Sunday, 18 May 2025

युट्युबवर पदार्पण

 मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी 

https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared 

गणपती बाप्पा मोरया 

जय शिवाजी जय भवानी  

Wednesday, 9 March 2022

देव दृष्टांत किंवा देवाची इच्छा समजणे!!

देवाचे अस्तित्व मान्य करणे ही सगळयात पहिली अट देवाचे परिणाम कळण्यासाठी आवश्यक आहे . देव ही संकल्पना माणूस सर्वशक्तिमान नाही हेच सिद्ध करण्यासाठी झालेली आहे हे आपण आधी मान्य करायला हवे. देव आपल्यापासून कधी दुरावतो ? जेव्हा आपण स्वतःला देव मानायला लागतो तेव्हा !! आपण अनेक इच्छा अत्यंत तीव्रतेने व्यक्त करतो व देवाला साकडे घालतो , नवस बोलतो विनवणी करतो पण ती इच्छा योग्य की अयोग्य हे आपल्याला माहीत नसते तर देवाला माहीत असते. अश्या अनेक मागण्या करून आपण आपले ऐहिक सुख प्राप्त करण्याच्या नादात आपले दैवत रुष्ट करून घेतो . देवाची आपल्याबद्दल काय इच्छा आहे हे विसरतो . इच्छा व्यक्त करताना आपण केंद्रीभूत असतो व आपल्या आजूबाजूचे , कुटुंबातील लोक यांना किंचितही किंमत नसते . पण देव सर्वांचे हित बघत असतो .

सर्वात लवकर दृष्टांत देणारे दैवत हे कुलदैवत जरी असले  तरी आपण अनाठायी इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस इत्यादी बोलून त्याला दूर करवतो. मग काय करावे ? 

आधी देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काय ? हे पाहू .

परमेश्वर सर्वशक्तिमान व सर्व जग चालवणारा आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे . म्हणजे मी स्वतः एखादे कृत्य करतोय ते अगदी क्षुल्लक आहे व परमेश्वराच्या जग चालवण्याच्या कृत्यापैकी तो एक क्षुल्लक भाग आहे असे आपण समजले पाहिजे व तसे असतेही. आपल्या आहार, निद्रा , मैथुन , भय , स्वार्थ , राग , चीड , अहंकार या नैसर्गिक प्रवृत्ती व त्याची इच्छा या खूप वाढतात. या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर मनुष्य प्रक्षुब्ध होतो . देवाकडे काही लोक यातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मागणी करतात. जर ती पूर्ण झाली नाही तर माणूस देव झूट आहे असे समजायला लागतो . दुसरे असे की माणूस देवाला किराणा मालाचे दुकान समजतो आपल्याला पाहिजे ते मागतो व त्याबद्दल काहीतरी देण्याचे कबूल करतो . आपल्याकडे सोपा भक्ती मार्ग असल्याने दैवत चांगली फळे देते. पूजा भक्ती हा तंत्र मार्ग आहे व सोपा आहे . याशिवाय मंत्र तप इत्यादी अवघड मार्ग आहेत . ते अचूक व कष्टाने साध्य करावे लागतात. अनेक लोक दुर्गासप्तशती हवन मनन करतात पण त्यातील अर्थ फारसा समजत नाही. पण साधी घटस्थापना ह्या तांत्रिक भक्तीयुक्त मार्गाने देवीची मोठी कृपा होते . पण तरीही आपण ऐहिक जीवन जगताना मागण्या करणे व पूर्ण करवुन घेणे यापुढे कधी जातो का ? देव सर्व चालवत आहे , देवी महामायाच्या कृपेने आपण सांसारिक मोहात अडकत असतो व तीच त्यातून दुरही करते .

पुढे पहा की युद्धाचे दिवस असतील तर आपण शांततेच्या बदल्यात गुलामी मान्य करू का ? किंवा दुष्काळात उपोषण करण्याचा सल्ला देऊ का ? कोरोनात स्वातंत्र्य म्हणून रस्त्यावर गर्दी करू का ?युद्ध दुष्काळ आजार हे सर्व दैवजनीत आहेत . आपण फार क्षुद्र आहोत व देव फार मोठा आहे हेच यातून निर्देशित होते ना? मग आपण देवाच्या इच्छेनुसार चाललो व आपल्या सर्व इच्छा देवाला समर्पित करून कार्य केले तर काय होईल ? 

हे नक्की करून पहा : इच्छा देवाला समर्पित करा तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून कार्य करायची प्रेरणा देतो . स्वतःचे हट्ट पूर्ण करण्याऐवजी देवाचे कार्य पूर्ण करा . 

यालाच दृष्टांत असे म्हणतात. अश्यावेळी ज्येष्ठ, अगदी लहान बालके , त्रयस्थ लोक देवरूपाने येऊन सल्ला देऊन जातात. असा सल्ला खूप चमत्कारी योग्य असतो . मी अनुभव घेतला आणि इतरांना मिळावा म्हणून केलेला लेख प्रपंच !

 

Friday, 8 January 2021

प्राणी-पक्षी शकून अपशकून.


प्राण्यांचे आणि पक्षांचे मानवाशी अगदी उत्क्रांतीच्या काळापासून नाते आहे. मानव ज्याज्या बाबत शारीरिकदृष्ट्या  कमी आहे त्यात्या बाबत त्याने आजूबाजूच्या प्राणी आणि पक्षांची मदत त्याचे प्रश्न सोडवण्यास घेतली आहे. ह्या सर्व प्राण्यांना मानवापेक्षा एक तिसरी शक्ती (third sense) अस्तित्वात असतो त्याचा उपयोग मानव आपली जी कमकुवत शक्ती आहे ती  वाढवण्यास करीत असतो. याशिवाय पाळीव प्राणी-पक्षी व न पाळलेले प्राणी-पक्षी यांच्याकडूनही अनेक संदेश निसर्गतः मिळत असतात तेही काय आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे.

कुत्रा-अशुभ: कुत्रा दोन प्रकारचे संदेश लगेच देतो असा माझा वयक्तिक अनुभव आहे, त्यातील पहिला अनुभव मी भूकंपाचा घेतला होता १९९०-२००० च्या दशकात लातूर किल्लारीला भूकंप झाले तेव्हा पुण्यातही हादरे जाणवले. विशेष म्हणजे आम्ही पाळलेली स्टेफी ही जर्मन शेफर्ड कुत्री इवळत नव्हती पण बरीच अस्वस्थ दिसत होती. रात्रभर भूकून भूकून तिने बेजार केले होते. शेवटी मध्यरात्री ३.०० वाजता तो भूकंप झाला व त्यानंतर १ तासाने ती शांत झाली. दुसरा प्रकार वेगळा आहे, त्यात कुत्रे काहीतरी भयंकर संकट येणार हे समजून इवळयला लागतात. बाहेरील रस्त्यावरील कुत्री असे करीत असतील तर तुम्ही त्यांना हाकलून लाऊ शकता व ते दुसर्या जागी जाऊन तोच कार्यक्रम चालू ठेवतात. अशावेळी गल्लीतील कोणा एकाची वाईट बातमी हाती येते. तुमचे घरातील कुत्रे जर असे इवळत असेल तर घरातील कोणाला किवा जवळच्या नातेवाईकाला प्राणसंकट आहे असे धरून चालावे. 

कावळ्याची जोडी -अशुभ: सहज दोन बसलेले कावळे आणि जोडी यात फरक आहे. जोडी म्हणजे कावळा आणि कावळी. जेव्हा ते घरटे बनवितात तेव्हा आसपास ते एकत्र असतात. ह्या स्थितीला कावळ्याची जोडी म्हंटले जाते.

अशी कावळ्याची जोडी एकदा दिसली असता तुम्ही आपल्या देवघरातील देवांचे दर्शन करून एक दीप प्रज्वलित करून त्रासापासून मुक्ती मिळवू शकता. पण रोजच जर दर्शन होऊ लागले तर पुढे एका वाईट घटनेची चाहूल ते देत आहेत हे समजून चालावे. अशावेळी तुमची जागा बदलणे, खिडकी बंद ठेवणे असे उपाय योग्य ठरते. तसेच जवळच्या नातेवाईक यांच्यापैकी कोणी वयोवृद्ध, आजारी असेल तर विशेष काळजी घेणे गरजेचे असते. 

टिटवी-अशुभ: टिटवी सहसा पाणथळ व निर्जन जागी अंडी व पिल्ले ठेवते. जेव्हा तिथे इतर पक्षी, मनसे किवा कुत्रे येतात तेव्हा ती मोठा कोलाहल करते. अशा कोलाहलात तुम्ही सापडला तर तिटवीचा अपशकून होतो. हा प्रत्येक माणसागणिक वेगवेगळा असू शकतो. एखाद्याला त्यानंतर पुढे लहान भांडणे होऊन मुक्ती मिळते किवा दुसरा मोठ्या अपघातात गारद होतो. यासाठी कुलदैवत दर्शन घेऊन द्वीप प्रज्वलित करून मनात आहे तो मंत्र म्हणून व्याप्ती कमी करता येते. 

भारद्वाजपक्षी-शुभ: हा पक्षी मोठी झाडे, गवताळ प्रदेश अशा ठिकाणी वास्तव्य करतो. भारद्वाज पक्षी दिसला असता, काम यशस्वी होते. पैसे आणायला जाणार असताल तर पैसे लगेच मिळतात.एका मोठा इरिगेशन खात्यातील साहेब त्याच्या खुर्चीवर बसलेला असताना त्याला रोज भारद्वाज दिसायचा आणि त्याला रोज कोणीतरी पाकीट आणून द्यायचे तेव्हा ह्या शकुनाचे महत्व पटले. असो. मोर हा पक्षीही भारद्वाज सारखाच फळे देतो.

साळून्क्यांची जोडी: दिसली असता मुलाला अनेक मुली भेटतात, किवा मुलीला दिसल्यास अनेक मुले भेटतात. त्यांच्याशी चर्चा व मैत्री होते. 

सवाष्ण स्त्री -शुभ: घरातून बाहेर पडून थोड्या अंतरावर सवाष्ण स्त्री दिसल्यास कार्यभाग सध्य होतो. 

विधवा स्त्री -अशुभ: घरातून बाहेर पडून थोड्या अंतरावर किवा लगेच विधवा स्त्री दिसल्यास कार्यभाग सध्य होत नाही अडचणी येतात. उपाय वरीलप्रमाणेच. 

घरात हिरव्या बांगड्या फुटणे हेही अशुभ आहे, उपाय वरीलप्रमाणे करावा. 

ब्राम्हण बोडका व स्मश्रू केलेला आल्यास कार्यसिद्धी होत नाही.

उजवे व वरील नेत्र पुरुषाचे फडफडले तर तो शुभ योग समजला जातो व यश संपत्ती येते.  

डावे व वरील नेत्र स्त्रीचे फडफडले तर तो शुभ योग समजला जातो व यश संपत्ती येते. या विपरीत घडल्यास ते अशुभ समजले जाते. 

ज्यावेळी एखाद्या कामास बाहेर पडता तेव्हा दिवसा डाव्या नाकपुडीतून श्वास घेतला जात असेल तर ते शुभ होय. तेच रात्री कामास बाहेर पडताना उजव्या नाकपुडीतून श्वास घेतला जात असेल तर ते शुभ होय. 

तर हे आहेत सामान्य शुभाशुभ शकून अपशकून. आता बरेच शकून अपशकून कालबाह्य झालेले आहेत. कारण ते प्राणी पक्षीच अस्तित्वात नाहीत.

यातील बरेच शकून अपशकून शेतकरी आणि कष्टकरी वर्गास लागू नाहीत. गृहस्थ, राजा, व्यवसायिक, ब्राम्हण यांना  याचे फळ प्रकर्षाने जाणवते. 

||शुभम भवतु||

Saturday, 24 October 2020

दुर्गा सप्तशती सारांश भाग -३ अंतिम भाग

 दुर्गा सप्तशती सारांश भाग -३ 

अध्याय ६, ७, ८, ९ व १०

शुंभ निशुंभाचा दूत परत आला व त्याने विस्तारपूर्वक देवीशी झालेले बोलणे शुंभ निशुंभाना सांगितले. त्यावेळी ते दोन्ही राक्षस भयंकर चिडले. त्यांनी त्यांचे लाखो हजारो सेनापती कोटीच्या कोटी सेनेसोबत देवीला बंधक बनवून  आणण्यासाठी रावाना केले . त्या सेना देवीजवळ पोहोचताच थांब थांब असे देवीला उद्देशून ओरडू लागल्या. तेव्हा देवीने फक्त हुंकार देऊन त्यातील अनेक असुरांना संपवले. देवीचा सिंह त्या असुरसेनेत घुसला व त्याने जंगलात जसा वणवा पेटतो तसा हाहाकार दैत्यसेनेनेत माजवला. देवीने स्वतःचे मुख विस्तीर्ण केले आणि अनेक असुरांना गिळंकृत केले. अनेकांना गदेने चूर्ण केले. खड्गाने कित्येकांना मधोमध चिरले तर कित्येकांना विनाशीर करून टाकले. 

देवीच्या शरीरातून तिच्या अनेक प्रतिभूती निर्माण झाल्या व त्यांनी दैत्यसेनेचा प्रचंड संहार सुरु केला. हे सर्व पाहून दैत्यसैन्य पुन्हा शुंभ निशुंभाकडे गेले तेव्हा त्याने महाहनू नामक दैत्याला सेनेसह देवीशी युद्ध करण्यास पाठवले. त्यालाही देवीने सहज मारले. 

त्यानंतर शुंभ निशुंभाने रक्तबीज नावाच्या असुराला देवीशी लढण्यास पाठवले. देवीने रक्तबीजावर चक्र व खड्गाने प्रहार केले पण जेव्हा जेव्हा रक्तबीजाचे रक्त जमिनीवर सांडले तेव्हा तेव्हा त्यातून नवीन असुर जन्माला येत होते व लढत होते. त्यांच्याशी लढताना देवीच्या चेहऱ्यावर किंचितही दमल्यासारखे दिसत नव्हते. 

देवीने आपल्या शरीरातून काली नावाची प्रतिभूती निर्माण केली. आणि तिला तिचे मुख विस्तीर्ण काण्यास सांगितले. तसेच हेही सांगितले कि जेव्हा जेव्हा रक्तबीजाचे रक्त जमिनीवर सांडत असेल त्याआधीच ते तू पिऊन टाक.

त्याप्रमाणे कालीदेवीने रक्तबीजावर देवीने वार करताच जे रक्त सांडत होते ते चटकन पिऊन घेतले तसेच त्यातून जे असुर जन्माला येत होते त्यांनाही गिळंकृत करून टाकले. असे करता करता रक्तबीजाचे रक्त वाहून तो क्षीण झाला व देवीच्या एका प्रहरात मृत्युमुखी पडला. 

हि बातमी ऐकून शुंभ निशुंभ भयंकर चिडले व राहिलेले राखीव सैन्य घेऊन देवीशी लढण्यास पोहोचले. देवीने शक्तीच्या एका प्रहरात मागे उभ्या असलेल्या शुम्भाला खलास केले. ते पाहून निशुंभ भयंकर प्रक्षुब्ध झाला. त्याने प्रथम मायावी युद्ध सुरु केले. वेगवेगळ्या रूपात तसेच कधी आकाशात तर कधी जमिनीवर असे तो देवीवर प्रहार करू लागला. तसेच त्याचा अनेक प्रतिकृती निर्माण होऊन त्या देवीबरोबर लढू लागल्या. हे पाहून ब्रम्हा, विष्णू महेश व अन्य देवता देवीच्या मदतीस आल्या. ब्रम्हाची शक्ती ब्राह्मणी, शिवाची शक्ती वृषभारूढ चंद्रलेखा, विष्णूची शक्ती वैष्णवी, इंद्राची शक्ती ऐंद्री, कार्तिकेयाची शक्ती मोरावर स्वार  होऊन देवीच्या शरीरात मिळाली तसेच वेळप्रसंगी वेगवेगळ्या प्रतिभूती बनून मायावी निशुंभाषी वेगवेगळ्या मोर्च्यावर लढू लागल्या. तुंबळ युद्ध चालू होते. तेव्हा भगवान शिवशंकर देवीस म्हणाले हे देवी तू या असुरांचा नाश कर! तेव्हा देवी म्हणाली हे महादेव आपण माझे दूत बनून असुरांना जाऊन सांगा कि तुम्ही पाताळात  निघून जा. देवांना त्यांचे राज्य परत द्या . यामुळे देवीस शिवदूती नावाने ओळखले जाते. पण असुरांनी महादेवाचे म्हणणे  ऐकले नाही. उलट निशुंभ देवीस म्हणू लागला कि तू स्वतः अहंकारी आहेस व अनेक स्त्रियांची मदत घेऊन माझ्या एकट्याशी लढत आहेस. त्यावर देवी म्हणाली ह्या  सर्व देवी माझ्याच प्रतिभूती आहेत त्यानंतर त्या सर्व देवी देवीच्या शरीरात समाविष्ट झाल्या. त्याचवेळी निशुंभाने देवीवर प्रहार केला पण त्याचा किंचितही परिणाम देवीवर झाला नाही. उलट देवीने बाणाने त्याची ८ चंद्र असलेली ढाल व तलवार नष्ट केली. देवीच्या सिंहाने निशुंभावर हल्ला केला तेव्हा तो आकाशात जाऊन लढू लागला मग देवी सुद्धा आकाशात त्याच्याशी लढू लागली. देवीचा एक खड्गप्रहार वर्मी लागून तो असुर जमिनीवर कोसळलेला व तिथेच गतप्राण झाला त्यावेळी मोठा भूकंप झाला.  त्यानांतर अशुभ उल्कापात बंद झाले, ग्रह व नद्या आपल्या मार्गावर चालू  /वाहू लागले . हे युद्ध व  निशुंभाचा वध  झालेला पाहून देव प्रसन्न झाले व देवीची स्तुती करू लागले. 

अध्याय ११ 

देवांनीअग्नीला पुढे करून देवीची स्तुती सुरु केली. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।। हा अध्याय ११ व्या मंत्रातील भाग आहे. देवी तू सनातन आहेस. तुझे शरीर दिव्य असून चेहरा व सूर्यसमान तेजस्वी आहे. तुझे स्तन त्यात अधिक शोभून दिसतात. तू मोहरूपिणी असून निर्सगचक्र चालवण्याचे महान कार्य करीत असते. तू जल, अन्न,काष्ठ इत्यादी आहेस तसेच तहान भूक ह्या सर्व मानवांच्या गरजा निर्माण करणारी आहेस. तसेच मोक्ष  बुद्धी कला काष्ठा प्रदान करणारी मंगलमयी देवी आहेस. उत्पत्ती पालन संहारकरणारी तूच आहेस.  शरणागताची पीडा दूर करणारी तूच आहेस. 

चाप खड्ग शंख गदा धारण करणारी देवी तुला नमस्कार असो.  त्रिनेत्रा सुलक्षणी श्रद्धा मेधा सरस्वती ईशा विद्या तूच आहेस तू आदिवाक्य प्रमाण आहेस. विश्वपिडा,महामारी,चोर,लुटेरे,समुद्रातील वादळ, जंगलातील वणवा मोठ्यात मोठे संकट दूर करणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे? देवीची स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली व तिने देवांस वर मागण्यास सांगितले. तेव्हा देव म्हणाले हे देवी जेव्हा जेव्हा त्रिलोकांवर संकट येईल तेव्हा तेव्हा तू ते नष्ट कर. तेव्हा देवी म्हणाली  वैस्वत मन्वंतराच्या  २८व्या  युगात शुंभ निशुंभ नावाचे अन्य दानव निर्माण होतील त्यांचा संहार करण्यासाठी मी यशोदेच्या पोटी जन्म  घेऊन विंध्य पर्वतावर जाऊन राहील व त्या राक्षसांचा नाश करील त्यानंतर विप्रशक्ती नावाच्या दैत्यांचा मी अतिशय भयंकर रूप धारण करून नाश करील त्यावेळी माझे दात हे डाळिंबाच्या दाण्यासारखे लाल होतील म्हणून लोक मला  रक्तदन्तिका नावाने ओळखतील. त्यानंतर पुढे १०० वर्षे पाऊस पडणार नाही तेव्हा मी शाकंभरी रूपात येऊन माझ्या फांद्या (शाखा) च्या द्वारे सर्व लोकांचे पोषण करील.  दुर्गम नावाच्या राक्षसाचा नाश करून मी दुर्गा नावाने प्रसिद्ध होईल.  हिमालयातील राक्षसांना मारून मी भीमादेवी नावाने प्रसिद्ध होईल . अरुं नामक दैत्याला मारण्यासाठी मी सहा पायांच्या भुंग्याचे रूप धारण करील त्यामुळे लोक मला भ्रामरी नावाने ओळखतील. 

अध्याय १२ फलश्रुती 

सर्व संकटात देवीचे स्मरण केले असता ती त्वरित धावून येते. तिचे यज्ञ दान पूजा इत्यादी प्रकारे पूजन केले असता ते स्थान ती कधीही सोडत नाही. सज्जनांचे ती मंगल करून त्यांना सुखी व ऐश्वर्यवान करते तर दुर्जनांना दरिद्री बनवते. जे तिच्या शरणी जातात त्यांची पीडा ती निश्चित दूर करते यात तिळमात्र शंका नाही. भयंकर संकटात ती भक्तांचे रक्षण करते. ती भक्ताचे सर्व दिशांनी, सर्व ग्रहांपासून , सर्व संकटांपासून रक्षण करते. 

अध्याय १३ राजा सुरथ व समाधीला देवीचे वरदान 

तर अशाप्रकारे देवीचे चरित्रमाहात्म्य मेधाऋषींनी राजा सुरथ व समाधीला सांगितले. त्यानंतर देवीची  व्रतपूर्वक उपासना करण्यास त्या दोघांना सांगितले. त्यांना सप्तशती मंत्र प्रदान केला. तेव्हा ते दोघे नदीच्या कधी जाणून देवीची मातीची मूर्ती बनवून व्रतपूर्वक उपासना करू लागले. सहा महिन्यानंतर त्यांनी आहार कमी कमी केला व शेवटी निराहार राहून देवीची उपासना करू लागले. तेव्हा देवी प्रत्यक्ष तिथे अवतीर्ण झाली व त्या दोघांस वर मागण्यास सांगितले. तेव्हा राजा सुरथने आपले राज्य परत मिळावे तसेच आपल्याला कधीच नष्ट न होणारे राज्य मिळावे अशी इच्छा प्रकट केली तेव्हा देवीने तथास्तु म्हटले व राजास सांगितले कि तू चैत्रवंशात सूर्याच्या पोटी जन्म घेशील व महान राजा होशील. त्यानंतर सुरथ राजाला त्याचे राज्य परत मिळाले व पुढील  जन्मात तो महान सम्राट व वैवस्तर मनू बनला. समाधीला देवीने तुला काय हवे ते माग असे म्हटले. त्यावर समाधी म्हणाला कि माझे मन संसारापासून अनासक्त झाले आहे त्यामुळे देवी तू मला मोक्ष दे . त्यासुमार देवीने त्याला मोक्षमार्ग दर्शविला व देवी अंतर्धान पावली.

 समाप्त    

Friday, 23 October 2020

दुर्गा सप्तशती सारांश थोडक्यात भाग -२

 दुर्गा सप्तशती - सारांश. भाग २ 

अध्याय २,३,४ 

मेधामूनी सांगतात : महिषासुर राक्षसाच्या सेनेचे देवांशी सुमारे १०० वर्ष युद्ध चालू होते आणि महिषासुर त्यात विजयी होत होता. त्याने देवांचे सर्व  अधिकार ताब्यात घेतले होते व देव सामान्य मनुष्याप्रमाणे मृत्युलोकात फिरत होते. 

यास्थितीत देवराज इंद्र इतर देवांसहित कैलास पर्वतावर श्रीशिव यांच्याकडे  गेले तेथे विष्णूही विराजमान होते. देवांनी सांगितलेले पराभव ऐकून श्रीशिवाचें व विष्णूंचे रागाने मुख वाकडे झाले भुवया वक्र झाल्या. तत्क्षणी शिवाच्या शरीरातून एक शक्ती बाहेर पडली व तिने स्त्रीच्या मुखाचे रूप धारण केले. श्रीविष्णूच्या शक्तीमुळे तिचे हात उत्पन्न झाले. चंद्र वरून वायू अग्नी, सूर्य कार्तिकेय इत्यादी देवतांच्या शक्तीने तिचे पूर्ण शरीर निर्माण झाले. समुद्राने रत्ने, नागाने मणिहार, कुबेराने वस्त्रे , तसेच अनेक देवांनी अनेक शस्त्रे  देवीस दिली. पिनाकधारी शंकराने एक त्रिशूल आपल्या धनुष्यातून निर्माण करून देवीला दिला. इंद्राने सिंह भेट दिला. 

अशाप्रकारे शस्त्रसज्ज होऊन महादेवी महिषासुराशी युद्ध करण्यास निघाली दोघांचे तुंबळ युद्ध झाले. महिषासुर मध्येच रेड्याचे रूप घेऊन पृथ्वी उध्वस्त करीत होता तर मध्येच हत्तीचे रूप घेऊन देवीवर हल्ला करीत होता. तर पुन्हा मानवी  लढत होता. एकदा त्याने रेड्याचे रूप घेतले असता देवीने त्यावर खड्ग प्रहार केला तेव्हा तेव्हा तो मानवी रूपात येण्याचा प्रयत्न करीत असता फक्त त्याचे मुख मानवाचे झाले होते त्यावर देवीने त्रिशूल प्रहार करून त्याला संपवले. 

सर्व देव देवीची स्तुती करू लागले. तेव्हा देवी प्रसन्न होऊन म्हणाली देवांनो तुम्हाला जे हवे असेल ते मागा. तेव्हा देव म्हणाले देवी आपण महिषासुराला मारून आम्हाला संकटमुक्त केले आहे तेव्हा आणखी काय मागायचे? पण एकच मागणे आम्ही मागतो आणि ते म्हणजे जेव्हा जेव्हा मानवावर / देवांवर संकट येईल तेव्हा तुम्ही प्रकट व्हावे हीच इच्छा. देवी तथास्तु म्हणून अंतर्धान पावली. 

पुढे शुंभ आणि निशुंभ राक्षस जन्माला आले व त्यांनी संपूर्ण पृथ्वी, स्वर्ग यांचा ताबा मिळवला देवांचे सर्व अधिकार घेऊन ते आपले कार्य करू लागले. 

त्यावेळी सर्व देव कैलास पर्वताकडे निघाले. त्याचवेळी पार्वतीदेवी स्नानासाठी एका तलावाजवळ आल्या होत्या. त्यांना पाहताच देवांनी त्यांची स्तुती सुरु केली. तेव्हा देवीने विचारले कि देवांनो तुम्ही इथे कशासाठी  आला आहात व कोणाची स्तुती करीत आहेत तेव्हा देवीच्याच शरीरातून एक प्रतिकृती प्रकट झाली  व म्हणाली देवी पार्वती हे देव शुंभ निशुंभ राक्षसांपासून स्त्रासलेले आहेत व आपलीच स्तुती करीत आहेत. तेव्हा देवीने राक्षसांचा नाश करण्याचे वचन देऊन देवांना परत पाठविले. 

त्यानंतर देवीने अलौकिक रूप धारण केले व हिमालयायच्या एका शिखरावर जाऊन बसली. तिचे ते  अलौकिक रूप पाहून शुंभ व निशुंभच्या दूतांनी त्यांना हि माहिती दिली व त्या स्त्रीस प्राप्त करावे असा सल्ला दिला. 

अध्याय ५ 

यानंतर शुंभ निशुंभ राक्षसाने आपला दूत सुग्रीव यास देवीकडे पाठवले दूताने देवीस सांगितले कि शुंभ निशुंभ तिन्ही  लोकांचे स्वामी आहेत देवांची सर्व अमूल्य संपत्ती, शस्त्रे , त्यांनी प्राप्त केले आहे. तेव्हा तुही शुंभ निशुंभ यांच्या आश्रयाला ये व त्यांच्यापैकी एकाची पत्नी हो. यावर देवी म्हणाली तुम्ही म्हणताय ते खरे आहे शुंभ निशुंभ महापराक्रमी आहेत. पण काय करू मी अल्पबुद्धीने व अज्ञानाने प्रतिज्ञा करून बसले कि जो कोणी पुरुष मला यद्वत हरवेल त्याच्याशीच मी लग्न करेल. यावर दूत म्हणाला देवी मूर्खता करू नकोस शुंभ निशुंभ जेव्हा तुला ओढत नेतील तेव्हा तुझा अहंकार व प्रतिज्ञा नष्ट होईल. पण तरीही देवीने पुन्हा आपली प्रतिज्ञा दूताला सांगितली व तो परत गेला.

क्रमश: 

दुर्गा सप्तशती सारांश थोडक्यात

दुर्गा सप्तशती
ह्या पूर्ण मंत्राचे एकूण १३ अध्याय आहेत व एक मुख्य कथा आहे त्याचा सारांश अतिशय थोडक्यात देत आहे. 
प्रथम अध्याय:
फार वर्षांपूर्वी सुरथ नावाचा राजा भूमंडळावर राज्य करीत होता. त्याचे सामर्थ्य उत्तम होते व तो अतिशय न्यायी राजा होता. पण त्यातच कोलाविध्वंसी नामक राजा त्याचा शत्रू बनला. राज्यविस्तार करण्यासाठी कोलाविध्वंसीने सुरथ राजावर आक्रमण केले. व दुर्दैवाने युद्धात सुरथ राजाचा पराभव झाला.  त्यातच सुरथ राजाचे मंत्रीसुद्धा कोलाविध्वंसीला मिळाले. आता सुरथ राजा फक्त त्याच्या नगरापुरता राजा राहिला होता. तेव्हा शिकार करण्याचे कारण सांगून तो जंगलात निघून गेला. घनदाट जंगलात गेल्यावर तो भटकत होता तेव्हा त्याला तिथे एक समाधी नावाचा वैश्य (व्यापारी) दिसला. राजाने त्याला विचारले कि तू या जंगलात काय करीत आहेस? त्यावर समाधी म्हणाला मी एका धनवान कुटुंबात जन्मलेला व्यापारी आहे. पण माझ्या मुलांनी,पत्नीने, व भावांनी माझी सर्व संपत्ती हडप करून मला घराबाहेर काढले आहे. 
दोघांचा वार्तालाप झाल्यावर दोघे आपल्या दुःखावर व जुन्या आठवणी आठवून स्तब्ध आणि उद्विग्न झाले. त्यात राजा सुरथ म्हणाला अरे समाधी तुझ्या कुटुंबातील लोकांनी तुला इतका त्रास दिला तरी तू त्यांची आठवण काढून दुःखी का होत आहेस? तेव्हा समाधी म्हणाला राजा मी काय करू माझे मन अजूनही माझ्या कुटुंबाची काळजी करीत आहे. राजा सुरथ सुद्धा मनातल्या मनात आपले राज्य, प्रजा, खजिना, आपला प्रिय हत्ती यांची आठवण काढून व्याकुळ होत होता. 
फिरत फिरत दोघे त्या जंगलात एका आश्रमाजवळ गेले. तिथे अनेक शांत आणि हिंसक जीव एकत्र गुण्यागोविंदाने राहत होते हे पाहून दोघांना आश्चर्य वाटले. तो आश्रम मेधामुनी नामक गुरुजींचा होता. 
तिथे अनेक शिष्य मेधा मुनींची सेवा करण्यात मग्न होते. राजा व समाधी आश्रमात गेले व विनयपूर्वक मेधामुनींना नमस्कार करून समोर  बसले व बोलू लागले. त्यांनी अपआपली परिस्थिती मेधामूनींना सांगितली. 
तेव्हा मेधामुनी म्हणाले विषयमार्गाचे ज्ञान सर्व प्राण्यांना असते. ते कसलीही अपेक्षा न करता आपल्या पिल्लांना तोंडात घास खाऊ घालतात. मनुष्य प्राणी बुद्धिमान आहे पण तोही विषय व आसक्तीमुळे अंधकारात फेकला गेला आहे. निसर्गाची स्थिती नित्य ठेवण्यासाठी हि आसक्ती व मोहमाया निर्माण करणारी महान परमेश्वरी देवी आहे. तीच नित्य या आजनमा आहे. तिच्याच कृपेने सर्व निसर्ग चक्र चालू आहे व निर्माण उत्कर्ष भोग व संहार हि तीच करते.
आम्ही अनेक मुनिजन तिच्याच चरित्राचा अभ्यास करीत असतो.   
हे ऐकून राजा व समाधी म्हणाले मुनिश्रेष्ठ हि देवी नक्की आहे तरी कोण आणि तिचे चरित्र काय आहे हे विस्तारपूर्वक कृपया सांगा. 
त्यावेळी मेधामूनी म्हणाले फार फार वर्षांपूर्वी भगवान विष्णूच्या कानातील मळापासून मधू आणि कैटभ राक्षस उत्पन्न झाले होते. त्यांनी सगळीकडे उत्पात माजवला होता. ते ब्रम्हाऋषींना मारण्यासाठी सरसावले. तेव्हा ब्रम्हाऋषीं श्री विष्णूंना शरण गेले. पण पाहतात तर काय महाविष्णू हे योगनिद्रा घेत होते व महादेवीच्या प्रभावाने ती योगनिद्रा असल्याने ब्रम्हादेवांनी महा योगनिद्रेचे स्मरण करून स्तुती सुरु केली. विविध अक्षरे उच्चार, ओंकार, उद्या स्थिती अंत , मोह आसक्ती हे सर्व महामोहमाया परमेश्वरी देवीकडून घडवले जाते तेव्हा देवी तू भगवान विष्णूंना योगनिद्रेतून मुक्त कर अशी प्रार्थना ब्रह्मदेवांनी केली. त्यावेळी ती स्तुती ऐकून परमेश्वरीदेवी विष्णूंच्या योगनिद्रेतून बाहेर अली व विष्णू भगवान जागे झाले. त्यावेळी मधू आणि कैटभ यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्ष युद्ध झाले व थे थांबेना तेव्हा परमेश्वरी योगेश्वरी देवींने मधू आणि कैटभ यांच्यात ममता उत्पन्न केली. तेव्हा ते भगवान विष्णूला म्हणु  लागले कि देवा आम्ही तुझ्या युद्धकौशल्यावर खुश झालो आहोत कृपया वरदान मागा. तेव्हा विष्णू म्हणाले कि मला इतर वर नकोत फक्त तुमचा वध माझ्या हातून व्हावा हीच इच्छा आहे. तेव्हा ते दोन राक्षस म्हणाले जिथे जल नसेल अशा ठिकाणी आमचा वध करावा. तेव्हा श्रीविष्णूने त्यांना आपल्या मांडीवर घेऊन मारले. 
अशाप्रकारे संपूर्ण देव, प्राणी पक्षी निसर्ग त्या दोन राक्षसांच्या उपद्रवापासून मुक्त झाले. 
हे ऐकून राजा व समाधी यांचे समाधान झाले पण त्यांनी देवीची अधिक माहिती सांगण्याचा आग्रह केला. 
क्रमश: 

Tuesday, 16 January 2018

आधुनिक जीवनशैली व मंगळदोष.

मंगळदोष हा रोजच्या जीवनात सहजासहजी न दिसणारा दोष आहे. ज्यावेळी घनिष्ट मैत्री किवा विवाहासारखे नाते बनते तेव्हा प्रत्येकाच्या आवडीनिवडी प्राथमिकता इत्यादी बदलते व हा दोष प्रकर्षाने दिसायला लागतो.
एका पिढीतील ज्योतिषी अनेक अपवाद सांगून मंगळदोषाचा परिहार होतोय व विवाह निर्धास्तपणे करा असा सल्ला देताना दिसत होते. मुलगा मुलगी यांच्या शिक्षणातील विषमता, जात, धर्म, वय यामुळे असा परिहार सांगणे योग्य आहे असेही एकीकडे वाटते. पण तसे खरे आहे का किवा होते का हेही पडताळून पाहणे महत्वाचे आहे.
हा परिहार पूर्वी कसा सांगितला गेलाय याच्यावर थोडक्यात नजर मारू. दोष परिहाराचे निकष: मंगळ कर्क या त्याच्या नीच राशीचा, शत्रुगृही म्हणजे मिथुन व कन्या राशीचा, अस्तंगत म्हणजे सूर्याजवळ असताना, प्रथमात मेषेचा, चातृर्थात वृश्चीकेचा, सप्तमात मकरेचा, अष्टमात सिंहेचा व द्वादाशात धनु राशीचा मंगळ निर्दोष समजला गेला आहे. मंगळावर शुभ ग्रहाची म्हणजे गुरु व शुक्राची पूर्ण दृष्टी असता तोही निर्दोष समजला गेला आहे.
मंगळ वर दिलेल्या राशीत असताना निर्दोष म्हटले जाते. पण त्याचे नक्षत्र व अंश पहिले जात नाहीत. कारण काही ठराविक नक्षत्रात असलेला मंगळ दोषी असू शकतो तसेच काही ठराविक अंशावर असतानाच तो नीच किवा परम नीच असतो. इतर अंशावर असे असत नाही. बरेचदा प्रथमात मेषेचा ऐवजी सप्तमात मेषेचा मंगळही निर्दोष म्हणून सांगितला जातो. त्याला काय होतंय अशी वृत्ती असते. असे निर्दोष ठरवण्याचे मार्ग असले तरीही मंगळ हा मंगळच असतो त्याचे काही अक्रमक गुणधर्म तो सोडत नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
पुढे मंगळाच्या कुंडलीला प्रतिकारक कुंडली म्हणून काही नियम दिलेत त्याचा विचार करू. अशी कुंडली ज्याला मंगळ आहे त्याची नसून संभाव्य जोडीदाराची असावी असा नियम आहे पण अनेकजण हा नियम उमेदवारालाच म्हणजे ज्याची कुंडली आहे त्यालाच लाऊन टाकतात.
जोडीदाराच्या कुंडलीत १,४,७,८,१२ या स्थानी शनी असेल तर, पंचमात व दशमात शनी असेल तर, १ किवा ७ स्थानी बलवान गुरु किवा शुक्र असतील तर, १ किवा ७ स्थानी राहू किवा केतू असेल तर अशा जोडीदाराची कुंडली मंगळाच्या कुंडलीला प्रतिकारक असते.
आता यातील शनीचा प्रतिकारकतेच्या दृष्टीने विचार करू. एक जण जर अक्रमक असेल तर दुसरा शांत असणे असा याचा एक अर्थ निघतो, पण जोडीदाराचा मंगळ कुठे आहे याचा विचार इथे होत नाही. पंचमात आणि दशमात शनी असणे म्हणजे जोडीदार मुले, जबाबदाऱ्या व ध्येय यात अडकून पडलेला असतो त्यामुळे तो मंगळ असलेल्या आपल्या जोडीदाराच्या किरकीरीकडे फारसे लक्ष देत नाही. गुरुबद्दल म्हणायचे झाले झाले तर न्याय्य हक्कांसाठी गुरु-मंगळ योग अडून राहणारा ठरतो व भांडायला कमी करत नाही. शुक्र फक्त भोग भोगणारा असतो म्हणजे ते नाते भोगावर आधारित असते. शुक्र-मंगळ योग दोघे एकमेकांची अनैतिकता खपवून संसार करणारे असू शकतात. राहू-केतू म्हणजे जोडीदार फारच सोशिक असतो व ठेविले अनंते ... नुसार सहन करणारा असतो.
एकेकाळी समाज अपवादामुळे संसारात कितीही अडचणी आल्या तरी व एकमेकांचे पटले नाही तरीही काडीमोड करायचा विचार नवराबायको करत नव्हते. पण आज कायदेशीर हक्क, बदललेला समाज, स्त्रियांना नोकरीच्या संधी, उंचावलेले जीवनमान यामुळे घटस्फोट घेणे फारसे अवघड राहिलेले नाही.
या बदललेल्या काळात मंगळाच्या निर्दोषतेचे जुने निकष लाऊन उपयोगाचे नाही. बरेचदा निर्दोष समजला गेलेला मंगळ आयुष्यात कधीतरी नवराबायकोत वादळी घटना निर्माण करून जातो.
हे सगळे असेल तर नेमके करायचे काय? यावर उपाय काही आहे का? पुढच्या लेखात.

Saturday, 25 November 2017

आपले देव विचित्र कसे झाले?

लहान मुले कधीकधी अवघड प्रश्न विचारतात,
हनुमानाला बोलता कसे येत होते? तो तर एक वानर होता ना! त्याने पर्वत कसा उचलला? भुते हनुमानाला का घाबरतात?
शंकराला तिसरा डोळा कसा? त्याच्या डोक्यावरून गंगा नदी कशी वाहते?
देवीला इतके हात कसे काय?
गणपतीला हत्तीचे तोंड कसे काय लावले? तो उंदरावर कसा बसू शकतो?
देवांना इतकी तोंडे कशी?
शनीला सगळे का घाबरतात? इत्यादी.
ह्यांची त्यांच्या मनाला पटणारी उत्तरे देणे सध्या आपल्यालाही अवघड होऊन बसले आहे. असे नक्की का होते आहे हे आपणच शोधायचे आहे. ज्या काळात ह्या संकल्पना रचल्या गेल्या त्याचा अभ्यास करणे हेही गरजेचे आहे.

प्रश्नकुंडली-पुढे चालू भाग-२

 प्रश्नकुंडली विषयावर आपण गेल्या लेखात चर्चा केली.  त्याच विषयी आणखी काही माहिती देत आहे. 
१) प्रश्नशास्त्र हे अजब शास्त्र आहे, माणूस प्रयत्न करूनही  ज्यावेळी हरतो  आणि हताश होतो तेव्हा देवाला/दैवाला विचारतो कि माझे काय चुकले? मला कशाची शिक्षा मिळत आहे? हा तो नेमका क्षण/ वेळ  असते  जी  प्रश्नकुंडलीसाठी फार महत्वाची असते. 
अर्थात दरवेळी व्यक्ती हताश किवा हरलेली असायला हवी असा नियम नाही. हताश होणे/हार मानणे हे अप्पर लिमिट आहे. व्यक्ती प्रश्न विचारताना गंभीर हवी हा यामागील मतितार्थ आहे इतकेच. समोर ज्योतिषी दिसला मग गम्मत म्हणून प्रश्न केला असेही लोक करतात. तोवर प्रश्न नीट तयार झालेला नसतो. एखादा प्रश्न तयार होण्यास कालावधी लागतो. मुलगी २१ वर्षांची झाली, शिक्षण घेत आहे, २६ व्या वर्षी आता नोकरी करत, तरीही लग्न ठरत नाही. वय वर्षे ३२ लाही जर लग्नाचाच प्रश्न असेल तर तो प्रश्न व्यवस्थितरित्या मनात गुंता करून राहिलेला असतो. आणि असा प्रश्न विचारण्यायोग्य असतो. असे अनुभव आपण इतर अनेक प्रश्नांचा बाबत घेऊ शकता. नोकरीतील बदल, परदेशगमन, आजारपण याबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यायोग्य होतो तेव्हाच विचारणे गरजेचे असते.
२) सर्वात पहिल्यांदा पाहिलेला प्रश्न हा जास्त परिणामकारक उत्तरे देतो. कारण आपण हा आपल्या नियतीशी-दैवाशी संवाद साधत असतो. तुमची अडचण व आकांत बघून नियती अशावेळी जास्तीत जास्त अचूक उत्तर द्यायचा प्रयत्न करते. कधीकधी जातकाला मिळालेले उत्तर पटलेले नसते मग तो परत परत प्रश्न विचारून काही चांगले उत्तर मिळते का याचा प्रयत्न करतो. 

इथे एक महत्वाचे समजून घेतले पाहिजे, तुम्ही एखादा सस्पेंस किवा कॉमेडी चित्रपट पाहता तेव्हा पहिल्यांदा पाहत असताना जी उत्कंठा असते ती दुसर्यांदा पाहताना शिल्लक राहत नाही, तसेच थोडेफार हेही आहे. म्हणून एखाद्या विषयावरील सर्वात प्रथम जो प्रश्न विचारला तो फार महत्वाचा असतो. नंतर त्यावर कितीही प्रश्न विचारले तरी ते वेगळे निष्कर्ष दर्शवितात. जो अतिविद्वान ज्योतिषी आहे तो पुढच्या प्रश्नात काय दडले आहे हेही सांगू शकतो. पण असे लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहे. अशावेळी आपण पहिल्यांदा ज्या ज्योतिष्याला भेटलो ती तारीख व वेळ नोंद करून ठेवावेत. म्हणजे समजा त्या ज्योतीश्याकडून  तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर दुसर्या ज्योतिष्याला तुम्ही विचारू शकता. प्रश्न तोच राहतो वेळही तीच राहते.. वाटल्यास आपल्या ज्योतिष्याला तो जर परत प्रश्नकुंडली मांडण्यास तयार असेल ती काढावयास लावावी. 
३) ज्योतिष्याची जबाबदारी: 

Saturday, 14 October 2017

हस्तरेषा - एक संशोधन

मानवाची उत्क्रांती:"मानवाच्या उत्क्रांतीत त्याला निसर्गनियमाने तीन महत्त्वपूर्ण गोष्टी प्राप्त झाल्या. एक म्हणजे हाताचा आकार बदलला व एका बोटाचा अंगठा बनला, जो इतर बोटांना टेकवता येऊ लागला. दुसरे म्हणजे कंठ थोडा उत्क्रांत होऊन तो वेगवेगळे आवाज काढू लागला. ज्यातून पुढे 'काही शब्द' आणि नंतर 'भाषा' निर्माण झाली व तिसरे म्हणजे हाताने अन्नाचे लहान तुकडे करून खाणे शक्य झाल्यावर, त्याला मोठय़ा जबडय़ाची गरज उरली नाही, त्यामुळे जबडा लहान होऊ लागल्याने डोक्यात मेंदूची वाढ व्हायला जागा निर्माण झाली व तशी मेंदूची वाढ क्रमश: होऊ लागली."
हाताचा आकार: मानवी हाताचा आणि मेंदूचा घनिष्ट संबंध आहे हे शास्त्रीय सत्य आहे. पृथ्वीवर माणूस वेगवेगळ्या परीस्थितीत उत्क्रांत झाला. काही मानव जंगलात वृक्षाच्या आधाराने उत्क्रांत झाले तर काही सपाट वाळवंटी प्रदेशात उत्क्रांत झाले. दोन्हीकडे स्वतःच्या जीवाचे रक्षण करणे हे सर्वात महत्वाचे होते. जे मानव वृक्षाच्या आधाराने उत्क्रांत झाले त्यांचे हात हे झाडावर चढण्यास व त्याद्वारे स्वतःचा बचाव करून घेण्यास अधिक बलवान ओबडधोबड व बोटे मोठी असलेले असे झाले. तर जे मानव सपाट प्रदेशात उत्क्रांत झाले त्यांचे हात लहान नाजूक, बोटे आखूड असे उत्क्रांत झाले. झाडावर स्वतःचा बचाव करून घेणे सोपे असल्याने ह्या वर्गातील मानवांची बुद्धीमत्ता हि मध्यम दर्जाची अशी असते. सपाट प्रदेशात उत्क्रांत झालेले लोक स्वतःचा बचाव करणारे व लहान हाताचे पण अधिक चतुर प्रकारचे लोक आहेत.
अर्थात नन्तर पुढे लाखो पिढ्यात एकमेकांच्या जनुकांचे मिश्रण झाल्याने पूर्ण लांब किवा पूर्ण आखूड हात अभावानेच पाहायला मिळतो. बरेच हात हे यातील या दोन टोकाच्या प्रकारांपैकी मधल्या प्रकारचे असतात. तरीही पूर्ण लांब व पूर्ण आखूड हात असलेल्या लोकांच्यात त्यांच्या बुद्धीत व सांपत्तिक स्थितीत ठळक वेगळेपणा पाहायला मिळतोच.
अंगठा: कोणतेही काम करताना किवा वस्तू उचलताना चार बोटे एकीकडे तर एकट अंगठा एकीकडे हि स्थिती असते. ह्याचा अर्थ अंगठ्याचे महत्व चार बोटांइतके आहे. अंगठ्याच्या आकारावरून माणसाच्या विचारांची आणि बुद्धीची कल्पना येते. लांब अंगठा हा प्रगल्भ विचार दर्शवितो. तसेच फार जाड बाकदार अंगठा हा कष्ट करणाऱ्या माणसाचा असतो. फार लांब अंगठा असलेला माणूस हा मात्र संकटांचा सामना करण्यास असमर्थ असतो. 


हाताची बोटे: हाताच्या बोटांचे सुद्धा अनुवान्शिकीय महत्व आहे. बोटे आणि तळवा ह्यांचा परस्पर आकाराच्या गुणोत्तराचे महत्व तर आहेच आहे. तसेच बोटांची कमी अधिक लांबी हीसुद्धा महत्वाची आहे. मधले बोट लांब असणारी व्यक्ती हे स्थिर वातावरणात उत्क्रांत झालेली असते. तर बोटांची लांबी समान आकाराची असणारे लोक हे अस्थिर वातावरणात उत्क्रांत झालेले असे आहेत. बोटाच्या लंबित विषमता असणारे लोक हे शांतताप्रिय, कलाप्रेमी असतात.
बोटांची लांबी सारखी असणारे लोक अधिक आक्रमक व कला इत्यादी क्षेत्रात थोडे मागास असतात पण व्यावहारिक बाबीत मात्र हुशार असतात. 

हातावरील रेषा:  माणूस जेव्हा मुठ वळतो तेव्हा हाताच्या रेषा निर्माण व्हायला लागतात. आयुष्यरेषा (life line) हि मुख्यता अंगठ्याच्या हालचालीमुळे निर्माण होते. आयुष्यरेषा हि शुक्राच्या (सेक्स) क्षेत्राजवळ असल्याने जगण्याची प्रेरणा सेक्सशी संबंधित असल्याचे दर्शविते. मस्तिष्करेषा (head line) (म्हणजे बुद्धी) व व हृदयरेषा (heart Line) (म्हणजे समाधान व शांतता) ह्या अंगठा व चार बोटे यांच्या एकत्रित उपयोगाने निर्माण होते. हि चार बोटे जितकी एकत्रित काम करतात तितक्या मस्तिष्क व हृदयरेषा जास्त लांब बनतात. गुरु (तर्जनी), शनी (मध्यमा), रवी (अनामिका) व बुध (करांगुली) यांच्या कमीअधिक प्रयोगाने मस्तिष्क व हृदय रेषा कमीअधिक लांब बनतात. 
भाग्यरेषा (fate line) ही चंद्राचे क्षेत्र (म्हणजे प्रतिभा) उन्नत असल्याने बनते. 
काही सामान्य नियम: डावा हात हा नेहमी तुमचे आई वडिलांवर अवलंबून असलेले आयुष्य दर्शवितो. डाव्या बाजूला मानवाचे हृदय असल्याने नेहमीच तो डावी बाजू मागे ठेऊन उजव्या बाजूला पुढे करतो. त्यामुळे डावा हात आहे ती स्थिती स्वीकारणे व उजवा हात स्थितीत बदल घडविणे यांचे निर्देशक ठरतात. उजवा हात पूर्वीचे आयुष्य व नंतर तुम्ही घडवलेले बदल दर्शवितो. दोन्ही हातात साम्य असणारे लोक सुखी असतात. दोन्ही हातात फरक असणारे लोक हे खूप कष्ट करून यशप्राप्ती करणारे असतात. 
बरेचदा वय १८ ते २७ पर्यंत हातावरील रेषा विकसित होत असतात. एका ठराविक टप्प्याला हि प्रक्रिया थांबते. 
विवाह, संतती, भावंडे, शिक्षण ह्या रेषा अनुवांशिक गुण दर्शवितात. आई-वडील व मुले यांच्या रेषात साम्य असते. 


याशिवाय हातावर असंख्य लहान लहान चिन्हे असतात, ती येतात पुढे नष्ट सुद्धा होतात. त्यांचे महत्व काय हे इतरत्र पाहू.
धन्यवाद!!

Sunday, 17 September 2017

नवरात्र-महत्वाचा कुलाचार

नवरात्र हा शेतकरी व आदिम संस्कृतीचा फार महत्वाचा कुलाचार आहे. असंख्य वर्षे ही परंपरा कशी टिकून राहिली हे जाणून घेणे उद्बोधक आहे. त्यासाठी आपण आधी आद्य-कुलस्वामिनीच्या तत्वाची ओळख करून घेऊ.

 महिषासुरमर्दिनीचे स्वरूप: देवीचे स्वरूप हे नेहमी महिष म्हणजे रेड्याला मारताना दाखवले गेले आहे. ह्याचा काळाचा शोध घेतला असता आपण फार पूर्वी म्हणजे सुमारे २० ते ५० हजार वर्षे मागे जाऊन पोचतो. मानव शेती करायला लागल्याचा काळ हा सुमारे १०००० ते १५००० वर्षापूर्वीचा आहे. त्यापूर्वी कित्येक हजार वर्षे माणूस हा रानटी अवस्थेत होता. पशुपालन विकसित होत होते. हा काळ फार मोठा म्हणजे सुमारे ३० ते ४० हजार वर्षे चालला. पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात होती. सुमारे ७००० वर्षापूर्वीची पूर्व-सिंधु संस्कृतीतील खालील प्रतीके पाहिल्यावर हे लक्षात येते.



वरील चित्रातील ध्यानस्थ बसलेला पुरुष स्वतः आद्यपुरुष महिष (पृथ्वी पती म्हणजे महि+इष), अर्थात महेश म्हणजे शंकर आहेत. विशेषतः डोक्यावर दर्शविलेली शिंगे म्हणजे माणूस व महिष यातील संबंध दर्शवितात. पुढे माणूस शेती करत स्थिरावत होता तसे नागरी संस्कृतीची निर्मिती करावी लागली. रानटी अवस्थेत जशी पुरुषाची शक्ती महत्वाची असते तशी नागरी संघटीत समाजात स्त्रीची शक्ती व तिचे अधिकार महत्वाचे बनतात. इथे स्थिरता, निर्मिती ह्यांना महत्व आहे. स्त्रियाच शेतात पेरणी करीत असत असे संशोधक सांगतात. गाव निर्माण झाले तसे ग्रामदेव व ग्रामदेवी ह्या अस्तित्वात आल्या.

रानटी अवस्थेतील पुरुषाला (अर्थात महीषाला) सुसंस्कृत नागरी/शेती करणाऱ्या समाजात सामावून घेताना बराच संघर्ष झाला. ते कार्य आपली आद्य स्त्री म्हणजे कुलस्वामिनी पार पाडले हे वरील चित्रात दर्शविले आहे. आज नामशेष झालेला रेडा हा प्राणी पूर्वी समस्त भूमी व्यापून राहिलेला होता. त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी मानवाला मोठा उद्योग करावा लागला आहे. हा रेडा हटवूनच पुढे शेतीचा मार्ग प्रशस्त झाला होता. नक्कीच काहीतरी मोठी उलथापालथ ह्या रेडा प्रकरणात झालेली आहे. नवमीला दिला जाणारा पशुबळी याचेही इथे काहीतरी तारतम्य आहे. पुढे तो बळी प्रतीकात्मक म्हणजे इतर प्राणी जसे बोकड इत्यादींचा द्यायला सुरुवात झाली. आता पशुबळी प्रथा गरज नसल्याने बंद होत आहे.
तर अशाप्रकारे आपण देवीच्या आद्य स्वरूपाचा विचार केला. आता आपण नवरात्र ह्या कुलाचाराचा अभ्यास करू,
घटस्थापना: "पेरले तर उगवते" अशी म्हण प्रसिद्ध आहे. आद्य समाजात प्रत्येकाची थोडीफार शेती होतीच. ह्या शेती उद्योगाचे स्मरण करून देणारा जो कुलाचार आहे तो म्हणजे घटस्थापना. हे व्रत नाही हा कुलाचार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शास्त्रात केलेले आहे. आपण जे अन्न बनवतो ते अन्न ज्या शक्तीने निर्माण होते तिच्या पूजनाचा हा विधी आहे. हा विधी साधा सरळ असून आपण स्वतः सहज करू शकतो.
१) सर्व देव स्वच्छ धुवून नागिणीच्या पानावर ठेवले जातात. पानांचा देठ देवाकडे असतो. देवांना हळद-कुंकू, अक्षता अर्पण करून धूप, दीप दर्शवून अत्तर लावावे. दीप, घंटा इत्यादींचे पूजन करावे.
२) देवघरात सर्व देवांच्या समोर एक पाण्याचे चौकोन मंडळ काढून त्यावर थोड्या अक्षता टाकाव्यात. तिथे एका पत्रावळीवर वावरी (म्हणजे शेतातील काळी किंवा तपकिरी माती) सुमारे पाच बोटे खोल अंथरून त्यावर एक मातीचे मडके (सुगडी) सरळ राहील असे मातीत दाबून ठेवावे. हे मडके सच्छिद्र असावे. ते पाण्याने पूर्ण भरून त्यात तांदूळ टाकावेत. त्यावर ५ नागिणीची किंवा आंब्याची पाने लावून शेंडी वरच्या दिशेला करून नारळ ठेवावा. ह्या नारळ व घटाचे हळद-कुंकू, अक्षता अर्पण करून, धूप, दीप दर्शवून पूजन करावे. काही ठिकाणी वरील नारळाला वस्त्र घालण्याची पद्धत असते. हे वस्त्र लाल रंगाचे असावे. आपल्याला माहित नसेल तर कापसाला थोडे हळद-कुंकू लावून ते वस्त्र अर्पण करावे. जे सौभाग्यअलंकार पूजा साहित्याबरोबर मिळतात ते घटाच्या (सुगडीच्या) गळ्याजवळ घालावेत. ते नसतील तर विविधरंगी नाडा असतो तो बांधावा. तोही अलंकार स्वरूपच असतो.

त्यानंतर जी सप्तधान्य मिळतात ती आजूबाजूच्या मातीत बोटभर माती बाजूला काढून धान्य पसरल्यावर त्यावर ती माती टाकावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. यात प्रामुख्याने गहू तांदूळ, ज्वारी, बाजरी, जव, डाळी हे धान्य असते.
३) पहिली माळ ही नागिणीच्या पानांची किंवा फुलांची असते. अशा नऊ माळा नऊ दिवस घटाच्यावर खिळ्याला टांगून खाली घटावर येतील अशा प्रकारे सोडाव्यात. प्रत्येक दिवशी एक माळा अर्पण करीत जावे. माळेतील फुले/पाने संख्येने विषम असावीत. बरेच घरात ७ व्या माळेला कडाकणी व वेणी फणी अर्पण केली जाते. तीही नैवेद्य करून देवघरात वर खिळ्याला टांगून ठेवली जाते. रोज कपूर जाळून देवीची आरती करावी.
हि सर्व पूजा व घटस्थापना सकाळी १० च्या आत संपन्न झालेली उत्तम.

नित्यविधी: एकदा घटस्थापना झाली असता देव हलवू नयेत. रोज एक फुलांची माळ अर्पण करीत जावे. रोज पेरलेल्या धान्यावर थोडे पाणी शिंपडावे.
बरेच घरात एक व्यक्ती नवरात्रात उपवास करते. फळभाज्या (लाल भोपळा, काकडी इत्यादी) सुद्धा उपवासाला चालतात. इतर नेहमीचे उपवासाचे पदार्थ चालतात.
उपवास हा पहिल्या माळेला सुरु होतो व नवव्या माळेला त्याचा पारणा म्हणजे तो सोडला जातो. उठता-बसता केलेला उपवास हा फक्त पहिल्या व नवव्या माळेला केला जातो. म्हणजे सकाळी धरलेला उपवास रात्री सोडता येतो. काही लोक नऊ दिवस पायात पादत्राणे घालत नाहीत. पण तसा नवस असेल तरच ते करणे ठीक आहे.पादत्राणांचा नियम किवा कुलाचार नाही त्याऐवजी उपवास केलेला चालतो.
नवरात्र पूजाविधी स्त्री व पुरुष असे दोघांनी करायचा असतो. नवरात्राचा क्षय करून चालत नाही. कडाकणी व वेणी फणी सातव्या माळेला करता अली नाहीत तर नवव्या माळेला करावीत. बरेच लोक गावाची सीमा न ओलांडण्याचा उपक्रम करतात. उद्देश हाच आहे कि गावाबाहेर गेल्याने नवरात्रातील ९ दिवस देवीची सेवा करण्यात व्यत्यय येऊ नये.
नंदादीप/समई: समई व वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हा पूर्वीच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते हे विसरून चालणार नाही. नवरात्रात नंदादीप अखंड प्रज्वलित ठेवावा असा कुलाचार आहे. त्यासाठी काही काळजी घेणे महत्वाचे आहे. बरेचदा तेल संपल्याने किंवा काजळी जमा झाल्याने नंदादीप विझतो. त्यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी नंदादीपात (समईत) पुरेसे तेल आहे का हे तपासत जावे. सहसा २ किंवा ३ वाती असाव्यात. एकएक करून त्यांची काजळी लहान काडीने साफ करावी. वाती फार जाड नसाव्यात पण साधारण ६ इंच लांब असाव्यात म्हणजे ९ दिवसात वात बदलावी लागत नाही. असे केल्याने नंदादीप सदैव तेवत राहतो. चुकून एखादी वात काजळी काढताना विझली तरी दोष लागत नाही.
घट उठवणे: हा विधी नवमी म्हणजे नवव्या माळेला सकाळी केला जातो. १, ३ किंवा ५ पुरुष व स्त्रिया यांनी तळी भरायची असते. पुरुषांबरोबर स्त्रियाही तळी भरू शकतात. दिवटी असल्यास ती पेटवली जाते. एका ताटात हळद-कुंकू, कोरडे खोबरे, सुपारी व पाने घेतली जातात. डोक्यावर टोपी घालून सर्वजण गोलाकार बसतात. आई-राजा उदे उदे म्हणून तळी उचलतात. पानसुपारी ताटाखाली ठेऊन बाकीची प्रत्येकाला दिली जाते व हळद-कुंकू प्रत्येकाच्या कपाळाला लावले जाते. तसेच ते ताट हातात घेऊन एकाने घटाला स्पर्श करून व त्याच्या हाताला सर्वांनी स्पर्श करून उदो-उदो (म्हणजे उठ-उठ) म्हणून घट हलवला जातो.
आता परत तळी भरण्याच्या जागी येऊन कडाकणी ताटात घेऊन पुन्हा एकदा तळी भरली जाते. खोबरे व कडाकणी सर्वांना वाटली जातात. दशमीला घट त्यावर उगवलेले धान्य झाकून ठेवले जाते. बरेच जण नवमीला कुमारिका पूजन करतात. देवी कुमारिका स्वरुपात प्रकट झाल्याची कथा असल्याने कुमारिकेचे पाय धुवून तिला भोजन व भेटवस्तू दिली जाते.
दसरा/ विजयादशमी: नवरात्र उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. सीमोल्लंघन, शस्त्रपूजन, औजारांची पूजा केली जाते. गावाची वेस ओलांडून शमीच्या वृक्षाचे दर्शन घेतले जाते. नंतर गावात भैरवनाथ व मारोतीचे दर्शन घेण्याचा रिवाज आहे. सीमोल्लंघन करून घरी आल्यावर औक्षण केले जाते. नंतर तांदुळाचा महिषासुर बनवून त्याला कापण्याची प्रथा आहे. आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोने लुटले जाते.


असा एकूण आपला हा नवरात्र व महत्वाचा कुलाचार आहे. वेळोवेळी त्यात बदल होत गेलेला असणार हे नक्की. तरी मूळ विधी हा शेती व सृजन या तत्वाशी जोडला गेलेला आहे. काही व्यावहारिक तत्वांची धर्माशी सांगड घालताना अनेक कथा निर्माण झाल्या त्याचे स्वरूप जाणून घेणे आज अपरिहार्य आहे.





Saturday, 26 August 2017

देवघरातील मूर्ती.

देवघरातील मूर्ती: आपली जी वृत्ती असते त्याप्रमाणे आपले दैवत असते. फार पूर्वी आपला समाज स्त्रीला सन्मान देणारा होता. त्यामुळे स्त्री देवता ही प्रमुख असून तिने पुरुष देवतेवर विजय मिळवला अशी संकल्पना पूर्वी स्पष्ट दिसते. मधल्या काळात स्त्री हे नरकाचे द्वार आहे असा समज पसरला. बरेच देव-देवी समाजावर लादले आणि घुसडले गेले. त्यामुळे आज बरेच लोकांना आपली दैवते कुठली हा संभ्रम निर्माण झाला आहे.  
नवनवीन देव निर्माण होण्याची काही तात्कालिक व राजकीय कारणे आहेत. काही ठराविक वेळी रोगाच्या साथी येणे, पशु, प्राणी, पक्षी यांचा उपद्रव होणे यातून काही देवता आपल्यात दाखल झाल्या. एखाद्या समाजावर आधिपत्य करायचे असेल तर त्याची दैवते व अस्मिता नष्ट केल्या जातात ही राजकीय कारणे आहेत. हजारो विचारधारा आणि पंथ आपल्या देशात असल्याने ह्या राजकीय कुरघोड्या सतत चालूच होत्या. इतके असूनही बराच मोठा समज आजही त्यांच्या पुरातन देवीदेवतांना चिकटून आहे हे विशेष आहे. ह्या पुरातन देवता म्हणजेच  आपल्या कुलदेवता. आपला समाज  इतका लवचिक आहे कि नवनवीन देव स्वीकारताना त्याने आपल्या घरातील देव तितक्याच चिकाटीने सांभाळले आहेत हे विशेष. हे देव आपले कुलदैवत नेमके कुठले हे अचूकपणे दर्शवितात. नवीन देव लादण्यात आले नाहीत, कारण लादणारे परावलंबी होते व इथल्या समाजावर अन्न वस्त्र यासाठी अवलंबून होते. वेगवेगळ्या कथा निर्माण करून आहे त्या दैवतात संभ्रम निर्माण करणे, राजकीय मदतीने चालीरीती नष्ट करणे आणि नवीन देव घुसवणे हे होत गेले. पूर्वी पुरोहित नावाचा वर्ग अस्तित्वात असावा असे वाटत नाही. कारण पूर्वी लोकांना देवांचे व त्यांच्या चालीरीतींचे अचूक ज्ञान व अर्थबोध होता. डावा हात नव्हे उजवा, किवा नारळाची शेंडी देवाकडे अशा निरर्थक कर्मकांडांना महत्व देत ते घुसविण्यात आलेले लगेच लक्षात येत नाही. बरेच लोक त्यांचे कुलदैवत अमुक अमुक गावचे असे काहीतरी सांगत असतात, असे लोक एकतर कोणाच्यातरी बुद्धीभेदाला बळी पडलेले असतात किवा स्वतः बुद्धिभेद करणारे असतात. कुलदैवत हे सर्वत्र एकच आहे, त्याची मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहेत. हे यासाठी लक्षात घेणे गरजेचे आहे.

देवघरात टाक पुजण्याचे प्रयोजन: विवाहात नवीन देव करण्याची प्रथा आहे. तसेच मृत्यू  इत्यादींचे अशौच आले तर देव नवीन केले जातात. बरेचदा घासून देवांची झीज होते. त्यातील डोळे अलंकार इत्यादी बारकावे नष्ट होतात. कधीकधी तो देव नक्की कुठला आहे इतका संभ्रम निर्माण होतो. देव सदैव सुचीर्भूत असावेत. त्यांचे नित्य कुलधर्म कुलाचार केले गेल्याने ते जागृत राहतात व तत्काळ फलदायी बनतात. झीज झालेले तसेच मृतअशौच आलेले देव हे निष्प्रभ असतात. साधारणतः घरात मृत्यू, विवाह सारखेसारखे होत नाहीत व मधल्या काळात देवांची झीज होते. जेव्हा विवाह मृत्यू इत्यादी होतात तेव्हा दरवेळी आर्थिक स्थिती चांगलीच असते असे नाही. अशावेळी जर बदलायचे झाले तर टाक कमी खर्चात बदलून होतात. तेच जर मोठी मूर्ती असेल तर काम खर्चिक होते. मूर्तीतील बारकावे जसेच्या तसे निर्माण करता येत नाहीत. गणपतीचा मारुती होण्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक टाकांची पूजा करतात. 
मुख्य टाक हे आधीच्या भागात पाहिल्याप्रमाणे १) ग्रामदैवत जानाई किवा भैरवनाथ किवा दोघे. २) लक्ष्मीदेवी ३) खंडोबा ४) कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी ५) म्हसोबा- स्वतःची शेतीची/राहण्याची जागा असून त्या जागेत किवा  जवळपास म्हसोबाचे ठाणे असेल तर हा घरात आढळतो अन्यथा नाही. ६) देवांचा रक्षक वीर टाक. 
भैरवनाथ हा गावाचा रक्षक व कोतवाल आहे. भैरवाचे अनेक अवतार व रूपे आहेत. सर्व एकच असून आपल्या गावातील भैरवनाथाची पूजाअर्चा-कुलाचार केल्याने ते मूळ भैरवनाथाला पोचतात.भैरवनाथाची खास वैशिष्ठ्ये म्हणजे हा एकटा घोड्यावर स्वार असतो. सर्प हा जवळपास हमखास आढळतो. 




म्हसोबा हा दैत्य स्वरूपातील महादेव आहे. त्यामुळे अघोरी विधीसाठी त्याचा उपयोग केला जातो. रेडा हा प्राणी एकेकाळी संख्येने भरपूर व खूप उपद्रवमूल्य असलेला प्राणी होता. त्याची शक्ती अमर्याद असते, तसेच त्याला ताब्यात आणणे अशक्य बाब आहे हे लक्षात घेता महिषासुरमर्दन कथा ही तथाकथित काळाशी संबंधित आहे हे लक्षात येते.बरेचदा म्हसोबाला मांस, मद्य इत्यादींचा नैवेद्य करून प्रसन्न केले जाते व अघोरी प्रयोगातून सुटका किवा इतरांवर प्रयोग केले जातात.
वरील नमूद केलेले देव आहेत त्यांचे प्रत्येकाचे महत्व असून त्यांनी एक परस्पर संबंध निर्माण केलेला आहे. 
संसाराला लागणाऱ्या साध्यासुध्या बाबींची मागणी व पूर्तता या देवांकडून होते. म्हणजे ही काम्य दैवते आहेत. इच्छा पूर्तता करणारी दैवते आहेत. हे कुळाचे पूर्वापार चालत आलेले देव असल्याने यांना कुलदैवत अशी एकत्रित संज्ञा आहे. त्यातील एक लहान व दुसरे मोठे असे काही नाही. प्रत्येकाचे आपापले महत्व आहे. 
तुम्हाला सातबारा घ्यायचा असेल तर लाईटच्या कार्यालयात जाऊन उपयोग नसतो तसे कुटुंब व संसारी मागण्यासाठी ह्याच देवांची मनधरणी करावी लागते. 
सर्वात महत्वाचे म्हणजे हे देव अतिशय शीघ्र फळ देणारे असतात. आपल्या अनेक पिढ्यांना तसा अनुभव आलेला असतो म्हणून पूर्वापार आपण त्यांची पूजाअर्चा करीत आलेले असतो. 
पुढे आपण देवघरातील इतर देवांकडे वळू,
साती आसरा: आसरा हा शब्द अप्सराचा अपभ्रंश आहे. सात पाण्याजवळ असलेल्या अप्सरा (किवा यक्षिणी) असा सोपा अर्थ इथे अभिप्रेत आहे. 
इतिहासात जे जे अज्ञात व अद्भुत आहे त्याला यक्ष मानल्या गेले आहे. यक्ष हे विचित्र असतात. अनेक हात, प्राण्याचे शरीर किवा डोके असे यक्षांचे स्वरूप आहे. व्यावहारिक दृष्ट्या सातीआसरांचे महत्व हे तुमच्या मालकीच्या जागेतील विहिरी व पाण्याचे स्त्रोत यांच्याशी आहे. असे पाण्याचे स्त्रोत बुजवले किवा अडवले तर साती आसरा प्रकोप होतो असे मानले जाते. अशावेळी सती आसरा टाक करून घरात पुजला जातो. मोठे जमीनदार ज्यांच्या मालकीच्या जागेत भरपूर पाणी असलेली विहीर असेल तर साती आसरा टाक घरात हमखास असतो. पुढे जमीन मालकी गेली तरी टाक तसेच राहतात. असा टाक कसलेली उपद्रव करीत नसल्याने पुढे पूजन करीत राहिलेले योग्य असते. सातीआसरा प्रकोप झाला असता तीन शुक्रवारी वाहत्या पाण्यातील ७ खडे आणून त्यांना दहीभात व १ केळे यांचा नैवेद्य केला असता तात्पुरता त्रास टळतो.
विठ्ठल रुक्माई: वैराग्य हि उतारवयातील एक आवश्यक गरज आहे. नेटाने संसार केल्यावर मुलेबाळे स्थिरावली असता जग हे नश्वर आहे व समाधानी मोक्ष ही अंतिम गरज आहे हे जाणवायला लागते. कधीकधी नियतीचा फासा इतका निर्दय व अवकाळी पडतो कि माणूस तरुण वयात माझे माझे करायचे सोडून वैराग्य धारण करतो. अशावेळी वैराग्य हा उत्तम पर्याय असतो. काम-क्रोधादी टाकले कि ९०% प्रश्न मिटलेले असतात.  घरातील ज्येष्ठ हे विठुरायाचे भक्त असणे अगदी साहजिक आहे. त्यामुळे विठ्ठलरुक्मिणी यांचा देवघरात मानसन्मान ठेवणे क्रमप्राप्त आहे. विठ्ठल-रुक्मिणी ह्या उभ्या जोडमुर्ती अनेक पिढ्यानपिढ्या आपल्या घरात चालत आलेल्या आहेत. कमरेवर हात धरलेली दोघांची मुद्रा आता कर्म पुरे झाले हे दर्शविते. निष्काम कर्मयोग हे तत्व ह्या मुद्रेमागे आहे. कधीकधी संसारात राहून वैराग्य धारण करणे श्रेयस्कर असते.
सात्विक आहार, एकादशीला उपोषण, गळ्यात माळ हे विठ्ठल भक्तीचे महत्वाचे उपक्रम आहेत. आळंदी ते पंढरपूर आषाढीवारी हा उन्हपावसात शरीराचे कष्ट सोसून निर्वाणाचे भय दूर करणारा व मोक्षमार्ग दर्शविणारा आहे.
गणपती: शिवाचा पुत्र, उंदीर वाहन असलेला, हत्तीचे शीर व मानवाचे शरीर असलेला हा यक्ष (अद्भुत) रूपातील देव आहे. हत्ती हा बुद्धिमान प्राणी असून त्याचा मानवाबरोबर असलेला सहयोग बराच जुना आहे. मंदिर घरे बांधताना मोठमोठाले दगड हलविणे, जंगले कापणे यासाठी हत्ती मदत करीत आला आहे. दुसरीकडे उंदीर हा शेतीसाठी अतिशय उपद्रवी प्राणी असून त्यावर अंकुश ठेवणारा गणपती देव न बनला तरच नवल!
गणपती उपासना ही चतुर्थीला केली जाते. मोदक नैवेद्य गणपतीला प्रिय आहे.  परंपरागत पितळेची गणपतीची मूर्ती घरात आढळते. तिचा फोटो खाली दिलेला आहे.
भाद्रपद महिन्यात पिक उत्तम आलेले असते पण दुसरीकडे उंदरांचा सुळसुळात वाढलेला असतो. प्लेगसारखा आजार हा उंदरांच्यामुळे उद्भवतो. हे उंदीर सर्वांसाठी व शेतकर्यासाठी विघ्नकर्ते ठरतात. त्यांचा नायनाट करणारा विघ्नहर्ता गणेश म्हणून आपण ह्याकाळात पुजतो. गणेश चतुर्थीव्रत हे मातीचा गणपती करून त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे व्रत आहे. गणेशमूर्ती ही सौम्य असावी. नेत्र शांत असावेत. गणपतीला अभ्यासात, स्पर्धा परीक्षेत यश येण्यासाठी, नवीन कार्य आरंभ करण्यापूर्वी साकडे घातले जाते.
गणपती हा प्रभावी देव आहे. नवसाला पावणारा म्हणून विघ्नहर्ता असे याचे नाव आहे. सर्व तत्वज्ञ गणेशाला आपल्या बाजूला ओढायचा प्रयत्न करीत असतात. उदाहरणार्थ अथर्वशीर्षातील खालील श्लोक पहा.
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् || ६ ||

अर्थ: तूच ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आहेस. भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत.
हे अतिशयोक्तीपूर्ण किवा स्तुतीपर स्तोत्र आहे त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर गणपती म्हणजेच ब्रम्हा किवा विष्णू किवा रुद्र आहे का असा गोंधळ उडतो. पुढे इंद्र, अग्नी वायू हाही घोळ होतो. पण शब्दशः अर्थ घेणे चुकीचे आहे. कारण ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, वायू, अग्नी इत्यादी देवता पूर्णतः वेगळा गुणधर्म असलेल्या आहेत. इथे फक्त पराकोटीची स्तुती केल्याने सर्व देव व शक्ती म्हणजेच गणपती आहेत असे म्हटले आहे. हे बर्याचश्या मंत्रात आढळते. त्यामुळे देवाचे नक्की मूळ व पूजेचा उद्देश काय यात मात्र आपला गोंधळ उडतो.  

दुसरीकडे काही तत्वज्ञ गणेशाला सिंधू संस्कृतीतील देव मानतात. भाजलेल्या मातीचा २ इंच x २ इंच आकाराचा मुखवटा लोक तोंडाला लाऊन नृत्यादी करीत असा दावा करीत असतात.  पण २ इंच हा आकार फारच लहान आहे. हा गणपती कि हत्ती हेही स्पष्ट होऊ शकत नाही.



अन्नपूर्णा: वास्तविक ग्रामदेवता व लक्ष्मी ह्या धनधान्य व प्रदान करणाऱ्या देवी आहेत, त्यांच्याबरोबर बरेच घरात अन्नपूर्णा देवी आलेली आहे. अन्नपूर्णा देवीचा टाक असतो तसेच धातूची मूर्तीसुद्धा असते.
योगेश्वरी (जानाई) ही कृषीजीवनाशी संबंधित देवी आहे. पण शहरात शेती न करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी पर्याय हवा म्हणून अन्नपूर्णा ही देवघरात पुजली जाते. दक्षिणेकडील राज्ये विशेषतः केरळ, तमिळनाडूत ही पूजा केली जाते. केरळ राज्यात अतिवृष्टी होते तर तमिळ राज्यात अनावृष्टी होते. दोन्हीही ठिकाणी शेती फार अनुकूल नाही. त्यामुळे जानाई (योगेश्वरी) च्या जागी अन्नपूर्णा आलेली आहे. 
सांस्कृतिक देवाणघेवाणीत तसेच राजकीय बदल होत असताना संपूर्ण समाज एकाच देवीदेवतेचे पूजन करीत असेल तर त्यांना एकत्र आणणे सोपे असते. त्यामुळे विविध देव पुढे आपल्याकडे येत गेले. श्रद्धा एकटावल्या गेल्या तसेच विभाजित झाल्या. हे आणखी कोणते देव होते यांची आपण पुढे माहिती घेऊ.





 

Thursday, 17 August 2017

आपल्या देवघरातील देव

आपण गेल्या भागात आपली जात, गावे इत्यादी कशी निर्माण झाली हे पाहिले. त्याकाळी देवधर्म हेच जगण्याचे साधन होते, कारण विज्ञान प्रगत नव्हते. हे देवधर्म म्हणजे लोक काय करायचे. आपले देव कोणते हे आपण पाहू.

हा जानाई (योगेश्वरी अथवा जोगेश्वरी) देवीचा टाक आहे. जानाई ही भैरवनाथाची पत्नी. जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. त्यातले त्यात जानाई स्त्री दैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते. भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जाते पण ते अधिक कडक दैवत आहे. त्याचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पुजण्याचे प्रमाण कमी आहे.
ह्या देवीचे नीट निरीक्षण केले असता, एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पिक दिसते. म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते. दुसऱ्या बाजूला लहान मुल दिसते आहे. म्हणजे पुत्रपौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी गावाचे रक्षण करते. सोबत एक पशु दर्शविला आहे. म्हणजे दूधदुभते उत्तम देणारी ही देवता आहे. त्याचबरोबर घरातील भांडी दर्शविली आहेत. म्हणजे तुमचे संसार भांडीकुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना ह्या देवीकडे केली जाते. 
थोडक्यात ग्राम किवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाईदेवी आहे. 
चैत्र महिन्यात ग्रामदैवताची जत्रा असते तेव्हा व विजयादशमीला ग्राम्दैवातला नैवेद्य करावा असा कुलाचार आहे.


ही आहे लक्ष्मीदेवी. ऋग्वेदात असलेली श्री किवा लक्ष्मी आणि ही लक्ष्मीदेवी यात साम्य असले तरीही ही तीच रुग्वैदिक लक्ष्मी नाही. बरेच लोक ही पलंगावर बसलेली असल्याने हिला पलंगावरची देवी असे म्हणतात. लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ही बसलेल्या मुद्रेत आहे. तिच्या हातात शस्त्र असल्याने ती धन संपत्तीचे रक्षण करणारी अशी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी धन संपत्तीचे रक्षण करते.

पूर्वी देवीच्या रोगाची साथ आल्याने खूप लोक दगावले जात असत. नंतर लसीकरण केल्याने ही साथ आटोक्यात आली. पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्त्रोत दुषित होत असत व आजार पसरत असे. त्यामुळे बरेचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला आहे असा समज होता. ह्या देवीला मरीआई, महामारी, कडकलक्ष्मी असेही संबोधले जाते. आषाढ महिन्यात नैवेद्य करून  पुढे देवीचा  कोप होऊ नये पिक उत्तम यावे व संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते.  


म्हसोबा हा परिचित देव असला तरीही बराच गूढ असा देव आहे. ज्योतिबा फुले म्हसोबाला महसुलाचा अधिपती असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात एका ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा!
आता आपण टाकाचे निरीक्षण करू. यात एक रेडा दर्शविला आहे. हा रेडा म्हणजेच महिष! महिष म्हणजेच महेश! म्हणजे हा शंकराचा ग्राम्य स्वरूपातील टाक आहे. आता थोडे पुराण कथेकडे वळू. 
देवीने जेव्हा महिषासुर मर्दन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले. चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता. शेतकी जीवनात पशूचे महत्व खूप आहे. म्हसोबा हा खरेतर म्हैसोबाचा अपभ्रंश आहे हे टाकाचे चित्र पाहून लगेच लक्षात येते. 
म्हसोबा हा शेतात विहिरीजवळ असतो. त्याचे ठराविक क्षेत्र असते. त्या क्षेत्रात सर्प वावर करतो असा समज प्रचलित आहे. म्हसोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो हाही दुसरा अर्थ यातून निघतो. म्हसोबाला अमावास्येला नारळ फोडण्याची प्रथा आहे. म्हैस, सर्प व शेतात  निर्जन ठिकाणी वास्तव्य हे हा देव शिव-शंकर असल्याचेच पुरावे आहेत. 


 खंडोबा हे सर्वपरिचित लोकदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहेत. तरीही खंडोबाचा काळ व इतिहास बुचकळ्यात पाडणारा आहे. खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो. कारण शेळ्या-मेंढ्या, लोकर, धनगर, कुत्रा ह्यांना खंडोबाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपारिक भक्त आहे. जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्याकाळातील इतिहासाशी ह्या बाबी संबंधित आहेत. 
जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे. तर पालीचा (किवा इतर ठिकाणचे) खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना दर्शविला जातो. 
आता आपण टाकाचे निरीक्षण करू. टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो. खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे. पती-पत्नीचे सौभाग्य, एकमेकांवरील विश्वास ह्यात वृद्धी करणारी ही देवता आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्वाचे आहे हा संदेश इथे दिला  जातो. विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्व हेच आहे. पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो. 
खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व फार आहे. कुत्रा हा विश्वासाचा प्रतिक म्हणून या टाकात दिसतो. पती-पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याच्या यामागील उद्देश आहे. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो तो पाच दिवस असून चंपाषष्ठीला उठतो. तसेच सोमवती अमावास्या, श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात. भांडार व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे. हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीकारिता वापरला जातो. त्यामुळे पतीपत्नी यांनी स्वच्छ, सुंदर नीटनेटके राहावे हा संदेश मिळतो. 


 महिषासुरमर्दिनी हा टाक सर्वत्र आढळतो. स्त्रीसात्तक व मातृपुजक समाज एकेकाळी अस्तित्वात होता याचा हा पुरावा आहे. रेडा किवा महिष हा स्वतः शिव आहे. संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असता उन्मत्त बनतो तेव्हा स्त्री त्याला जाग्यावर आणते हा संदेश वरील प्रतिमा देत आहे.  
ही देवीची मुद्रा कधी चार तर कधी आठ हातांची असते. जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी. 
देवीने एका हाताने रेड्याची जीभ पकडली आहे. याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत हा संदेश दिला गेलेला आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी संसाराचे रक्षण करते असा अर्थ निघतो.
महिषासुर मर्दनाची कथा दुर्गा सप्तशती मंत्रात दिलेली आहे. 
देवीची अनेक रूपे आहेत. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत व या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक देवी घरात कुलदेवता म्हणून पुजली जाते. तथापि पूर्वी दळणवळणाची साधने अपुरी होती, जंगले इत्यादीमुळे गावाच्या जवळच आपापल्या कुलदेवीचे मंदिर स्थापन केले जात होते. लोक त्यालाच आपले कुलदैवत समजू लागले. तरीही आपले कुलदैवत माहित नसेल तर या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कुलदैवत मानून चालण्याने काहीही अनर्थ होत नाही. सोनारकामात इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्याने पूर्वी एकाच साच्यातून मूर्ती बनवल्या जात. पुढे कोल्हापूर, वणी, अंबेजोगाई, एकविरा असे वेगवेगळे टाक सहज बनविता येऊ लागले व आपले कुलदैवत नेमके कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागला. पण पूर्वी चार किवा आठ हात असलेली महिषासुरमर्दिनी हीच मूळ देवी  असल्याचे दिसून येते.
अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्वाचा कुलाचार आहे. तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे. विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे. 
जागरण गोंधळ हे ग्राम्य जीवनातील विवाहविधीच आहेत. आता वाजतगाजत लग्न करण्याच्या प्रथेमुळे हे विधी मागे पडत गेले. विवाह विधीत त्यामुळे अमुलाग्र बदल घडला आहे. आता लोकांना दोन्ही करावे लागते ही मोठी गम्मत आहे. 
हा देवांचा रक्षक अर्थात वीर. मंदिरात द्वारपाल तसा घराला जसा वॉचमन असतो तसे याचे स्वरूप. हा बरेचदा तलवार व ढाल धारण केलेला असतो. काही घरात हा धनुष्य-बाण धारण केलेला असतो. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र हा आपले व देवांचे रक्षण करते असा अर्थ निघतो. घरातील भांडी-कुंडी व चार फुल्या व गोल चित्रात दिसतात.  चार फुल्या व गोल म्हणजे आपले देव आहेत म्हणून हा आपल्या देवांचे रक्षण करतो.
तर असे आपले पूर्वापार चालत  आलेले देव आहेत.  याशिवाय बऱ्याच घरात  विविध प्रकारच्या मूर्ती व टाक आढळतात. ते खालीलप्रमाणे,
१) बनेश्वरी-वनशंकरी - समोरून सिंहावर आरूढ झालेली आठ हात असलेली देवी.
२) काळूबाई- फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेला.
३) अन्नपूर्णा- हातात पळी घेतलेली.
४) महिषासुरमर्दिनी- अष्टभुजा स्वरूपातील.
५) रेणुका- फक्त मुखवटा व दोन अर्धचंद्राचा मुकुट.
६) एकविरा-फक्त मुखवटा, एक बाण, व मोठे गोटे डोंगराचे प्रतिक.
७) अंबेजोगाई- फक्त मुखवटा, अडवा चेहरा व हनुवट वर गेलेली. 
८) अष्टभुजा सिन्हावरची.
९) यल्लम्मा- दहा हात व डोक्यामागे चक्र.
१०) जोखाई- जानाई सारखीच फक्त कणीस व मुल बरोबर नसते.
११) लक्ष्मी - मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना.
१२) ज्योतिबा- घोड्यावर स्वार, समोरून व हातात तलवार.
१३) नवनाथ- ९ देव.
१४) मुंजोबा- उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी.
१५) भैरोबा - घोड्यावर एकटा व हातात तलवार.
१६) अष्टभुजा वाघावारची वाघजाई.
१७) वीर- धनुष्य-बाणधारी 
१८) गणपती.
१९) शिव पार्वती. 
२०) वणी सप्तशृंगी १८ हात असलेली.
२१) औंधची देवी. 
२२) घोड्यावरची देवी. 
२३) कोल्हापूरची महालक्ष्मी 
२४) माता-पिता 
२५) साती आसरा- सात देवी व मगर किवा पशु.

वरील टाकांचे फोटो हवे असल्यास मला फेसबुकवर इनबॉक्समध्ये संपर्क करा.

मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी 

https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared 

गणपती बाप्पा मोरया 

जय शिवाजी जय भवानी  











Monday, 14 August 2017

जात व आडनावे..... पुढे चालू

तर मागील भागात आपण पहिले कि, शांततेच्या काळात भरभराट होती. ऐसपैस शेतजमीन होती, दूधदुभते मुबलक होते. सर्व लोक हे गुण्यागोविनादाने नांदत होते. 
इस पूर्ण तीनशे वर्षांपूर्वी जबर महत्त्वाकांक्षेने अलेक्झांडर बाहेर पडला त्यानंतर सहाव्या शतकात अखतात इस्लाम धर्म उदय झाला. नंतर इस्लामी शासक साम्राज्यविस्तार व लूट करण्यासाठी बाहेर पडू लागले. काही जीवनावश्यक गरजा पुढे ठेऊन या धर्माची मांडणी केलेली दिसते.  त्यामुळे मोठा जनसमुदाय एका छत्राखाली एकटवला. त्यात जाण्याच्या ह्या लेखाचा उद्देश नाही. पण पुढे ह्या धर्माचा प्रसार होत तो भारताच्या तात्कालिक सीमेपर्यंत पोचला. तसा भारतदेश हा हिमालयामुळे मंगोल आक्रमकांपासून सुरक्षित राहिला होता. वायव्येला असलेले डोंगराळ भाग, राजस्थानचे वाळवंट व महाकाय सिंधूनदी ह्यामुळे ह्या प्रदेशाकडे कोणाचे लक्ष लगेच गेले नाही. खैबरमार्ग जसजसा बनत गेला तसे परदेशी लोक भारतात येऊ लागले.

आक्रमक टोळ्या सुरवातीला रोखणे अशक्य झाले होते याची अनेक उदाहरणे देता येतील. सौराष्ट्र सोमनाथ मंदिर हे अगदी सर्वांच्या डोळ्यासमोर लुटले गेले. कारण एकच होते कि समाज हा शिथिल आणि सुस्त होता. अशी आक्रमणे काही महिने, काही वर्षे अशा अंतराने नेहमी होऊ लागली तेव्हा जनजीवन बदलू लागले. त्यात दोन महत्वाचे बदल झाले. पहिला बदल म्हणजे लोक स्थानांतर करू लागले. उत्तरेकडील लोक नेहमीच्या लुटीला कंटाळून कमी सुपीक अशा दक्षिणेकडे स्थानांतरीत होऊ लागले. दक्षिणेकडील प्रदेश हा अधिक डोंगराळ, जंगले असलेला, दुष्काळी असा होता. या काळाच्यापूर्वी मानवाने दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थलांतर केले होते असे पुरावे मिळतात. ते शांततेच्या काळातील आहेत.
दुसरा बदल म्हणजे समाज वरील आक्रमणांचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवू लागला. पहारा आणि रक्षण करण्यासाठी समाजातील एक फळी पुढे येऊ लागली. होणारी आक्रमणे तारीख/वार सांगून होत नसत त्यामुळे सदैव तत्पर राहणे गरजेचे होते. त्यामुळे एक नवीन जात  जन्माला आली. 
ती जात होती लढवैय्ये. हे लढवैय्ये लोक सर्व समाजातून पुढे आले. पूर्वीचे ४ वर्ण म्हणजेच ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शुद्र हे केव्हाच नष्ट झालेले होते. कारण  त्यांची कधी  गरजच पडली नव्हती. चतुर्वर्ण पद्धतीत जे चार वर्ण होते ते कधीच इतिहासजमा झाले होते. राहिले होते ते फक्त शेतकरी, पशुपालक आणि कारागीर! आता ह्याच समाजातून लढवैय्ये पुढे आणायचे होते. तेही मोठ्या संख्येने कारण समोर जो शत्रू उभा होता त्याच्यात जात नव्हती. 
समाज अशाप्रकारे स्वतःमध्ये बदल घडवून आणत होता. साहजिकच उत्तरेकडील प्रदेशात हा बदल आधी घडला. यादव आडनाव असलेले एक गाव असेल तर त्यात ७० ते ८० टक्के यादव लढवैय्ये बनले. शिल्लक राहिलेले २० ते ३० टक्के हे शेतकरी, कारागीर बनले. लढवय्या लोकांना अनेक मुभा समाजाने स्वतःहून दिल्या. शेतीच्या जमिनी कसायला इतर लोकांकडे असल्या तरी वंशपरंपरागत मालकी लढवैय्या माणसाची होती. संख्या वाढवण्यासाठी बहुपत्नीत्व, दासी अशा मुभा मिळाल्या. यापूर्वी एकपत्नी राम हा समाजाचा आदर्श होता हेही इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे. 
इतिहासाच्या गदारोळात हा मध्यकालीन समाजव्यवस्था इतिहास कायम गोंधळ निर्माण करीत राहतो. त्याचे नेमके स्वरूप काय होते हे तपासणे गरजेचे आहे. 
एक साधा विचार करा कि आज विज्ञान प्रचंड प्रगती करीत आहे, बऱ्याच अवघड बाबी आज विज्ञानाने साध्य करून दाखवल्या आहेत ज्या एकेकाळी अशक्य वाटत होत्या. त्यामुळे माणूस पूर्वी ज्या देवाला सर्वशक्तिमान समजून शरण जात होता तो आज विज्ञानाला शरण जात आहे. माणूस असा विचित्र प्राणी आहे कि स्वतःचा स्वार्थ असल्याखेरीज कशाला किती महत्व द्यायचे हे नेहमी ठरवत असतो. जेव्हा युद्धे अजिबात होत नव्हती तेव्हा आपल्या समाजाला चार वर्ण व त्यांच्या महत्तीची अजिबात गरज वाटली नाही. शांततेच्या काळात हे चार वर्ण नष्ट झाले. जेव्हा परकीय आक्रमणांच्या काळात लढणाऱ्या समाजाची गरज निर्माण झाली तेव्हा लढवैय्या जाती निर्माण झाल्या. त्यांनी मग आम्ही पूर्वीचे क्षत्रिय कुलीन आहोत इत्यादी मिथकांचा आधार घेतला. पण त्यात तथ्य नाही. 
दुसरा मुद्दा हा कि जेव्हा वर्णव्यवस्था होती तेव्हा चार वर्ण मानणारे यांची संख्या किती होती? तर भारतातील जैन, बुद्ध, शैव, शाक्त, वैदिक व इतर अनेक पंथांचा विचार केला तर फक्त वैदिक यज्ञ करणारे लोक चार वर्ण मानीत होते. म्हणजे हि संख्या फारच क्षुल्लक होती. त्यातही प्रत्यक्ष कृती व युद्धे करणारे क्षत्रिय फक्त एक चथुर्ताश! शत्रूच्या सैन्यासमोर ही क्षत्रियांची संख्या अगदीच तोडकी होती याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जेव्हा लुटालुटीचे अनेक फटके बसले व समाजात लुटीला विरोध करायची मानसिकता निर्माण झाली त्यावेळी वैदिक तत्वज्ञानाची नव्याने जाहिरात सुरु केली गेली. पुढे वर्ण व्यवस्थेतून जातीव्यवस्था निर्माण झाली हा भ्रम पसरला. 
आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळू. जेव्हा आपण मी कोण आहे, माझे पूर्वज कोण? माझे दैवत कोणते? या बाबींचा शोध घेतो तेव्हा वरील सर्व मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे आहे. एकाच आडनावाचे कुळ हे एकच असू शकते. त्यांचे मूळ गावही एकच असू शकते. एकच गाव व आडनाव असेल तर दैवत एकच असण्याची शक्यता फार जास्त असते. 
बऱ्याच अडनावांचा कुलवृत्तांत लिखित स्वरुपात आढळतो. ज्या ज्या पिढ्यात आर्थिक स्थिती सत्ता हातात होती तेव्हा ह्या आडनावाच्या लोकांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले. हिंदूंना देवांची कमी नाही. देवदेव करायला गेले तर एक जन्म अपुरा आहे. जागोजागी अनेक मंदिरे व त्यांचे अवशेष आज आढळतात. त्यांचा इतिहास हा काळाच्या अंधारात गायब झाला आहे. तर बरेच ठिकाणी त्यावर पुराणकथांचे थर जमा झाले आहेत. त्यात राम सीता, शिव-पार्वती ह्यांच्या एकसारख्या स्वरूपाच्या कथा बरेच ठिकाणी आढळतात. खंडोबा, शंकर, ग्रामदैवत भैरोबा, ग्रामदेवी किवा मातृदेवी जोगेश्वरी (जानाई), देवीची विविध रूपे, म्हसोबा, आषाढात पुजली जाणारी लक्ष्मी, जलदेवता असे अनेक देव ह्या मधल्या काळात आपल्या देवघरात दाखल झाले. देव पंचायतन म्हणजे सूर्य, देवी, शिव, विष्णू, आणि गणपती यांना मानणारा एक पंथ आहे. 
ह्या देवांचे कोडे उलगडण्यास आपल्याला आपला अंधारात दडलेला इतिहास तर्काच्या आधारावर घासून पहिला पाहिजे.त्यावर पुढील काही लेखात आपण चर्चा करू.
समाप्त.









  

Friday, 11 August 2017

जात व आडनावे

जातीवरून आडनाव शोधणारे लोक जागोजागी आढळतात. पण जातीचा आणि आडनावाचा तसा काहीही संबंध नाही. याचा रंजक इतिहास आपण थोडक्यात पाहणार आहोत. 
यासाठी आपल्याला इतिहासात फार मागे जावे लागेल. आद्य माणूस हा सर्वात पूर्वी पशुपालन करीत होता व भटके जीवन जगत होता. पशूंच्या मदतीने जंगले नष्ट करून मानवाने शेतीसाठी योग्य जमीन बनवायला सुरुवात केली. त्यावेळी मनुष्यवस्ती अतिशय तुरळक होती हे नक्की. पुढे लहान खेडी आणि गावे निर्माण झाली. पण मनुष्य मोठे अंतर कापून दुसऱ्या वसाहतीवर आक्रमण करू शकेल अशी प्रवासाची साधने त्याच्याकडे नव्हती. मोठे अंतर कापून केलेले सर्वात प्रथम आक्रमण हे ग्रीक राजा अलेक्झांडर याचे नोंदले गेले आहे. त्याच्या आधी १००० व नंतरच्या १२०० वर्षात अशा मोठ्या कुठल्याही आक्रमणाची नोंद इतिहासात नाही. 
असे आक्रमण का होते याचाही विचार इथे करणे गरजेचे आहे. आक्रमणाची दोन प्रमुख कारणे दिसतात

१) साम्राज्यविस्तार 
2) जीवनावश्यक वस्तू यांची लुट.

वरवर साम्राज्यविस्तार हे कारण जरी दिसत असले तरी मूळ उद्देश जीवनावश्यक वस्तू, स्त्रिया, पशू यांची लुट हेच आक्रमण करण्याचे कारण दिसते. मानवांची संख्या वाढत गेली कि जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा निर्माण होतो आणि आक्रमण करावे लागते.
असा आक्रमण करण्याचा प्रसंग २२०० वर्षाच्या प्रदीर्घ काळात फक्त एकदाच आला हे लक्षात घेण्यासारखे आहे. याचा अर्थ इतर सर्व काळात लोक आपापल्या जागी आहे त्या साधनसंपत्तीत सुखात जगत होते.

आता आपण रामायण महाभारत काळाकडे वळू. हा काळ नक्की कुठला हेही ठामपणे कुठेही सिद्ध होत नाही. हा बहुतेक शांततेचा काळ होता इतकेच आपण समजून पुढे जाऊ. रामायण काळात स्वतः राजा राम हा सूर्यवंशी राजा होता. तर श्रीकृष्ण हा यदुवंशी होता. रामाच्या सुर्यवंशाचे पुरावे पुढे सापडत नसले तरी श्रीकृष्णाच्या यदुवंशाचे पुढे आडनाव यादव व आत्ताचे नाव जाधव सर्वत्र आढळते.
श्रीकृष्णाने आपल्या यदुवंशीय लोकांचे नगर वसवले असे काहीसे इतिहासात सापडते. हे जर उलट तपासले तर असे लक्षात येईल कि एकाच वंशाचे लोक (एकच आई वडील असलेले) एका गावात स्थाईक झाले व त्या वंशाचे नाव त्यांनी सर्वांनी धारण केले. मग अशा अनेक लोकांचे नगर बनले इत्यादी. म्हणजे श्रीकृष्णाने अशा यादवांच्या गावांना एकत्र आणून नगर स्थापन केले असा अर्थ होतो.  नगरात गावात एकाच आडनावाचे लोक वेगवेगळे व्यवसाय करीत होते हेही पुढे ओघाने येतेच. वेगवेगळे व्यवसाय असल्याने त्यांच्या जाती सारख्या नव्हत्या.

रामायण व महाभारत हे ग्रंथ आपले श्रद्धास्थान आहे. पण नक्की ही युद्धे इतकी जोरदार लढली गेली का? त्यासाठी युद्धातील सैनिकांच्या संख्येचा विचार करू. श्रीकृष्णाचे "फार मोठे" यादव सैन्य कौरवांच्या बाजूने लढले. आज अगदी उत्तरप्रदेश बिहारचा विचार केला तरी यादव आडनावाची टक्केवारी एकूण लोकसंख्येच्या १५ ते २० टक्के इतकीही नाही. म्हणजे त्याकाळी हीच संख्या काही हजारात असेल इतकेच अनुमान निघू शकते. लोकसंख्या गेल्या शतकात झपाट्याने वाढली. महाभारत हे युध्द कुटुंबातील वादसदृश टोळीयुद्ध होते इतकेच. इतर आडनावाचे वंशाचे फार लोक त्यात सहभागी नव्हते.सहभागी होते ते फक्त कौरव व पांडव.
आता त्यावेळी वापरल्या गेलेल्या शस्त्रांचा विचार करू. धनुष्यबाण हे शस्त्र फारतर १० मीटर इतक्या लांबीवर मारा करू शकते. बाणाने मुंडके उडवणे हे शास्त्रीय दृष्ट्या तपासले तर हास्यास्पद आहे हे सहज लक्षात येईल. त्याने माणूस फक्त जखमी होऊ शकतो. चक्र हे अस्त्र फारतर एकदा फेकून मारल्याने जखमी करू शकते पण ते उडत जाऊन परत येऊ शकते हे शक्य शास्त्रीयदृष्ट्या तपासले तर शक्य नाही. पण तेच चक्र शत्रूच्या हाती लागले तर त्याचा उलटा प्रहर सहन करावा लागू शकतो. 
भाला-त्रिशूल ही अस्त्रे प्रभावी असली तरी एकावेळी फक्त एकाचाच संहार करू शकतात. व तत्कालीन धातुकामाचा विचार करता फार धार नसलेली शस्त्रे फक्त जखमी करू शकत असतील हे सत्य लक्षात येते. तलवारीचे सुद्धा तसेच आहे. 
थोडक्यात काय तर युद्धातील विजय हा शस्त्रांवर अवलंबून नसून सैन्याच्या संख्येवर अवलंबून आहे हे स्पष्ट होते. आता पुढचा प्रश्न हा कि तेव्हा खरेच हि भयंकर युद्धे झाली कि नुसते शक्तीप्रदर्शन केले गेले? 
युद्धे होऊन नष्ट झालेल्या रथ, शस्त्रे, मानवी सांगाडे यांचे कोणतेही अवशेष आजवर देशात कुठेही सापडले नाहीत. याचा अर्थ हि युद्धे इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली याला कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही. हारले कि मारले गेले हे निश्चित नाही. हारले पण मारले असा इतिहास लिहिला जेत्त्याकडून लिहिला जाऊ शकतो.त्यातअनेक वर्षांचा अपभ्रंश जोडला तर हे उघड होते.   
समाजाला जोवर जीवनावश्यक वस्तू अपुऱ्या पडत नाहीत तोवर तो युद्धाला उतरत नाही हे महत्वाचे तत्व इथे तपासून बघावे लागते. पिकपाणी उत्तम असताना सगळे मजेत जीवन जगत असताना ही युद्धे समजा झाली असतील तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या संपत्ती, पत्नी अधिकार यासाठी सर्वसामान्य माणूस या युद्धात स्वताच्या जीवावर उदार होऊन उतरणे शक्य आहे का? त्रयस्थ माणूस फारतर दोन्ही पक्षांची समजूत काढण्याइतपत सहभागी होऊ शकतो. त्यामुळे या युद्धांचा अन्वयार्थ एक सांस्कृतिक ठेवा जो पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगताना वाढत व अपभ्रंशीत होत गेला इतकाच आहे. 
दसरा हा सण साजरा करताना आपण तांदुळाचा दैत्य करून कापतो तसा काहीसा हा प्रकार आहे.

थोडक्यात सांगायचा मुद्दा हाच कि ह्या काळात व मागील व पुढील काळात जी युद्धे लढली गेली ती आपापसातील युद्धे होती. पण ती जीवनावश्यक वस्तूंची लुट करण्यासाठी केली गेलेली धाड-सदृश्य युद्धे नव्हती. सगळे समाज गुण्यागोविंदाने नांदत होते. ज्याची राजकीय आकांक्षा मोठी होती तो त्याच्या नगरातील सगळ्यांचेच (म्हणजे पगारी लढवैय्ये व कारागीर) सैन्य उभारून नुसता उभा राहिला तरी जो संख्येने मोठा तो विजयी व संख्येने कमी तो पराजित असा निकाल लागत होता. इतिहास हा नेहमी जेता लिहित असतो त्यामुळे पुढे ते युद्ध कसे अधिकाधिक भयाण होते हेही लिहिले गेले. पण ह्या युद्धाचा मूळ उद्देश काय हे लक्षात येतच नाही.

हा उहापोह करायचे कारण हेच कि युद्धामुळे जातीसंस्था निर्माण झाल्या. १) युद्धासाठी एकत्र केले गेलेले लढवैय्ये लोक यांची एक जात, 2) त्यांना अन्न पुरवणारे शेतकरी यांची दुसरी  जात व ३) इतर वस्तू व तांत्रिक सेवा देणारे हि तिसरी जाती, अशा प्राथमिक जाती निर्माण झाल्या.
याचा अर्थ आपला हा मध्ययुगीन समाज शांततेत धनधान्याची भरपूर रेलचेल असलेले जीवनमान जगत होता. त्याला कुठल्या आक्रमणाची कसलीही तोशीश लागली नव्हती. मग इतक्या कट्टर तेव्हा निर्माण झाल्या होत्या का?

आत्ता आपण पुढील काळाकडे वळूया. हा काल होता इस्लामी आक्रमणाचा. इस्लामी आक्रमणे सुरुवातीच्या फार मोठ्या काळात हि धाडी आणि लुटालूट करण्यासाठी केलेली असत. त्यांचा मुळ उद्देश जीवनावश्यक वस्तूंची लुट हाच होता. अशी लुट करण्यास सुरुवात मुहमद बिन कासीम याने केली. त्याने अनेक हल्ले करून मोठी संपत्ती, दागिने, पैसा, सोने चांदी, स्त्रिया, गुलाम पशु हे सगळे लुटून एकदा नव्हे तर अनेकदा नेले. पुढे गझनी, अब्दाली तैमुर यांनीही लुट केली व निघून गेले. इथे राज्य स्थापन केले नाही हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.
परकीय लुट करायला आले असता आपण आपले शांत जीवन जगात बसलेले होतो. असे संकट येणार आहे याची अजिबात खबर समाजाला लागलेली नव्हती. अचानक कित्येक लाखांचे सशस्त्र सैन्य थोड्या अंतरावर येऊन धडकते तेव्हा धावाधाव सुरु होई. 
आपला समाज अजगरासारखा पसरला होता. परकीय आक्रमणाला उत्तर देण्यास अजून त्याने काहीच पवत्रा घेतला नव्हता. 
पुढे आपल्या समाजाने कसा पवित्रा घेतला आणि जाती कशा निर्माण झाल्या हे पाहू.
तोवर शुभ रात्री!!
क्रमश:


मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी 

https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared 

गणपती बाप्पा मोरया 

जय शिवाजी जय भवानी