जातीयता हा विषय नेहमीच चर्चिला जातो, आणि नेमका "सैराट" च्या निमित्ताने हा विषय गाजतोय, जातीयतेवर पुरोगामी महाराष्ट्राला नेमके काय म्हणायचे आहे, हे विचारात घेणे महत्वाचे आहे.
जातीयता सोडायला आपला समाज अजून घाबरतोय, चित्रपट पाहून सुन्न झाले तरी तो विषय तिथेच विसरून जायची आपली सवय आहे, त्याची काय कारणे आहेत,
१) बऱ्याच लोकांना जातीयता कशी निर्माण झाली हेच माहित नाही. एकेकाळी मोठे जातीय हुद्दे असलेले बरेच लोक आता शेतात पाणी नाही म्हणून जीव देतात. साध्या नोकऱ्या करतात. पण जातीचा विषय आला कि हिरहिरीने भांडायला लागतात. जुने जातीय हुद्दे हे त्याकाळातील सामाजिक स्थितीमुळे त्यांना मिळाले होते, ती स्थिती आता राहिलेली नाही. फार थोडे लोक जे आहेत ते ह्या जातीय समीकरणांचा फायदा घेत अजून टिकून आहेत. पण बहुसंख्य समाजातून आता ते जातीय हुद्दे नामशेष झाले आहेत. त्यांचा फक्त इतिहास शिल्लक आहे पण त्या इतिहासावर वर्तमान चालत नाही. बहुसंख्य समाज हा पूर्वी जसा प्रतिकूल स्थितीत जगत होता तसाच आज जगत आहे.
२) बरेच लोक असे आहेत कि त्यांना आपल्या जातीच्या संस्कारांचा, त्यांच्या इतिहासाचा, त्यांच्या कुलदैवत, त्यांचे वंश ह्यांच्यात ढवळढवळ होण्याची भीती वाटते म्हणून ते जातीला सोडायला तयार नसतात. संस्कार म्हणाल तर ते चांगल्या शिक्षणाने प्राप्त होतात. इतिहास, वंश, ह्यांचे पुरावे ५००-६०० वर्षापूर्वीचे सापडत नाहीत. हे इतिहास, वंशश्रेष्ठत्व फक्त उच्च जातियच मानतात असे नाही, तर ह्या प्रथा सगळ्याच जातीचे लोक मानतात. सगळ्याच जातीत जतिअंत व्हावा असे न वाटणारी एक पिढी अस्तित्वात असतेच.
३) पूर्वी एकतर स्त्रिया घरातून बाहेर पडतच नव्हत्या (हा बहुतेक एक गैरसमज आहे) कारण शेतकरी स्त्रिया पतीच्या खांद्याला खांदा लावून शेती करतात, शेतमजुरी करतात हे आजही आपण पाहतो. आतातर बहुसंख्य समाजाच्या स्त्रिया बाहेर पडताहेत, शाळा, कॉलेजात शिकत आहेत, अशावेळी इतर जातीच्या मुलांचा संपर्क त्यांच्याशी येणारच. तेव्हा त्यापैकी एखादा मुलगा/मुलगी जरा जास्त उद्योगी असेल तर तो दुसऱ्या एखाद्या मुलगा/मुलीवर इम्प्रेशन मारणार. कधीकधी फसवणूक सुद्धा करू शकणार. अशी फसवणूक होऊ नये म्हणून कायद्याने विवाहाचे वय हे निर्धारित केलेले आहे. हे विवाहाचे वय जागतिक निकष व अनेक देशांचे अनुभव त्यांचे कायदे यांचा अभ्यास करूनच ठरवले गेले आहे. त्यामुळे आपला मुलगा मुलगी घरातून बाहेर पडले म्हणजे त्यांची फसवणूक होणार हे समजणे चुकीचे आहे. उलट मुलांवर आपली मते लादण्यापेक्षा त्यांना योग्य ते निर्णय घेण्याचे ज्ञान आपण दिले तर ते योग्य निर्णय घेऊ शकतात.
४) पूर्वीच्या जातीपाती जशा संपत चालल्या आहेत तश्या नवीन जाती समाजात निर्माण होत आहेत. एखाद्याची आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक स्थिती ह्यावरून नवीन वर्ग निर्माण होत आहेत. एखादा डॉक्टर, इंजिनियर असेल तर तो दुकानदाराला कमी समजतो, किवा राजकारणी (खरे तर हा व्यवसाय नाही पण) एखाद्या सामान्य मध्यमवर्गीयाला कमी समजतो, कोणी पोलिस, कोणी मिलिटरीमन, कोणी सरकारी नोकर, कोणी सफाई कामगार असे नवीन वर्ग निर्माण होत आहेत. कदाचित ह्या वर्गांचेही पूर्वीच्या जातीत रुपांतर होऊ शकते. जसे पूर्वी अशाच पद्धतीने जाती निर्माण झाल्या तसे आताही होऊ शकते. मग परत त्या जाती निर्मूलनाचे काम नव्याने करावे लागणार.
५) अजूनही मोठा समाज जुने ते सोने समजतो, मी ७० वर्षे कुठलेही औषध न घेता कसा धडधाकट आहे हे सांगत असतो. आता पूर्वीसारख्या पटकी, प्लेगच्या साथी येत नाहीत हे ह्या धडधाकट लोकांचे नशीब! पूर्वी माणसाचे साधारण आयुर्मान २० ते ४० होते ते आता ६० वर्षांच्या आसपास आले आहे. तलवारी कधीच गेल्यात, त्याच्या जागी बंदुका येउन आता ड्रोन आकाशात उडताहेत. समुद्र ओलांडणे पाप हे समजणारे आता विमानाशिवाय जगू शकत नाहीत! स्वतः मोबाईल फोन वापरणारे शेतकऱ्याला मोबाईल इंटरनेट का वापरू देत नाहीत?
कारण एकाला अडाणी ठेवण्यात आपल्या समाजाचा मोठा स्वार्थ दडलेला असतो, तो एका ठराविक जातीचा दुर्गुण नाही. पूर्वीचा वैश्य हा क्षत्रियाला लढायला पाठवून स्वतः घरात धन साचवत असे, आणि तर क्षत्रिय लढायला जातो म्हणून त्याच्या मुभा घेत असे.
पण ह्याच देशावर संकटे आली तेव्हा सगळे वर्ण एकत्र येउन लढायला का उभे ठाकले नाहीत? एकावर संकट आले तर दुसरा म्हणतो तो त्याचा प्रश्न आहे तो ते बघून घेईल.
बर शेजारच्या गावावर संकट आले तरी अजून माझ्या दारात आले नाही ना म्हणून मी शांत झोपतो.
हे सगळे होण्यामागे आपला समाज लढवैय्या नाही असेही म्हणने चुकीचे होते, प्रत्येक जाती वर्णाचा, गावाचा माणूस हा स्वतःचे अस्तित्व जपण्याचा अटीतटीचा प्रयत्न करत असतो. पण कधी? जेव्हा त्याला योग्य वेळी, योग्य धोका लक्षात येण्याची संधी मिळाली तरच!
पूर्वी ही संधी सामान्य बहुसंख्य लोकांना मिळत नव्हती, आज पाकिस्तान, चीनने काही हालचाली, लफडी केली कि सगळे कान टवकारून उभे राहतात, ही आपली राष्ट्रवृत्ती आहे, लढायची वेळ आली तरीही सगळ्या जातीधर्माचे लोक मागे हटले नाहीत, कि घरात झोपून राहिले नाहीत. हे असे आत्ताच का होतेय, आणि पूर्वी का होत नव्हते?
आता सार्वजनिक संवादाची साधने वाढलीत, लोकशाहीचा पाचवा स्तंभ हा जो मेडिया आहे तो घरोघर पोचतोय. हे असे पूर्वी होणे अशक्य होते, शिवाजींचे स्वराज्य (जे पेशवाईत लयास गेले), १८५७ चे बंड जे अयशस्वी झाले. हे आपल्या समाजात सुसंवाद नसल्यानेच घडले. अजूनही शेतकरी समाज जुनाट कल्पना डोक्यात ठेऊन मोबाईलही वापरायला नकार देत असेल तर काय करायचे?
समाजात संवाद नव्हता त्याचा मुठभर लोक फायदा घेत राहिले. स्वतःचा बचाव करीत राहिले व मोठमोठे इमले उभारत राहिले.
ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आत्ताही बरेच राजकीय लोक काही गुपिते सामान्य जनतेपासून लपवून मोठी माया जमा करतात. धरणातले पाणी कुठे गायब होते ते आपल्याला कळत नाही. अजूनही आपली पिढी जर जातीयतेत अडकली असेल तर आपण असे फसवले जाणारच, यात वाद नाही. पुढे जायचे असेल तर ह्यातून बाहेर यायलाच हवे. हजारो कोटींचे हिशेब/बेहिशेब बघून नुसते आ वासून बसण्यात काय अर्थ आहे.
समाजात संवाद नव्हता त्याचा मुठभर लोक फायदा घेत राहिले. स्वतःचा बचाव करीत राहिले व मोठमोठे इमले उभारत राहिले.
ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आत्ताही बरेच राजकीय लोक काही गुपिते सामान्य जनतेपासून लपवून मोठी माया जमा करतात. धरणातले पाणी कुठे गायब होते ते आपल्याला कळत नाही. अजूनही आपली पिढी जर जातीयतेत अडकली असेल तर आपण असे फसवले जाणारच, यात वाद नाही. पुढे जायचे असेल तर ह्यातून बाहेर यायलाच हवे. हजारो कोटींचे हिशेब/बेहिशेब बघून नुसते आ वासून बसण्यात काय अर्थ आहे.
No comments:
Post a Comment