ओशोंचे गणेश जन्मावरील भाष्य ऐकले त्यात त्यांनी हिंदू लोक भंपक काल्पना जसे की पार्वतीचा मळ, शंकर हिंस्त्र होणे , हत्तीचे शीर लावणे इत्यादी बद्दल बोलत आहेत व हिंदू लोक अजून प्राचीन आदिमानव जीवन जगत आहेत असा दावा केला. ते ज्ञानी आहेत पण पुराण कथांचा अन्वयार्थ लावताना बरेच गूढ विचारात घ्यावे लागते.
Avinash Pataskar
मी अंधश्रद्धा पसरवत नाही. चिकित्सेच्या आधारे जे सत्य सापडते तेच मांडतो!
Thursday 18 August 2022
अन्वयार्थ : गणेश जन्म
Wednesday 9 March 2022
देव दृष्टांत किंवा देवाची इच्छा समजणे!!
देवाचे अस्तित्व मान्य करणे ही सगळयात पहिली अट देवाचे परिणाम कळण्यासाठी आवश्यक आहे . देव ही संकल्पना माणूस सर्वशक्तिमान नाही हेच सिद्ध करण्यासाठी झालेली आहे हे आपण आधी मान्य करायला हवे. देव आपल्यापासून कधी दुरावतो ? जेव्हा आपण स्वतःला देव मानायला लागतो तेव्हा !! आपण अनेक इच्छा अत्यंत तीव्रतेने व्यक्त करतो व देवाला साकडे घालतो , नवस बोलतो विनवणी करतो पण ती इच्छा योग्य की अयोग्य हे आपल्याला माहीत नसते तर देवाला माहीत असते. अश्या अनेक मागण्या करून आपण आपले ऐहिक सुख प्राप्त करण्याच्या नादात आपले दैवत रुष्ट करून घेतो . देवाची आपल्याबद्दल काय इच्छा आहे हे विसरतो . इच्छा व्यक्त करताना आपण केंद्रीभूत असतो व आपल्या आजूबाजूचे , कुटुंबातील लोक यांना किंचितही किंमत नसते . पण देव सर्वांचे हित बघत असतो .
सर्वात लवकर दृष्टांत देणारे दैवत हे कुलदैवत जरी असले तरी आपण अनाठायी इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस इत्यादी बोलून त्याला दूर करवतो. मग काय करावे ?
आधी देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काय ? हे पाहू .
परमेश्वर सर्वशक्तिमान व सर्व जग चालवणारा आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे . म्हणजे मी स्वतः एखादे कृत्य करतोय ते अगदी क्षुल्लक आहे व परमेश्वराच्या जग चालवण्याच्या कृत्यापैकी तो एक क्षुल्लक भाग आहे असे आपण समजले पाहिजे व तसे असतेही. आपल्या आहार, निद्रा , मैथुन , भय , स्वार्थ , राग , चीड , अहंकार या नैसर्गिक प्रवृत्ती व त्याची इच्छा या खूप वाढतात. या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर मनुष्य प्रक्षुब्ध होतो . देवाकडे काही लोक यातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मागणी करतात. जर ती पूर्ण झाली नाही तर माणूस देव झूट आहे असे समजायला लागतो . दुसरे असे की माणूस देवाला किराणा मालाचे दुकान समजतो आपल्याला पाहिजे ते मागतो व त्याबद्दल काहीतरी देण्याचे कबूल करतो . आपल्याकडे सोपा भक्ती मार्ग असल्याने दैवत चांगली फळे देते. पूजा भक्ती हा तंत्र मार्ग आहे व सोपा आहे . याशिवाय मंत्र तप इत्यादी अवघड मार्ग आहेत . ते अचूक व कष्टाने साध्य करावे लागतात. अनेक लोक दुर्गासप्तशती हवन मनन करतात पण त्यातील अर्थ फारसा समजत नाही. पण साधी घटस्थापना ह्या तांत्रिक भक्तीयुक्त मार्गाने देवीची मोठी कृपा होते . पण तरीही आपण ऐहिक जीवन जगताना मागण्या करणे व पूर्ण करवुन घेणे यापुढे कधी जातो का ? देव सर्व चालवत आहे , देवी महामायाच्या कृपेने आपण सांसारिक मोहात अडकत असतो व तीच त्यातून दुरही करते .
पुढे पहा की युद्धाचे दिवस असतील तर आपण शांततेच्या बदल्यात गुलामी मान्य करू का ? किंवा दुष्काळात उपोषण करण्याचा सल्ला देऊ का ? कोरोनात स्वातंत्र्य म्हणून रस्त्यावर गर्दी करू का ?युद्ध दुष्काळ आजार हे सर्व दैवजनीत आहेत . आपण फार क्षुद्र आहोत व देव फार मोठा आहे हेच यातून निर्देशित होते ना? मग आपण देवाच्या इच्छेनुसार चाललो व आपल्या सर्व इच्छा देवाला समर्पित करून कार्य केले तर काय होईल ?
हे नक्की करून पहा : इच्छा देवाला समर्पित करा तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून कार्य करायची प्रेरणा देतो . स्वतःचे हट्ट पूर्ण करण्याऐवजी देवाचे कार्य पूर्ण करा .
यालाच दृष्टांत असे म्हणतात. अश्यावेळी ज्येष्ठ, अगदी लहान बालके , त्रयस्थ लोक देवरूपाने येऊन सल्ला देऊन जातात. असा सल्ला खूप चमत्कारी योग्य असतो . मी अनुभव घेतला आणि इतरांना मिळावा म्हणून केलेला लेख प्रपंच !
Friday 8 January 2021
प्राणी-पक्षी शकून अपशकून.
प्राण्यांचे आणि पक्षांचे मानवाशी अगदी उत्क्रांतीच्या काळापासून नाते आहे. मानव ज्याज्या बाबत शारीरिकदृष्ट्या कमी आहे त्यात्या बाबत त्याने आजूबाजूच्या प्राणी आणि पक्षांची मदत त्याचे प्रश्न सोडवण्यास घेतली आहे. ह्या सर्व प्राण्यांना मानवापेक्षा एक तिसरी शक्ती (third sense) अस्तित्वात असतो त्याचा उपयोग मानव आपली जी कमकुवत शक्ती आहे ती वाढवण्यास करीत असतो. याशिवाय पाळीव प्राणी-पक्षी व न पाळलेले प्राणी-पक्षी यांच्याकडूनही अनेक संदेश निसर्गतः मिळत असतात तेही काय आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे.
कुत्रा-अशुभ: कुत्रा दोन प्रकारचे संदेश लगेच देतो असा माझा वयक्तिक अनुभव आहे, त्यातील पहिला अनुभव मी भूकंपाचा घेतला होता १९९०-२००० च्या दशकात लातूर किल्लारीला भूकंप झाले तेव्हा पुण्यातही हादरे जाणवले. विशेष म्हणजे आम्ही पाळलेली स्टेफी ही जर्मन शेफर्ड कुत्री इवळत नव्हती पण बरीच अस्वस्थ दिसत होती. रात्रभर भूकून भूकून तिने बेजार केले होते. शेवटी मध्यरात्री ३.०० वाजता तो भूकंप झाला व त्यानंतर १ तासाने ती शांत झाली. दुसरा प्रकार वेगळा आहे, त्यात कुत्रे काहीतरी भयंकर संकट येणार हे समजून इवळयला लागतात. बाहेरील रस्त्यावरील कुत्री असे करीत असतील तर तुम्ही त्यांना हाकलून लाऊ शकता व ते दुसर्या जागी जाऊन तोच कार्यक्रम चालू ठेवतात. अशावेळी गल्लीतील कोणा एकाची वाईट बातमी हाती येते. तुमचे घरातील कुत्रे जर असे इवळत असेल तर घरातील कोणाला किवा जवळच्या नातेवाईकाला प्राणसंकट आहे असे धरून चालावे.
कावळ्याची जोडी -अशुभ: सहज दोन बसलेले कावळे आणि जोडी यात फरक आहे. जोडी म्हणजे कावळा आणि कावळी. जेव्हा ते घरटे बनवितात तेव्हा आसपास ते एकत्र असतात. ह्या स्थितीला कावळ्याची जोडी म्हंटले जाते.
अशी कावळ्याची जोडी एकदा दिसली असता तुम्ही आपल्या देवघरातील देवांचे दर्शन करून एक दीप प्रज्वलित करून त्रासापासून मुक्ती मिळवू शकता. पण रोजच जर दर्शन होऊ लागले तर पुढे एका वाईट घटनेची चाहूल ते देत आहेत हे समजून चालावे. अशावेळी तुमची जागा बदलणे, खिडकी बंद ठेवणे असे उपाय योग्य ठरते. तसेच जवळच्या नातेवाईक यांच्यापैकी कोणी वयोवृद्ध, आजारी असेल तर विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
टिटवी-अशुभ: टिटवी सहसा पाणथळ व निर्जन जागी अंडी व पिल्ले ठेवते. जेव्हा तिथे इतर पक्षी, मनसे किवा कुत्रे येतात तेव्हा ती मोठा कोलाहल करते. अशा कोलाहलात तुम्ही सापडला तर तिटवीचा अपशकून होतो. हा प्रत्येक माणसागणिक वेगवेगळा असू शकतो. एखाद्याला त्यानंतर पुढे लहान भांडणे होऊन मुक्ती मिळते किवा दुसरा मोठ्या अपघातात गारद होतो. यासाठी कुलदैवत दर्शन घेऊन द्वीप प्रज्वलित करून मनात आहे तो मंत्र म्हणून व्याप्ती कमी करता येते.
भारद्वाजपक्षी-शुभ: हा पक्षी मोठी झाडे, गवताळ प्रदेश अशा ठिकाणी वास्तव्य करतो. भारद्वाज पक्षी दिसला असता, काम यशस्वी होते. पैसे आणायला जाणार असताल तर पैसे लगेच मिळतात.एका मोठा इरिगेशन खात्यातील साहेब त्याच्या खुर्चीवर बसलेला असताना त्याला रोज भारद्वाज दिसायचा आणि त्याला रोज कोणीतरी पाकीट आणून द्यायचे तेव्हा ह्या शकुनाचे महत्व पटले. असो. मोर हा पक्षीही भारद्वाज सारखाच फळे देतो.
साळून्क्यांची जोडी: दिसली असता मुलाला अनेक मुली भेटतात, किवा मुलीला दिसल्यास अनेक मुले भेटतात. त्यांच्याशी चर्चा व मैत्री होते.
सवाष्ण स्त्री -शुभ: घरातून बाहेर पडून थोड्या अंतरावर सवाष्ण स्त्री दिसल्यास कार्यभाग सध्य होतो.
विधवा स्त्री -अशुभ: घरातून बाहेर पडून थोड्या अंतरावर किवा लगेच विधवा स्त्री दिसल्यास कार्यभाग सध्य होत नाही अडचणी येतात. उपाय वरीलप्रमाणेच.
घरात हिरव्या बांगड्या फुटणे हेही अशुभ आहे, उपाय वरीलप्रमाणे करावा.
ब्राम्हण बोडका व स्मश्रू केलेला आल्यास कार्यसिद्धी होत नाही.
उजवे व वरील नेत्र पुरुषाचे फडफडले तर तो शुभ योग समजला जातो व यश संपत्ती येते.
डावे व वरील नेत्र स्त्रीचे फडफडले तर तो शुभ योग समजला जातो व यश संपत्ती येते. या विपरीत घडल्यास ते अशुभ समजले जाते.
ज्यावेळी एखाद्या कामास बाहेर पडता तेव्हा दिवसा डाव्या नाकपुडीतून श्वास घेतला जात असेल तर ते शुभ होय. तेच रात्री कामास बाहेर पडताना उजव्या नाकपुडीतून श्वास घेतला जात असेल तर ते शुभ होय.
तर हे आहेत सामान्य शुभाशुभ शकून अपशकून. आता बरेच शकून अपशकून कालबाह्य झालेले आहेत. कारण ते प्राणी पक्षीच अस्तित्वात नाहीत.
यातील बरेच शकून अपशकून शेतकरी आणि कष्टकरी वर्गास लागू नाहीत. गृहस्थ, राजा, व्यवसायिक, ब्राम्हण यांना याचे फळ प्रकर्षाने जाणवते.
||शुभम भवतु||
Saturday 24 October 2020
दुर्गा सप्तशती सारांश भाग -३ अंतिम भाग
दुर्गा सप्तशती सारांश भाग -३
अध्याय ६, ७, ८, ९ व १०
शुंभ निशुंभाचा दूत परत आला व त्याने विस्तारपूर्वक देवीशी झालेले बोलणे शुंभ निशुंभाना सांगितले. त्यावेळी ते दोन्ही राक्षस भयंकर चिडले. त्यांनी त्यांचे लाखो हजारो सेनापती कोटीच्या कोटी सेनेसोबत देवीला बंधक बनवून आणण्यासाठी रावाना केले . त्या सेना देवीजवळ पोहोचताच थांब थांब असे देवीला उद्देशून ओरडू लागल्या. तेव्हा देवीने फक्त हुंकार देऊन त्यातील अनेक असुरांना संपवले. देवीचा सिंह त्या असुरसेनेत घुसला व त्याने जंगलात जसा वणवा पेटतो तसा हाहाकार दैत्यसेनेनेत माजवला. देवीने स्वतःचे मुख विस्तीर्ण केले आणि अनेक असुरांना गिळंकृत केले. अनेकांना गदेने चूर्ण केले. खड्गाने कित्येकांना मधोमध चिरले तर कित्येकांना विनाशीर करून टाकले.
देवीच्या शरीरातून तिच्या अनेक प्रतिभूती निर्माण झाल्या व त्यांनी दैत्यसेनेचा प्रचंड संहार सुरु केला. हे सर्व पाहून दैत्यसैन्य पुन्हा शुंभ निशुंभाकडे गेले तेव्हा त्याने महाहनू नामक दैत्याला सेनेसह देवीशी युद्ध करण्यास पाठवले. त्यालाही देवीने सहज मारले.
त्यानंतर शुंभ निशुंभाने रक्तबीज नावाच्या असुराला देवीशी लढण्यास पाठवले. देवीने रक्तबीजावर चक्र व खड्गाने प्रहार केले पण जेव्हा जेव्हा रक्तबीजाचे रक्त जमिनीवर सांडले तेव्हा तेव्हा त्यातून नवीन असुर जन्माला येत होते व लढत होते. त्यांच्याशी लढताना देवीच्या चेहऱ्यावर किंचितही दमल्यासारखे दिसत नव्हते.
देवीने आपल्या शरीरातून काली नावाची प्रतिभूती निर्माण केली. आणि तिला तिचे मुख विस्तीर्ण काण्यास सांगितले. तसेच हेही सांगितले कि जेव्हा जेव्हा रक्तबीजाचे रक्त जमिनीवर सांडत असेल त्याआधीच ते तू पिऊन टाक.
त्याप्रमाणे कालीदेवीने रक्तबीजावर देवीने वार करताच जे रक्त सांडत होते ते चटकन पिऊन घेतले तसेच त्यातून जे असुर जन्माला येत होते त्यांनाही गिळंकृत करून टाकले. असे करता करता रक्तबीजाचे रक्त वाहून तो क्षीण झाला व देवीच्या एका प्रहरात मृत्युमुखी पडला.
हि बातमी ऐकून शुंभ निशुंभ भयंकर चिडले व राहिलेले राखीव सैन्य घेऊन देवीशी लढण्यास पोहोचले. देवीने शक्तीच्या एका प्रहरात मागे उभ्या असलेल्या शुम्भाला खलास केले. ते पाहून निशुंभ भयंकर प्रक्षुब्ध झाला. त्याने प्रथम मायावी युद्ध सुरु केले. वेगवेगळ्या रूपात तसेच कधी आकाशात तर कधी जमिनीवर असे तो देवीवर प्रहार करू लागला. तसेच त्याचा अनेक प्रतिकृती निर्माण होऊन त्या देवीबरोबर लढू लागल्या. हे पाहून ब्रम्हा, विष्णू महेश व अन्य देवता देवीच्या मदतीस आल्या. ब्रम्हाची शक्ती ब्राह्मणी, शिवाची शक्ती वृषभारूढ चंद्रलेखा, विष्णूची शक्ती वैष्णवी, इंद्राची शक्ती ऐंद्री, कार्तिकेयाची शक्ती मोरावर स्वार होऊन देवीच्या शरीरात मिळाली तसेच वेळप्रसंगी वेगवेगळ्या प्रतिभूती बनून मायावी निशुंभाषी वेगवेगळ्या मोर्च्यावर लढू लागल्या. तुंबळ युद्ध चालू होते. तेव्हा भगवान शिवशंकर देवीस म्हणाले हे देवी तू या असुरांचा नाश कर! तेव्हा देवी म्हणाली हे महादेव आपण माझे दूत बनून असुरांना जाऊन सांगा कि तुम्ही पाताळात निघून जा. देवांना त्यांचे राज्य परत द्या . यामुळे देवीस शिवदूती नावाने ओळखले जाते. पण असुरांनी महादेवाचे म्हणणे ऐकले नाही. उलट निशुंभ देवीस म्हणू लागला कि तू स्वतः अहंकारी आहेस व अनेक स्त्रियांची मदत घेऊन माझ्या एकट्याशी लढत आहेस. त्यावर देवी म्हणाली ह्या सर्व देवी माझ्याच प्रतिभूती आहेत त्यानंतर त्या सर्व देवी देवीच्या शरीरात समाविष्ट झाल्या. त्याचवेळी निशुंभाने देवीवर प्रहार केला पण त्याचा किंचितही परिणाम देवीवर झाला नाही. उलट देवीने बाणाने त्याची ८ चंद्र असलेली ढाल व तलवार नष्ट केली. देवीच्या सिंहाने निशुंभावर हल्ला केला तेव्हा तो आकाशात जाऊन लढू लागला मग देवी सुद्धा आकाशात त्याच्याशी लढू लागली. देवीचा एक खड्गप्रहार वर्मी लागून तो असुर जमिनीवर कोसळलेला व तिथेच गतप्राण झाला त्यावेळी मोठा भूकंप झाला. त्यानांतर अशुभ उल्कापात बंद झाले, ग्रह व नद्या आपल्या मार्गावर चालू /वाहू लागले . हे युद्ध व निशुंभाचा वध झालेला पाहून देव प्रसन्न झाले व देवीची स्तुती करू लागले.
अध्याय ११
देवांनीअग्नीला पुढे करून देवीची स्तुती सुरु केली. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।। हा अध्याय ११ व्या मंत्रातील भाग आहे. देवी तू सनातन आहेस. तुझे शरीर दिव्य असून चेहरा व सूर्यसमान तेजस्वी आहे. तुझे स्तन त्यात अधिक शोभून दिसतात. तू मोहरूपिणी असून निर्सगचक्र चालवण्याचे महान कार्य करीत असते. तू जल, अन्न,काष्ठ इत्यादी आहेस तसेच तहान भूक ह्या सर्व मानवांच्या गरजा निर्माण करणारी आहेस. तसेच मोक्ष बुद्धी कला काष्ठा प्रदान करणारी मंगलमयी देवी आहेस. उत्पत्ती पालन संहारकरणारी तूच आहेस. शरणागताची पीडा दूर करणारी तूच आहेस.
चाप खड्ग शंख गदा धारण करणारी देवी तुला नमस्कार असो. त्रिनेत्रा सुलक्षणी श्रद्धा मेधा सरस्वती ईशा विद्या तूच आहेस तू आदिवाक्य प्रमाण आहेस. विश्वपिडा,महामारी,चोर,लुटेरे,समुद्रातील वादळ, जंगलातील वणवा मोठ्यात मोठे संकट दूर करणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे? देवीची स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली व तिने देवांस वर मागण्यास सांगितले. तेव्हा देव म्हणाले हे देवी जेव्हा जेव्हा त्रिलोकांवर संकट येईल तेव्हा तेव्हा तू ते नष्ट कर. तेव्हा देवी म्हणाली वैस्वत मन्वंतराच्या २८व्या युगात शुंभ निशुंभ नावाचे अन्य दानव निर्माण होतील त्यांचा संहार करण्यासाठी मी यशोदेच्या पोटी जन्म घेऊन विंध्य पर्वतावर जाऊन राहील व त्या राक्षसांचा नाश करील त्यानंतर विप्रशक्ती नावाच्या दैत्यांचा मी अतिशय भयंकर रूप धारण करून नाश करील त्यावेळी माझे दात हे डाळिंबाच्या दाण्यासारखे लाल होतील म्हणून लोक मला रक्तदन्तिका नावाने ओळखतील. त्यानंतर पुढे १०० वर्षे पाऊस पडणार नाही तेव्हा मी शाकंभरी रूपात येऊन माझ्या फांद्या (शाखा) च्या द्वारे सर्व लोकांचे पोषण करील. दुर्गम नावाच्या राक्षसाचा नाश करून मी दुर्गा नावाने प्रसिद्ध होईल. हिमालयातील राक्षसांना मारून मी भीमादेवी नावाने प्रसिद्ध होईल . अरुं नामक दैत्याला मारण्यासाठी मी सहा पायांच्या भुंग्याचे रूप धारण करील त्यामुळे लोक मला भ्रामरी नावाने ओळखतील.
अध्याय १२ फलश्रुती
सर्व संकटात देवीचे स्मरण केले असता ती त्वरित धावून येते. तिचे यज्ञ दान पूजा इत्यादी प्रकारे पूजन केले असता ते स्थान ती कधीही सोडत नाही. सज्जनांचे ती मंगल करून त्यांना सुखी व ऐश्वर्यवान करते तर दुर्जनांना दरिद्री बनवते. जे तिच्या शरणी जातात त्यांची पीडा ती निश्चित दूर करते यात तिळमात्र शंका नाही. भयंकर संकटात ती भक्तांचे रक्षण करते. ती भक्ताचे सर्व दिशांनी, सर्व ग्रहांपासून , सर्व संकटांपासून रक्षण करते.
अध्याय १३ राजा सुरथ व समाधीला देवीचे वरदान
तर अशाप्रकारे देवीचे चरित्रमाहात्म्य मेधाऋषींनी राजा सुरथ व समाधीला सांगितले. त्यानंतर देवीची व्रतपूर्वक उपासना करण्यास त्या दोघांना सांगितले. त्यांना सप्तशती मंत्र प्रदान केला. तेव्हा ते दोघे नदीच्या कधी जाणून देवीची मातीची मूर्ती बनवून व्रतपूर्वक उपासना करू लागले. सहा महिन्यानंतर त्यांनी आहार कमी कमी केला व शेवटी निराहार राहून देवीची उपासना करू लागले. तेव्हा देवी प्रत्यक्ष तिथे अवतीर्ण झाली व त्या दोघांस वर मागण्यास सांगितले. तेव्हा राजा सुरथने आपले राज्य परत मिळावे तसेच आपल्याला कधीच नष्ट न होणारे राज्य मिळावे अशी इच्छा प्रकट केली तेव्हा देवीने तथास्तु म्हटले व राजास सांगितले कि तू चैत्रवंशात सूर्याच्या पोटी जन्म घेशील व महान राजा होशील. त्यानंतर सुरथ राजाला त्याचे राज्य परत मिळाले व पुढील जन्मात तो महान सम्राट व वैवस्तर मनू बनला. समाधीला देवीने तुला काय हवे ते माग असे म्हटले. त्यावर समाधी म्हणाला कि माझे मन संसारापासून अनासक्त झाले आहे त्यामुळे देवी तू मला मोक्ष दे . त्यासुमार देवीने त्याला मोक्षमार्ग दर्शविला व देवी अंतर्धान पावली.
समाप्त
Friday 23 October 2020
दुर्गा सप्तशती सारांश थोडक्यात भाग -२
दुर्गा सप्तशती - सारांश. भाग २
अध्याय २,३,४
मेधामूनी सांगतात : महिषासुर राक्षसाच्या सेनेचे देवांशी सुमारे १०० वर्ष युद्ध चालू होते आणि महिषासुर त्यात विजयी होत होता. त्याने देवांचे सर्व अधिकार ताब्यात घेतले होते व देव सामान्य मनुष्याप्रमाणे मृत्युलोकात फिरत होते.
यास्थितीत देवराज इंद्र इतर देवांसहित कैलास पर्वतावर श्रीशिव यांच्याकडे गेले तेथे विष्णूही विराजमान होते. देवांनी सांगितलेले पराभव ऐकून श्रीशिवाचें व विष्णूंचे रागाने मुख वाकडे झाले भुवया वक्र झाल्या. तत्क्षणी शिवाच्या शरीरातून एक शक्ती बाहेर पडली व तिने स्त्रीच्या मुखाचे रूप धारण केले. श्रीविष्णूच्या शक्तीमुळे तिचे हात उत्पन्न झाले. चंद्र वरून वायू अग्नी, सूर्य कार्तिकेय इत्यादी देवतांच्या शक्तीने तिचे पूर्ण शरीर निर्माण झाले. समुद्राने रत्ने, नागाने मणिहार, कुबेराने वस्त्रे , तसेच अनेक देवांनी अनेक शस्त्रे देवीस दिली. पिनाकधारी शंकराने एक त्रिशूल आपल्या धनुष्यातून निर्माण करून देवीला दिला. इंद्राने सिंह भेट दिला.
अशाप्रकारे शस्त्रसज्ज होऊन महादेवी महिषासुराशी युद्ध करण्यास निघाली दोघांचे तुंबळ युद्ध झाले. महिषासुर मध्येच रेड्याचे रूप घेऊन पृथ्वी उध्वस्त करीत होता तर मध्येच हत्तीचे रूप घेऊन देवीवर हल्ला करीत होता. तर पुन्हा मानवी लढत होता. एकदा त्याने रेड्याचे रूप घेतले असता देवीने त्यावर खड्ग प्रहार केला तेव्हा तेव्हा तो मानवी रूपात येण्याचा प्रयत्न करीत असता फक्त त्याचे मुख मानवाचे झाले होते त्यावर देवीने त्रिशूल प्रहार करून त्याला संपवले.
सर्व देव देवीची स्तुती करू लागले. तेव्हा देवी प्रसन्न होऊन म्हणाली देवांनो तुम्हाला जे हवे असेल ते मागा. तेव्हा देव म्हणाले देवी आपण महिषासुराला मारून आम्हाला संकटमुक्त केले आहे तेव्हा आणखी काय मागायचे? पण एकच मागणे आम्ही मागतो आणि ते म्हणजे जेव्हा जेव्हा मानवावर / देवांवर संकट येईल तेव्हा तुम्ही प्रकट व्हावे हीच इच्छा. देवी तथास्तु म्हणून अंतर्धान पावली.
पुढे शुंभ आणि निशुंभ राक्षस जन्माला आले व त्यांनी संपूर्ण पृथ्वी, स्वर्ग यांचा ताबा मिळवला देवांचे सर्व अधिकार घेऊन ते आपले कार्य करू लागले.
त्यावेळी सर्व देव कैलास पर्वताकडे निघाले. त्याचवेळी पार्वतीदेवी स्नानासाठी एका तलावाजवळ आल्या होत्या. त्यांना पाहताच देवांनी त्यांची स्तुती सुरु केली. तेव्हा देवीने विचारले कि देवांनो तुम्ही इथे कशासाठी आला आहात व कोणाची स्तुती करीत आहेत तेव्हा देवीच्याच शरीरातून एक प्रतिकृती प्रकट झाली व म्हणाली देवी पार्वती हे देव शुंभ निशुंभ राक्षसांपासून स्त्रासलेले आहेत व आपलीच स्तुती करीत आहेत. तेव्हा देवीने राक्षसांचा नाश करण्याचे वचन देऊन देवांना परत पाठविले.
त्यानंतर देवीने अलौकिक रूप धारण केले व हिमालयायच्या एका शिखरावर जाऊन बसली. तिचे ते अलौकिक रूप पाहून शुंभ व निशुंभच्या दूतांनी त्यांना हि माहिती दिली व त्या स्त्रीस प्राप्त करावे असा सल्ला दिला.
अध्याय ५
यानंतर शुंभ निशुंभ राक्षसाने आपला दूत सुग्रीव यास देवीकडे पाठवले दूताने देवीस सांगितले कि शुंभ निशुंभ तिन्ही लोकांचे स्वामी आहेत देवांची सर्व अमूल्य संपत्ती, शस्त्रे , त्यांनी प्राप्त केले आहे. तेव्हा तुही शुंभ निशुंभ यांच्या आश्रयाला ये व त्यांच्यापैकी एकाची पत्नी हो. यावर देवी म्हणाली तुम्ही म्हणताय ते खरे आहे शुंभ निशुंभ महापराक्रमी आहेत. पण काय करू मी अल्पबुद्धीने व अज्ञानाने प्रतिज्ञा करून बसले कि जो कोणी पुरुष मला यद्वत हरवेल त्याच्याशीच मी लग्न करेल. यावर दूत म्हणाला देवी मूर्खता करू नकोस शुंभ निशुंभ जेव्हा तुला ओढत नेतील तेव्हा तुझा अहंकार व प्रतिज्ञा नष्ट होईल. पण तरीही देवीने पुन्हा आपली प्रतिज्ञा दूताला सांगितली व तो परत गेला.
क्रमश:
दुर्गा सप्तशती सारांश थोडक्यात
Tuesday 16 January 2018
आधुनिक जीवनशैली व मंगळदोष.
एका पिढीतील ज्योतिषी अनेक अपवाद सांगून मंगळदोषाचा परिहार होतोय व विवाह निर्धास्तपणे करा असा सल्ला देताना दिसत होते. मुलगा मुलगी यांच्या शिक्षणातील विषमता, जात, धर्म, वय यामुळे असा परिहार सांगणे योग्य आहे असेही एकीकडे वाटते. पण तसे खरे आहे का किवा होते का हेही पडताळून पाहणे महत्वाचे आहे.
हा परिहार पूर्वी कसा सांगितला गेलाय याच्यावर थोडक्यात नजर मारू. दोष परिहाराचे निकष: मंगळ कर्क या त्याच्या नीच राशीचा, शत्रुगृही म्हणजे मिथुन व कन्या राशीचा, अस्तंगत म्हणजे सूर्याजवळ असताना, प्रथमात मेषेचा, चातृर्थात वृश्चीकेचा, सप्तमात मकरेचा, अष्टमात सिंहेचा व द्वादाशात धनु राशीचा मंगळ निर्दोष समजला गेला आहे. मंगळावर शुभ ग्रहाची म्हणजे गुरु व शुक्राची पूर्ण दृष्टी असता तोही निर्दोष समजला गेला आहे.
मंगळ वर दिलेल्या राशीत असताना निर्दोष म्हटले जाते. पण त्याचे नक्षत्र व अंश पहिले जात नाहीत. कारण काही ठराविक नक्षत्रात असलेला मंगळ दोषी असू शकतो तसेच काही ठराविक अंशावर असतानाच तो नीच किवा परम नीच असतो. इतर अंशावर असे असत नाही. बरेचदा प्रथमात मेषेचा ऐवजी सप्तमात मेषेचा मंगळही निर्दोष म्हणून सांगितला जातो. त्याला काय होतंय अशी वृत्ती असते. असे निर्दोष ठरवण्याचे मार्ग असले तरीही मंगळ हा मंगळच असतो त्याचे काही अक्रमक गुणधर्म तो सोडत नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
पुढे मंगळाच्या कुंडलीला प्रतिकारक कुंडली म्हणून काही नियम दिलेत त्याचा विचार करू. अशी कुंडली ज्याला मंगळ आहे त्याची नसून संभाव्य जोडीदाराची असावी असा नियम आहे पण अनेकजण हा नियम उमेदवारालाच म्हणजे ज्याची कुंडली आहे त्यालाच लाऊन टाकतात.
जोडीदाराच्या कुंडलीत १,४,७,८,१२ या स्थानी शनी असेल तर, पंचमात व दशमात शनी असेल तर, १ किवा ७ स्थानी बलवान गुरु किवा शुक्र असतील तर, १ किवा ७ स्थानी राहू किवा केतू असेल तर अशा जोडीदाराची कुंडली मंगळाच्या कुंडलीला प्रतिकारक असते.
आता यातील शनीचा प्रतिकारकतेच्या दृष्टीने विचार करू. एक जण जर अक्रमक असेल तर दुसरा शांत असणे असा याचा एक अर्थ निघतो, पण जोडीदाराचा मंगळ कुठे आहे याचा विचार इथे होत नाही. पंचमात आणि दशमात शनी असणे म्हणजे जोडीदार मुले, जबाबदाऱ्या व ध्येय यात अडकून पडलेला असतो त्यामुळे तो मंगळ असलेल्या आपल्या जोडीदाराच्या किरकीरीकडे फारसे लक्ष देत नाही. गुरुबद्दल म्हणायचे झाले झाले तर न्याय्य हक्कांसाठी गुरु-मंगळ योग अडून राहणारा ठरतो व भांडायला कमी करत नाही. शुक्र फक्त भोग भोगणारा असतो म्हणजे ते नाते भोगावर आधारित असते. शुक्र-मंगळ योग दोघे एकमेकांची अनैतिकता खपवून संसार करणारे असू शकतात. राहू-केतू म्हणजे जोडीदार फारच सोशिक असतो व ठेविले अनंते ... नुसार सहन करणारा असतो.
एकेकाळी समाज अपवादामुळे संसारात कितीही अडचणी आल्या तरी व एकमेकांचे पटले नाही तरीही काडीमोड करायचा विचार नवराबायको करत नव्हते. पण आज कायदेशीर हक्क, बदललेला समाज, स्त्रियांना नोकरीच्या संधी, उंचावलेले जीवनमान यामुळे घटस्फोट घेणे फारसे अवघड राहिलेले नाही.
या बदललेल्या काळात मंगळाच्या निर्दोषतेचे जुने निकष लाऊन उपयोगाचे नाही. बरेचदा निर्दोष समजला गेलेला मंगळ आयुष्यात कधीतरी नवराबायकोत वादळी घटना निर्माण करून जातो.
हे सगळे असेल तर नेमके करायचे काय? यावर उपाय काही आहे का? पुढच्या लेखात.
Saturday 25 November 2017
आपले देव विचित्र कसे झाले?
हनुमानाला बोलता कसे येत होते? तो तर एक वानर होता ना! त्याने पर्वत कसा उचलला? भुते हनुमानाला का घाबरतात?
शंकराला तिसरा डोळा कसा? त्याच्या डोक्यावरून गंगा नदी कशी वाहते?
देवीला इतके हात कसे काय?
गणपतीला हत्तीचे तोंड कसे काय लावले? तो उंदरावर कसा बसू शकतो?
देवांना इतकी तोंडे कशी?
शनीला सगळे का घाबरतात? इत्यादी.
ह्यांची त्यांच्या मनाला पटणारी उत्तरे देणे सध्या आपल्यालाही अवघड होऊन बसले आहे. असे नक्की का होते आहे हे आपणच शोधायचे आहे. ज्या काळात ह्या संकल्पना रचल्या गेल्या त्याचा अभ्यास करणे हेही गरजेचे आहे.
प्रश्नकुंडली-पुढे चालू भाग-२
Saturday 14 October 2017
हस्तरेषा - एक संशोधन
Sunday 17 September 2017
नवरात्र-महत्वाचा कुलाचार
महिषासुरमर्दिनीचे स्वरूप: देवीचे स्वरूप हे नेहमी महिष म्हणजे रेड्याला मारताना दाखवले गेले आहे. ह्याचा काळाचा शोध घेतला असता आपण फार पूर्वी म्हणजे सुमारे २० ते ५० हजार वर्षे मागे जाऊन पोचतो. मानव शेती करायला लागल्याचा काळ हा सुमारे १०००० ते १५००० वर्षापूर्वीचा आहे. त्यापूर्वी कित्येक हजार वर्षे माणूस हा रानटी अवस्थेत होता. पशुपालन विकसित होत होते. हा काळ फार मोठा म्हणजे सुमारे ३० ते ४० हजार वर्षे चालला. पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात होती. सुमारे ७००० वर्षापूर्वीची पूर्व-सिंधु संस्कृतीतील खालील प्रतीके पाहिल्यावर हे लक्षात येते.
वरील चित्रातील ध्यानस्थ बसलेला पुरुष स्वतः आद्यपुरुष महिष (पृथ्वी पती म्हणजे महि+इष), अर्थात महेश म्हणजे शंकर आहेत. विशेषतः डोक्यावर दर्शविलेली शिंगे म्हणजे माणूस व महिष यातील संबंध दर्शवितात. पुढे माणूस शेती करत स्थिरावत होता तसे नागरी संस्कृतीची निर्मिती करावी लागली. रानटी अवस्थेत जशी पुरुषाची शक्ती महत्वाची असते तशी नागरी संघटीत समाजात स्त्रीची शक्ती व तिचे अधिकार महत्वाचे बनतात. इथे स्थिरता, निर्मिती ह्यांना महत्व आहे. स्त्रियाच शेतात पेरणी करीत असत असे संशोधक सांगतात. गाव निर्माण झाले तसे ग्रामदेव व ग्रामदेवी ह्या अस्तित्वात आल्या.
रानटी अवस्थेतील पुरुषाला (अर्थात महीषाला) सुसंस्कृत नागरी/शेती करणाऱ्या समाजात सामावून घेताना बराच संघर्ष झाला. ते कार्य आपली आद्य स्त्री म्हणजे कुलस्वामिनी पार पाडले हे वरील चित्रात दर्शविले आहे. आज नामशेष झालेला रेडा हा प्राणी पूर्वी समस्त भूमी व्यापून राहिलेला होता. त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी मानवाला मोठा उद्योग करावा लागला आहे. हा रेडा हटवूनच पुढे शेतीचा मार्ग प्रशस्त झाला होता. नक्कीच काहीतरी मोठी उलथापालथ ह्या रेडा प्रकरणात झालेली आहे. नवमीला दिला जाणारा पशुबळी याचेही इथे काहीतरी तारतम्य आहे. पुढे तो बळी प्रतीकात्मक म्हणजे इतर प्राणी जसे बोकड इत्यादींचा द्यायला सुरुवात झाली. आता पशुबळी प्रथा गरज नसल्याने बंद होत आहे.
तर अशाप्रकारे आपण देवीच्या आद्य स्वरूपाचा विचार केला. आता आपण नवरात्र ह्या कुलाचाराचा अभ्यास करू,
घटस्थापना: "पेरले तर उगवते" अशी म्हण प्रसिद्ध आहे. आद्य समाजात प्रत्येकाची थोडीफार शेती होतीच. ह्या शेती उद्योगाचे स्मरण करून देणारा जो कुलाचार आहे तो म्हणजे घटस्थापना. हे व्रत नाही हा कुलाचार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शास्त्रात केलेले आहे. आपण जे अन्न बनवतो ते अन्न ज्या शक्तीने निर्माण होते तिच्या पूजनाचा हा विधी आहे. हा विधी साधा सरळ असून आपण स्वतः सहज करू शकतो.
१) सर्व देव स्वच्छ धुवून नागिणीच्या पानावर ठेवले जातात. पानांचा देठ देवाकडे असतो. देवांना हळद-कुंकू, अक्षता अर्पण करून धूप, दीप दर्शवून अत्तर लावावे. दीप, घंटा इत्यादींचे पूजन करावे.
२) देवघरात सर्व देवांच्या समोर एक पाण्याचे चौकोन मंडळ काढून त्यावर थोड्या अक्षता टाकाव्यात. तिथे एका पत्रावळीवर वावरी (म्हणजे शेतातील काळी किंवा तपकिरी माती) सुमारे पाच बोटे खोल अंथरून त्यावर एक मातीचे मडके (सुगडी) सरळ राहील असे मातीत दाबून ठेवावे. हे मडके सच्छिद्र असावे. ते पाण्याने पूर्ण भरून त्यात तांदूळ टाकावेत. त्यावर ५ नागिणीची किंवा आंब्याची पाने लावून शेंडी वरच्या दिशेला करून नारळ ठेवावा. ह्या नारळ व घटाचे हळद-कुंकू, अक्षता अर्पण करून, धूप, दीप दर्शवून पूजन करावे. काही ठिकाणी वरील नारळाला वस्त्र घालण्याची पद्धत असते. हे वस्त्र लाल रंगाचे असावे. आपल्याला माहित नसेल तर कापसाला थोडे हळद-कुंकू लावून ते वस्त्र अर्पण करावे. जे सौभाग्यअलंकार पूजा साहित्याबरोबर मिळतात ते घटाच्या (सुगडीच्या) गळ्याजवळ घालावेत. ते नसतील तर विविधरंगी नाडा असतो तो बांधावा. तोही अलंकार स्वरूपच असतो.
त्यानंतर जी सप्तधान्य मिळतात ती आजूबाजूच्या मातीत बोटभर माती बाजूला काढून धान्य पसरल्यावर त्यावर ती माती टाकावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. यात प्रामुख्याने गहू तांदूळ, ज्वारी, बाजरी, जव, डाळी हे धान्य असते.
३) पहिली माळ ही नागिणीच्या पानांची किंवा फुलांची असते. अशा नऊ माळा नऊ दिवस घटाच्यावर खिळ्याला टांगून खाली घटावर येतील अशा प्रकारे सोडाव्यात. प्रत्येक दिवशी एक माळा अर्पण करीत जावे. माळेतील फुले/पाने संख्येने विषम असावीत. बरेच घरात ७ व्या माळेला कडाकणी व वेणी फणी अर्पण केली जाते. तीही नैवेद्य करून देवघरात वर खिळ्याला टांगून ठेवली जाते. रोज कपूर जाळून देवीची आरती करावी.
हि सर्व पूजा व घटस्थापना सकाळी १० च्या आत संपन्न झालेली उत्तम.
नित्यविधी: एकदा घटस्थापना झाली असता देव हलवू नयेत. रोज एक फुलांची माळ अर्पण करीत जावे. रोज पेरलेल्या धान्यावर थोडे पाणी शिंपडावे.
बरेच घरात एक व्यक्ती नवरात्रात उपवास करते. फळभाज्या (लाल भोपळा, काकडी इत्यादी) सुद्धा उपवासाला चालतात. इतर नेहमीचे उपवासाचे पदार्थ चालतात.
उपवास हा पहिल्या माळेला सुरु होतो व नवव्या माळेला त्याचा पारणा म्हणजे तो सोडला जातो. उठता-बसता केलेला उपवास हा फक्त पहिल्या व नवव्या माळेला केला जातो. म्हणजे सकाळी धरलेला उपवास रात्री सोडता येतो. काही लोक नऊ दिवस पायात पादत्राणे घालत नाहीत. पण तसा नवस असेल तरच ते करणे ठीक आहे.पादत्राणांचा नियम किवा कुलाचार नाही त्याऐवजी उपवास केलेला चालतो.
नवरात्र पूजाविधी स्त्री व पुरुष असे दोघांनी करायचा असतो. नवरात्राचा क्षय करून चालत नाही. कडाकणी व वेणी फणी सातव्या माळेला करता अली नाहीत तर नवव्या माळेला करावीत. बरेच लोक गावाची सीमा न ओलांडण्याचा उपक्रम करतात. उद्देश हाच आहे कि गावाबाहेर गेल्याने नवरात्रातील ९ दिवस देवीची सेवा करण्यात व्यत्यय येऊ नये.
नंदादीप/समई: समई व वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हा पूर्वीच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते हे विसरून चालणार नाही. नवरात्रात नंदादीप अखंड प्रज्वलित ठेवावा असा कुलाचार आहे. त्यासाठी काही काळजी घेणे महत्वाचे आहे. बरेचदा तेल संपल्याने किंवा काजळी जमा झाल्याने नंदादीप विझतो. त्यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी नंदादीपात (समईत) पुरेसे तेल आहे का हे तपासत जावे. सहसा २ किंवा ३ वाती असाव्यात. एकएक करून त्यांची काजळी लहान काडीने साफ करावी. वाती फार जाड नसाव्यात पण साधारण ६ इंच लांब असाव्यात म्हणजे ९ दिवसात वात बदलावी लागत नाही. असे केल्याने नंदादीप सदैव तेवत राहतो. चुकून एखादी वात काजळी काढताना विझली तरी दोष लागत नाही.
घट उठवणे: हा विधी नवमी म्हणजे नवव्या माळेला सकाळी केला जातो. १, ३ किंवा ५ पुरुष व स्त्रिया यांनी तळी भरायची असते. पुरुषांबरोबर स्त्रियाही तळी भरू शकतात. दिवटी असल्यास ती पेटवली जाते. एका ताटात हळद-कुंकू, कोरडे खोबरे, सुपारी व पाने घेतली जातात. डोक्यावर टोपी घालून सर्वजण गोलाकार बसतात. आई-राजा उदे उदे म्हणून तळी उचलतात. पानसुपारी ताटाखाली ठेऊन बाकीची प्रत्येकाला दिली जाते व हळद-कुंकू प्रत्येकाच्या कपाळाला लावले जाते. तसेच ते ताट हातात घेऊन एकाने घटाला स्पर्श करून व त्याच्या हाताला सर्वांनी स्पर्श करून उदो-उदो (म्हणजे उठ-उठ) म्हणून घट हलवला जातो.
आता परत तळी भरण्याच्या जागी येऊन कडाकणी ताटात घेऊन पुन्हा एकदा तळी भरली जाते. खोबरे व कडाकणी सर्वांना वाटली जातात. दशमीला घट त्यावर उगवलेले धान्य झाकून ठेवले जाते. बरेच जण नवमीला कुमारिका पूजन करतात. देवी कुमारिका स्वरुपात प्रकट झाल्याची कथा असल्याने कुमारिकेचे पाय धुवून तिला भोजन व भेटवस्तू दिली जाते.
दसरा/ विजयादशमी: नवरात्र उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. सीमोल्लंघन, शस्त्रपूजन, औजारांची पूजा केली जाते. गावाची वेस ओलांडून शमीच्या वृक्षाचे दर्शन घेतले जाते. नंतर गावात भैरवनाथ व मारोतीचे दर्शन घेण्याचा रिवाज आहे. सीमोल्लंघन करून घरी आल्यावर औक्षण केले जाते. नंतर तांदुळाचा महिषासुर बनवून त्याला कापण्याची प्रथा आहे. आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोने लुटले जाते.
असा एकूण आपला हा नवरात्र व महत्वाचा कुलाचार आहे. वेळोवेळी त्यात बदल होत गेलेला असणार हे नक्की. तरी मूळ विधी हा शेती व सृजन या तत्वाशी जोडला गेलेला आहे. काही व्यावहारिक तत्वांची धर्माशी सांगड घालताना अनेक कथा निर्माण झाल्या त्याचे स्वरूप जाणून घेणे आज अपरिहार्य आहे.
Saturday 26 August 2017
देवघरातील मूर्ती.
देवघरात टाक पुजण्याचे प्रयोजन: विवाहात नवीन देव करण्याची प्रथा आहे. तसेच मृत्यू इत्यादींचे अशौच आले तर देव नवीन केले जातात. बरेचदा घासून देवांची झीज होते. त्यातील डोळे अलंकार इत्यादी बारकावे नष्ट होतात. कधीकधी तो देव नक्की कुठला आहे इतका संभ्रम निर्माण होतो. देव सदैव सुचीर्भूत असावेत. त्यांचे नित्य कुलधर्म कुलाचार केले गेल्याने ते जागृत राहतात व तत्काळ फलदायी बनतात. झीज झालेले तसेच मृतअशौच आलेले देव हे निष्प्रभ असतात. साधारणतः घरात मृत्यू, विवाह सारखेसारखे होत नाहीत व मधल्या काळात देवांची झीज होते. जेव्हा विवाह मृत्यू इत्यादी होतात तेव्हा दरवेळी आर्थिक स्थिती चांगलीच असते असे नाही. अशावेळी जर बदलायचे झाले तर टाक कमी खर्चात बदलून होतात. तेच जर मोठी मूर्ती असेल तर काम खर्चिक होते. मूर्तीतील बारकावे जसेच्या तसे निर्माण करता येत नाहीत. गणपतीचा मारुती होण्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक टाकांची पूजा करतात.
गणपती हा प्रभावी देव आहे. नवसाला पावणारा म्हणून विघ्नहर्ता असे याचे नाव आहे. सर्व तत्वज्ञ गणेशाला आपल्या बाजूला ओढायचा प्रयत्न करीत असतात. उदाहरणार्थ अथर्वशीर्षातील खालील श्लोक पहा.
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् || ६ ||
अर्थ: तूच ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आहेस. भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत.
हे अतिशयोक्तीपूर्ण किवा स्तुतीपर स्तोत्र आहे त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर गणपती म्हणजेच ब्रम्हा किवा विष्णू किवा रुद्र आहे का असा गोंधळ उडतो. पुढे इंद्र, अग्नी वायू हाही घोळ होतो. पण शब्दशः अर्थ घेणे चुकीचे आहे. कारण ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, वायू, अग्नी इत्यादी देवता पूर्णतः वेगळा गुणधर्म असलेल्या आहेत. इथे फक्त पराकोटीची स्तुती केल्याने सर्व देव व शक्ती म्हणजेच गणपती आहेत असे म्हटले आहे. हे बर्याचश्या मंत्रात आढळते. त्यामुळे देवाचे नक्की मूळ व पूजेचा उद्देश काय यात मात्र आपला गोंधळ उडतो.
दुसरीकडे काही तत्वज्ञ गणेशाला सिंधू संस्कृतीतील देव मानतात. भाजलेल्या मातीचा २ इंच x २ इंच आकाराचा मुखवटा लोक तोंडाला लाऊन नृत्यादी करीत असा दावा करीत असतात. पण २ इंच हा आकार फारच लहान आहे. हा गणपती कि हत्ती हेही स्पष्ट होऊ शकत नाही.
अन्नपूर्णा: वास्तविक ग्रामदेवता व लक्ष्मी ह्या धनधान्य व प्रदान करणाऱ्या देवी आहेत, त्यांच्याबरोबर बरेच घरात अन्नपूर्णा देवी आलेली आहे. अन्नपूर्णा देवीचा टाक असतो तसेच धातूची मूर्तीसुद्धा असते.
सांस्कृतिक देवाणघेवाणीत तसेच राजकीय बदल होत असताना संपूर्ण समाज एकाच देवीदेवतेचे पूजन करीत असेल तर त्यांना एकत्र आणणे सोपे असते. त्यामुळे विविध देव पुढे आपल्याकडे येत गेले. श्रद्धा एकटावल्या गेल्या तसेच विभाजित झाल्या. हे आणखी कोणते देव होते यांची आपण पुढे माहिती घेऊ.
Thursday 17 August 2017
आपल्या देवघरातील देव
८) अष्टभुजा सिन्हावरची.
९) यल्लम्मा- दहा हात व डोक्यामागे चक्र.
१०) जोखाई- जानाई सारखीच फक्त कणीस व मुल बरोबर नसते.
११) लक्ष्मी - मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना.
१२) ज्योतिबा- घोड्यावर स्वार, समोरून व हातात तलवार.
१३) नवनाथ- ९ देव.
१४) मुंजोबा- उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी.
१५) भैरोबा - घोड्यावर एकटा व हातात तलवार.
१६) अष्टभुजा वाघावारची वाघजाई.
१७) वीर- धनुष्य-बाणधारी
१८) गणपती.
१९) शिव पार्वती.
२०) वणी सप्तशृंगी १८ हात असलेली.
२१) औंधची देवी.
२२) घोड्यावरची देवी.
२३) कोल्हापूरची महालक्ष्मी
२४) माता-पिता
२५) साती आसरा- सात देवी व मगर किवा पशु.
वरील टाकांचे फोटो हवे असल्यास मला फेसबुकवर इनबॉक्समध्ये संपर्क करा.
Monday 14 August 2017
जात व आडनावे..... पुढे चालू
ती जात होती लढवैय्ये. हे लढवैय्ये लोक सर्व समाजातून पुढे आले. पूर्वीचे ४ वर्ण म्हणजेच ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शुद्र हे केव्हाच नष्ट झालेले होते. कारण त्यांची कधी गरजच पडली नव्हती. चतुर्वर्ण पद्धतीत जे चार वर्ण होते ते कधीच इतिहासजमा झाले होते. राहिले होते ते फक्त शेतकरी, पशुपालक आणि कारागीर! आता ह्याच समाजातून लढवैय्ये पुढे आणायचे होते. तेही मोठ्या संख्येने कारण समोर जो शत्रू उभा होता त्याच्यात जात नव्हती.
समाज अशाप्रकारे स्वतःमध्ये बदल घडवून आणत होता. साहजिकच उत्तरेकडील प्रदेशात हा बदल आधी घडला. यादव आडनाव असलेले एक गाव असेल तर त्यात ७० ते ८० टक्के यादव लढवैय्ये बनले. शिल्लक राहिलेले २० ते ३० टक्के हे शेतकरी, कारागीर बनले. लढवय्या लोकांना अनेक मुभा समाजाने स्वतःहून दिल्या. शेतीच्या जमिनी कसायला इतर लोकांकडे असल्या तरी वंशपरंपरागत मालकी लढवैय्या माणसाची होती. संख्या वाढवण्यासाठी बहुपत्नीत्व, दासी अशा मुभा मिळाल्या. यापूर्वी एकपत्नी राम हा समाजाचा आदर्श होता हेही इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
इतिहासाच्या गदारोळात हा मध्यकालीन समाजव्यवस्था व इतिहास कायम गोंधळ निर्माण करीत राहतो. त्याचे नेमके स्वरूप काय होते हे तपासणे गरजेचे आहे.
एक साधा विचार करा कि आज विज्ञान प्रचंड प्रगती करीत आहे, बऱ्याच अवघड बाबी आज विज्ञानाने साध्य करून दाखवल्या आहेत ज्या एकेकाळी अशक्य वाटत होत्या. त्यामुळे माणूस पूर्वी ज्या देवाला सर्वशक्तिमान समजून शरण जात होता तो आज विज्ञानाला शरण जात आहे. माणूस असा विचित्र प्राणी आहे कि स्वतःचा स्वार्थ असल्याखेरीज कशाला किती महत्व द्यायचे हे नेहमी ठरवत असतो. जेव्हा युद्धे अजिबात होत नव्हती तेव्हा आपल्या समाजाला चार वर्ण व त्यांच्या महत्तीची अजिबात गरज वाटली नाही. शांततेच्या काळात हे चार वर्ण नष्ट झाले. जेव्हा परकीय आक्रमणांच्या काळात लढणाऱ्या समाजाची गरज निर्माण झाली तेव्हा लढवैय्या जाती निर्माण झाल्या. त्यांनी मग आम्ही पूर्वीचे क्षत्रिय कुलीन आहोत इत्यादी मिथकांचा आधार घेतला. पण त्यात तथ्य नाही.
दुसरा मुद्दा हा कि जेव्हा वर्णव्यवस्था होती तेव्हा चार वर्ण मानणारे यांची संख्या किती होती? तर भारतातील जैन, बुद्ध, शैव, शाक्त, वैदिक व इतर अनेक पंथांचा विचार केला तर फक्त वैदिक यज्ञ करणारे लोक चार वर्ण मानीत होते. म्हणजे हि संख्या फारच क्षुल्लक होती. त्यातही प्रत्यक्ष कृती व युद्धे करणारे क्षत्रिय फक्त एक चथुर्ताश! शत्रूच्या सैन्यासमोर ही क्षत्रियांची संख्या अगदीच तोडकी होती याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जेव्हा लुटालुटीचे अनेक फटके बसले व समाजात लुटीला विरोध करायची मानसिकता निर्माण झाली त्यावेळी वैदिक तत्वज्ञानाची नव्याने जाहिरात सुरु केली गेली. पुढे वर्ण व्यवस्थेतून जातीव्यवस्था निर्माण झाली हा भ्रम पसरला.
आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळू. जेव्हा आपण मी कोण आहे, माझे पूर्वज कोण? माझे दैवत कोणते? या बाबींचा शोध घेतो तेव्हा वरील सर्व मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे आहे. एकाच आडनावाचे कुळ हे एकच असू शकते. त्यांचे मूळ गावही एकच असू शकते. एकच गाव व आडनाव असेल तर दैवत एकच असण्याची शक्यता फार जास्त असते.
बऱ्याच अडनावांचा कुलवृत्तांत लिखित स्वरुपात आढळतो. ज्या ज्या पिढ्यात आर्थिक स्थिती सत्ता हातात होती तेव्हा ह्या आडनावाच्या लोकांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले. हिंदूंना देवांची कमी नाही. देवदेव करायला गेले तर एक जन्म अपुरा आहे. जागोजागी अनेक मंदिरे व त्यांचे अवशेष आज आढळतात. त्यांचा इतिहास हा काळाच्या अंधारात गायब झाला आहे. तर बरेच ठिकाणी त्यावर पुराणकथांचे थर जमा झाले आहेत. त्यात राम सीता, शिव-पार्वती ह्यांच्या एकसारख्या स्वरूपाच्या कथा बरेच ठिकाणी आढळतात. खंडोबा, शंकर, ग्रामदैवत भैरोबा, ग्रामदेवी किवा मातृदेवी जोगेश्वरी (जानाई), देवीची विविध रूपे, म्हसोबा, आषाढात पुजली जाणारी लक्ष्मी, जलदेवता असे अनेक देव ह्या मधल्या काळात आपल्या देवघरात दाखल झाले. देव पंचायतन म्हणजे सूर्य, देवी, शिव, विष्णू, आणि गणपती यांना मानणारा एक पंथ आहे.
ह्या देवांचे कोडे उलगडण्यास आपल्याला आपला अंधारात दडलेला इतिहास तर्काच्या आधारावर घासून पहिला पाहिजे.त्यावर पुढील काही लेखात आपण चर्चा करू.
समाप्त.