Friday, 22 April 2016

कर्मयोगाचे शास्त्र:

बऱ्याचदा फळाची अपेक्षा न करिता कर्म करीत राहणे हे तत्व व्यवहारी मनाला पटत नाही. काहीतरी मिळाल्याशिवाय काहीतरी करणे म्हणजे निरर्थक कर्म करणे असा एक विचार बाळगणारे अनेक लोक असतात.
पण असा विचार करणे किती परिस्थितीसापेक्ष आहे याचा अनुभव आपण घेऊ. 
मुले-मुली अमेरिकेला स्थाईक झाले आहेत, किवा इत्ररत्र त्यांचे ते स्वतंत्र राहत आहेत, अशा मुलामुलींचे वृद्ध पालक ह्यांचे उदाहरण घ्या. किवा नोकरीव्यवसाय निमित्त कर्त्या पुरुषालाच कुटुंब सोडून एकटे राहायची वेळ येते. सकाळी आपले मित्र, शेजारी हे गाढ साखरझोपेत असताना तुम्ही एकटेच फिरायला (व्यायाम करायला) जात असता. इतकेच काय एखादा भरपूर अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा स्वतःला एकटे करून अभ्यास करत असतो. 
अशा परिस्थितीत कर्मयोगाचे महत्व फार असते. तुम्ही एकटे असतना एक असुरक्षिततेची भावना तुमच्या मनात असते. आपल्या आप्तांचे, स्वकीयांचे कसे काय चालले आहे याची काळजी मनात असते. आपले स्वतःचे काय होईल हिही  काळजी असते. 
पण अशावेळी हे सगळे मनातले विचार झटकून एखाद्या कामाला तुम्ही लागलात कि विचार आपोआप बाजूला पडायला लागतात आणि कामाचे विचार मनात यायला लागतात. 
साधे उदाहरण तुम्ही घ्या, तुम्हाला फेरफटका मारायला बाहेर जायचे आहे, जाऊ कि नको या विचारात तुम्ही अडकून बसता. बाहेर फार उन आहे, रस्त्यावर फार ट्राफिक आहे, अंगावरचे दागिने हिसकावणारे बाहेर फिरत असतात. अंगात त्राण नाही. चालायला लागले कि चक्कर येते, अशी अनेक नकारात्मक कारणे समोर ठाण मांडून बसलेली असतात. पण तुमचे संचारस्वातंत्र्य असे एका सोन्याच्या महालात जरी तुम्हाला ठेवले तरी कुणाच्या हवाली करू शकत नाहीत. त्यामुळे मूळ प्राणी  गुणधर्मानुसार तुम्ही बाहेर पडताच आणि पडायलाच हवे. मनाचा हिय्या करून बाहेर पडायलाच हवे. 
एकदा बाहेर पडल्यावर तुम्ही रस्त्यावर चालायला लागता. प्रत्येक जण किती चालायचे हे मनातल्या मनात ठरवत असतो. बाजारातून काय काय घ्यायचे आहे हेही मनात ठरवले जाते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे करून सुरक्षित परत घरी यायचे आहे हेही मनात चाललेले असते. एकदा तुम्ही बाहेर पडलात कि तुमचा मुलगा-मुलगी, नातू, नात काय करत असतील ह्याचा विचार मनात येत नाही, पण समोरून येणारा गाडीवाला मला उडवणार तर नाही ना? ह्याची अधिक काळजी तुम्ही घेत असता. शेवटी फेरफटका मारून तुम्ही घरी सुखरूप पोचता आणि तुमचे ते कर्म पुरे होते. 
मनुष्य प्राणी बुद्धिमान असल्याने त्याने कर्माचा फेरा चुकवला. अनेक यंत्रे आज आपल्या दिमतीला आहेत. घरातच ट्रेड-मिलवर व्यायाम होतो. हॉटेलला ऑर्डर दिली कि ते जेवण घरपोच देतात. संपर्क करायचा असल्यास मोबाईल फोन, इंटरनेट आहेतच. म्हणजे कर्म करणे गरजेचे नाही. म्हणजे एकाच जागी बसून चिंतन करून नसत्या चिंता करत बसायच्या का?
प्राणी असे करतात का? एखादा वाघ, सिंह, वानर म्हातारे झाले म्हणून त्याचे अन्नशोधाचे कार्य बंद करून निवांत बसतो का? तर नाही. तो परत त्याची स्फूर्ती वापरून नव्या जोमाने कामाला लागतो आणि आपला चरितार्थ साधतो. हे साध्या प्राण्यांना कळते पण बुद्धिमान माणसाला कळत नाही. अशी छोटी-छोटी अनेक कामे तुम्ही स्वतःची स्वतः करायला लागलात तर स्वतःला कणखर बनवत असता. कोण जवळ आहे आणि कोण सोडून गेले का गेले याचा निरर्थक हिशेब करण्यात काहीच अर्थ नाही. स्वतः कणखर बनलात तर कोण येवो अथवा जावो. तुम्ही तिथेच राहता. येणारे जाणारे येत जात राहतात. 
तर असा हा साधा सरळ कर्मयोग आहे. हे जगायचे एक शास्त्र आहे. व्यक्ती, आणि संचार स्वातंत्र्याचा प्रवर्तक असा हा कर्मयोग आहे. जे तुमच्या जवळ नाही त्यासाठी कुढत बसण्यापेक्षा जे आहे त्यात कसे आनंदी राहायचे ह्याचे हे तत्व आहे. मुले आईवडिलांवर मायेची आड घेऊन गुलामगिरी लादतात, तर आईवडील कधी कधी आपले हक्क दाखविण्यासाठी मुलांवर गुलामगिरी लादतात. अशी हि लादलेली गुलामगिरी कोणालाही नको असते. तेव्हा आपले अस्तित्व कर्मयोगाने सिद्ध करणे गरजेचे असते. इतकेच!!
 

No comments:

Post a Comment