फलज्योतिष्य, प्रश्नाचे उत्तर म्हणजे प्रश्नकुंडली हे अधिकाधिक गुंतागुंतीचे करून ठेवण्याचे उद्योग ९ ग्रह, १२ राशी आणि २७ नक्षत्रे ह्यांनी आधीच करून ठेवले असताना अनेक ज्योतिष्यकारांनी आपले अधिकाधिक गुंतागुंतीचे संशोधन त्यात घुसवून विषयाचा पूर्ण बट्ट्याबोळ करून ठेवलाय.
कधीही गुगल करून ह्या विषयावर माहिती काढायचा प्रयत्न करा, डोके अगदी चक्रावून जाणारे लेख, प्रत्येकाचे वेगवेगळे आडाखे मिळतात. कशाला कशाचा ताळमेळ नाही. डोके अगदी भणाणून जाते. नक्की खरे काय आणि कोणाचे हेच कळत नाही.
हे कसले शास्त्र? कोणाचे साधे सरळ नियम नाहीत, प्रत्येकाचे अनुभव तो आपले केस स्टडी म्हणून विकायचा प्रयत्न करत असतो. त्यात ९ ग्रह, १२ राशी आणि २७ नक्षत्रे हे येथेच्छ धुमाकूळ घालत असतात. त्यात एकेक योगाचे अजब गजब नाव असते, कुठे काल,नाग,सर्प, कुठे गजांतलक्ष्मी तर कुठे कर्तरी. कशाला इतका गोंधळ घालायचा? तर फक्त पोटासाठी?
स्वतःचे पोट चालविण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे की काय अशी शंका नक्कीच येते. येत्या शे-दोनशे वर्षात तर हे शास्त्र अगदी धुवून काढले गेले आहे. कसे ते पहा आता,
नोकरी की धंदा?: ह्या अवघ्या विश्वात ३ प्रकारचे काम करणारे लोक आहेत. पाहिले नोकरी करणारे, दुसरे व्यवसाय करणारे व तिसरे काहीही काम न करणारे! हे तीनच प्रकारचे लोक जगात असताना नोकरी की व्यवसाय ह्या विषयावर लाखो वेगवेगळी मते ज्योतिषी वर्तवताना दिसतात. हे कसे काय बुवा? रस्त्यावर उभा असलेला साधा भिकारी सुद्धा मोठा व्यावसायिक असतो. कुठली जागा चांगली, कुठली वेळ चांगली हे जास्तीत जास्त त्यालाच माहीत असते. अधिकाधिक भिकारीपणा दाखवायचा प्रयत्न करून तो त्याची उत्तम जाहिरात करत असतो. दुसरीकडे नोकरी करणारे कोट्याधीश सीईओ कंपन्यात असतात. व्यवसायात जास्त पैसा की नोकरीत हा दुसरा प्रश्न यामागे दडलेला असतो. म्हणून तो प्रश्न आडपडदा ठेऊन विचारायची ती एक पद्धत असते. असो तो विषय आपण इथेच सोडू.
पण एखादा माणूस व्यवसाय की नोकरी करणार हा फारच परिस्थिती सापेक्ष प्रश्न आहे. ते असे काही जन्मपत्रिका बघून ठाम सांगता येत नाही. एकेकाळी मोठा व्यावसाय करणारा कधीतरी नोकरी करायला लागतो, तर नोकरी करता करता भांडवल गोळा करून एखादा मनुष्य मोठा व्यवसाय करू लागतो. ह्यासाठी बाजारपेठ, भांडवल, जबाबदाऱ्या, मनुष्यबळ असे अनेक घटक कारणीभूत असतात ते जर प्राप्तच झाले नाहीत तर मोठा व्यावसायिक होण्याचे योग किंवा गुण असलेला माणूस आयुष्यभर नोकरी करीत बसतो किंवा याउलट होते. इथे आततायी ज्योतिषी नेहमी काहीतरी स्वतःचे नियम तयार करून ठोकून देतात आणि परत गोंधळ निर्माण होतो.
असे एक ना अनेक प्रश्न मनात येत असतात आणि उत्तरे नेहमी निराशाजनक येतात. त्यातील काही प्रश्न असे,
विवाह केव्हा होईल?
संतती योग केव्हा आहे ?
शिक्षण काय होईल?
मृत्यू केव्हा होईल? हा भयंकर प्रश्न आहे बरका !!
"क्ष" मुलगी लग्नाला होकार देईल का?
असे अनेक प्रश्न!!
एकतर माणूस भयंकर आळशी आणि हवरट प्राणी आहे. त्यातले बरेच जण काहीही कष्ट न करता सगळे मिळावे अशी अपेक्षा करणारे असतात. त्यांनी काहीच एखाद्या विषयात परिश्रम घेतलेले नसतात पण एखादा ज्योतिषी समोर दिसला की आपली पत्रिका फेकून मला सरकारी नोकरीचा किंवा कायमस्वरूपी नोकरीचा योग आहे का हा प्रश्न विचारतात. सरकारी किंवा कायमस्वरूपी नोकरी खरेतर ब्रिटिशांनी आपल्याला दिलेली एक गलिच्छ मानसिकता आहे. एकदा का सरकारी नोकरी मिळाली की आरामच आराम करायचा, भ्रष्टाचार करून पैसे कमवायचे हा एक जन्मसिद्ध हक्कच लोक समजतात. शिवाय असे करून ती नोकरी कायमस्वरूपी टिकावी हेही या लोकांना हवे असते!! ना एमपीएससी/यूपीएससी परीक्षा दिलीय, ना नोकरीचे प्रयत्न केलेत तरी नोकरी मात्र सरकारीच पाहिजे.
मग पुढे ज्योतिषी सुद्धा आळशी व हवरट असतातच. ते मनोरंजन करून त्या त्या माणसाला अगदी हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवतात आणि आपली फी घेऊन मोकळे होतात. तर हे असे अव्याहत चक्र चाललेले असते. इथे थोडक्यात इतकेच सांगतो की नोकरी ही माणसाच्या दशम स्थानावरून कळते तर व्यवसाय हा सप्तम स्थानावरून. ते कसे ते आपण इतरत्र पाहू,
तर मूळ मुद्दा पुढे असा येतो की असे भंपक प्रश्न विचारणारे लोक व त्यांना ज्योतिष्य सांगणारे ज्योतिषी हे एकमेकांचे निव्वळ मनोरंजन करीत असतात. पण ह्यामुळे ज्या व्यक्तीला खरेच गंभीर प्रश्न असतात तेही ह्या लोकांबरोबर भरडले जातात.
गंभीर प्रश्न असलेले लोक म्हणजे काय तर ज्यानी परीक्षेचा गंभीरपणे अभ्यास केलाय व त्यांना परीक्षेत यश कसे मिळेल, विवाहासाठी प्रयत्न करतोय तर विवाह कधी होईल असे अनेक प्रकारचे प्रश्न असणारे लोक होत. एखादा खूप आजारी आहे त्याचे काय होईल, किंवा काहीही गुन्हा नसतात आरोपात गुंतलेल्याची सुटका होईल की नाही असेही काही प्रश्न असतात.
अशा अडचणीच्या वेळी माणूस त्याच्या आतल्या मनातून प्रश्नाचे उत्तर विचारात असतो. ते उत्तर तो नियतीसारख्या एका अपरिचित शक्ती कडून मिळवत असतो. (ग्रह तारे नक्षत्र, परमेश्वर वगैरे जे काही असते त्याला आपण सध्या नियती म्हणूयात). तो माणूस गंभीर असेल, त्याला नक्कीच मार्गदर्शनाची गरज असेल तर नियतीही त्याला काहीतरी मार्गदर्शन करतेच.
परंतु तेच मात्र नियतीची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न करणारा असेल, तसेच नोकरीच्या प्रश्नावरून लग्नाचा प्रश्न व पुढे संतती व मृत्यू पर्यंतचे सगळेच विचारात असेल तर हाय देवा!! देवही उत्तरे न देता पळून जाईल.
जसे जगण्याचा प्रत्येक सजीवाला हक्क आहे तसेच संकटाच्या प्रसंगी नियतीला योग्य मार्गदर्शन विचारण्याचा हक्कही त्याला आहे. विशेषतः असे प्रश्न हो/नाही या स्वरूपाचे किंवा ठोक प्रश्न असतील काम फारच सोपे होते.
उदाहरणार्थ एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात चुकून अडकवली गेली आणि तिने तळमळीने प्रश्न विचारला तर उत्तर मिळते की साहेबाला खुश कर. मग सदर व्यक्ती नुसते शब्द वापरून किंवा नोटांचे वजन वापरून ते करू शकते पण त्यामुळे पुढे जेल, कोर्ट, तारखा, बेअब्रू हे सगळे सोपस्कार वाचतात.
नियतीशी संवाद: तुम्ही प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी गंभीर असाल व प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही स्वरूपात हवे असेल तर अगदी मन स्थिर करून व एखादे पैशाचे नाणे घेऊन छापा काटा करून प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता. इतके प्रश्नशास्त्र सोपे आहे. त्यासाठी आणखी एक अट महत्वाची आहे ती म्हणजे दोन्हीपैकी एक पर्यायावर अधिक जोर मनात नसावा. निरपेक्ष मानाने हे केले तर ज्या नियतीला पुढचे सगळे माहीत आहे ती नक्कीच स्पष्ट उत्तर देऊन मोकळी होते.
ह्या नियतीशी संवाद साधण्यासाठी पुढे अनेक सोप्या पद्धती निर्माण करण्यात आल्यात. पण त्यात जेव्हा प्रश्न विचारणारी व्यक्ती अधिकाधिक प्रश्न विचारू लागले तसतसे उत्तरे चुकीची मिळू लागतात. जे प्रथम उत्तर आलेले असते त्याचा व्यवस्थित अर्थ समजावून घेऊन त्याप्रमाणे कामाला लागणे हे अधिक सयुक्तिक असते. त्यावर आणखी उत्खनन करण्यात अर्थ नसतो. तसे करायचा प्रयत्न केला केल्यास परत ग्रहांचे, राशींचे आणि नक्षत्रांचे गुंते होत जातात आणि उत्तरे अधिक चुकीचीच मिळत जातात.
थोडक्यात नियतीशी संवादाचा प्रकार आपण जितका सोपा आणि सरळ व मुद्द्याला धरून करतो तितके अचूक उत्तर मिळते. हा संवाद साधण्याचे अनेक सोपे ठोकताळे, कोष्टके आहेत त्यांचा विचार आपण पुढे कधीतरी करूया.
No comments:
Post a Comment