Friday, 23 October 2020

दुर्गा सप्तशती सारांश थोडक्यात

दुर्गा सप्तशती
ह्या पूर्ण मंत्राचे एकूण १३ अध्याय आहेत व एक मुख्य कथा आहे त्याचा सारांश अतिशय थोडक्यात देत आहे. 
प्रथम अध्याय:
फार वर्षांपूर्वी सुरथ नावाचा राजा भूमंडळावर राज्य करीत होता. त्याचे सामर्थ्य उत्तम होते व तो अतिशय न्यायी राजा होता. पण त्यातच कोलाविध्वंसी नामक राजा त्याचा शत्रू बनला. राज्यविस्तार करण्यासाठी कोलाविध्वंसीने सुरथ राजावर आक्रमण केले. व दुर्दैवाने युद्धात सुरथ राजाचा पराभव झाला.  त्यातच सुरथ राजाचे मंत्रीसुद्धा कोलाविध्वंसीला मिळाले. आता सुरथ राजा फक्त त्याच्या नगरापुरता राजा राहिला होता. तेव्हा शिकार करण्याचे कारण सांगून तो जंगलात निघून गेला. घनदाट जंगलात गेल्यावर तो भटकत होता तेव्हा त्याला तिथे एक समाधी नावाचा वैश्य (व्यापारी) दिसला. राजाने त्याला विचारले कि तू या जंगलात काय करीत आहेस? त्यावर समाधी म्हणाला मी एका धनवान कुटुंबात जन्मलेला व्यापारी आहे. पण माझ्या मुलांनी,पत्नीने, व भावांनी माझी सर्व संपत्ती हडप करून मला घराबाहेर काढले आहे. 
दोघांचा वार्तालाप झाल्यावर दोघे आपल्या दुःखावर व जुन्या आठवणी आठवून स्तब्ध आणि उद्विग्न झाले. त्यात राजा सुरथ म्हणाला अरे समाधी तुझ्या कुटुंबातील लोकांनी तुला इतका त्रास दिला तरी तू त्यांची आठवण काढून दुःखी का होत आहेस? तेव्हा समाधी म्हणाला राजा मी काय करू माझे मन अजूनही माझ्या कुटुंबाची काळजी करीत आहे. राजा सुरथ सुद्धा मनातल्या मनात आपले राज्य, प्रजा, खजिना, आपला प्रिय हत्ती यांची आठवण काढून व्याकुळ होत होता. 
फिरत फिरत दोघे त्या जंगलात एका आश्रमाजवळ गेले. तिथे अनेक शांत आणि हिंसक जीव एकत्र गुण्यागोविंदाने राहत होते हे पाहून दोघांना आश्चर्य वाटले. तो आश्रम मेधामुनी नामक गुरुजींचा होता. 
तिथे अनेक शिष्य मेधा मुनींची सेवा करण्यात मग्न होते. राजा व समाधी आश्रमात गेले व विनयपूर्वक मेधामुनींना नमस्कार करून समोर  बसले व बोलू लागले. त्यांनी अपआपली परिस्थिती मेधामूनींना सांगितली. 
तेव्हा मेधामुनी म्हणाले विषयमार्गाचे ज्ञान सर्व प्राण्यांना असते. ते कसलीही अपेक्षा न करता आपल्या पिल्लांना तोंडात घास खाऊ घालतात. मनुष्य प्राणी बुद्धिमान आहे पण तोही विषय व आसक्तीमुळे अंधकारात फेकला गेला आहे. निसर्गाची स्थिती नित्य ठेवण्यासाठी हि आसक्ती व मोहमाया निर्माण करणारी महान परमेश्वरी देवी आहे. तीच नित्य या आजनमा आहे. तिच्याच कृपेने सर्व निसर्ग चक्र चालू आहे व निर्माण उत्कर्ष भोग व संहार हि तीच करते.
आम्ही अनेक मुनिजन तिच्याच चरित्राचा अभ्यास करीत असतो.   
हे ऐकून राजा व समाधी म्हणाले मुनिश्रेष्ठ हि देवी नक्की आहे तरी कोण आणि तिचे चरित्र काय आहे हे विस्तारपूर्वक कृपया सांगा. 
त्यावेळी मेधामूनी म्हणाले फार फार वर्षांपूर्वी भगवान विष्णूच्या कानातील मळापासून मधू आणि कैटभ राक्षस उत्पन्न झाले होते. त्यांनी सगळीकडे उत्पात माजवला होता. ते ब्रम्हाऋषींना मारण्यासाठी सरसावले. तेव्हा ब्रम्हाऋषीं श्री विष्णूंना शरण गेले. पण पाहतात तर काय महाविष्णू हे योगनिद्रा घेत होते व महादेवीच्या प्रभावाने ती योगनिद्रा असल्याने ब्रम्हादेवांनी महा योगनिद्रेचे स्मरण करून स्तुती सुरु केली. विविध अक्षरे उच्चार, ओंकार, उद्या स्थिती अंत , मोह आसक्ती हे सर्व महामोहमाया परमेश्वरी देवीकडून घडवले जाते तेव्हा देवी तू भगवान विष्णूंना योगनिद्रेतून मुक्त कर अशी प्रार्थना ब्रह्मदेवांनी केली. त्यावेळी ती स्तुती ऐकून परमेश्वरीदेवी विष्णूंच्या योगनिद्रेतून बाहेर अली व विष्णू भगवान जागे झाले. त्यावेळी मधू आणि कैटभ यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्ष युद्ध झाले व थे थांबेना तेव्हा परमेश्वरी योगेश्वरी देवींने मधू आणि कैटभ यांच्यात ममता उत्पन्न केली. तेव्हा ते भगवान विष्णूला म्हणु  लागले कि देवा आम्ही तुझ्या युद्धकौशल्यावर खुश झालो आहोत कृपया वरदान मागा. तेव्हा विष्णू म्हणाले कि मला इतर वर नकोत फक्त तुमचा वध माझ्या हातून व्हावा हीच इच्छा आहे. तेव्हा ते दोन राक्षस म्हणाले जिथे जल नसेल अशा ठिकाणी आमचा वध करावा. तेव्हा श्रीविष्णूने त्यांना आपल्या मांडीवर घेऊन मारले. 
अशाप्रकारे संपूर्ण देव, प्राणी पक्षी निसर्ग त्या दोन राक्षसांच्या उपद्रवापासून मुक्त झाले. 
हे ऐकून राजा व समाधी यांचे समाधान झाले पण त्यांनी देवीची अधिक माहिती सांगण्याचा आग्रह केला. 
क्रमश: 

No comments:

Post a Comment