Saturday, 24 October 2020

दुर्गा सप्तशती सारांश भाग -३ अंतिम भाग

 दुर्गा सप्तशती सारांश भाग -३ 

अध्याय ६, ७, ८, ९ व १०

शुंभ निशुंभाचा दूत परत आला व त्याने विस्तारपूर्वक देवीशी झालेले बोलणे शुंभ निशुंभाना सांगितले. त्यावेळी ते दोन्ही राक्षस भयंकर चिडले. त्यांनी त्यांचे लाखो हजारो सेनापती कोटीच्या कोटी सेनेसोबत देवीला बंधक बनवून  आणण्यासाठी रावाना केले . त्या सेना देवीजवळ पोहोचताच थांब थांब असे देवीला उद्देशून ओरडू लागल्या. तेव्हा देवीने फक्त हुंकार देऊन त्यातील अनेक असुरांना संपवले. देवीचा सिंह त्या असुरसेनेत घुसला व त्याने जंगलात जसा वणवा पेटतो तसा हाहाकार दैत्यसेनेनेत माजवला. देवीने स्वतःचे मुख विस्तीर्ण केले आणि अनेक असुरांना गिळंकृत केले. अनेकांना गदेने चूर्ण केले. खड्गाने कित्येकांना मधोमध चिरले तर कित्येकांना विनाशीर करून टाकले. 

देवीच्या शरीरातून तिच्या अनेक प्रतिभूती निर्माण झाल्या व त्यांनी दैत्यसेनेचा प्रचंड संहार सुरु केला. हे सर्व पाहून दैत्यसैन्य पुन्हा शुंभ निशुंभाकडे गेले तेव्हा त्याने महाहनू नामक दैत्याला सेनेसह देवीशी युद्ध करण्यास पाठवले. त्यालाही देवीने सहज मारले. 

त्यानंतर शुंभ निशुंभाने रक्तबीज नावाच्या असुराला देवीशी लढण्यास पाठवले. देवीने रक्तबीजावर चक्र व खड्गाने प्रहार केले पण जेव्हा जेव्हा रक्तबीजाचे रक्त जमिनीवर सांडले तेव्हा तेव्हा त्यातून नवीन असुर जन्माला येत होते व लढत होते. त्यांच्याशी लढताना देवीच्या चेहऱ्यावर किंचितही दमल्यासारखे दिसत नव्हते. 

देवीने आपल्या शरीरातून काली नावाची प्रतिभूती निर्माण केली. आणि तिला तिचे मुख विस्तीर्ण काण्यास सांगितले. तसेच हेही सांगितले कि जेव्हा जेव्हा रक्तबीजाचे रक्त जमिनीवर सांडत असेल त्याआधीच ते तू पिऊन टाक.

त्याप्रमाणे कालीदेवीने रक्तबीजावर देवीने वार करताच जे रक्त सांडत होते ते चटकन पिऊन घेतले तसेच त्यातून जे असुर जन्माला येत होते त्यांनाही गिळंकृत करून टाकले. असे करता करता रक्तबीजाचे रक्त वाहून तो क्षीण झाला व देवीच्या एका प्रहरात मृत्युमुखी पडला. 

हि बातमी ऐकून शुंभ निशुंभ भयंकर चिडले व राहिलेले राखीव सैन्य घेऊन देवीशी लढण्यास पोहोचले. देवीने शक्तीच्या एका प्रहरात मागे उभ्या असलेल्या शुम्भाला खलास केले. ते पाहून निशुंभ भयंकर प्रक्षुब्ध झाला. त्याने प्रथम मायावी युद्ध सुरु केले. वेगवेगळ्या रूपात तसेच कधी आकाशात तर कधी जमिनीवर असे तो देवीवर प्रहार करू लागला. तसेच त्याचा अनेक प्रतिकृती निर्माण होऊन त्या देवीबरोबर लढू लागल्या. हे पाहून ब्रम्हा, विष्णू महेश व अन्य देवता देवीच्या मदतीस आल्या. ब्रम्हाची शक्ती ब्राह्मणी, शिवाची शक्ती वृषभारूढ चंद्रलेखा, विष्णूची शक्ती वैष्णवी, इंद्राची शक्ती ऐंद्री, कार्तिकेयाची शक्ती मोरावर स्वार  होऊन देवीच्या शरीरात मिळाली तसेच वेळप्रसंगी वेगवेगळ्या प्रतिभूती बनून मायावी निशुंभाषी वेगवेगळ्या मोर्च्यावर लढू लागल्या. तुंबळ युद्ध चालू होते. तेव्हा भगवान शिवशंकर देवीस म्हणाले हे देवी तू या असुरांचा नाश कर! तेव्हा देवी म्हणाली हे महादेव आपण माझे दूत बनून असुरांना जाऊन सांगा कि तुम्ही पाताळात  निघून जा. देवांना त्यांचे राज्य परत द्या . यामुळे देवीस शिवदूती नावाने ओळखले जाते. पण असुरांनी महादेवाचे म्हणणे  ऐकले नाही. उलट निशुंभ देवीस म्हणू लागला कि तू स्वतः अहंकारी आहेस व अनेक स्त्रियांची मदत घेऊन माझ्या एकट्याशी लढत आहेस. त्यावर देवी म्हणाली ह्या  सर्व देवी माझ्याच प्रतिभूती आहेत त्यानंतर त्या सर्व देवी देवीच्या शरीरात समाविष्ट झाल्या. त्याचवेळी निशुंभाने देवीवर प्रहार केला पण त्याचा किंचितही परिणाम देवीवर झाला नाही. उलट देवीने बाणाने त्याची ८ चंद्र असलेली ढाल व तलवार नष्ट केली. देवीच्या सिंहाने निशुंभावर हल्ला केला तेव्हा तो आकाशात जाऊन लढू लागला मग देवी सुद्धा आकाशात त्याच्याशी लढू लागली. देवीचा एक खड्गप्रहार वर्मी लागून तो असुर जमिनीवर कोसळलेला व तिथेच गतप्राण झाला त्यावेळी मोठा भूकंप झाला.  त्यानांतर अशुभ उल्कापात बंद झाले, ग्रह व नद्या आपल्या मार्गावर चालू  /वाहू लागले . हे युद्ध व  निशुंभाचा वध  झालेला पाहून देव प्रसन्न झाले व देवीची स्तुती करू लागले. 

अध्याय ११ 

देवांनीअग्नीला पुढे करून देवीची स्तुती सुरु केली. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।। हा अध्याय ११ व्या मंत्रातील भाग आहे. देवी तू सनातन आहेस. तुझे शरीर दिव्य असून चेहरा व सूर्यसमान तेजस्वी आहे. तुझे स्तन त्यात अधिक शोभून दिसतात. तू मोहरूपिणी असून निर्सगचक्र चालवण्याचे महान कार्य करीत असते. तू जल, अन्न,काष्ठ इत्यादी आहेस तसेच तहान भूक ह्या सर्व मानवांच्या गरजा निर्माण करणारी आहेस. तसेच मोक्ष  बुद्धी कला काष्ठा प्रदान करणारी मंगलमयी देवी आहेस. उत्पत्ती पालन संहारकरणारी तूच आहेस.  शरणागताची पीडा दूर करणारी तूच आहेस. 

चाप खड्ग शंख गदा धारण करणारी देवी तुला नमस्कार असो.  त्रिनेत्रा सुलक्षणी श्रद्धा मेधा सरस्वती ईशा विद्या तूच आहेस तू आदिवाक्य प्रमाण आहेस. विश्वपिडा,महामारी,चोर,लुटेरे,समुद्रातील वादळ, जंगलातील वणवा मोठ्यात मोठे संकट दूर करणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे? देवीची स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली व तिने देवांस वर मागण्यास सांगितले. तेव्हा देव म्हणाले हे देवी जेव्हा जेव्हा त्रिलोकांवर संकट येईल तेव्हा तेव्हा तू ते नष्ट कर. तेव्हा देवी म्हणाली  वैस्वत मन्वंतराच्या  २८व्या  युगात शुंभ निशुंभ नावाचे अन्य दानव निर्माण होतील त्यांचा संहार करण्यासाठी मी यशोदेच्या पोटी जन्म  घेऊन विंध्य पर्वतावर जाऊन राहील व त्या राक्षसांचा नाश करील त्यानंतर विप्रशक्ती नावाच्या दैत्यांचा मी अतिशय भयंकर रूप धारण करून नाश करील त्यावेळी माझे दात हे डाळिंबाच्या दाण्यासारखे लाल होतील म्हणून लोक मला  रक्तदन्तिका नावाने ओळखतील. त्यानंतर पुढे १०० वर्षे पाऊस पडणार नाही तेव्हा मी शाकंभरी रूपात येऊन माझ्या फांद्या (शाखा) च्या द्वारे सर्व लोकांचे पोषण करील.  दुर्गम नावाच्या राक्षसाचा नाश करून मी दुर्गा नावाने प्रसिद्ध होईल.  हिमालयातील राक्षसांना मारून मी भीमादेवी नावाने प्रसिद्ध होईल . अरुं नामक दैत्याला मारण्यासाठी मी सहा पायांच्या भुंग्याचे रूप धारण करील त्यामुळे लोक मला भ्रामरी नावाने ओळखतील. 

अध्याय १२ फलश्रुती 

सर्व संकटात देवीचे स्मरण केले असता ती त्वरित धावून येते. तिचे यज्ञ दान पूजा इत्यादी प्रकारे पूजन केले असता ते स्थान ती कधीही सोडत नाही. सज्जनांचे ती मंगल करून त्यांना सुखी व ऐश्वर्यवान करते तर दुर्जनांना दरिद्री बनवते. जे तिच्या शरणी जातात त्यांची पीडा ती निश्चित दूर करते यात तिळमात्र शंका नाही. भयंकर संकटात ती भक्तांचे रक्षण करते. ती भक्ताचे सर्व दिशांनी, सर्व ग्रहांपासून , सर्व संकटांपासून रक्षण करते. 

अध्याय १३ राजा सुरथ व समाधीला देवीचे वरदान 

तर अशाप्रकारे देवीचे चरित्रमाहात्म्य मेधाऋषींनी राजा सुरथ व समाधीला सांगितले. त्यानंतर देवीची  व्रतपूर्वक उपासना करण्यास त्या दोघांना सांगितले. त्यांना सप्तशती मंत्र प्रदान केला. तेव्हा ते दोघे नदीच्या कधी जाणून देवीची मातीची मूर्ती बनवून व्रतपूर्वक उपासना करू लागले. सहा महिन्यानंतर त्यांनी आहार कमी कमी केला व शेवटी निराहार राहून देवीची उपासना करू लागले. तेव्हा देवी प्रत्यक्ष तिथे अवतीर्ण झाली व त्या दोघांस वर मागण्यास सांगितले. तेव्हा राजा सुरथने आपले राज्य परत मिळावे तसेच आपल्याला कधीच नष्ट न होणारे राज्य मिळावे अशी इच्छा प्रकट केली तेव्हा देवीने तथास्तु म्हटले व राजास सांगितले कि तू चैत्रवंशात सूर्याच्या पोटी जन्म घेशील व महान राजा होशील. त्यानंतर सुरथ राजाला त्याचे राज्य परत मिळाले व पुढील  जन्मात तो महान सम्राट व वैवस्तर मनू बनला. समाधीला देवीने तुला काय हवे ते माग असे म्हटले. त्यावर समाधी म्हणाला कि माझे मन संसारापासून अनासक्त झाले आहे त्यामुळे देवी तू मला मोक्ष दे . त्यासुमार देवीने त्याला मोक्षमार्ग दर्शविला व देवी अंतर्धान पावली.

 समाप्त    

No comments:

Post a Comment