आपण गेल्या भागात आपली जात, गावे इत्यादी कशी निर्माण झाली हे पाहिले. त्याकाळी देवधर्म हेच जगण्याचे साधन होते, कारण विज्ञान प्रगत नव्हते. हे देवधर्म म्हणजे लोक काय करायचे. आपले देव कोणते हे आपण पाहू.
हा जानाई (योगेश्वरी अथवा जोगेश्वरी) देवीचा टाक आहे. जानाई ही भैरवनाथाची पत्नी. जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. त्यातले त्यात जानाई स्त्री दैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते. भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जाते पण ते अधिक कडक दैवत आहे. त्याचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पुजण्याचे प्रमाण कमी आहे.
ह्या देवीचे नीट निरीक्षण केले असता, एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पिक दिसते. म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते. दुसऱ्या बाजूला लहान मुल दिसते आहे. म्हणजे पुत्रपौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी गावाचे रक्षण करते. सोबत एक पशु दर्शविला आहे. म्हणजे दूधदुभते उत्तम देणारी ही देवता आहे. त्याचबरोबर घरातील भांडी दर्शविली आहेत. म्हणजे तुमचे संसार भांडीकुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना ह्या देवीकडे केली जाते.
थोडक्यात ग्राम किवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाईदेवी आहे.
चैत्र महिन्यात ग्रामदैवताची जत्रा असते तेव्हा व विजयादशमीला ग्राम्दैवातला नैवेद्य करावा असा कुलाचार आहे.
ही आहे लक्ष्मीदेवी. ऋग्वेदात असलेली श्री किवा लक्ष्मी आणि ही लक्ष्मीदेवी यात साम्य असले तरीही ही तीच रुग्वैदिक लक्ष्मी नाही. बरेच लोक ही पलंगावर बसलेली असल्याने हिला पलंगावरची देवी असे म्हणतात. लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ही बसलेल्या मुद्रेत आहे. तिच्या हातात शस्त्र असल्याने ती धन संपत्तीचे रक्षण करणारी अशी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी धन संपत्तीचे रक्षण करते.
पूर्वी देवीच्या रोगाची साथ आल्याने खूप लोक दगावले जात असत. नंतर लसीकरण केल्याने ही साथ आटोक्यात आली. पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्त्रोत दुषित होत असत व आजार पसरत असे. त्यामुळे बरेचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला आहे असा समज होता. ह्या देवीला मरीआई, महामारी, कडकलक्ष्मी असेही संबोधले जाते. आषाढ महिन्यात नैवेद्य करून पुढे देवीचा कोप होऊ नये पिक उत्तम यावे व संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते.
म्हसोबा हा परिचित देव असला तरीही बराच गूढ असा देव आहे. ज्योतिबा फुले म्हसोबाला महसुलाचा अधिपती असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात एका ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा!
आता आपण टाकाचे निरीक्षण करू. यात एक रेडा दर्शविला आहे. हा रेडा म्हणजेच महिष! महिष म्हणजेच महेश! म्हणजे हा शंकराचा ग्राम्य स्वरूपातील टाक आहे. आता थोडे पुराण कथेकडे वळू.
देवीने जेव्हा महिषासुर मर्दन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले. चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता. शेतकी जीवनात पशूचे महत्व खूप आहे. म्हसोबा हा खरेतर म्हैसोबाचा अपभ्रंश आहे हे टाकाचे चित्र पाहून लगेच लक्षात येते.
म्हसोबा हा शेतात विहिरीजवळ असतो. त्याचे ठराविक क्षेत्र असते. त्या क्षेत्रात सर्प वावर करतो असा समज प्रचलित आहे. म्हसोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो हाही दुसरा अर्थ यातून निघतो. म्हसोबाला अमावास्येला नारळ फोडण्याची प्रथा आहे. म्हैस, सर्प व शेतात निर्जन ठिकाणी वास्तव्य हे हा देव शिव-शंकर असल्याचेच पुरावे आहेत.
खंडोबा हे सर्वपरिचित लोकदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहेत. तरीही खंडोबाचा काळ व इतिहास बुचकळ्यात पाडणारा आहे. खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो. कारण शेळ्या-मेंढ्या, लोकर, धनगर, कुत्रा ह्यांना खंडोबाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपारिक भक्त आहे. जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्याकाळातील इतिहासाशी ह्या बाबी संबंधित आहेत.
जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे. तर पालीचा (किवा इतर ठिकाणचे) खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना दर्शविला जातो.
आता आपण टाकाचे निरीक्षण करू. टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो. खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे. पती-पत्नीचे सौभाग्य, एकमेकांवरील विश्वास ह्यात वृद्धी करणारी ही देवता आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्वाचे आहे हा संदेश इथे दिला जातो. विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्व हेच आहे. पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो.
खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व फार आहे. कुत्रा हा विश्वासाचा प्रतिक म्हणून या टाकात दिसतो. पती-पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याच्या यामागील उद्देश आहे. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो तो पाच दिवस असून चंपाषष्ठीला उठतो. तसेच सोमवती अमावास्या, श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात. भांडार व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे. हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीकारिता वापरला जातो. त्यामुळे पतीपत्नी यांनी स्वच्छ, सुंदर व नीटनेटके राहावे हा संदेश मिळतो.
महिषासुरमर्दिनी हा टाक सर्वत्र आढळतो. स्त्रीसात्तक व मातृपुजक समाज एकेकाळी अस्तित्वात होता याचा हा पुरावा आहे. रेडा किवा महिष हा स्वतः शिव आहे. संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असता उन्मत्त बनतो तेव्हा स्त्री त्याला जाग्यावर आणते हा संदेश वरील प्रतिमा देत आहे.
ही देवीची मुद्रा कधी चार तर कधी आठ हातांची असते. जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी.
देवीने एका हाताने रेड्याची जीभ पकडली आहे. याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत हा संदेश दिला गेलेला आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी संसाराचे रक्षण करते असा अर्थ निघतो.
महिषासुर मर्दनाची कथा दुर्गा सप्तशती मंत्रात दिलेली आहे.
देवीची अनेक रूपे आहेत. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत व या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक देवी घरात कुलदेवता म्हणून पुजली जाते. तथापि पूर्वी दळणवळणाची साधने अपुरी होती, जंगले इत्यादीमुळे गावाच्या जवळच आपापल्या कुलदेवीचे मंदिर स्थापन केले जात होते. लोक त्यालाच आपले कुलदैवत समजू लागले. तरीही आपले कुलदैवत माहित नसेल तर या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कुलदैवत मानून चालण्याने काहीही अनर्थ होत नाही. सोनारकामात इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्याने पूर्वी एकाच साच्यातून मूर्ती बनवल्या जात. पुढे कोल्हापूर, वणी, अंबेजोगाई, एकविरा असे वेगवेगळे टाक सहज बनविता येऊ लागले व आपले कुलदैवत नेमके कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागला. पण पूर्वी चार किवा आठ हात असलेली महिषासुरमर्दिनी हीच मूळ देवी असल्याचे दिसून येते.
अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्वाचा कुलाचार आहे. तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे. विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे.
जागरण गोंधळ हे ग्राम्य जीवनातील विवाहविधीच आहेत. आता वाजतगाजत लग्न करण्याच्या प्रथेमुळे हे विधी मागे पडत गेले. विवाह विधीत त्यामुळे अमुलाग्र बदल घडला आहे. आता लोकांना दोन्ही करावे लागते ही मोठी गम्मत आहे.
हा देवांचा रक्षक अर्थात वीर. मंदिरात द्वारपाल तसा घराला जसा वॉचमन असतो तसे याचे स्वरूप. हा बरेचदा तलवार व ढाल धारण केलेला असतो. काही घरात हा धनुष्य-बाण धारण केलेला असतो. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र हा आपले व देवांचे रक्षण करते असा अर्थ निघतो. घरातील भांडी-कुंडी व चार फुल्या व गोल चित्रात दिसतात. चार फुल्या व गोल म्हणजे आपले देव आहेत म्हणून हा आपल्या देवांचे रक्षण करतो.
तर असे आपले पूर्वापार चालत आलेले देव आहेत. याशिवाय बऱ्याच घरात विविध प्रकारच्या मूर्ती व टाक आढळतात. ते खालीलप्रमाणे,
१) बनेश्वरी-वनशंकरी - समोरून सिंहावर आरूढ झालेली आठ हात असलेली देवी.
२) काळूबाई- फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेला.
३) अन्नपूर्णा- हातात पळी घेतलेली.
४) महिषासुरमर्दिनी- अष्टभुजा स्वरूपातील.
५) रेणुका- फक्त मुखवटा व दोन अर्धचंद्राचा मुकुट.
६) एकविरा-फक्त मुखवटा, एक बाण, व मोठे गोटे डोंगराचे प्रतिक.
७) अंबेजोगाई- फक्त मुखवटा, अडवा चेहरा व हनुवट वर गेलेली.
८) अष्टभुजा सिन्हावरची.
९) यल्लम्मा- दहा हात व डोक्यामागे चक्र.
१०) जोखाई- जानाई सारखीच फक्त कणीस व मुल बरोबर नसते.
११) लक्ष्मी - मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना.
१२) ज्योतिबा- घोड्यावर स्वार, समोरून व हातात तलवार.
१३) नवनाथ- ९ देव.
१४) मुंजोबा- उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी.
१५) भैरोबा - घोड्यावर एकटा व हातात तलवार.
१६) अष्टभुजा वाघावारची वाघजाई.
१७) वीर- धनुष्य-बाणधारी
१८) गणपती.
१९) शिव पार्वती.
२०) वणी सप्तशृंगी १८ हात असलेली.
२१) औंधची देवी.
२२) घोड्यावरची देवी.
२३) कोल्हापूरची महालक्ष्मी
२४) माता-पिता
२५) साती आसरा- सात देवी व मगर किवा पशु.
वरील टाकांचे फोटो हवे असल्यास मला फेसबुकवर इनबॉक्समध्ये संपर्क करा.
मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी
https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared
गणपती बाप्पा मोरया
जय शिवाजी जय भवानी