Friday, 23 October 2020

दुर्गा सप्तशती सारांश थोडक्यात भाग -२

 दुर्गा सप्तशती - सारांश. भाग २ 

अध्याय २,३,४ 

मेधामूनी सांगतात : महिषासुर राक्षसाच्या सेनेचे देवांशी सुमारे १०० वर्ष युद्ध चालू होते आणि महिषासुर त्यात विजयी होत होता. त्याने देवांचे सर्व  अधिकार ताब्यात घेतले होते व देव सामान्य मनुष्याप्रमाणे मृत्युलोकात फिरत होते. 

यास्थितीत देवराज इंद्र इतर देवांसहित कैलास पर्वतावर श्रीशिव यांच्याकडे  गेले तेथे विष्णूही विराजमान होते. देवांनी सांगितलेले पराभव ऐकून श्रीशिवाचें व विष्णूंचे रागाने मुख वाकडे झाले भुवया वक्र झाल्या. तत्क्षणी शिवाच्या शरीरातून एक शक्ती बाहेर पडली व तिने स्त्रीच्या मुखाचे रूप धारण केले. श्रीविष्णूच्या शक्तीमुळे तिचे हात उत्पन्न झाले. चंद्र वरून वायू अग्नी, सूर्य कार्तिकेय इत्यादी देवतांच्या शक्तीने तिचे पूर्ण शरीर निर्माण झाले. समुद्राने रत्ने, नागाने मणिहार, कुबेराने वस्त्रे , तसेच अनेक देवांनी अनेक शस्त्रे  देवीस दिली. पिनाकधारी शंकराने एक त्रिशूल आपल्या धनुष्यातून निर्माण करून देवीला दिला. इंद्राने सिंह भेट दिला. 

अशाप्रकारे शस्त्रसज्ज होऊन महादेवी महिषासुराशी युद्ध करण्यास निघाली दोघांचे तुंबळ युद्ध झाले. महिषासुर मध्येच रेड्याचे रूप घेऊन पृथ्वी उध्वस्त करीत होता तर मध्येच हत्तीचे रूप घेऊन देवीवर हल्ला करीत होता. तर पुन्हा मानवी  लढत होता. एकदा त्याने रेड्याचे रूप घेतले असता देवीने त्यावर खड्ग प्रहार केला तेव्हा तेव्हा तो मानवी रूपात येण्याचा प्रयत्न करीत असता फक्त त्याचे मुख मानवाचे झाले होते त्यावर देवीने त्रिशूल प्रहार करून त्याला संपवले. 

सर्व देव देवीची स्तुती करू लागले. तेव्हा देवी प्रसन्न होऊन म्हणाली देवांनो तुम्हाला जे हवे असेल ते मागा. तेव्हा देव म्हणाले देवी आपण महिषासुराला मारून आम्हाला संकटमुक्त केले आहे तेव्हा आणखी काय मागायचे? पण एकच मागणे आम्ही मागतो आणि ते म्हणजे जेव्हा जेव्हा मानवावर / देवांवर संकट येईल तेव्हा तुम्ही प्रकट व्हावे हीच इच्छा. देवी तथास्तु म्हणून अंतर्धान पावली. 

पुढे शुंभ आणि निशुंभ राक्षस जन्माला आले व त्यांनी संपूर्ण पृथ्वी, स्वर्ग यांचा ताबा मिळवला देवांचे सर्व अधिकार घेऊन ते आपले कार्य करू लागले. 

त्यावेळी सर्व देव कैलास पर्वताकडे निघाले. त्याचवेळी पार्वतीदेवी स्नानासाठी एका तलावाजवळ आल्या होत्या. त्यांना पाहताच देवांनी त्यांची स्तुती सुरु केली. तेव्हा देवीने विचारले कि देवांनो तुम्ही इथे कशासाठी  आला आहात व कोणाची स्तुती करीत आहेत तेव्हा देवीच्याच शरीरातून एक प्रतिकृती प्रकट झाली  व म्हणाली देवी पार्वती हे देव शुंभ निशुंभ राक्षसांपासून स्त्रासलेले आहेत व आपलीच स्तुती करीत आहेत. तेव्हा देवीने राक्षसांचा नाश करण्याचे वचन देऊन देवांना परत पाठविले. 

त्यानंतर देवीने अलौकिक रूप धारण केले व हिमालयायच्या एका शिखरावर जाऊन बसली. तिचे ते  अलौकिक रूप पाहून शुंभ व निशुंभच्या दूतांनी त्यांना हि माहिती दिली व त्या स्त्रीस प्राप्त करावे असा सल्ला दिला. 

अध्याय ५ 

यानंतर शुंभ निशुंभ राक्षसाने आपला दूत सुग्रीव यास देवीकडे पाठवले दूताने देवीस सांगितले कि शुंभ निशुंभ तिन्ही  लोकांचे स्वामी आहेत देवांची सर्व अमूल्य संपत्ती, शस्त्रे , त्यांनी प्राप्त केले आहे. तेव्हा तुही शुंभ निशुंभ यांच्या आश्रयाला ये व त्यांच्यापैकी एकाची पत्नी हो. यावर देवी म्हणाली तुम्ही म्हणताय ते खरे आहे शुंभ निशुंभ महापराक्रमी आहेत. पण काय करू मी अल्पबुद्धीने व अज्ञानाने प्रतिज्ञा करून बसले कि जो कोणी पुरुष मला यद्वत हरवेल त्याच्याशीच मी लग्न करेल. यावर दूत म्हणाला देवी मूर्खता करू नकोस शुंभ निशुंभ जेव्हा तुला ओढत नेतील तेव्हा तुझा अहंकार व प्रतिज्ञा नष्ट होईल. पण तरीही देवीने पुन्हा आपली प्रतिज्ञा दूताला सांगितली व तो परत गेला.

क्रमश: 

No comments:

Post a Comment