Friday, 1 July 2016

वास्तुशास्त्राच्या गमतीजमती

स्वतःचे घर घेणे हे आयुष्यातील मोठे दिव्य असते. एकतर मोठ्या पैशाची जमवाजमव करावी लागते, ते करीत असताना रस्ते, बस-रेल्वे स्टेशन, आजुबाजीची लोकॅलिटी, शाळा, दुकाने इत्यादी सर्व जवळ असणे गरजेचे असते. 
थोडक्यात योग्य घर मिळणे हे एक अग्निदिव्यच आहे असे म्हणावे लागेल. मोठा खर्च करून व वरील व्यवहार्य बाबी तपासून सुद्धा  जर राहत्या वास्तूत काही दोष आहे म्हणून कोणी सांगितले की काळजात चर्र होते, आणि इतके कष्ट करून घेतलेले घर नकोसे वाटू लागते. 
वास्तूत दोष असणे म्हणजे नक्की काय हे आधी पाहूया,
दक्षिणमुखी वास्तू: वस्तुतः हा वास्तुदोष म्हणता येणार नाही. भारतात बहुतेक ठिकाणी पाऊस हा दक्षिण किंवा नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. वास्तुशास्त्रात दक्षिणेपेक्षा नैऋत्यदिशा अधिक दोषकारक समजली गेली आहे. पूर्वीचे वाडे किंवा घरे पहिली तर सुरक्षेच्या दृष्टीने बाहरेच्या भिंतीत दरवाजाशिवाय कुठेलच मोठे ओपनिंग दिसत नाही. घराला खिडक्या असणे ही तर दूरची गोष्ट. ह्या मागील प्रमुख कारण हेच कि पाऊस व वारा ह्यापासून घराचे रक्षण व्हावे. 
यापुढे जाऊन घरासमोर मोठी वास्तू असेल तर दक्षिणमुखी वास्तूचा दोष आपोआप दूर होतो हे ही त्याच कारणास्तव होते. कारण घरात  थेट वारा पाऊस येत नाहीत. कित्येक ठिकाणी गावातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांची किंवा घरांची पूर्ण गल्ली ही दक्षिणमुखी असते ( उदा. पुण्यातील लक्ष्मी रोड) पण समोर पूर्ण तितक्याच उंच घरांची रांग असल्याने ह्या घरांचा दक्षिणमुखी हा दोष जातो, व तेथील लोक उत्तम प्रगती करताना दिसतात. 
आधुनिक काळात घर बांधणीची उत्तम साधने उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे हा मुद्दा इतका महत्वाचा राहिलेला नाही. 
दुसरे महत्वाचे कारण असे आहे की,  गेल्या १०००० वर्षात भारतात जे लोक वसाहत करून राहिले ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. असे नवीन येणारे अतिथी/आक्रमक यांच्याकडे पाठ करून घरात राहणे हे एक असुरक्षित मानसिकता निर्माण करणारे ठरते. पूर्वी घराला दरवाजा, त्यात एक टेहळणी करण्यासाठी खिडकी ठेवलेली असे, किंवा वर गच्ची किंवा टेहळणीची तत्सम साधने घरावर असत त्यामुळे नवीन येणारे आक्रमक ह्यांच्यावर लक्ष ठेवणे सोपे जात होते. 
घराच्या दरवाजात बाहेर कोण आले आहे हे पाहण्याची सोय नसेल तर त्याला वास्तुशास्त्रात अंधक दोष असे म्हणतात. त्यादृष्टीने दक्षिणद्वार असणे हे कसे दोषदायक असते हे समजून येते. 
ज्या जागेत आपण राहतो तिथे पाणी वाहून जाण्यासाठी जमिनीला आवश्यक उतार असणे गरजेचे असते. तसेच  घराचे जोते (प्लिंथ) हे आजूबाजूच्या जमिनीपेक्षा वर असावी  अन्यथा घरात पाणी शिरू शकते. 
जमिनीखाली पाणी असणे: घर नदीच्या अगदी जवळ किंवा पूरक्षेत्रात असू नये. नदी जवळ असेल तर जिवंत झरे घराखाली असण्याची शक्यता असते. असे घर कायम पुराची भीती असलेले असते. तसेच भिंतीच्या पायाला पाणी लागल्याने पायाची व तिथे आधार देणाऱ्या मातीची शक्ती (स्ट्रेंथ) ढासळते. म्हणून जिवंत  पाण्यावर असलेले घर हे अशुभ समजले गेलेले आहे. तसेच नदीच्या जवळ बऱ्याचदा गाळ साचलेला असल्याने पाया खूप खोलवर खणावा लागतो तेही भूकंपाच्या दृष्टीने धोकादायक ठरते. 
जमिनीखाली माणूस, प्राणी ह्यांची हाडे असणे: हा संबंध पूर्वी युद्धभूमीशी लावला जात असे. तसेच पूर, भूकंप अशा नैसर्गिक कारणांनी ज्या प्रदेशाला आधी झटके दिलेले आहेत तिथे घर बंधने हे दोषकारक समजले गेले आहे. सामान्यतः युद्धे, पूर, भूकंप, अतिवृष्टी इत्यादी कारणास्तव जमिनीखाली हाडे असण्याची शक्यता जास्त असते म्हणून हा दोष मान्यता पावला असे म्हणता येईल. 
तर अशा प्रकारे जे महत्वाचे वास्तुदोष आहेत त्यांचे तत्कालीन जीवनाशी असलेले तारतम्य आपण विचारात घेतले. याशिवाय अनेक वास्तुदोष सांगितले जातात पण त्यात फारसे काही तथ्य आढळत नाही. असे वास्तुदोष सांगून त्यावर उपाय करायला लावणे म्हणजे एक मानसिक कमकुवतपणा हेरून लुटण्याचाच प्रकार आहे.







 

No comments:

Post a Comment