Saturday, 30 April 2016

कुलधर्म-कुलाचार

प्रत्येक कुटुंबाचे काही कुलधर्म-कुलाचार ठरलेले असतात त्यांची आपण माहिती करून घेऊ,
आडनाव, गोत्र, वंश, देवक: महाराष्ट्रातील बहुतेक ९६ कुळी आडनावे इतर जातीत आहेत त्यांचाप्रमाणे गोत्र, वंश, देवक व आराध्यवृक्ष व कुलदैवत हे ठरतात. 
ही माहिती ब्राम्हण समाजासाठी खालील दुव्यावर मिळते,
इतर मराठी समाजासाठी खालील माहिती ग्राह्य ठरते, (सौजन्य विकीपेडिया) 
त्या त्या विशिष्ट कुटुंबांमध्ये, ज्याची नित्य आराधना, पूजा केली जाते, ते त्या कुटुंबाच्या कुळाचे कुळदैवत किंवा कुलदैवत समजले जाते. विवाह वा मुंज अशा महत्त्वाच्या प्रसंगी होणाऱ्या कुळाचाराच्या वेळी, वा सणावारी किंवा दैनंदिन करावयाच्या पूजेच्या वेळी, प्रत्येक वेळेस 'कुळदेवतेची' पूजा करण्याची परंपरा आहे. 'कुळदैवत' हे,'देव' वा 'देवी' यांपैकी काहीही असू शकते. बहुतेककरून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे 'कुलदैवत' असते. माहूर, व त्याचे आसपासच्या सुमारे १००-१५० किलोमीटर परिसरातील राहणाऱ्या लोकांचे 'कुलदैवत' माहूरची रेणुका, कोल्हापूर परिसरात राहणाऱ्यांचे अंबा, तर दक्षिणेकडून येथे आलेल्यांचे बालाजी हे कुलदैवत असू शकते. 'कुळदैवत' हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. शिवाजी महाराजांची कुळदेवता तुळजापूरची भवानी होती हे तर सर्वश्रुतच आहे. 
आपले कुलदैवत कसे शोधायचे ह्यावर आपण चर्चा वेगळ्या लेखात करू,
महाराष्ट्र इतिहास (थोडक्यात): पूर्वी महाराष्ट्रात ज्या वसाहती झाल्या त्या जातीविरहित होत्या. कारण शेती आणि शेती संबंधित व्यवसाय हे जगण्याचे एकच साधन होते. तेव्हा बरेच लोक अनेक प्रदेशातून विशेषतः अगदी आफ्रिकेपासून सिंधू व पुढे गुजरात मार्गे महाराष्ट्र कर्नाटकात व अगदी केरळ पर्यंत स्थाईक झाले. ह्या लोकांनी ज्या देवी-देवतांच्या उपासना केल्या तीती त्यांची कुलदैवते आहेत. ही कुलदैवते फार प्राचीन काळापासून पुजली जात आहेत. जाती व वर्ण कसे निर्माण झाले हा पुढच्या काळातील प्रश्न आहे तो आपण सध्या बाजूला ठेऊन पुढे जाऊ. 
माझे कुलदैवत कुठले? : बहुतेककरून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे 'कुलदैवत' असते. माहूर, व त्याचे आसपासच्या सुमारे १००-१५० किलोमीटर परिसरातील राहणाऱ्या लोकांचे 'कुलदैवत' माहूरची रेणुका, कोल्हापूर परिसरात राहणाऱ्यांचे अंबा, तर दक्षिणेकडून येथे आलेल्यांचे बालाजी हे कुलदैवत असू शकते.  (परत सौजन्य विकीपेडिया). 
आता साधे बघा, की दोनशे वर्षापूर्वी आपल्या समाजाला बैलगाडीशिवाय काहीही माहित नव्हते तेव्हा आपले पूर्वज दरवर्षी आपले कुलदैवताच्या मूळस्थानी जाऊ शकत असतील का? अंतरे अगदी पुण्या-मुंबईपासून तुळजापूर किवा जेजुरी ही शंभर किलोमीटरपेक्षा जास्त आहेत. ही अंतरे पायी कापणे शिवाय अतिशय उन्हामध्ये पदरी काहीच पैसे नसताना किवा असले तरी लुटणारे वाटोवाटी बसलेले असताना शिवाय पती अजिबात सहकार्य करीत नसताना ह्या बायका कशा पार पाडीत असतील? (इथे पुरुष वर्गावर नाहक आरोप केला जातोय अनेक तुळजाभवानी आणि खंडोबाचे निस्सीम भक्त हे पुरुषच आहेत व तसा प्राप्त इतिहास आहे) असो. तर सांगायचा मुद्दा हाच की कुलदैवताचे मूळ देऊळ जरी माहूर, तुळजापूर, जेजुरी अशा ठिकाणी असले तरी प्रत्येक गावाच्या पंचक्रोशीत त्या त्या कुलदैवताचे जागृत देऊळ हे असतेच असते. त्यामुळे काही लोक त्यालाच आपले कुलदैवत मानतात आणि ते काही चूक नाही. म्हणून आपले कुलदैवत शोधयाचे असल्यास आपले मूळ गाव कुठले? तेथील आपल्या आडनावाचे/समाजाचे लोक कोणत्या जवळच्या देव-देवीची पूजा करतात हे शोधणे महत्वाचे आहे. 
घरात असलेले टाक यावरूनही आपले कुलदैवत कुठले हे समजू शकते. सोनाराकडे जाऊन आपले टाक कोणत्या देवाचे आहेत हे जाणून घ्यावेत. घरात परडी, माळ, पोत, दिवटी, बुधली असेल तर हमखास तुळजापूर-भवानी किवा यल्लमा हे कुलदैवत असते. घरात कोटंबा (तांब्याचे चौकोन व बुडाकडे लहान होत जाणारे पात्र-ह्यात भंडार ठेवतात) असल्यास जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत आहे हे समजून चालावे.
ज्यांना आपले कुलदैवत माहित नाही त्यांनी तुळजाभवानी व जेजुरी खंडोबा हे कुलदैवत समजून चालावे. तुळजा नावातच त्वरिता, त्वरजा म्हणजे लगेच प्रसन्न होणारी व त्वरेने मदतीला धावून येणारी असल्याने हे करणे योग्यच आहे. 
कुलधर्म कुलाचार म्हणजे काय?: ह्यात आपल्या देवासंबंधित ज्या उपासना व कृती करतो त्या प्रामुख्याने येतात. 
नवरात्र: नवरात्र हा सगळ्यात महत्वाचा कुलधर्म कुलाचार आहे, प्रत्येक स्वतंत्र राहणाऱ्या मुलाने हा आपल्या घरी करायला हवा. तसेच नवरात्राचा लोप करता येत नाही. सोयर-सुतक इत्यादी आले तरीही जितके दिवस मिळतात तितके दिवस नवरात्र करावे. पूर्ण नवरात्र अशौच असेल तर ज्याला असे सोयर-सुतक नाही अशाकडून (किवा ब्राम्हणाकडून) घटस्थापना आणि उद्यापन करून घ्यावे, सवाष्णभोजन, सप्तशती पाठ इत्यादी करू नयेत, व फक्त दुधाचा नैवेद्य करावा. उपोषण करण्याचा कुलाचार कोणीतरी एकाने करावा. उपोषण किवा ९ दिवस अनवाणी राहणे यापैकी एक हे केलेले चालू शकते. त्यातले त्यात उपोषण हा एक अधिक चांगला उपासनेचा प्रकार आहे. नवरात्र सुरु झाल्यानंतर अशौच आले तर राहिलेले दिवस वरीलप्रमाणे करावेत. 
कुलदैवत वारी: ही दरवर्षी मूळ कुलदैवताच्या जागी जाऊन करायलाच पाहिजे असा एक गैरसमज पसरत चालला आहे. आता वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत म्हणून हे करायला काही हरकत नाही पण तो एक पायंडा पडला तर पुढच्या पिढ्या करू शकतील कि नाही याचाही विचार व्हायला हवा. 
सहसा घरात विवाह, मुंज, जन्म आणि मृत्यु असे काही झालेले असता देव (टाक,माळ,परडी इत्यादी) नवीन करावे लागतात व ते मूळ कुलदैवताच्या जागी जाऊन देवाच्या चरणी स्पर्ष करून आणावे लागतात ह्याला देवभेट असे म्हणतात व ह्या एकूण प्रक्रियेला देव उजवणे असे म्हणतात. पूर्वी दरवेळी शक्य नसल्याने ४-५ वर्षातून एकदा अशी वारी केली जात असे. सोयर-सुतकातील देव हे प्रभावहीन असतात म्हणून ते जास्त दिवस घरात ठेऊ नयेत. आर्थिक कारणांमुळे शक्य नसल्यास जवळच्या कुलदैवताच्या मंदिरात देवभेट आणि देव उजवलेले चालू शकतात. 
अशी वारी केल्यावर देव आपल्या बरोबर घरी येतात, त्यामुळे जाताना व येताना कलह करू नये. घरी आल्यावरही आनंदी राहावे. ह्या देवी-देवतांचा गुण उग्र असल्याने त्या आपल्या घरी फार दिवस राहिल्या व त्यांना काही गोष्टी खटकल्या की घरात कलह वाढतो. म्हणून ह्या देवांची बोळवण (अर्थात बोडण-बडन) करायची पद्धत आहे. देवीसाठी एक सवाष्ण व एक कुमारिका स्त्रीस जेवायास बोलवावे, सवाष्ण स्त्रीची ओटी भरावी व कुमारीकेस आवडती भेट द्यावी. परडी असल्यास ती मागावी. असा रिवाज आहे. 
खंडोबा, म्हस्कोबा यांसाठी तळी भरावी. कित्येकदा ती मंदिरातच भरतात. काही लोक घरी भरतात. त्यासाठी ३ किवा ५ पुरुष असावेत. भंडार-खोबरे, पान सुपारी हे एका ताटात घेऊन पाच जन गोल बसावेत. हे ताट उचलून "सदानंदाचा येळकोट" म्हणून ताटाखाली पानसुपारी ठेवावी. खंडोबा मंदिराच्या दिशेने भांडार-खोबरे उधळावे. सर्वांना भांडार लावावा, व पान सुपारी खोबरे द्यावे, परत एकदा तळी उचलावी. सर्वांना काही खायचे पदार्थ वाटावेत. 
कुलदैवताची वारी करण्याचा दुसरा उद्देश हा असतो कि राहिलेले नवस, संकल्प हे ह्या वेळी पूर्ण करून घेता येतात. 
नवस बोलणे: कुलदैवताचे नवस त्याच्या मुळ ठिकाणाशी संबंधितच बोलावेत असे काही नाही. उलट असे करू नये. कारण तिथे जाऊन ते पूर्ण करण्याची संधी मिळते न मिळते हे बर्याचदा ठाऊक नसते. आणि एकदा बोललेला नवस कालांतराने त्रासदायक ठरू लागतो. नवसपूर्ती करायला जितका उशीर होतो तितका त्रास वाढत राहतो. साधारणतः एका वर्षाच्या आत बोललेला नवस पूर्ण करावा. म्हणून आपल्या घराच्या जवळच्या देवळात जरी नवस बोलला आणि पूर्ण केला तरी चालू शकतो. आपली कुलदेवी आणि जवळच्या मंदिरातील देवी एकच आहे हे समजून घेणे महत्वाचे असते. वाघ्या सोडणे, किवा मुरळी वाहने असे कालबाह्य नवस बोलू नयेत. त्यापेक्षा सोन्याचे अलंकार, नैवेद्य अर्पण करण्याचे, २१ प्रदक्षिणा घालण्याचे असे नवस बोलावेत. 
भाग बांधणे: मी देवासाठी अमुक करेल म्हणून कापडात आपल्याला शक्य तितके पैसे बांधून देवघरात ठेवणे ह्याला भाग बांधणे असे म्हणतात. नवसाचे विस्मरण होऊ नये म्हणून त्यात कागदाच्या चिठ्ठीवर नवस काय हेही लिहून ठेवणे उत्तम.
तर असे आहेत आपले साधे सरळ कुलधर्म कुलाचार!
बऱ्याचदा आपण कुलदैवत किवा अन्य मंदिरात जातो आणि तिथे बाहेर विक्रीस ठेवलेल्या अनेक वस्तू कुतुहुला पोटी विकत आणतो. जर त्या आणल्या तर देवघरात ठेऊ नयेत. इतर ठिकाणी शोभेची वस्तू म्हणून ठेवल्यास हरकत नाही. कारण त्यामागे काय शास्त्र व कारण आहे हे आपल्याला माहित नसते. शिवाय नवनवीन प्रथा आत्ता शक्य आहेत म्हणून सुरु करू नयेत. कारण तो एक पायंडा पडतो, आणि पुढच्या पिढीला ते सगळे करणे जमेलच असे नाही. शिवाय बऱ्याच वस्तू अशा असतात कि जेव्हा पुढची पिढी त्यांची कुठेतरी चौकशी करते तेव्हा भलतीच माहिती हाती येते. उदाहरणार्थ तुम्ही खंडोबाचा कोटंबा किवा देवीची परडी हौसेने विकत घेतली आणि ते पुढच्या पिढीच्या हाती लागले  तर ते  मागायचे काम त्यांना करावे लागणार!
कुलदैवत कसे शोधायचे हे आपण पुढे इतरत्र पाहूया, ह्या लेखावर काही शंका असल्यास अवश्य विचारा.
टीप:
विवाहानंतर जागरण व गोंधळ करणे हाही आपल्यातील एक महत्वाचा कुलाचार आहे, त्याचा संबंध वरील बोळवणाशीच (किवा बडन किवा बोडण)आहे. विवाहात देव करून घेतल्यावर कुलदैवत आपल्या घरी येते त्यांना तृप्त करवून, त्यांची स्तुती करण्याचा व महती गायनाचा हा सोहळा आहे, हा माझा थोडा सांगायचाच राहिला. जागरण गोंधळ हे वाघ्या मुरळी, देवदासी करतात. पण आजकाल सगळेच लोक हे करू लागलेत शिवाय भरपूर पैसे घेतात. पुरोहित वर्गांची लुटालूट आणि जागरण गोंधळ ह्यांचे मोठे खर्च ह्यांचे कारण काय आहे? महागाई वाढली आहेच आहे. पण नित्य कुलधर्म कुलाचार करणाऱ्या लोकांची संख्याही रोडावली आहे, त्याऐवजी हॉटेलमध्ये लोक पैसे खर्च करतात पण जागरण-गोंधळ यातील नाच गाणी लोकांना जुनाट वाटतात. सगळ्यांनी सुधारित व्हावे पण खोटेपणा करून का? आपले हे सांस्कृतिक विधी व त्याचे मानसशास्त्र ह्याची जाण ठेवायला हवीच ना! मोठ्या हॉटेलात पार्टी दिली कि नुसते अन्नाचे पैसे यापेक्षा कितीतरी जास्त पैसे उकळले जातात.



Wednesday, 27 April 2016

वास्तुशांती, लग्न ह्यावर खर्च कशासाठी?

बरेचदा अनेक लोक वास्तुशांती, विवाह, नक्षत्र शांती कर्म ह्यावर भरमसाट पैसे खर्च का करायचे असा प्रश्न विचारतात. ह्याची लौकिक कारणे आहेत. ती समजून घेणे आवश्यक आहे. 
वास्तुशांती: एक उदाहरण देतो, काही वर्षापूर्वी आमच्या जवळच्या बिल्डींगमध्ये एक नवीन भाडेकरू राहायला आला. त्याच्याबरोबर दोन बायका आणि २ मुले होती. त्यातली त्याची बायको कुठली हे काही कळाले नाही. घरात रात्री-अपरात्री वाद होत असत. मुले रडत असत. पण ते कुटुंब एकतर कुणाशीही बोलत नव्हते शिवाय परप्रांतीय होते त्यामुळे त्यांच्याशी कोणाचेच बोलणे चालणे नव्हते. त्यांचे जवळपास कोणी नातेवाईक नव्हते. असे दिवस चालले होते आणि अचानक त्या घरासमोर मोठी गर्दी झालेली दिसली. चौकशी केली असता त्या घरातील माणसाने आत्महत्या केल्याचे कळले. 
घडले ते वाईटच होते. आपल्या आजूबाजूला अनेक नवीन लोक येउन राहतात. त्यांची पार्श्वभूमी आपल्याला माहित नसते. नंतर अशा दुर्घटना घडल्यावर आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो तेव्हा विचित्र माहिती समोर येते. ती खरी असते की खोटे हे लगेच स्पष्ट होत नाही. ह्या सगळ्या प्रकारामागे काहीतरी अनैतिक दडले आहे हे मात्र आपल्याला समजलेले असते. लोक एखादी सदनिका किवा बंगला विकत/भाड्याने घेतात आणि तिचा कुंटणखाना म्हणून वापर करतात. किवा लोकांना आर्थिक गंडा घालायच्या संस्था तिथून चालवतात. असले काहीही उद्योग लोक करू शकतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजातील संवाद कमी होत चालला आहे. 
पूर्वी असे होत नसे. एखादा कुविख्यात माणूस व त्याचे घर हे  ठरलेले असे. नवीन घर केले कि वास्तुशांतीच्या  निमित्ताने गुरुजी बोलावले जात. हे गुरुजी म्हणजे त्या काळातील एक शिकलेला व सद्सदविवेकबुद्धी असलेला (खोटे न बोलणारा) साक्षीदार असे. तो यजमान कोण? त्याची पत्नी कोण? त्याची मुले किती इत्यादी साधारण माहिती न सांगता जाणून घेत असे. पुढे त्या घराच्या मालकीचे काही वाद झाले तर त्यासाठी हा साक्षीदार महत्वाचा होता. 
गुरुजीनंतर सगे-सोयरे, आप्त, शेजारी-पाजारी, गावातील समाजाचे लोक वास्तुशांतीला सहभोजन करण्यास बोलावले जात. हेही खरेतर साक्षीदार असत. "पंचमुखी परमेश्वर" अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजे पाच लोक जे सांगतात ते सत्य असा त्याचा साधा अर्थ आहे. हे सगळे लोक नुसते साक्षीदार नसून काही तंट्याच्या प्रसंगी समुपदेशक म्हणून मोठी भूमिका निभावत असत. 
पूर्वी पोलिस नसत. गाव-पाटील बरीच पोलिसांची कामे करीत असत. हा पाटील चांगला कि वाईट असे याबद्दल वाद आहेत. भ्रष्टाचार आपल्या पाचवीला पुजला आहे. तेव्हाचे सामाजिक पोलिस आणि आत्ताचे पोलिस हे ह्याला अपवाद नाहीत. पण एकंदर प्रतिष्ठा आणि नैतिकता ह्यांना खूप महत्व असल्याने लोक चांगलेच होते असे गणित निघते. पाटील गाव-पाटील जरी असला तरी दोन बायका केल्यावर पहिली बायको घरातूनच त्याला विरोध करीत असणार हे सहज कोणीही सांगू शकेल. असो. 
ब्रिटीश काळात पोलिस यंत्रणा आली. ती दंडेलशाहीच्या स्वरुपात आली. तिचे पाटीलकीचे सौम्य समुपदेशकाचे स्वरूप नव्हते. तिथे कायद्याचा बडगा होता. ती अजूनही काहीश्या तश्याच स्वरुपात टिकून आहे. याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो. अर्थात तो एक स्वतंत्र विषय आहे म्हणून इथेच थांबतो. 
तर थोडक्यात वास्तुशांती हा एक समाजाशी संवाद स्थापन करायचा सोहळा आहे. हा संवाद गरिबाने कसा स्थापन करायचा? गरीब माणूस हा संवाद स्थापन करू शकत नाही  याला आपली भ्रष्ट समाजव्यवस्था कारणीभूत आहे. गुरुजी वास्तुशान्तीचे भरमसाठ पैसे आकारतात. आहेर देणे-घेणे होते. प्रतिष्ठा जपण्यासाठी मोठे जेवण, हॉल, कार्याक्रम हे केले जाते तो पैसाही असाच कुठूनतरी आलेला असतो. पण गरीब माणूस हे सगळे टाळून साधा कार्यक्रम करू शकतो. साधे कलश पूजन करून गुरुजींना टाळू शकतो. अगदी जवळच्या १०-१५ नातेवाईक व शेजारी ह्यांना बोलावून हा सोहळा करू शकतो. जेणेकरून एक सामाजिक सुसंवाद प्रस्थापित होऊ शकतो. तुम्ही कर्म करीत राहिला तर आर्थिक प्रश्न येत नाहीत. अशावेळी आप्त, शेजारी ह्यांना आर्थिक संकटात पैसे मागायला जायची गरज राहत नाही. पण अनेक कौटुंबिक आणि तत्सम प्रश्न एकमेकांच्या मदतीने तुम्ही सोडवू शकता, आपले स्वरूप स्वच्छ ठेवण्यास ह्याच आप्त शेजार्यांचा अंकुश तुमच्यावर राहतो. वेळप्रसंगी वाद चव्हाट्यावर न येता घरातल्या घरात सोडवले जातात.
विवाह: विवाहाचे पारंपारिक, वैदिक तसेच देव, गंधर्व, पिशाच्च, राक्षस असे अनेक प्रकार आहेत, सामान्यतः आपण पारंपारिक विवाहाचा विचार करू. "विवाहसंस्थेचा इतिहास" हे श्री. राजवाडे यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात पूर्वी विवाहसंस्था कशी असू शकेल ह्याचे काही अंदाज बांधले आहेत, त्यात पूर्वीच्या काळी यज्ञाभोवती अनेक पुरुष व स्त्रिया मुक्तपणे मैथुन करीत इत्यादी अंदाज आहेत, पण हे अंदाजच आहेत असे वाटते. कारण पती-पत्नी व विवाहसंस्था ही मानवाइतकीच जुनी व मानवाचे जनुकीय वैशिष्ठ्य असलेली संस्था आहे असे वाटते. क्रौंच पक्षी आपले जीवन एकाच जोडीदाराबरोबर जगतो, इतकेच काय जोडीदार मेल्यावर तोही जीव सोडतो, असा जनुकीय इतिहास इतर अनेक प्राण्यांत आढळतो. माणूसही याच प्रकारचा प्राणी आहे. अनेक जोडीदार यांच्याबरोबर जीवन व्यतीत केल्याने काही समस्या तयार होतात हे ह्या प्राण्यांना इतिहासाने वारंवार शिकवले व ते इतके पक्के बनले कि तो त्यांचा जनुकीय विशेष बनला. 
रामायण हे क्रौंच पक्षाची मानवाशी तुलना करताना बनले हेही बर्याच जणांना माहित असेलच. तर विवाह करताना बरेच सोपस्कार पार पाडावे लागतात. दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल, प्रेम असेल तर कशाला हे सोपस्कार? असा प्रश्न मनात येतोच. पण प्रेम, विश्वास ह्या प्रगल्भ कल्पना सगळ्याच लग्नाळू उमेदवारांच्या ठिकाणी नसतात. अनेकदा लाडात वाढलेल्या मुलीचे लग्न लावले जाते, तिच्या गावीही नसते कि ती दुसऱ्या एका वातावरणात जाणार आहे! तेच प्रेम दुसऱ्या घरी मिळेल कि जबाबदाऱ्या अंगावर पडतील हे तिला ठाऊक नसते, मग नवीन घरी गेल्यावर ती तिथे रुळत नाही. ज्यांनी तिचे लाड केले त्यांची तिला आठवण येते. यातून तिला प्रगल्भ व्हायला १०-२० वर्षेही लागू शकतात. 
दुसरीकडे पुरुष वर्गाच्या अनेक तऱ्हा असतात. काही विचित्र प्रथा असतात. काहींच्या पूर्वजांनी चार बायका केल्या म्हणून हेही किमान दोन बायका करणार म्हणून नाचत असतात. काही पुरुष हे बायकोवर कमालीचे अधिकार गाजवणारे असतात. ती माझी बायको आहे म्हणजे तिने इतर कोणाशीच बोलायचे नाही. तिचे नातेवाईक आत्ता कशाला हवेत? अर्थात हेही परस्पर सापेक्ष असते. काही मुली पतीला देव मानण्याचा अतिरेक करू शकतात पण पती वेगळ्याच प्रकारचा असू शकतो आणि या उलटही असू शकते. 
एकत्र कुटुंब असेल तर पती-पत्नीत सुसंवाद असत नाही. तसेच नोकरीच्या वेळा, झालेली मुले ह्यामुळे पती -पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत व एकमेकांकडे होणारे दुर्लक्ष अनेक गैरसमज निर्माण करते.
अशी एक ना अनेक कारणे पुढे पती-पत्नीतील दुराव्याचे आणि संघर्षाचे कारण बनतात. म्हणजे लग्न केले कि सगळे झाले असे नाही तर पुढे असे अनेक प्रसंग निभावून नेणे गरजेचे असते. अशा वादाच्या प्रसंगी सर्वात प्रथम मदतीला येतात ते आपले सगे-सोयरे! वाद अधिक विकोपाला गेले कि मग कायदा, कोर्ट आणि पोलिस. जेव्हा कोर्टात पती-पत्नी जातात तेव्हा आपले म्हणणे मांडतात. हे ते एकमेकांसमोर घरीही मांडू शकले असते पण तेव्हा त्यांना वेळ नसतो तो आत्ता मिळतो नव्हे तर काढावा लागतो!
तर थोडक्यात अशा प्रसंगी अशा जोडप्यांना समुपदेशन देणारे कोणीतरी हवे असते. त्यांची बाजू ऐकणारे कोणीतरी हवे असते. ते कामच समाज करीत असतो. त्यालाच विवाह निभावून नेणे म्हणतात. आपली विवाहसंस्था ही अतिशय नैसर्गिक अशा तत्वावर बनलेली पुरातन संस्था आहे, तिचे पावित्र्य आपण जपले पाहिजे. म्हणून विवाह करताना आजूबाजूच्या समाजाला बोलावणे, समारंभ करणे गरजेचे असते.
शांती: शांती करणे गरजेचे असलेले लोक थोडे आक्रमक असतात. जरी शांती केली तरीही थोडे ना थोडे गुण हे शिल्लक राहतातच. असे लोक अनेक प्रकारे इतरांना उपद्रवी ठरू शकतात. शिवाय ते स्वतःला त्रास करवून घेतात. गुन्हेगारी विश्वातील लोकांचा अभ्यास केला तर शांतीची गरज असताना शांती न केलेले अनेक सापडतात. नुसते शांती करवून घेणे हा उपाय नाही तर अशी शांती आवश्यक असलेल्या लोकांना काही विधायक कार्याला लावणे महत्वाचे असते. त्यांच्या काही वैचारिक समस्या, चुकलेली जडण-घडण जाणून घेणे महत्वाचे असते तेव्हाच त्यावर समाज आणि आपण योग्य उपाय करू शकतो. आणि असे मानसिक उपचार केले तर ती व्यक्ती सुधारू शकते हे शास्त्र आता सिद्ध होऊ लागले आहे हेही एक नवलच आहे.

Friday, 22 April 2016

कर्मयोगाचे शास्त्र:

बऱ्याचदा फळाची अपेक्षा न करिता कर्म करीत राहणे हे तत्व व्यवहारी मनाला पटत नाही. काहीतरी मिळाल्याशिवाय काहीतरी करणे म्हणजे निरर्थक कर्म करणे असा एक विचार बाळगणारे अनेक लोक असतात.
पण असा विचार करणे किती परिस्थितीसापेक्ष आहे याचा अनुभव आपण घेऊ. 
मुले-मुली अमेरिकेला स्थाईक झाले आहेत, किवा इत्ररत्र त्यांचे ते स्वतंत्र राहत आहेत, अशा मुलामुलींचे वृद्ध पालक ह्यांचे उदाहरण घ्या. किवा नोकरीव्यवसाय निमित्त कर्त्या पुरुषालाच कुटुंब सोडून एकटे राहायची वेळ येते. सकाळी आपले मित्र, शेजारी हे गाढ साखरझोपेत असताना तुम्ही एकटेच फिरायला (व्यायाम करायला) जात असता. इतकेच काय एखादा भरपूर अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा स्वतःला एकटे करून अभ्यास करत असतो. 
अशा परिस्थितीत कर्मयोगाचे महत्व फार असते. तुम्ही एकटे असतना एक असुरक्षिततेची भावना तुमच्या मनात असते. आपल्या आप्तांचे, स्वकीयांचे कसे काय चालले आहे याची काळजी मनात असते. आपले स्वतःचे काय होईल हिही  काळजी असते. 
पण अशावेळी हे सगळे मनातले विचार झटकून एखाद्या कामाला तुम्ही लागलात कि विचार आपोआप बाजूला पडायला लागतात आणि कामाचे विचार मनात यायला लागतात. 
साधे उदाहरण तुम्ही घ्या, तुम्हाला फेरफटका मारायला बाहेर जायचे आहे, जाऊ कि नको या विचारात तुम्ही अडकून बसता. बाहेर फार उन आहे, रस्त्यावर फार ट्राफिक आहे, अंगावरचे दागिने हिसकावणारे बाहेर फिरत असतात. अंगात त्राण नाही. चालायला लागले कि चक्कर येते, अशी अनेक नकारात्मक कारणे समोर ठाण मांडून बसलेली असतात. पण तुमचे संचारस्वातंत्र्य असे एका सोन्याच्या महालात जरी तुम्हाला ठेवले तरी कुणाच्या हवाली करू शकत नाहीत. त्यामुळे मूळ प्राणी  गुणधर्मानुसार तुम्ही बाहेर पडताच आणि पडायलाच हवे. मनाचा हिय्या करून बाहेर पडायलाच हवे. 
एकदा बाहेर पडल्यावर तुम्ही रस्त्यावर चालायला लागता. प्रत्येक जण किती चालायचे हे मनातल्या मनात ठरवत असतो. बाजारातून काय काय घ्यायचे आहे हेही मनात ठरवले जाते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे करून सुरक्षित परत घरी यायचे आहे हेही मनात चाललेले असते. एकदा तुम्ही बाहेर पडलात कि तुमचा मुलगा-मुलगी, नातू, नात काय करत असतील ह्याचा विचार मनात येत नाही, पण समोरून येणारा गाडीवाला मला उडवणार तर नाही ना? ह्याची अधिक काळजी तुम्ही घेत असता. शेवटी फेरफटका मारून तुम्ही घरी सुखरूप पोचता आणि तुमचे ते कर्म पुरे होते. 
मनुष्य प्राणी बुद्धिमान असल्याने त्याने कर्माचा फेरा चुकवला. अनेक यंत्रे आज आपल्या दिमतीला आहेत. घरातच ट्रेड-मिलवर व्यायाम होतो. हॉटेलला ऑर्डर दिली कि ते जेवण घरपोच देतात. संपर्क करायचा असल्यास मोबाईल फोन, इंटरनेट आहेतच. म्हणजे कर्म करणे गरजेचे नाही. म्हणजे एकाच जागी बसून चिंतन करून नसत्या चिंता करत बसायच्या का?
प्राणी असे करतात का? एखादा वाघ, सिंह, वानर म्हातारे झाले म्हणून त्याचे अन्नशोधाचे कार्य बंद करून निवांत बसतो का? तर नाही. तो परत त्याची स्फूर्ती वापरून नव्या जोमाने कामाला लागतो आणि आपला चरितार्थ साधतो. हे साध्या प्राण्यांना कळते पण बुद्धिमान माणसाला कळत नाही. अशी छोटी-छोटी अनेक कामे तुम्ही स्वतःची स्वतः करायला लागलात तर स्वतःला कणखर बनवत असता. कोण जवळ आहे आणि कोण सोडून गेले का गेले याचा निरर्थक हिशेब करण्यात काहीच अर्थ नाही. स्वतः कणखर बनलात तर कोण येवो अथवा जावो. तुम्ही तिथेच राहता. येणारे जाणारे येत जात राहतात. 
तर असा हा साधा सरळ कर्मयोग आहे. हे जगायचे एक शास्त्र आहे. व्यक्ती, आणि संचार स्वातंत्र्याचा प्रवर्तक असा हा कर्मयोग आहे. जे तुमच्या जवळ नाही त्यासाठी कुढत बसण्यापेक्षा जे आहे त्यात कसे आनंदी राहायचे ह्याचे हे तत्व आहे. मुले आईवडिलांवर मायेची आड घेऊन गुलामगिरी लादतात, तर आईवडील कधी कधी आपले हक्क दाखविण्यासाठी मुलांवर गुलामगिरी लादतात. अशी हि लादलेली गुलामगिरी कोणालाही नको असते. तेव्हा आपले अस्तित्व कर्मयोगाने सिद्ध करणे गरजेचे असते. इतकेच!!
 

Monday, 11 April 2016

ज्योतिष्य म्हणजे मिनिटामिनिटाचे भविष्य सांगणे नव्हे

बरयाचदा लोक त्यांची जन्मवेळ मिनिट सेकंदाच्या अचूकतेने सांगतात. त्यांची अपेक्षा हीच असते कि त्यावरून निघालेली कुंडली ह्यातून त्यांच्या जन्मात घडणारया प्रत्येक गोष्टीचे अचूक व तंतोतंत भविष्य ज्योतिष्याने सांगावे. तर असे काही नसते रे बाबांनो! असे मिनिटामिनिटाचे भविष्य व गणित करता येऊच शकत नाही हे माझे निरीक्षण आहे. जे कोणी असे सांगत असतील त्यांना एकतर वाचाशक्ती इत्यादी चमत्कारी प्रकार सिद्ध असू शकतात किवा त्यांना ज्योतिष्य शास्त्राचे अगाध ज्ञान असू शकते. त्यातील वाचाशक्ती विषयाचे मला फारसे माहित नाही म्हणून इथेच तो विषय थांबवतो. 
तर जन्मकुंडली किवा प्रश्नकुंडली यांची अचूकता २ तासांची असते. एक लग्न हे अंदाजे २ तासांचे असते, म्हणजे २ तासांच्या अंतराने कुंडलीतील ग्रह त्यांचे स्थान बदलतात. उदा. एकाचा जन्म मेष लग्नावर झाला असेल तर त्यानंतर २ तासांनी जन्म झालेला माणूस हा वृषभ लग्नाचा असू शकतो. ह्या २ तासात लग्नाचे अंश जरी बदलत असले तरी ग्रहांचे अंश आणि त्यांच्या अंशात्मक युत्या त्याच राहतात. उदाहरणार्थ सूर्य मेष राशीला १२ अंशांवर आहे तर लग्न कितीही बदलले तरी सूर्य १२ च अंशावर राहतो, किवा शनी मंगळ ह्यांचे अंश १२ व १३ असतील म्हणजे त्यांची अंशात्मक युती होत असेल तर ती एक-दोन दिवसात तशीच राहते, बदलत नाही. जोवर मंगळ हा शीघ्रगती ग्रह पुढे जात नाही तोवर हि युती टिकून असते. मंगळ साधारणतः दीड दिवसात एक अंश इतके अंतर कापतो तर शनि एका महिन्यात एक अंश पुढे सरकतो. म्हणजे शनि मंगळ युती तुटायला ३-४ दिवस लागतात. चंद्ररास ही अडीच दिवसाने बदलते. 
थोडक्यात सांगायचा मुद्दा हा कि २ तासात लाखो मुले जन्माला येतात त्यांची सर्वांची कुंडली व त्या अनुषंगाने त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ह्या सारख्याच असतात असे होत नाही. तरीही जुळी मुले ह्यांचे चेहरे, शरीर, आयुष्यातील घटना ह्या बऱ्याच प्रमाणात सारख्या घडतात त्याला आपण जुळ्याचे दुखणे म्हणतो. 
कुंडली म्हणजे गणित करून तंतोतंत जुळणारे भविष्य कथन करणे असे नसते. कुंडली हा एक ठोकताळा असतो. फार पूर्वी नुसते हाताने तपासून आतील हाड मोडले आहे का ते गाववैद्य सांगायचे. पुढे एक्स-रे ने अधिक माहिती मिळू लागली. आता एम. आर. आय. करतात. पण जो अनुभवी डॉक्टर असतो तो नुसते हाताने तपासून किवा साधा एक्स-रे बघून हाड मोडले आहे हे सांगतो, त्याला एम. आर. आयची गरज नसते. नुसते हाताने दाबून (चोळून) मोडलेले हाड पूर्वी जोडले जात असे. त्यालाच आता क्लोजड फिक्सेशन असे म्हणतात. तसेच कुंडलीचे आहे. कुंडली पाहणारे अनुभवी जे मोडलेले नाही ते पाहत नाहीत पण जे मोडले आहे ते त्यांच्या नजरे समोरून सुटू शकत नाही. 
कुंडली मांडण्यातील खरे कौशल्य पूर्वीच्या काळी ग्रहांच्या गतीचे अचूक गणित करण्यात होते. ते आता कम्प्युटरच्या मध्यमातून फार सोपे झालेले आहे. पण मांडलेल्या कुंडली वरून नक्की काय गडबड आहे हे कम्प्युटर सांगू शकत नाही. त्यासाठी मानवी बुद्धीच्या तर्काचीच गरज लागते.
एक्स-रे तपासणाऱ्या डॉक्टरला एखादे हाड मोडलेले असताना माझी बाकीची हाडे किती बळकट आहेत ते जरा सांगा म्हणून तुम्ही अडून बसलात तर तो तुम्हाला रामराम करेल यात वाद नाही. बरेच लोक ही अशीच कामे करतात. इथे नोकरी गेलेली असते किवा नवरा बायकोचे वितुष्ट सोडचिठ्ठी पर्यंत गेलेले असते तेव्हा मला गर्भश्रीमंत होण्याचा राजयोग कधी आहे हा प्रश्न ते विचारत असतात. त्यांचेही काही चुकत नाही. कारण आधीच ज्योतिष्य हे दोष हुडकण्याच्या ऐवजी, स्तुती व स्वप्नरंजन करण्यासाठी भरपूर वापरले गेलेले आहे त्यामुळे या शास्त्राची बदनामी झालेली आहे. शिवाय राजेशाहीच्या काळात एखाद्या राजाला जर त्याचे दुर्दैवी भविष्य सांगितले तर त्याने तरवारीने मुंडके उडवायची भीती. काहीच सांगितले नाही तर उपाशी मरायची पाळी. त्यामुळे निस्पृह आणि रोखठोक भविष्य सांगणे हे कमी आणि वाढीव गोष्टी त्यात टाकत राहणे हे होत गेले. 
क्रिकेट विश्वचषक २०१६ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना भारत जिंकणार, तसेच विश्वचषक सुद्धा भारत जिंकणार असे कोण्या ज्योतिष्याने ठोकून दिले. असे कशावरून त्याने ठरवले तर दोन्ही टीमचे कप्तान ह्यांच्या कुंडल्या त्याने काढल्या. हे अजब तर्कट लावले गेले! जर कप्तान हाच ११ खेळाडूंच्या जागी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करीत असला असता तर ते एकवेळ ठीक होते. पण संघ हा ११ वेगवेगळ्या व्यक्तींचा असतो. तो ज्या देशाचा असतो त्याचे काय. देश, राष्ट्र अश्या विस्तृत विषयावर असे मटका पद्धतीचे भविष्य सांगणे म्हणजे खरेच असे ज्योतिषी धन्य आहेत. असे काही ज्ञानकक्षेच्या बाहेरचे आहे ते लोक रंजनासाठी व प्रसिद्धीसाठी सांगणे टाळले पाहिजे. उद्या खरेच भारत विश्वचषक जिंकला असता तर ही भविष्यवाणीची बातमी मोठी करून अनेकदा वाजवली गेली असती हेही पुढे आलेच. तर हे सगळे टाळायला हवे. येत नसेल आणि माहित नसेल तर तसे स्पष्ट सांगणे उत्तम हेच खरे!
हे कुठेतरी थांबले पाहिजे. केंद्रात १-२ शुभग्रह स्वराशीचे, किवा उच्चीचे असले, ८-१२ स्थानी कुठलेही ग्रह नसले तर अशी पत्रिका सर्वसामान्य पत्रीकेहून सरस असते. ८-१२ स्थानात कुठलेही ग्रह असले कि कसलीतरी पिडा संबंधित व्यक्तीला असतेच असते. 
पण विचारणारे हार मानीत नाहीत. मला मुलगा होणार कि मुलगी? संतती विषयक अभ्यास हा पंचम स्थानावरून होतो. पण ह्याच पंचम स्थानावरून विद्या, उदर (म्हणजे बरगडीखालचे पोट) आईचे वडील म्हणजे आजोबा ह्यांचा अभ्यास केला जातो! मला बहिण आहे कि भाऊ? व ते किती आहेत? अरे जे बहिण भाऊ तुमच्या कसल्याच मदतीला येत नसतील ते असून नसून उपयोग काय आणि उपयोग (प्रभाव) नसेल तर ते पत्रिकेत दिसणार कसे? तेच तत्व संततीला लागू पडते. त्रितीय स्थान हे भाऊ-बहिणींचे स्थान आहे म्हणजे तिथले ग्रह बहिण-भाऊ व त्यांची संख्या दर्शवितात असे नाही. कारण तिसरे स्थान हे भाऊ-बहिण यांचे असले तरी ते पराक्रम, प्रवास स्थानही आहे. ज्यांना आपण तुमचे भाऊ-बहिण हे तुमच्या मदतीला धावतील असे सांगतो तेच त्यांचे भाऊ-बहीण तिकडे भाऊ बंदकी करत कोर्टात केसा करत असतात. त्यामुळे बरेचदा अशा लोकांना त्या स्थानातील ग्रह यावरून किती बहिण-भाऊ आहेत हे सांगायच्या फंदात पडू नये. तसे नसतात सुद्धा. कधीकधी तिथे स्वराशीचा रवि, शनि असे ग्रह असतात त्यातून अशी पत्रिका असलेला माणूस मोठे पराक्रम करतो, प्रवास करतो. पण बहिण-भाऊ तो जिवंत आहे कि मृत हे त्याला विचारायला सुद्धा येत नाहीत. त्यामुळे संबंधित माणसाचा सर्वांगीण अभ्यास करून मगच काय ते सांगावे. विचारनार्याने सुद्धा सगळे अचूक असावे अशी अपेक्षा का करावी? असे अचूक काहीच नसते. लोक नुसते जन्मतारीख, वेळ, ठिकाण समोर टाकतात आणि माझे सगळे तंतोतंत भविष्य सांगा ही अपेक्षा का करतात. शिवाय दक्षिणा देताना अकरा रुपये देतात. अरे ही काय वडापावची गाडी किवा भाजी मंडई नाही रे बाबांनो! जसे शारीरिक अडचणी आल्या कि डॉक्टरवर भरमसाठ पैसे खर्च करता तसे घरात रोजच्या जीवनात अडचणी आल्या कि का करत नाही? तिथे बरेच महाभाग २-२ मुले मोठी झालेली असताना घटस्फोट देऊन मोकळे होतात. किती खर्च केला मुलांवर? किती जीव लावला त्यांना? त्याचे मोल काय आहे? असल्या बुद्धिवादी हेकेखोरपणा पेक्षा अडाणीपणे संसार करणारे कधीही परवडले. निदान स्वतःच्या हट्टाची शिक्षा ते आपल्या निरागस मुलांना देत नाहीत. स्वतःच्या आत्म्यावर अत्याचार तरी करीत नाहीत. असो तर असे अनेक नमुने भेटतात. 
लोकांना लोकशाहीत आपले हक्क फार चांगले दिसतात पण कर्तव्याची जाणीव लवकर होत नाही.
डॉक्टर, वकील ह्यांच्यापुढे काहीही लपवून उपयोग नसतो तसेच ज्योतिष्यशास्त्र्यासमोर काही लपवणे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेण्यासारखे असते. तो तुम्हाला अडचणीत मार्ग दाखवत असतो आणि तुम्ही त्याचीच परीक्षा घेताय होय? अडचणी म्हणजे तरी काय? शारीरिक अडचणी म्हणजे शुगर खूप वाढली, ब्लड प्रेशर वाढले, रक्तवाहिन्यातील ब्लोकेजेस वाढून एन्जेओप्लास्टी  बायपास किवा ओपन हार्ट करायला लागली कि लोक हे लोक निपचित पडून राहतात, ज्यांना आपले हे लाड कोणी करणार नाही हे माहित असते ते गप आपले आजार सहन करत राहतात. अतिअपेक्षा करणारे अपेक्षाभंग झाल्याने मरण पावतात. नाहीतर अन्नपाणी सोडून देऊन प्राण त्यागतात. 
म्हणजे जी आपली मुले (संतती) त्यांच्यासाठी तुम्ही समस्त प्राणिमात्राचा धर्म पाळला ते तुम्ही मरत असताना तिकडे मजा मारत फिरत असतील तर कसला हा प्राणीधर्म? हा तर अधर्म आहे. ज्योतिषाला मला चार मुले आणि अमुक इतके जावई-सुना आहेत हे सांगण्यापेक्षा त्यातील किती तुमच्या संकटकाळात निदान विचारपूस करण्यास आले हे तुम्ही का सांगत नाही? तुम्ही मुलांसाठी, मुलीच्या लग्नासाठी तुमची समस्त संपत्ती खर्च केलीत ना आणि त्यांनी तुम्हाला आता अंतर दिले हे सांगायची तुम्हाला लाज वाटते का? आपण फसवलो गेलोय हे तुम्ही कुणाला सांगता? एका ज्योतिष्याला! आणि कधी सांगता जेव्हा तुमच्या हातात काहीच नसते तेव्हा? मग तुम्ही इतके निरीश्वर, पुरोगामी, सेकुलर संशोधन केले ते कुठे गेले? निदान मृत्यू तरी सुखाने यावा ही तुमची अपेक्षा कोणी पूर्ण करण्यास मोकळे बसलेले नाही. आयुष्याचा तारुण्याचा काळ जितका लोभस असतो तितकाच उतरणीचा काळ भयाण असतो. त्यामुळे सावध व्हा. वेळीच आपले भविष्य सुरक्षित करा, ते दुसर्याच्या हातात देऊ नका.
ज्योतिष्यात स्वप्नरंजन, खोटी स्तुती ऐकणे हे असले सोडा. त्यातील सत्य जाणून घ्या त्याचा सामना करा. कष्ट करा पण पुढे मानाने जगा. उगाच दुसर्याच्या हातात पट्टा असलेले श्वान बनू नका. तरच नवीन पिढी ही कृतज्ञ बनेल. नाहीतर हे फसवाफसवीचे आणि इमोशनल ब्लाक मेलीन्गचे चक्र असेच असेच चालू राहील. 
अशा अडचणीच्या वेळी बरेचदा लोक वकिलाचा सल्ला घेतात. कायदेशीर सल्ला घेणे नक्कीच चांगले. बरेचदा वकीलही दोन्ही पार्टींना सामंजस्याने घ्या. परस्पर मिटवून टाका हा रास्त सल्ला देतात. हेही योग्यच आहे. पण सल्ला ऐकणारे किवा त्यांचे नातेवाईक इतके शहाणे थोडेच असतात. परवाची एक बातमी वाचून हसावे कि रडावे हेच कळेना. एक विवाहित जोडपे त्यांच्यातील वाद मिटवून सरकारी समुपदेशन केंद्रातून बाहेर पडले. त्यांच्यातील सगळे वाद मिटले. पण बाहेर पडताच क्षणी त्यांचे नातेवाईक केंद्राच्या बाहेरच एकमेकांना भिडले आणि सगळ्या केल्यावर पाणी फिरले! असा हा आपला समाज!

शनिच्या चौथर्यावर महिला

शनीच्या चौथर्यावर महिला पोचल्या. नंतर सनातनी विचारांच्या लोकांना त्यांचे हे कृत्य सहन झाले नाही आणि मजेशीर वक्तव्ये दोन्ही बाजूने येऊ लागलीत. ह्यातून नक्की काय मोठा अनर्थ घडलाय याचा उहापोह आपण इथे करणार आहोत. शनीच्या चौथर्यावर चढणाऱ्या महिला दोन प्रकारच्या मानसिकता असलेल्या असू शकतात. 
त्यातील प्रकार पहिला म्हणजे ह्या महिला पूर्ण निरीश्वरवादी असतील, त्यामुळे शनीच्या चौथर्यावर गेलो तरी शनीने आमचे काहीच वाकडे केले नाही असे त्यांना सिद्ध करायचे असेल. त्या जर असे करीत असतील तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे. एखादी बाब अंधपणे न मानता जिज्ञासुपणे पडताळून पाहण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे. आणि तसे केलेच पाहिजे. 
दुसरा मुद्दा असा की त्या स्वतः निरीश्वरवादी असतील तर ईश्वरवाद्यांच्या धार्मिक भावनांशी त्यांना खेळायचा अधिकार नाही. पण एखादा जर खरेच खड्ड्यात पडत असेल तर त्याला वाचविण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले तर त्यात त्यांचा काहीही गुन्हा नाही असे माझे मत आहे. 
तर त्यासाठी आधी शनि हे तत्व नक्की काय भानगड आहे ते आपण समजावून घेऊ. शनि हा आकाशस्थ ग्रह आहे. तो जरी पृथ्वीवर एका पाषाणाच्या स्वरुपात पुजला गेला तरीही त्याचा आणि आकाशातील शनीचा काहीही संबंध नाही. महिला नुसत्या त्या चौथर्यावर काय अगदी त्या पाषाणावर जाऊन बसल्या तरी शनि त्यांचे काही वाकडे करू शकत नाही. हेही तितकेच खरे आहे. शनि हे दुसरे तिसरे काही नसून ते कालमापनाचे एक एकक आहे. शनि १२ राशी पूर्ण फिरण्यास ३० वर्षे घेतो. शनीची साडेसाती ही फार कुप्रसिद्ध आहे. जेव्हा शनि एखाद्याच्या राशीला १२-१-२ ह्या स्थानी असतो तेव्हा त्या व्यक्तीची साडेसाती आहे असे म्हणतात. अशी साडेसाती ३० वर्षांनी येते. साडेसातीची ७.५ वर्षे सोडली तर राहिलेली २२.५ वर्षे शनि अजिबात कोणाला त्रास देत नाही. उलट ३-६-१०-११ ह्या स्थानी शनि असताना प्रचंड भरभराट करून देतो. पण नेमके ह्याच २२.५ वर्षात माणसाला काही सवयी लागतात. आपलेच खरे, आपण म्हणू ती पूर्व दिशा असे तो वागू लागतो. ईश्वर-परमेश्वर त्यावेळी त्याला अजिबात आठवत नाही. मस्त भोग भोगत तो माणूस जीवन जगत असतो. पण विश्वात स्थिर आणि वाढत जाणारे कधीतरी मावळते हा जसा नियम आहे तसे नेमके साडेसातीत होते. आजूबाजूचे लोक इच्छेविरुद्ध  वागायला लागतात. लोक सोडून जातात किवा तुम्ही तरी त्यांच्यापासून दूर जाता, जवळचे लोक तुमचे वर्चस्व जुमानत नाहीत. हे निसर्ग नियमाने होणार असतेच फक्त निमित्त शनीचे होते आणि ह्या आधी सुखात जगणाऱ्या महाशयांचा संयम संपायला सुरुवात होते. संयम सुटला कि बेताल वागण्याचे उलटे फटके बसायला सुरुवात होते. तसेच परम संयम, सयंत व संत स्वभाव असलेला मानव हा फार दुर्मिळ किवा निव्वळ अशक्य आहे त्यामुळे प्राप्त साडेसाती असह्य होऊन माणूस साडेसातीच्या तडाख्यात सापडतो. संयम सोडून प्रतिक्रिया देतो. साडेसाती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अपरिमित संयमाची परीक्षा असते. 
निसर्ग आधी माणसाला बलवान व उन्मत्त बनवतो आणि तसा बनल्यावर मग त्याला ठोके मारून जाग्यावर आणतो. ह्या प्रक्रियेत जो टिकाव धरून राहतो तो पुढे जातो. 
हे सगळे होत असते त्यासाठी काळाचे अचूक निरीक्षण करण्याची नितांत गरज असते. असे निरीक्षण करून त्याचा नोंदी करून ठेवल्या, त्या आठवल्या कि साडेसाती म्हणजे काय याचे आकलन सोपे होते. एखादे पातेले गरम आहे म्हणून त्याला हात लाऊ नकोस असे आपल्याला सांगितले असले तरी दोनचार वेळा हात भाजून पक्का धडा मिळाला कि मगच माणूस त्या गरम पातेल्याला हात लावायला घाबरतो. तसे ह्या शनि साडेसातीचे आहे. इथे मिळालेला धडा हा पक्का कोरून ठेवण्यासाठी तो इतका जोरात आणि परत परत दिला जातो कि पुढची १० वर्षे तो विसरणे  अवघड असते. ही त्या माणसाला सुधारण्याची प्रक्रिया निसर्गाकडून आपोआप होत असते. पुढे असा प्रश्न निर्माण होतो कि जी लहान मुले आहेत त्यांनी त्यांचे २२.५ वर्षांचे आयुष्य ओलांडलेलेच नसते, मग त्यांना संयमाची परीक्षा द्यावी लागते? तर निरीक्षण असे सांगते कि लहानपणी साडेसाती फारच सौम्य जाते. फारच खटपटे मुल असेल तर हात पाय मोडणे यावर भागते. पण धडा हा मिळतोच. अगदीच तान्हे बाळ असेल तर आईवडीलांच्या कृत्यांचा परिणाम गृहीत धरावा लागतो. त्यांचे वर्तन हे मुलाला मिळणाऱ्या फलाशी संबंधित असते.  
 जसे विज्ञान हे निरीक्षण व नोंदींनी सिद्ध होते तसेच शनीचे हे विज्ञान आहे. याउपर निरीश्वरवाद्यांना (अगर असले काहीच न मानणार्यांना) त्यांचे काय विज्ञान आहे ते मानायचे स्वातंत्र्य आहेच आहे. 
तर असा हा पहिला महिला-पुरुष वर्ग आपण पहिला. 
दुसरा महिला वर्ग असाही असू शकतो कि त्या शनीला खूप मानतात. साडेसातीचे गंभीर परिणाम त्यांना माहित आहेत. त्या परिणामांपासून स्वतःला किवा आपल्या कुटुंबाला दूर ठेवण्यासाठी त्या शनीच्या चौथर्यावर चढून गेल्यात. त्यांनाही एखाद्या देवाची उपासना करण्याचा पुरुषांच्या इतकाच हक्क आहे आणि त्या मागण्यासाठी त्या झगडत आहेत. असे असेल तरी स्थिती तीच राहते. शनि मुळात संयमाची परीक्षा घेणारा असल्याने त्याच्या नुसत्या जवळून दर्शनाने फार मोठे लाभ पदरात पडतील असे दिसत नाही. दर्शनाचे द्या सोडून पण असे असेल तर शनीच्या प्रतिकूल काळात जप, दान पूजन का सांगितले जाते? का हि सुद्धा बनवेगिरी आहे? हा पुढचा प्रश्न मनात उपस्थित होतो. 
त्याचे कारण असे आहे कि, तो एक उपचार असतो. तुम्ही एखादी चुकीची कृती केलीत पण त्याची जाणीव जर मनाला झालीच नाही तर ती कृती तुम्ही पुन्हा पुन्हा करता. पण दान, पूजन मंत्र-जप केल्याने आपला काळ प्रतिकूल आहे, आपण जे कृत्य करतोय ते चुकीचे होते याची जाणीव माणसाला होत राहते व ते करण्याचे टाळण्यासाठी तो जागृत राहतो हा जप, दान मंत्र, पूजन यांच्यामागील उदेश आहे. जाणीव नसेल तर कितीही जप, दान, पूजन केले तर त्याचा उपयोग शून्यच आहे. हे ओघाने पुढे येतेच. 
तर अश्या प्रकारे शनीच्या चौथर्याचे प्रकरण गाजत आहे. 
पुढे आणखी गंमत अशी कि प्रत्येक मंदिरात लाखोने भाविक जातात. पंढरीच्या विठोबाचरणी भाविकांच्या स्पर्शाने खड्डा पडायला लागला आहे. अनेक मूर्तीवर अभिषेक घालून दरवर्षी कित्येक मूर्तींचे पाषाण काही मिलीमीटरने घासून कमी होतात. मंदिरात दिलेल्या बळीच्या रक्ताच्या पाटात घसरून अडीचशे लोक मेल्याची घटना सहज घडून जाते. त्यात हे शनीचे प्रकरण विचारात घेतले तर तिथे दिवसभर तेल घातले जाते. शनिशिंगणापूर मंदिर परिसर तेलाने इतका निसरडा झालेला असतो कि कधी गर्दी होऊन घसरा-घसरी आणि चेंगराचेंगरी होईल हे सांगता येत नाही. शनिला तेल वाहतात कारण ते चिकट असते, साध्या पाण्याने ते निघत नाही. पूर्वी साबण नावाचा प्रकार नव्हता तेव्हा तेलाचा चिकटपणा हा शनीचा त्रास देण्यासाठीचा गुणधर्म समजला जायचा-१. तर असे हे तेल आणि त्यात जाऊन घसरून कुणी पडावे-२
आपल्याकडे लेकाला दोन घास जास्त खायला लावायचे आणि ते घास लेकीच्या ताटातून द्यायचे हि परंपरा आहे त्यामुळे मुली आधीच फार सशक्त असतात. त्यात गर्भारपण, आजारपण असेल तर ह्या तेलाच्या गोंधळात महिलांनी पडू नये इतकेच वाटते. शनीची उपासना मनातल्या मनात केली, त्याच्या चांगल्या आणि वाईट स्थितीत त्याने आपल्या पतीला, मुलाला किवा तुम्हाला स्वतःला कशी फळे दिली ह्याचा अभ्यास व निरीक्षणे करून ठेवलीत तर ती शनीची विधायक भक्ती होईल असे वाटते. साडेसातीत काय करावे काय टाळावे ह्याचे स्वतःला आणि तुमच्या कुटुंबियांना मार्गदर्शन तुम्ही महिलाच फार उत्तम प्रकारे करू शकता, कारण घडवायची जबाबदारी तुमचीच आहे. 

टिपा:
१) साबण किवा साबणीकरण गुणधर्म असलेला कुठलाही पदार्थ पूर्वी हात धुवायला वापरल्याचे पुरावे नाहीत. रिठे किवा शिकेकाई हे केस धुवायला वापरले जात होते हे ऐकून माहित आहे. इतकेच काय शौचास जाऊन आल्यावर लोक हाताला माती चोळून मग हात धूत. हाताचे तेल काढण्यासाठी आत्ता जसा साबण वापरला जातो तसा पर्यायी पदार्थ पूर्वी नव्हता.
२) शनीला तेल जाळत नाही तर ते त्याच्या अंगावर ओततात. अपवादाने काही ठिकाणी (शनि शिंगणापूर येथे    जाळतात कारण एकतर इथे भयंकर मोठ्या प्रमाणात तेल ओतले जाते ते जाळून टाकल्याने चिकचिक व संभाव्य अपघात टाळावेत हा उद्देश असावा.) 




तुम्ही लोक जंगली जीवन जगता म्हणून आम्ही तुम्हाला सुधारण्यास आलोय!

इस्लामचा प्रचार ह्या प्रमुख तत्वावर केला जातो कि इस्लामचा जीवन जगायचा मार्ग सर्वात उत्तम, सर्वांना न्याय देणारा, समानता प्रस्थापित करणारा आधुनिक मार्ग आहे. 
जरी इस्लामी शासनकर्त्यांनी तलवारीच्या जोरावर लुट केली व इथे राज्य केले तरी ती एत्तादेशियांच्या भल्यासाठीच केली असे सांगितले जाते. 
प्रमुख प्रवाद खालीलप्रमाणे आहेत,
१) आपण अनेक देवांची पूजा करतो, हे चूक आहे, ईश्वर एक आहे हा आधुनिक विचार आहे. आपण ईश्वराची मानव स्वरुपात कल्पना करतो हेही चूक व जुनाट आहे. ज्या ईश्वराने सर्व सृष्टी निर्माण केली तो मानव स्वरुपात कसा काय असू शकतो? ईश्वराचे मानवी स्वरूप हे  कपोलकल्पित मिथक आहे. 
२) आपण हुंडा घेतो. त्यांचे पुरुष हुंडा देतात!
३) युद्धानंतर स्त्रिया सती जात हे चुकीचे आहे. विधवा ह्या आपल्यात अशुभ समजल्या जातात. पण इस्लाममध्ये त्यांना असे वाईट स्टेटस नाही. त्यांच्याशी पुनर्विवाह करावा अशी आज्ञा आहे. 
४) चोरी, बलात्कार, अनेक व्यक्ती बरोबर लैंगिक संबंध ठेवणे, विवाहबाह्य संबंध ह्यांना कठोर शासन आहे. तसे आपल्या धर्मात नाही.
 असे एक ना अनेक मुद्दे आहेत. खरेच संपूर्ण विश्वाला सुधरवून टाकण्याची महत्वाकांक्षा ही किती सुंदर कल्पना आहे ना! जसे एकनाथांनी त्यांना चावणाऱ्या विंचवाला वाचवण्यासाठी त्याचे असंख्य चावे सहन केले पण त्याला वाचवणे थांबवले नाही. तशातलाच हा प्रकार आहे. आपण विंचू आहोत का? आपल्याला सुधरवण्यासाठी कोणीतरी जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहे का? 
कि जे आपल्याला सुधरावायाला आले ते आपल्याबरोबर राहून स्वतः सुधारून गेले? एका प्रगल्भ लोकशाहीत ज्याची आपण २०० वर्षापूर्वी कल्पना करू शकत नव्हतो ती आज आपण उपभोगतो आहोत हेही नसे थोडके. जिथे त्यांचा धर्म स्थापन झाला त्या वातावरणाप्रमाणे त्याची तत्वे होती. त्यापेक्षा अधिक प्रगत संस्कृती, धर्मतत्वे जगात व संपूर्ण विश्वात अस्तित्वातच  नाहीत हे समजणे असे काही त्यांचे झाले आहे का? 
तसेच आपल्या जाती, भेदभाव, भ्रष्टाचार इत्यादी कुप्रथा कौतुकास्पद नाहीत हेही समजून घेणे इथे अभिप्रेत आहे.
असे प्रश्न मनात येतात तेव्हा वाचकांच्या प्रतिक्रिया येण्यासाठी ही चर्चा उपस्थित केली आहे.

Sunday, 10 April 2016

कुलदैवताच्या जागी विष्णू आला!

मागील लेखात आपण पहिले कि, सावरकरांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अष्टभुजादेवी हे कुलदैवत मंदिरात विसर्जित केले. जसा काळ असतो तसे माणूस वर्तन करत असतो. त्या काळात कुलदैवताचे मोठे महत्व होते. छत्रपती शिवाजी यांनी केलेली कुलदेवता उपासना प्रख्यात आहे. त्यातच आपली कुलदेवी, देव हे उग्र व रागीट आहेत हेही आपण पहिले. देवीचे बोळवण (बोडण) केले नाही तर ती घरात कसा उच्छाद मांडते हे आपण पहिले आहे. शिवाय जुन्या लोकांना ह्या कुलदेवी-कुलदेव विषयक प्रश्न तुम्ही सहज विचारून बघा. सगळे जुने लोक तेच तेच सांगत असतात. देवी फार कडक आहे, ओल्या झाडाला आग लावू शकते, असे गूढ शब्द, विचित्र देवदासी, वाघ्या मुरळी प्रथा आपण आजही अनुभवतो आहोतच. चांगला शिकला सावरलेला मुलगा ज्याला ब्रिटीश दरबारी सुखवस्तू नोकरी सहज मिळू शकते, तो तिकडे काळ्या पाण्यावर खितपत पडला आहे म्हटल्यावर कुटुंबियांची अशी मानसिकता होणे साहजिक होते. पण स्वातंत्र्याचे वेड हे वेडच असते. जेव्हा स्वातंत्र्य नसते तेव्हा त्याची किंमत कळते. आज आपण जी स्वातंत्र्याची गोड फळे खात आहोत ती सावरकरांनी त्यांच्या कुलदेवीसमोर केलेल्या प्रतिज्ञेची फळे आहेत नाही का? तर ह्याच विषयाचा आपण विचार करू.
वैदिक ब्राम्हण समाज अफगाण प्रांतातून भारतात आला असे शोध सध्या लागत आहेत. मूलनिवासी लोक हे मातृ-पितृ पूजक लोक होते असेही सांगितले जाते. त्यातील मातृ-पितृ पूजा हा कळीचा विषय आहे. कोणीही कोणाला आई वडिलांशी संबंधित शिवी दिली कि राग अतिशय वाढतो. राग हा मनाचा शत्रू आहे. राग आला कि सूड-प्रतीसूड यांचे चक्र सुरु होते. तू असे केले म्हणून मी असे केले अशी शृंखला चालूच राहते. प्रत्येकाचे काहीतरी तत्वज्ञान असते. ह्या देशावर आक्रमण करणारा म्हणतो कि, मी ज्या भूमीतून आलो तिथे काहीच पिकत नाही मग मी काय उपाशी मरु का? ह्या देशातला मूलनिवासी म्हणतो मी आधी इथे आलो आता हि जागा माझी आहे तिथे तू येऊ नकोस. हे असे जगण्या मरणाचे लढे अनंतकाळ चालू आहेत. 
लढणारे लढतात आणि मरतात पण ज्यांचा काही संबंध नाही ते (कर्म स्वरूप वर्ग ह्यात कायम त्रास सहन करत राहतात) जसे आपली भूमी हि आज शोषली जात आहे, जिथे एका किलोमीटर वर्गामध्ये  १०० लोक पूर्वी राहत होते  तिथे १ लाख लोक राहत आहेत. जिथे एका पुरुषास एक स्त्री असे गुणोत्तर होते ते आता एकास ०.८ इतके कमी झाली आहे. अशा युद्धाचे दूरगामी परिणाम आपल्यावर होत आलेले आहेत. ह्या युद्धात टोकाचा प्रतिकार करण्याची वृत्ती निर्माण होण्यासही आपली कुलदैवते आपल्याबरोबरच निर्माण झाली. देवाने सृष्टी निर्माण केली कि मानवाने देव निर्माण केले हा वाद "कोंबडी आधी कि अंडे आधी" असा निरुत्तर करणारा आहे म्हणून तो तूर्तास बाजूला ठेऊ. परकीय आक्रमणांचा इतिहास तसा फार जुना आहे. अशी अक्रमणे पुरातन काळापासून होत आलेली आहेत व त्यातून आपली एक ठराविक उत्क्रांती होत आलेली आहे. ह्या उत्क्रांतीत स्त्री-पुरुषात लढाऊ बाणा निर्माण होण्यासाठी अशी उग्र कुलदैवते निर्माण झाली. त्यांचे सशस्त्र उग्र रूप, त्यांचा मांसाहारी नैवेद्य हे शरीरात शौर्य व युद्धजन्य क्रौर्य निर्माण होण्यासाठी आहेत हे न सांगता कळते. नुसते पुरूषच नाही तर स्त्री देवता सुद्धा अस्तित्वात आल्या. प्रसंगी आपल्या संततीला युद्धाच्या मैदानात पाठवण्याचे अवघड काम स्त्रीने करावे हा यामागील उद्देश आहे. स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळावे असा दुसरा उद्देश होता. स्त्री ही किती पुरातन आहे यावरून स्त्री दैवते किती पुरातन होती याची कल्पना येऊ शकते! आई जशी माया लावते तसे ती न्याय मिळवण्यासाठी आपल्या संततीला युद्धाच्या यज्ञात अर्पणही करू शकते. समोरासमोरील तलवारीच्या युद्धात असे क्रौर्य, सूडबुद्धी, स्वातंत्र्याची आस हे आवश्यक होते. 
प्रत्येक प्राण्याला त्याचे स्वातंत्र्य परम प्रिय असते. त्याला स्वतःच्या पद्धतीने खायला प्यायला, जिथे वाटेल तिथे फिरायला, स्वतःला आवडते ते आचरण करणे प्रिय असते. त्यात कसली अडकाठी आली कि त्याच्या स्वातंत्र्यावर घाला येतो व तो माणूस चवताळून उठतो. पिंजऱ्यात कुठलाच प्राणी सुखी नसतो, भले तो सोन्याचा पिंजरा का असेना हे आपण लहानपणी शिकलो. परकीय आक्रमणात हेच मातृभूमीचे (म्हणजे इथल्या प्रत्येक मानवाचे) स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इथला माणूस त्याविरुद्ध शतकानुशतके लढत राहिला आहे व त्याला प्रेरणा देत आलीत ती आपली कुलदैवते! इथल्या मानवाने हार मानली नाही. अतिशय सूक्ष्म, मूलगामी आणि जनुकीय बदल आपल्यात त्या त्या स्थितीत होत आलेले आहेत त्यामुळे आपण असे बनलो आहोत. आपली दैवते अशी बनली आहेत.
काळ मोठ्या झपाट्याने बदलला तो ब्रिटीश काळात! ब्रिटिशांनी शिस्तबद्ध बंदुका धारण केलेले कवायती सैन्य आणले तेव्हा आपली हि अंतर्गत हमरी तुमरी थांबली. यात ब्रिटीश फार मोठे देव होते असे सांगण्याचा अजिबात उद्देश नाही. उलट आज आपली लोकशाही ब्रिटीश लोकशाही पेक्षा करोडो पटींनी मोठी लोकशाही आहे आणि व्यवस्थित प्रगती करीत आहे हे खरेच कौतुकास्पद आहे. ह्या लेखाचा उद्देश आपली कुलदैवते त्यांची न्याय अन्याय विषयक भूमिका याविषयी आहे. म्हणून ब्रिटीशांच्या राज्याचा विचार इथे करीत नाही. जसे काळ बदलला तसे विचार बदलत गेले. ब्रिटीशपूर्व काळातही अनेक मोठी साम्राज्ये होती. अनेक शांतता पर्वे येउन गेली. तेव्हा बाह्य नव्हे पण अंतर्गत युद्धे थोडीफार होत होती. 
अशा शांततेच्या काळात आपली उग्र दैवते, त्यांच्यातून येणारी युद्धखोर वृत्ती यांची गरज समाजातील पुरोगामी घटकांना वाटेनाशी झाली. शिवाय जे माणसात अंतर्गत बदल घडले होते त्याचे काही कौटुंबिक व सामाजिक दुष्परिणामही होत होते. कुलधर्म-कुलाचार का व कशासाठी करायचे. हे कर्मकांड कशासाठी? असेही प्रश्न समाजातील एक पुढारलेला वर्ग स्वतःला विचारू लागला होता. बर नुसते बोलून किवा विचार करून ठीक पण हे कुलधर्म कुलाचार केले नाहीत तर भयंकर दुष्परिणाम होतात असाही एक समज दुसरीकडे भीती दाखवत होता. त्याचे काय करायचे? 
अशा स्थितीत एक सौम्य दैवत पुढे असणे गरजेचे होते. त्यातून विष्णू ह्या दैवताची निर्मिती झाली. त्याचा मार्ग हा साधा भक्तिमार्ग. त्याला मांसाहार चालत नाही. एकादशीचा उपवास करून चित्त शुद्ध ठेवायचे. वारी करायची असे त्याच्या भक्तीचे स्वरूप. याबरोबर ह्या दैवतासारखे असलेल्या देवांचे भक्त वाढत गेले. अनेक संत ते स्वामी, बाबा बुवा तयार झाले. त्यांनी समता शांती इत्यादी संदेश दिले. 
वरवर पाहता समाज बदलला, कायद्याचे राज्य आले. युद्धे फक्त सीमेवर लढली जातात. त्यासाठी फक्त काही लाख सैनिकांची आवश्यकता असते. पण जो माणूस इथे राहतो तो अजून जुन्या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन म्हणजे ती युद्धात पळवून आणायची वस्तू असाच अजून आहे. त्यामुळे शत्रूची नांगी ठेचली जाते, चांगला सूड उगवला जातो असा पुरुष मानसिकतेचा भाग ह्यामागे आहे. पूर्वी पिके, संपत्ती जशी लुटली जात होती तसा हा प्रकार आहे. 
बरेच गुन्हे आजच्या कायद्याच्या राज्यात आपल्या समाजाच्या ह्या अज्ञानामुळे घडतात असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. हुंडा मागणे, स्त्रीभ्रूण हत्या, चोरी, अल्पवयीन विवाह, विचित्र प्रथा असे गुन्हे हे गुन्हे आहेत हेच समाजातील अनेकांना माहित नसते ही एक गंभीर पण गमतीशीर बाब आहे. कुलदैवत ओल्या झाडाला आग लावते म्हणजे काय हेही ह्यातच दडलेले गूढ आहे. गुन्हेगारीचे मानस शास्त्र हा एक संपूर्ण वेगळा व विस्तृत विषय असल्याने तो इथेच थांबवतो त्यावर आपण इतरत्र चर्चा करूयात. 
पूर्वी समाज देव-धर्म ह्यांच्या नियमांनी चालत असे. तसे आता राहिलेले नाही. पण जुने दैवत सोडून देणेही उचित आहे असे वाटत नाही. विधायक मार्गाने प्रगती आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास हीच कुलदैवते तितक्याच दमदारपणे तुमच्या पाठीशी उभी राहतात. पण तो अनुभव स्वतः घेणे आवश्यक आहे. पूर्वी स्त्रीची मानमर्यादा राखण्यासाठी कुलदेवी उपासना केली जात असे तशीच मानमर्यादा ठेवण्यासाठी देवीची उपासना आपण आत्ता का करू शकत नाही. म्हणजे देवळात जाऊन पूजा करून आले कि बाहेर स्त्रियांना त्रास द्यायला आपण मोकळे झालोत का? मग ती देवळात केलेली पूजा म्हणजे तुमच्या शरीराने केलेले कृत्य आहे ते मनाने व बुद्धीने केलेले नाही असे झाले. आपण हि दैवते तेव्हा तशी का होती व आता कशा स्वरुपात पुजली पाहिजेत हे समजून घेतले तर आपली पुरातन कुलदैवते सोडून आपल्याला ज्यांचा कार्यकारण भाव माहित नाही किवा जी कशासाठी उभी केली गेली हेही माहित नाही अशा दैवतांना अंगीकारणे म्हणजे स्वतःची अंधळेपणाने फसवणूक करण्यासारखे नाही का? नुसता देव बदलून मानसिकता बदलते का? जर उग्र दैवते त्रास देत असतील व तुम्ही त्यासाठी ती सोडत असाल तर नक्कीच असे देव अस्तित्वात होते म्हणूनच तर त्यांना सोडायची वेळ तुमच्यावर आली ना? अशी दैवते नसतीच तर सोडायची गरजच नव्हती.








 

Saturday, 9 April 2016

देव प्राप्त करायला पुरोहिताची गरज आहे का?

हा मोठा कळीचा प्रश्न आहे. बऱ्याच पुरोहितांचे पोटपाणी देवळे, पूजा-अर्चा, होमहवन ह्यावर अवलंबून आहे त्यामुळे ह्या प्रश्नावर जोरदार चर्चा होत आलेली आहे. आपण ह्या प्रश्नाचा आज उहापोह करूयात. 
मला विचारले तर देव प्राप्त करण्यासाठी पुरोहिताची गरज नाही. तुम्ही खऱ्या मनाने काहीही अर्पण केले तर ते देवापर्यंत पोचते, व तो संतुष्ट होतो. शबरीने उष्टी केलेली बोरे रामाला वाहिली व त्याने ती आवडीने खाल्ली हे उदाहरण तर आपण नेहमीच ऐकत आलो आहोत.  
पण थांबा थांबा, थोडे थांबा. आता तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन असे उष्टे देवाला वाहायला गेलात तर लोक म्हणजे आपला समाज तुम्हाला वेड्यात काढेल. तरीही विचित्र नवस बोलणाऱ्या लोकांची कमी नाही. एकाने १०८ नारळाचे तोरण देवाला वाहायचा संकल्प केला. ते १०८ नारळाचे तोरण त्याने घरी बनवून नेले आणि त्या ऐन गर्दीत देवाला वाहिले तेव्हा खरेच नवस फेडणे किती अवघड असते हे त्या गृहस्थाला कळले. असो. 
तर हे ईश्वर-देव प्राप्ती इतकी सोपी असताना हा पुरोहित वर्ग आला कुठून? शिवाय ह्या पुरोहितांचा मोठा रुबाब असतो. देवाचे नारळ, वाहिलेले साहित्य, साड्या, वस्त्रे इकडची तिकडे फिरवून तो फक्त पैसे मिळवत असतो. तेही विकलेल्या मालावर १०-२०% नफा असे नाही तर १००% त्याच्याच मालकीचे असते. हे कुणाही भक्ताला खरे तर अजिबात आवडत नाही. आत्ता कुठे लोक ह्या विषयावर मोकळेपणाने बोलू लागले आहेत. बर पुरोहीतही का गप्प बसावेत? ते म्हणतात कि लोक सिनेमाला हजार-दोन हजार असे खर्च करतात मग देवासाठी खर्च करताना का इतके ओरडतात?
तर हि पुरोहितशाही कशी जन्माला आली हे आपण आधी पाहूयात, मग सगळी उत्तरे आपोआप मिळतील. पुरोहित वर्ग आपल्याच काही चुका, निराशावाद आणि अज्ञानामुळे निर्माण झाला आहे असे मला वाटते. कसे ते पाहू.
१) प्रथांचे पालन:   वर आपण शबरीचे उदाहरण पहिलेच. देवाच्या पूजेच्या काही प्रथा आहेत. त्यापेक्षा वेगळे काही केले कि लोक मूर्ख म्हणतात हेही आपण पहिले. प्रत्येक कुळाच्या काही प्रथा व कुलधर्म कुलाचार आहेत. ते माहित होणे याविषयी प्रत्येकाची जिज्ञासा असते. पण बऱ्याचदा घरातील कर्ते पुरुष काय स्त्रियासुद्धा चांगला व भरभराटीचा काळ असताना त्यांच्या कुलदैवताकडे ढुंकूनही बघत नाहीत. एकदा अडचणी सुरु झाल्या कि नाही नाही ते उपाय करतात. ग्रहांच्या दशेप्रमाणे हा काळ बदलत असतो. तो किती आणि कसा असतो ते पहा. 
ग्रह महादशा वर्ष
सूर्य 6 वर्ष
चन्द्र 10 वर्ष
मंगल 07 वर्ष
राहू 18 वर्ष
गुरु 16 वर्ष
शनि 19 वर्ष
बुध 17 वर्ष
केतु 07 वर्ष
शुक्र 20 वर्ष
 ग्रहांच्या दशांचे दुष्परिणाम त्यांच्या कुंडलीतील स्थितीप्रमाणे मिळतात. दशेच्या ह्या तत्वाप्रमाणे प्रत्येक मानवाचे जेजे काही घडणार आहे ते नियत (म्हणजे नियतीप्रमाणे) घडत असते असे शास्त्र ह्यामागे आहे. वयक्तिकरित्या मी ते मान्य करत नाही कारण एकाच वेळी जन्माला आलेले दोन मानव एक चोर व एक सज्जन असे असतात. ते असे असतात कारण त्यांचे संस्कार तसे असतात.  व त्याप्रमाणे त्यांची नियती बदलत असते. हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे म्हणून याविषयी नंतर आपण चर्चा करू. पण मूळ मुद्दा तोच राहतो, जो संस्काराप्रमाणे कुलधर्म कुलाचार करतो तो पुढे जातो. जो भक्ती करतो तो ह्या कठीण किवा चांगल्या वेळेत तारून जातो. जो चांगली वेळ आली म्हणून सगळे विसरून जातो, उततो, माततो आणि नंतर वाईट वेळ आली कि आणाभाका घेतो असे करोडो लोक आहेत, तेव्हा नेमके पुरोहित लोकांचे फावते. 
२) जुन्या प्रथांचे संदर्भ:अनेक जुन्या प्रथा ज्यांची आज आपल्याला अजिबात गरज वाटत नाही त्या आज करायला लागतात. तळी कशी भरायची? बोडण (कुलदेवीला जाऊन आल्यानंतर ती आपल्याबरोबर येते व तिचा वास आपल्या घरी असतो. बहुतेक कुलदेवी ह्या भयंकर व उग्र आहेत त्यामुळे जर त्यांचे बोडण अथवा बोळवण केले नाही तर घरात भयंकर वाद, संकटे हि होतात. तेव्हा त्या देवीला परत पाठविण्यासाठी एक सवाष्ण व एक कुमारिका ह्यांना जेऊ घालून व सवाष्ण स्त्रीची ओटी भरून व कुमारिकेला वस्त्रे देवून बोळवण केली जाते) हे बोडण हा अतिशय सामान्य विधी आहे पण बऱ्याच महिला आर्थिक कारणांसाठी तो करीत नाहीत व नंतर नसते प्रश्न उपस्थित होतात. तसेच कुठले नवस कधी बोलावेत, भाग बांधणे म्हणजे काय? हेही बऱ्याच जणांना माहित नसते. नवसांचे विस्मरण हे आपले चौथीला पुजलेले प्रश्न आहेत. 
काही स्त्रिया-पुरुष हे मला लाखाचे कंत्राट मिळू देत मी सव्वा किलो पेढे वाहील हा नवस बोलतात. किवा वंशाचा दिवा मिळू देत ११ नारळाचे तोरण वाहील असे बोलतात. अगदी हसू येते अशावेळी. म्हणजे तुम्ही लाखो कमावणार आणि देवाला फक्त सव्वाशे रुपयाचे पेढे वाहणार! वाह रे वाह. अति-आजारपणात, किवा लग्न जुळू देत, नोकरी टिकू देत, अगर मिळू देत म्हणून माउली सव्वा किलो पेढ्याचा नवस बोलते आणि नोकरी लागली कि पोरग तिला सव्वा रुपयाला महाग करून टाकत. ही आपली मातृपुजक संस्कृती. 
आता भाग बांधणे म्हणजे काय? तर पूर्वी स्त्रिया बिचार्या संकट काळात मी संकट दूर झाल्यावर देवाला अमुक अमुक करील म्हणून एका कागदाच्या किवा कापडाच्या तुकड्यात सव्वा रुपया, सव्वा अकरा रुपये किवा घरातील अन्नधान्य बांधून ठेवीत असत, जेणेकरून ह्या नवसाचे विस्मरण होऊ नये हा यामागे उद्देश असे. नंतर जेव्हा कुलदैवत वरिला त्या जात तेव्हा हा नवस किवा संकल्प त्या पूर्ण करीत. 
पण माणूस हा मोठा लबाड प्राणी आहे. जेव्हा तो संकटात असतो तेव्हा नाही नाही ते वचन द्यायला तयार होतो आणि संकट गेले कि मस्त होतो हे देवालाही माहित असते. म्हणूनच देवाने त्याचे नवस असे सव्वा किलो पेढ्याचे सोपे ठेवले नाहीत. "अग बाई वा बुवा तुला मुलगा मुलगी हवीये ना? मग ती सव्वा किलो पेढ्याने मिळत नाही." तिला देशकार्यासाठी सोड. समाजकार्यासाठी सोड, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सोड हि प्रांजळ मागणी आपली कुलदैवते करीत आली आहेत, आणि खरे आईवडील ते देत आले आहेत. त्या आईवडिलांनी असे त्यांचे लाडके लपवून ठेवले तर ते संसार करू शकत नाहीत किवा बंडाळी करून समाजसेवेत घुसतात किवा त्यांना त्यांच्या मनासारखे करू दिले नाही तर ते वाया जातात, हा अनुभव आहे. त्यामुळे कुलदैवताचा नाद ज्यांना त्याचे महत्व कळते त्यांनीच करावा अन्यथा त्याला विसर्जित करावे व आपल्याला जे जे वाटते ते देव घरात आणून टाळ कुटत बसावे.
एक गम्मत बघा: ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरानी आपल्या कुलदैवतेसमोर स्वातंत्र्याची शपथ घेतली त्याच कुलदैवतेच्या मूर्तीला त्यांच्या घरचे मंदिरात ठेऊन आले. कारण काय तर ह्या कुलदेवता ह्या उग्र असतात, व संसाराला आग लावतात. सावरकरांची कुलदेवी अष्टभुजा ही सध्या एका खंडोबा मंदिरात आहे असे ऐकण्यात आले. म्हणजे ज्या देवीने तुम्हाला परधर्म आक्रमणातून वाचवले तिला तुम्ही सोडले. असे हे आपल्या समाजातले स्थित्यंतर असते. 
३) काशीयात्रा: हिंदू समाजात काशीयात्रा जन्माचे पूर्णत्व समजली जाते. काशीयात्रा करताना धनाची व जीवाची पर्वा करायची नसते. जन्मात हि यात्रा एकदातरी करावीच हा दंडक पूर्वी होता. जसे हज यात्रा तशीच हि आपली काशी! काशीला गेल्याचे फायदे काय? फायदे काहीच नाहीत तोटेच जास्त. एकतर तिथे लुबाडतात, शिवाय गलिच्छ अनुभव! 
पण असे नाही, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजींना त्यांची वंशावळ काशीला ज्ञात झाली असे म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीला आपण कोण आहोत, आपले वंशज कोण, आपली दैवते कुठली, हि शंका असते. तर अशाप्रकारे प्रत्येक कुटुंबातील एक एक व्यक्ती पूर्वी काशीला जाऊन येत असे. आपण तिथे गेल्याची नोंद तिथले पंडे करून ठेवीत असत. नाव, आडनाव, गोत्र, दैवत, कुलदैवत, कुलधर्म कुलाचार ह्यांचे ते पुरातन डाटा सेंटर होते. आणि तिथे जाऊन यायला पाहिजे हा दंडक होता, म्हणजे आपण कोण आहोत आपले कर्म काय याची आपोआप माहिती मिळायची व्यवस्था आपल्या धर्माने करून ठेवली होती. हीच माहिती आपले पूर्वज जर साक्षर आणि जुना इतिहास जपणारे असले असते तर त्यांनी त्यांचे सगळे लिहून ठेवले असते व काशीला जायची गरजच पडली नसती. आपली आडनावे त्यांचे वर्ग, प्रवर्ग, गोत्र ह्यातही मोठे गूढ दडलेले आहे. जे ब्राम्हण आणि मराठा जातीच्या लोकांचे आहे तेच मातंग समाजाचे नाव, आडनाव आहे. त्यामुळे देवाप्रती भेदभाव नाही.
४) मंत्र-तंत्र यातील क्लिष्टता: अमुक पूजा अशीच केली पाहिजे, अमुक शांती अशीच केली पाहिजे नाहीतर फळ मिळणार नाही असा एक समज आपल्या सर्वांत पसरलेला असतो. त्यावर उत्तर म्हणून शबरीचे उदाहरण तर आहेच, एखाद्याला अमुक नक्षत्र दोष आहे, एखाद्याला साडेसाती आहे किवा गुरुबळ नाही, एखाद्याला चुकलेल्या नवसाचा त्रास होतो आहे, कुणाचे बोडण राहिले आहे. असे असंख्य प्रश्न कुंडलीच्या अभ्यासाने किवा अनुभवाने समोर येतात. तेव्हा माणूस पुरोहिताकडे धाव घेतो, आणि खिसे मोकळे करून घेऊन आणखी एक संकट ओढवून घेतो. असे करायची खरेच गरज आहे का? तुम्ही ज्यांना मानता अशी पक्की १-२ दैवते तर बहुतेकांची असतात. त्या दैवतांशी संवाद साधायचा आपण प्रयत्न करतो का? तर करीत नाही. कारण देवांना मंत्राची भाषा कळते. आपली साधी भाषा कळत नाही असा आपला समज असतो. खरेच जो परमेश्वर कर्ता- नियंता आहे त्याला फक्त एक २००० वर्षापूर्वी जन्माला आलेली संस्कृत भाषाच कळते का? मग गणपतीची आरती मराठीत का? तर असे काही नाही. भाषा हे तुमची देवाप्रती व्यक्त करायच्या श्रद्धेचे एक माध्यम आहे. भाषा कुठलीही असू शकते. मग पुढचा प्रश्न मनात उभा राहतो कि देवाला नक्की काय म्हणायचे. त्यासाठी मात्र थोडे डोके चालवणे गरजेचे आहे. शरीर बलवान करण्यासाठी व स्वतःचे रक्षण करण्यासाठी अनेक मंत्र आहेत ते मंत्र अपुरा राहिलेला नवस पूर्ण करण्यासाठी म्हणून उपयोगी आहेत का? किवा एखाद्या नक्षत्राचा दोष, साडेसाती, गुरुबळ नाही अशी स्थिती असताना एखादे भावपूर्ण भजन म्हणून उपयोग आहे का? उत्तर नाहीच-नाही असे आहे. पुढे येते मंत्राची संख्या!
म्हणजे एकीकडे लोक लाखोंचा फायदा पदरात पाडून घेऊ इच्छितात आणि त्यासाठी एखादा मंत्र सहज पुट-पुटतात. मोठा गुन्हा करून एका मंत्राने त्याला क्षमस्व मिळावे हि अपेक्षा असते. तर थोडक्यात सांगायचे हेच कि केलेल्या कर्माचे किवा अज्ञानाचे इतक्या वेळा क्षमस्व मागायला हवे कि आपण ते परत करणार नाही हे चांगले लक्षात राहिले पाहिजे म्हणून मंत्र हजारो-लाखो अशा संख्येने म्हणावे लागतात. पण असे हजारो वेळा मंत्र म्हणायचे तर ते सूत्रबद्ध व तालबद्ध असतील तरच कमीत कमी चुका करता म्हणता येऊ शकतात. १५ व्या शतकात तुकोबांनी अनेक ओव्या रचल्या त्या अशाच प्रकारे! त्यांचेच पुढे मंत्र व अभंग झाले. आपण जर साधी साधी वाक्ये अशी सूत्रबद्धपणे तयार करून हजारो नाही पण किमान शंभर वेळा म्हणून शकलो तर तो आपल्या बोली भाषेतील एक मंत्रच बनून जातो. आता साधे उदाहरण पहा गुरूच्या मंत्राचे, "देवांच्या आणि ऋषींच्या गुरु असलेल्या बृहस्पती तुझे शरीर सोन्याने झळाळलेले आहे, तुला माझा नमस्कार असो. माझ्या राशीला असलेल्या तुझ्या प्रतिकूल स्थितीपासून तू माझे रक्षण कर, असे अगदी सध्या मराठीत आपण म्हटलो तर ते गुरूला ऐकू जाणार नाही का? कि गुरूला फक्त संस्कृतच समजते?
देवाधर्माचे गूढ म्हणजे यज्ञ करणे, शांती करणे, कर्मकांड ह्यामुळे पुरोहित वर्गाला पैसा मिळू लागला पण बहुजन समाजाने ह्या कर्मकांडाचे महत्व वाढू दिलेले नाही हेही तितकेच खरे आहे व कर्मकांडाचा मार्ग समाजाने फारसा स्वीकारला नाही. पण अजूनही बहुजन समाजाच्या कुलदेव-देवीच्या मंदिरातून पुरोहित वर्ग हद्दपार होत नाही हेही विचारात घेणे महत्वाचे आहे. आपले स्वतःचे प्रबोधन जोवर आपण करून घेऊ शकत नाही तोवर हा पुरोहित वर्ग आपल्याला लुटतच राहणार व त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणार. गम्मत आहे ना.




Thursday, 7 April 2016

हस्तरेषा, ज्योतिष्य हे शास्त्र नाही का?

एखादे तत्व शास्त्रीय आहे असे आपण केव्हा म्हणतो? जेव्हा त्याची शास्त्रीय सिद्धता होते तेव्हा. जसे एखादा विषारी पदार्थ खाल्ल्यावर माणूस मरतो, किवा एखादे रक्तदाब कमी करणारे औषध खाल्ल्याने रक्तदाब खरेच  कमी होतो. तेव्हा ते औषध सिद्ध झाले असे म्हणता येते. त्याला क्लिनिकल ट्रायल असे म्हणतात. तसेच इतर शास्त्रात देखील असे सिद्ध होणे गरजेचे असते. जसे सोनोग्राफी करताना फक्त काही कंपने शरीरात सोडली जातात व परत मिळवली जातात व त्यावरून शरीरातील अवयवांचे चित्र तयार होते. शरीर कुठेही कापावे लागत नाही. एक्स-रे, दूरध्वनी इत्यादी तंत्र अशाच प्रकारे चालतात. हे वैज्ञानिक चमत्कार आहेत. ते कसे साध्य केले जातात त्याचे शास्त्र आहे. शास्त्राची सिद्धता करताना निरीक्षणे व परिणाम हे नोंदवून ठेवावे लागतात. नंतर अमुक एक शास्त्र हे सिद्ध झाले असे आपण म्हणतो तेव्हा एका ठराविक टक्क्यांपेक्षा अधिक टक्के जर परिणाम अचूक आले तर ते शास्त्र सिद्ध झाले असे म्हणतात. 
दुर्दैवाने ज्योतिष्य किवा हस्तरेषा विषयक शास्त्र ह्याबाबत असे निरीक्षण नोंदवणे किवा परिणाम ह्यांची नोंदणी झालेली नाही. साधारणतः नऊ महिन्यात मुल जन्माला येते हे आपल्याला अनुभवाने माहित आहे म्हणून त्याची नोंद कोणी ठेवत नाही तशातलाच हा प्रकार आहे. ज्योतिष्यशास्त्र, किवा हस्तरेषा ह्यांचा अभ्यास हजारो वर्षे चालत आलेला आहे. फार पूर्वी अशी निरीक्षणे नोंदवणे किवा त्यांना आव्हान देणे हा प्रकार घडलेला असू शकतो. पण नंतर एकदा का तो नियम सिद्ध झाला कि कोणी नवीन निरीक्षण करायच्या भानगडीत पडत नाही किवा आव्हानही देत नाही. चार्वाक, आयतक इत्यादींच्या काळात निरीश्वर व भोगवादी विचारसरणी वाढीस लागली त्यावेळी बहुदा ज्योतिष्य, दैव ह्यांना आव्हान दिले गेले असावे. नियती असते का? कि सगळे जीव अनियत जगत असतात असाही प्रश्न विचारला गेला असावा व आजही विचारला जातो. 
ह्या प्रश्नांची उत्तरे देणास एकही समर्थ ज्योतिषी समोर उभा राहत नाही कारण कोणीही कसलीही निरीक्षणे नोंदवून ठेवत नाही. अमुक एक ग्रह खराब आहे, गुरुबळ नाही, साडेसाती आहे, अमुक नक्षत्र शांती आहे असे साचेबद्ध उत्तर सगळे ज्योतिषी देतात. हा आपल्या भारतीय लोकांचा एक दुर्गुण म्हणावा लागेल, कारण एकतर आपण जे रोज काही करतो, अनुभवतो त्याची निरीक्षणे कुठेही नोंदवून ठेवत नाही. त्यांची तुलना/अभ्यास करत नाही. आपली निरीक्षणे एकत्रित करीत नाही. एकमेकांना वाटून त्याचे ज्ञान वाढवत नाही. असे असेल तर आपण कुठलेच नवीन शोध लावू शकत नाही. आपण फक्त पाश्चिमात्य लोकांनी शोधलेले शोध वापरतो आणि त्यांची वाहवा करत राहतो. आपण जे शोधले आहे ते विसरून जातो. 
आता गम्मत बघा, जो धडधाकट असतो तो डॉक्टरकडे कधी जात नाही. जो अशक्त, वयोवृद्ध असतो तोच जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्रात जेव्हा एखादा माणूस काही अडचणी नसतात तेव्हा तिकडे ढुंकूनही पाहत नाही पण जेव्हा प्रतिकूल ग्रहस्थिती निर्माण झाल्यावर नाही नाही ते उपाय करत फिरतो. ज्योतिष्यशास्त्रीय अभ्यासक लोकांनी असे धडधाकट आणि आजारी अश्या दोनही प्रकारच्या लोकांना कायम नजरेखाली ठेवायला हवे, आणि योग्य वेळी "अब आया उंट पहाड के नीचे" ह्या तत्वाप्रमाणे त्यांचाही अभ्यास व सर्वांगीण निरीक्षणे करायला हवीत. 
औषधे खाऊन जिवंत राहणे आणि ज्योतिष्य पाहून जीवन जगणे ह्यात फार मोठा फरक आहे. जो ज्योतिष्य बघून जीवन जगतो त्याला औषधे खायची गरज नसते. त्याचे ध्येय निश्चित असेल तर तो अधेमधे ज्योतिष्यविषयक सल्ला विचारायला येऊ शकतो. एखादा अट्टल चोर, खुनी गुंड हा कधी ज्योतिष्याला विचारून चोरी करायला जात नाही. त्याची चोरी करायची एक मानसिकता (वेड) असते. शिवाजींना स्वराज्याचे वेड होते, अनेक मोठमोठे क्रांतिकारी ह्यांना अशीच अनेक वेडे होती. त्यांनी ज्योतिष्यांना विचारून त्यांचे कर्म केले नाही, उलट नंतर ज्योतिष्यांनी त्यांचा अभ्यास करायचा प्रयत्न केलाय. सलमान खान ह्या महाभागाने आजच कोर्टात "मी फक्त पाणी पिउन गाडी चालवत होतो" असे लेखी दिले आहे, त्यावरून मी त्याची जन्मकुंडली सहज तपासली. फारच भयंकर!! एकाला खलास केले, अनेकांना जखमी केले, तरीही हा माणूस अजुनही पैश्याच्या गुर्मीत जगतोय आणि आपली सिस्टीम त्याला सहन करतीय. तो मस्त गावभर फिरतोय. कोणी त्याची कुंडली उघडली नाही. असे चोरांचे दिवस किती सहन करणार आपण? आपणच त्याला पैसे मिळवून दिले आणि तोच आपल्याला रस्त्यावर चिरडतो. थोडीही माणुसकी त्याच्यात नाही. हा जसा सलमान तसेच आपले राजकारणी लोक !!. ज्या छगन भुजबळला लोकांनी आपला आपला म्हणून मोठा केला त्यानेच जनतेचा केसाने गळा कापला. कोणीही ह्या लोकांच्या कुंडल्या का खोलत नाहीत. अरे तरुणानो पुढे या, शिका निरीक्षणे करा, ती नोंदवा. सिद्ध करा ज्योतिष्य. बरेच काम आहे इकडे. नाहीतरी तुमचे आईवडील कष्टात जगले आणि तुम्हाला शिकवत आले आहेत. तुम्ही शिकता ते परदेशी विद्या. पण त्यातून काही होत नसेल तर इकडे या आणि संशोधन करा. अवघड वेळ आली कि ज्योतिष्यासमोर हात करून बसण्यापेक्षा स्वतः शिका आणि मोठे व्हा. असे मोठे झालात तर नक्कीच तुम्ही सर्वश्रेष्ठ असाल.