसेच विश्वचषक सुद्धा भारत जिंकणार असे कोण्या ज्योतिष्याने ठोकून दिले. असे कशावरून त्याने ठरवले तर दोन्ही टीमचे कप्तान ह्यांच्या कुंडल्या त्याने काढल्या. हे अजब तर्कट लावले गेले! जर कप्तान हाच ११ खेळाडूंच्या जागी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करीत असला असता तर ते एकवेळ ठीक होते. पण संघ हा ११ वेगवेगळ्या व्यक्तींचा असतो. तो ज्या देशाचा असतो त्याचे काय. देश, राष्ट्र अश्या विस्तृत विषयावर असे मटका पद्धतीचे भविष्य सांगणे म्हणजे खरेच असे ज्योतिषी धन्य आहेत. असे काही ज्ञानकक्षेच्या बाहेरचे आहे ते लोक रंजनासाठी व प्रसिद्धीसाठी सांगणे टाळले पाहिजे. उद्या खरेच भारत विश्वचषक जिंकला असता तर ही भविष्यवाणीची बातमी मोठी करून अनेकदा वाजवली गेली असती हेही पुढे आलेच. तर हे सगळे टाळायला हवे. येत नसेल आणि माहित नसेल तर तसे स्पष्ट सांगणे उत्तम हेच खरे!
हे कुठेतरी थांबले पाहिजे. केंद्रात १-२ शुभग्रह स्वराशीचे, किवा उच्चीचे असले, ८-१२ स्थानी कुठलेही ग्रह नसले तर अशी पत्रिका सर्वसामान्य पत्रीकेहून सरस असते. ८-१२ स्थानात कुठलेही ग्रह असले कि कसलीतरी पिडा संबंधित व्यक्तीला असतेच असते. 
पण विचारणारे हार मानीत नाहीत. मला मुलगा होणार कि मुलगी? संतती विषयक अभ्यास हा पंचम स्थानावरून होतो. पण ह्याच पंचम स्थानावरून विद्या, उदर (म्हणजे बरगडीखालचे पोट) आईचे वडील म्हणजे आजोबा ह्यांचा अभ्यास केला जातो! मला बहिण आहे कि भाऊ? व ते किती आहेत? अरे जे बहिण भाऊ तुमच्या कसल्याच मदतीला येत नसतील ते असून नसून उपयोग काय आणि उपयोग (प्रभाव) नसेल तर ते पत्रिकेत दिसणार कसे? तेच तत्व संततीला लागू पडते. त्रितीय स्थान हे भाऊ-बहिणींचे स्थान आहे म्हणजे तिथले ग्रह बहिण-भाऊ व त्यांची संख्या दर्शवितात असे नाही. कारण तिसरे स्थान हे भाऊ-बहिण यांचे असले तरी ते पराक्रम, प्रवास स्थानही आहे. ज्यांना आपण तुमचे भाऊ-बहिण हे तुमच्या मदतीला धावतील असे सांगतो तेच त्यांचे भाऊ-बहीण तिकडे भाऊ बंदकी करत कोर्टात केसा करत असतात. त्यामुळे बरेचदा अशा लोकांना त्या स्थानातील ग्रह यावरून किती बहिण-भाऊ आहेत हे सांगायच्या फंदात पडू नये. तसे नसतात सुद्धा. कधीकधी तिथे स्वराशीचा रवि, शनि असे ग्रह असतात त्यातून अशी पत्रिका असलेला माणूस मोठे पराक्रम करतो, प्रवास करतो. पण बहिण-भाऊ तो जिवंत आहे कि मृत हे त्याला विचारायला सुद्धा येत नाहीत. त्यामुळे संबंधित माणसाचा सर्वांगीण अभ्यास करून मगच काय ते सांगावे. विचारनार्याने सुद्धा सगळे अचूक असावे अशी अपेक्षा का करावी? असे अचूक काहीच नसते. लोक नुसते जन्मतारीख, वेळ, ठिकाण समोर टाकतात आणि माझे सगळे तंतोतंत भविष्य सांगा ही अपेक्षा का करतात. शिवाय दक्षिणा देताना अकरा रुपये देतात. अरे ही काय वडापावची गाडी किवा भाजी मंडई नाही रे बाबांनो! जसे शारीरिक अडचणी आल्या कि डॉक्टरवर भरमसाठ पैसे खर्च करता तसे घरात रोजच्या जीवनात अडचणी आल्या कि का करत नाही? तिथे बरेच महाभाग २-२ मुले मोठी झालेली असताना घटस्फोट देऊन मोकळे होतात. किती खर्च केला मुलांवर? किती जीव लावला त्यांना? त्याचे मोल काय आहे? असल्या बुद्धिवादी हेकेखोरपणा पेक्षा अडाणीपणे संसार करणारे कधीही परवडले. निदान स्वतःच्या हट्टाची शिक्षा ते आपल्या निरागस मुलांना देत नाहीत. स्वतःच्या आत्म्यावर अत्याचार तरी करीत नाहीत. असो तर असे अनेक नमुने भेटतात. 
लोकांना लोकशाहीत आपले हक्क फार चांगले दिसतात पण कर्तव्याची जाणीव लवकर होत नाही.
डॉक्टर, वकील ह्यांच्यापुढे काहीही लपवून उपयोग नसतो तसेच ज्योतिष्यशास्त्र्यासमोर काही लपवणे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेण्यासारखे असते. तो तुम्हाला अडचणीत मार्ग दाखवत असतो आणि तुम्ही त्याचीच परीक्षा घेताय होय? अडचणी म्हणजे तरी काय? शारीरिक अडचणी म्हणजे शुगर खूप वाढली, ब्लड प्रेशर वाढले, रक्तवाहिन्यातील ब्लोकेजेस वाढून एन्जेओप्लास्टी  बायपास किवा ओपन हार्ट करायला लागली कि लोक हे लोक निपचित पडून राहतात, ज्यांना आपले हे लाड कोणी करणार नाही हे माहित असते ते गप आपले आजार सहन करत राहतात. अतिअपेक्षा करणारे अपेक्षाभंग झाल्याने मरण पावतात. नाहीतर अन्नपाणी सोडून देऊन प्राण त्यागतात. 
म्हणजे जी आपली मुले (संतती) त्यांच्यासाठी तुम्ही समस्त प्राणिमात्राचा धर्म पाळला ते तुम्ही मरत असताना तिकडे मजा मारत फिरत असतील तर कसला हा प्राणीधर्म? हा तर अधर्म आहे. ज्योतिषाला मला चार मुले आणि अमुक इतके जावई-सुना आहेत हे सांगण्यापेक्षा त्यातील किती तुमच्या संकटकाळात निदान विचारपूस करण्यास आले हे तुम्ही का सांगत नाही? तुम्ही मुलांसाठी, मुलीच्या लग्नासाठी तुमची समस्त संपत्ती खर्च केलीत ना आणि त्यांनी तुम्हाला आता अंतर दिले हे सांगायची तुम्हाला लाज वाटते का? आपण फसवलो गेलोय हे तुम्ही कुणाला सांगता? एका ज्योतिष्याला! आणि कधी सांगता जेव्हा तुमच्या हातात काहीच नसते तेव्हा? मग तुम्ही इतके निरीश्वर, पुरोगामी, सेकुलर संशोधन केले ते कुठे गेले? निदान मृत्यू तरी सुखाने यावा ही तुमची अपेक्षा कोणी पूर्ण करण्यास मोकळे बसलेले नाही. आयुष्याचा तारुण्याचा काळ जितका लोभस असतो तितकाच उतरणीचा काळ भयाण असतो. त्यामुळे सावध व्हा. वेळीच आपले भविष्य सुरक्षित करा, ते दुसर्याच्या हातात देऊ नका.
ज्योतिष्यात स्वप्नरंजन, खोटी स्तुती ऐकणे हे असले सोडा. त्यातील सत्य जाणून घ्या त्याचा सामना करा. कष्ट करा पण पुढे मानाने जगा. उगाच दुसर्याच्या हातात पट्टा असलेले श्वान बनू नका. तरच नवीन पिढी ही कृतज्ञ बनेल. नाहीतर हे फसवाफसवीचे आणि इमोशनल ब्लाक मेलीन्गचे चक्र असेच असेच चालू राहील. 
अशा अडचणीच्या वेळी बरेचदा लोक वकिलाचा सल्ला घेतात. कायदेशीर सल्ला घेणे नक्कीच चांगले. बरेचदा वकीलही दोन्ही पार्टींना सामंजस्याने घ्या. परस्पर मिटवून टाका हा रास्त सल्ला देतात. हेही योग्यच आहे. पण सल्ला ऐकणारे किवा त्यांचे नातेवाईक इतके शहाणे थोडेच असतात. परवाची एक बातमी वाचून हसावे कि रडावे हेच कळेना. एक विवाहित जोडपे त्यांच्यातील वाद मिटवून सरकारी समुपदेशन केंद्रातून बाहेर पडले. त्यांच्यातील सगळे वाद मिटले. पण बाहेर पडताच क्षणी त्यांचे नातेवाईक केंद्राच्या बाहेरच एकमेकांना भिडले आणि सगळ्या केल्यावर पाणी फिरले! असा हा आपला समाज!

No comments:

Post a Comment