Monday, 14 August 2017

जात व आडनावे..... पुढे चालू

तर मागील भागात आपण पहिले कि, शांततेच्या काळात भरभराट होती. ऐसपैस शेतजमीन होती, दूधदुभते मुबलक होते. सर्व लोक हे गुण्यागोविनादाने नांदत होते. 
इस पूर्ण तीनशे वर्षांपूर्वी जबर महत्त्वाकांक्षेने अलेक्झांडर बाहेर पडला त्यानंतर सहाव्या शतकात अखतात इस्लाम धर्म उदय झाला. नंतर इस्लामी शासक साम्राज्यविस्तार व लूट करण्यासाठी बाहेर पडू लागले. काही जीवनावश्यक गरजा पुढे ठेऊन या धर्माची मांडणी केलेली दिसते.  त्यामुळे मोठा जनसमुदाय एका छत्राखाली एकटवला. त्यात जाण्याच्या ह्या लेखाचा उद्देश नाही. पण पुढे ह्या धर्माचा प्रसार होत तो भारताच्या तात्कालिक सीमेपर्यंत पोचला. तसा भारतदेश हा हिमालयामुळे मंगोल आक्रमकांपासून सुरक्षित राहिला होता. वायव्येला असलेले डोंगराळ भाग, राजस्थानचे वाळवंट व महाकाय सिंधूनदी ह्यामुळे ह्या प्रदेशाकडे कोणाचे लक्ष लगेच गेले नाही. खैबरमार्ग जसजसा बनत गेला तसे परदेशी लोक भारतात येऊ लागले.

आक्रमक टोळ्या सुरवातीला रोखणे अशक्य झाले होते याची अनेक उदाहरणे देता येतील. सौराष्ट्र सोमनाथ मंदिर हे अगदी सर्वांच्या डोळ्यासमोर लुटले गेले. कारण एकच होते कि समाज हा शिथिल आणि सुस्त होता. अशी आक्रमणे काही महिने, काही वर्षे अशा अंतराने नेहमी होऊ लागली तेव्हा जनजीवन बदलू लागले. त्यात दोन महत्वाचे बदल झाले. पहिला बदल म्हणजे लोक स्थानांतर करू लागले. उत्तरेकडील लोक नेहमीच्या लुटीला कंटाळून कमी सुपीक अशा दक्षिणेकडे स्थानांतरीत होऊ लागले. दक्षिणेकडील प्रदेश हा अधिक डोंगराळ, जंगले असलेला, दुष्काळी असा होता. या काळाच्यापूर्वी मानवाने दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थलांतर केले होते असे पुरावे मिळतात. ते शांततेच्या काळातील आहेत.
दुसरा बदल म्हणजे समाज वरील आक्रमणांचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवू लागला. पहारा आणि रक्षण करण्यासाठी समाजातील एक फळी पुढे येऊ लागली. होणारी आक्रमणे तारीख/वार सांगून होत नसत त्यामुळे सदैव तत्पर राहणे गरजेचे होते. त्यामुळे एक नवीन जात  जन्माला आली. 
ती जात होती लढवैय्ये. हे लढवैय्ये लोक सर्व समाजातून पुढे आले. पूर्वीचे ४ वर्ण म्हणजेच ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शुद्र हे केव्हाच नष्ट झालेले होते. कारण  त्यांची कधी  गरजच पडली नव्हती. चतुर्वर्ण पद्धतीत जे चार वर्ण होते ते कधीच इतिहासजमा झाले होते. राहिले होते ते फक्त शेतकरी, पशुपालक आणि कारागीर! आता ह्याच समाजातून लढवैय्ये पुढे आणायचे होते. तेही मोठ्या संख्येने कारण समोर जो शत्रू उभा होता त्याच्यात जात नव्हती. 
समाज अशाप्रकारे स्वतःमध्ये बदल घडवून आणत होता. साहजिकच उत्तरेकडील प्रदेशात हा बदल आधी घडला. यादव आडनाव असलेले एक गाव असेल तर त्यात ७० ते ८० टक्के यादव लढवैय्ये बनले. शिल्लक राहिलेले २० ते ३० टक्के हे शेतकरी, कारागीर बनले. लढवय्या लोकांना अनेक मुभा समाजाने स्वतःहून दिल्या. शेतीच्या जमिनी कसायला इतर लोकांकडे असल्या तरी वंशपरंपरागत मालकी लढवैय्या माणसाची होती. संख्या वाढवण्यासाठी बहुपत्नीत्व, दासी अशा मुभा मिळाल्या. यापूर्वी एकपत्नी राम हा समाजाचा आदर्श होता हेही इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे. 
इतिहासाच्या गदारोळात हा मध्यकालीन समाजव्यवस्था इतिहास कायम गोंधळ निर्माण करीत राहतो. त्याचे नेमके स्वरूप काय होते हे तपासणे गरजेचे आहे. 
एक साधा विचार करा कि आज विज्ञान प्रचंड प्रगती करीत आहे, बऱ्याच अवघड बाबी आज विज्ञानाने साध्य करून दाखवल्या आहेत ज्या एकेकाळी अशक्य वाटत होत्या. त्यामुळे माणूस पूर्वी ज्या देवाला सर्वशक्तिमान समजून शरण जात होता तो आज विज्ञानाला शरण जात आहे. माणूस असा विचित्र प्राणी आहे कि स्वतःचा स्वार्थ असल्याखेरीज कशाला किती महत्व द्यायचे हे नेहमी ठरवत असतो. जेव्हा युद्धे अजिबात होत नव्हती तेव्हा आपल्या समाजाला चार वर्ण व त्यांच्या महत्तीची अजिबात गरज वाटली नाही. शांततेच्या काळात हे चार वर्ण नष्ट झाले. जेव्हा परकीय आक्रमणांच्या काळात लढणाऱ्या समाजाची गरज निर्माण झाली तेव्हा लढवैय्या जाती निर्माण झाल्या. त्यांनी मग आम्ही पूर्वीचे क्षत्रिय कुलीन आहोत इत्यादी मिथकांचा आधार घेतला. पण त्यात तथ्य नाही. 
दुसरा मुद्दा हा कि जेव्हा वर्णव्यवस्था होती तेव्हा चार वर्ण मानणारे यांची संख्या किती होती? तर भारतातील जैन, बुद्ध, शैव, शाक्त, वैदिक व इतर अनेक पंथांचा विचार केला तर फक्त वैदिक यज्ञ करणारे लोक चार वर्ण मानीत होते. म्हणजे हि संख्या फारच क्षुल्लक होती. त्यातही प्रत्यक्ष कृती व युद्धे करणारे क्षत्रिय फक्त एक चथुर्ताश! शत्रूच्या सैन्यासमोर ही क्षत्रियांची संख्या अगदीच तोडकी होती याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जेव्हा लुटालुटीचे अनेक फटके बसले व समाजात लुटीला विरोध करायची मानसिकता निर्माण झाली त्यावेळी वैदिक तत्वज्ञानाची नव्याने जाहिरात सुरु केली गेली. पुढे वर्ण व्यवस्थेतून जातीव्यवस्था निर्माण झाली हा भ्रम पसरला. 
आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळू. जेव्हा आपण मी कोण आहे, माझे पूर्वज कोण? माझे दैवत कोणते? या बाबींचा शोध घेतो तेव्हा वरील सर्व मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे आहे. एकाच आडनावाचे कुळ हे एकच असू शकते. त्यांचे मूळ गावही एकच असू शकते. एकच गाव व आडनाव असेल तर दैवत एकच असण्याची शक्यता फार जास्त असते. 
बऱ्याच अडनावांचा कुलवृत्तांत लिखित स्वरुपात आढळतो. ज्या ज्या पिढ्यात आर्थिक स्थिती सत्ता हातात होती तेव्हा ह्या आडनावाच्या लोकांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले. हिंदूंना देवांची कमी नाही. देवदेव करायला गेले तर एक जन्म अपुरा आहे. जागोजागी अनेक मंदिरे व त्यांचे अवशेष आज आढळतात. त्यांचा इतिहास हा काळाच्या अंधारात गायब झाला आहे. तर बरेच ठिकाणी त्यावर पुराणकथांचे थर जमा झाले आहेत. त्यात राम सीता, शिव-पार्वती ह्यांच्या एकसारख्या स्वरूपाच्या कथा बरेच ठिकाणी आढळतात. खंडोबा, शंकर, ग्रामदैवत भैरोबा, ग्रामदेवी किवा मातृदेवी जोगेश्वरी (जानाई), देवीची विविध रूपे, म्हसोबा, आषाढात पुजली जाणारी लक्ष्मी, जलदेवता असे अनेक देव ह्या मधल्या काळात आपल्या देवघरात दाखल झाले. देव पंचायतन म्हणजे सूर्य, देवी, शिव, विष्णू, आणि गणपती यांना मानणारा एक पंथ आहे. 
ह्या देवांचे कोडे उलगडण्यास आपल्याला आपला अंधारात दडलेला इतिहास तर्काच्या आधारावर घासून पहिला पाहिजे.त्यावर पुढील काही लेखात आपण चर्चा करू.
समाप्त.









  

No comments:

Post a Comment