देवाचे अस्तित्व मान्य करणे ही सगळयात पहिली अट देवाचे परिणाम कळण्यासाठी आवश्यक आहे . देव ही संकल्पना माणूस सर्वशक्तिमान नाही हेच सिद्ध करण्यासाठी झालेली आहे हे आपण आधी मान्य करायला हवे. देव आपल्यापासून कधी दुरावतो ? जेव्हा आपण स्वतःला देव मानायला लागतो तेव्हा !! आपण अनेक इच्छा अत्यंत तीव्रतेने व्यक्त करतो व देवाला साकडे घालतो , नवस बोलतो विनवणी करतो पण ती इच्छा योग्य की अयोग्य हे आपल्याला माहीत नसते तर देवाला माहीत असते. अश्या अनेक मागण्या करून आपण आपले ऐहिक सुख प्राप्त करण्याच्या नादात आपले दैवत रुष्ट करून घेतो . देवाची आपल्याबद्दल काय इच्छा आहे हे विसरतो . इच्छा व्यक्त करताना आपण केंद्रीभूत असतो व आपल्या आजूबाजूचे , कुटुंबातील लोक यांना किंचितही किंमत नसते . पण देव सर्वांचे हित बघत असतो .
सर्वात लवकर दृष्टांत देणारे दैवत हे कुलदैवत जरी असले तरी आपण अनाठायी इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस इत्यादी बोलून त्याला दूर करवतो. मग काय करावे ?
आधी देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काय ? हे पाहू .
परमेश्वर सर्वशक्तिमान व सर्व जग चालवणारा आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे . म्हणजे मी स्वतः एखादे कृत्य करतोय ते अगदी क्षुल्लक आहे व परमेश्वराच्या जग चालवण्याच्या कृत्यापैकी तो एक क्षुल्लक भाग आहे असे आपण समजले पाहिजे व तसे असतेही. आपल्या आहार, निद्रा , मैथुन , भय , स्वार्थ , राग , चीड , अहंकार या नैसर्गिक प्रवृत्ती व त्याची इच्छा या खूप वाढतात. या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर मनुष्य प्रक्षुब्ध होतो . देवाकडे काही लोक यातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मागणी करतात. जर ती पूर्ण झाली नाही तर माणूस देव झूट आहे असे समजायला लागतो . दुसरे असे की माणूस देवाला किराणा मालाचे दुकान समजतो आपल्याला पाहिजे ते मागतो व त्याबद्दल काहीतरी देण्याचे कबूल करतो . आपल्याकडे सोपा भक्ती मार्ग असल्याने दैवत चांगली फळे देते. पूजा भक्ती हा तंत्र मार्ग आहे व सोपा आहे . याशिवाय मंत्र तप इत्यादी अवघड मार्ग आहेत . ते अचूक व कष्टाने साध्य करावे लागतात. अनेक लोक दुर्गासप्तशती हवन मनन करतात पण त्यातील अर्थ फारसा समजत नाही. पण साधी घटस्थापना ह्या तांत्रिक भक्तीयुक्त मार्गाने देवीची मोठी कृपा होते . पण तरीही आपण ऐहिक जीवन जगताना मागण्या करणे व पूर्ण करवुन घेणे यापुढे कधी जातो का ? देव सर्व चालवत आहे , देवी महामायाच्या कृपेने आपण सांसारिक मोहात अडकत असतो व तीच त्यातून दुरही करते .
पुढे पहा की युद्धाचे दिवस असतील तर आपण शांततेच्या बदल्यात गुलामी मान्य करू का ? किंवा दुष्काळात उपोषण करण्याचा सल्ला देऊ का ? कोरोनात स्वातंत्र्य म्हणून रस्त्यावर गर्दी करू का ?युद्ध दुष्काळ आजार हे सर्व दैवजनीत आहेत . आपण फार क्षुद्र आहोत व देव फार मोठा आहे हेच यातून निर्देशित होते ना? मग आपण देवाच्या इच्छेनुसार चाललो व आपल्या सर्व इच्छा देवाला समर्पित करून कार्य केले तर काय होईल ?
हे नक्की करून पहा : इच्छा देवाला समर्पित करा तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून कार्य करायची प्रेरणा देतो . स्वतःचे हट्ट पूर्ण करण्याऐवजी देवाचे कार्य पूर्ण करा .
यालाच दृष्टांत असे म्हणतात. अश्यावेळी ज्येष्ठ, अगदी लहान बालके , त्रयस्थ लोक देवरूपाने येऊन सल्ला देऊन जातात. असा सल्ला खूप चमत्कारी योग्य असतो . मी अनुभव घेतला आणि इतरांना मिळावा म्हणून केलेला लेख प्रपंच !
No comments:
Post a Comment