Wednesday, 4 January 2017

फलज्योतिष्य- बे दुणे चार नव्हे पाच !

मी हस्तरेषेवर काही लेख लिहिले, हस्तरेषेचे अनेक जिज्ञासू मला संपर्क करीत असतात, पण लोकांना हस्तरेषेबद्दल तितकासा विश्वास निर्माण झालेला नाही हा माझा खास अनुभव आहे. म्हणून मी आता हस्तरेषेवरून परत कुंडली ज्योतिष्याकडे उडी मारत आहे. काय करणार कोणी जातकच भेटला नाही तर उद्या कुणाच्या हस्तरेशांचा अभ्यास करणार? 

हस्तरेषा लोकांना न आवडण्याची काही गमतीशीर कारणे आहेत. 

गणिताचा बागुलबुवा: कुंडलीशास्त्रात अंकांची आकडेमोड १२ राशी, ९ ग्रह व त्यांचे अचूक अंश म्हणजे हे शास्त्र गणितावर आधारित आहे असा एक सर्वसामान्य लोकांचा समज असतो. त्यामुळे येणारे उत्तर अगदी अणे-पैत अचूक असणार असे सगळ्यांना वाटते. पण तसे काही नसते. इथे एक गणित व एक फॉर्म्युला असा नसतो कि त्यात आकडे टाकले कि धपकन उत्तर खाली पडते. इथे अनेक गणिते तर असतातच पण सगळ्यात जास्त असते ते तर्कशास्त्र, संबंधित प्रकारचे प्रश्न असेलेल्या कुंडल्यांचा अभ्यास व तत्सम अनेक बाबी. फलज्योतिष्य म्हणजेच भविष्यकथन ते कशाच्या आधारे केले जाते हेच कित्येकांना माहित नसते तिथे कसले आकडे टाकता आणि कसली उत्तरे शोधता? थोडक्यात गणिताच्या अवाजवी आकर्षणापाई माणूस (बाईमाणूस - स्त्री पुरुष समानतेचे युग आहे ब्वा म्हून) एखाद्या भविष्यकाराच्या हाती आपली कुंडली देतो आणि स्वतःची फसवणूक करवून घेतो. असो. तर पुढे आपण फलज्योतिष्य आणि भविष्यकथन याचे काही साधे सरळ ठोकताळे समजावून घेऊ. 

मात्र ह्या ठोकताळे उर्फ गणिताच्या फॉर्म्युलाचा मालक मी (आणि एकटा मीच) आहे हे विसरू नका. 

हाताचा आकार: आपल्या हाताचा आकार इतका लहान असतो कि त्यात इतके सगळे भविष्य कसे काय लिहिले असेल ब्वा? अशी एक शंका काढून बरेच लोक हाताचा नाद सोडून देतात.  तसेच बहुतेक सर्व बाया-माणसांचे हात म्हणजे काही मुख्य रेषा, बोटे इत्यादी सारखेच असतात मग प्रत्येकाचे इतके वेगवेगळे भविष्य कसे काय ब्वा.. ? त्यात काही लोकांचे (स्वतःचाच) हात बघून डोके गरगरायला लागते, कारण त्यांना ह्या विषयाची काहीच माहिती नसते पण काहीतरी चुकीचे तर्कट करून ते स्वतःला आणि आपल्या मेंदूला त्रास देत असतात. 

आजकल लाईफ फास्ट हो गया है. प्रकरण घाईला आलेले असले कि जसे इमर्जन्सीला जाते तसे घाईची प्रकरणे नेमकी कुठल्या तरी कुडमुड्या बाबाकडे जाऊन पडतात आणि मग आणखी गम्मत जम्मत सुरु होते. त्यात पंचांगावरून जन्मकुंडली मांडणारे, टीव्हीवर भल्या सकाळी फुकट १२ राशींचे भविष्य सांगणारे हे असतातच. ते सावज हेरून जवळ आणत असतात. 

तर सांगायचा मुद्दा हाच आहे कि लोकांमध्ये काही अशी विचारसरणी पसरली आहे कि ज्यामुळे लोक आपोआप फसतात. आयते गिऱ्हाईक बनतात. फलज्योतिष्यात दरवेळी बे दुणे चारच असते असे नाही तर ते कधी-कधी तीन, पाच दहा काहीही असू शकते. कसे ते पुढच्या लेखात सोप्पे करून देत आहे.





 
 

No comments:

Post a Comment