Saturday, 7 January 2017

फलज्योतिष्य: गणिताचा फॉर्म्युला नं. १

नमनाला घडाभर तेल घालवण्यापेक्षा सरळ विषयालाच हात घालतो.
घटना घडण्याची कारणे: यासाठी अनेक पत्रिका पाहाव्या लागतात व त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. आपली स्वतःची जन्म तारीख वेळ पक्की माहित असेल तर हे स्वतःबद्दल करणे अधिक अचूक सिद्ध होते. मी पत्रिकांचा असा अभ्यास आधी वीर सावरकर व नरेंद्र मोदी ह्यांचा  करायचा प्रयत्न केला पण सगळे उलटसुलट चित्र दिसायला लागले. वीर सावरकर ह्यांची जन्मतारीख बरोबर आहे असे वाटते पण वेळ नक्कीच चुकीची आहे असे मला ठाम वाटते त्यामुळे सगळा कालनिर्णय (भूततकाळातील भविष्यकथन) चुकीचे ठरते. मोदींच्या तर दोन-दोन जन्मतारखा मिळतात त्यामुळे तोही नाद सोडून मी दिला. वीर सावरकरांची पत्रिका खाली दिलेली आहे. एका विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे म्हणून पत्रिकेची निवड केलेली नाही तर व्यक्तीच्या जीवनातील झंझावाती घटना असलेली व्यक्ती अभ्यासायला घेतली. मी विशिष्ट जात धर्म तसले उद्योग करीत नाही. माणूस बघतो त्याची पत्रिका बघतो. असो. 
पहिला  गणितीय नियम असा कि एखाद्या व्यक्तीचे जीवनमान हे ग्रहांच्या दशा, अंतर्दशा  यावर अवलंबुन असते. एखाद्याचे जीवनमान (उदा. शेतकरी) खडतर असेल तर ते साधारणतः ७ ते २० वर्ष इतक्या मोठ्या काळासाठी खडतरच राहते. एखादी अंतर्दशेची झुळूक मध्ये येऊन जाते तेव्हा पाऊस चांगला होतो. घरात चांगले कार्य होते इत्यादी इत्यादी.  दशा बदलली कि मोठे धारण होते पाण्याचा प्रश्न सुटून तो शेतकरी मालदार होतो. नोकरीला असलेला माणूस नोकरीच करत असतो, महादशा बदलली कि मगच व्यवसाय करायची संधी येते. शहरात राहणार शहरातच राहतो. परदेशात राहणार परदेशात राहतो. सुखवस्तू असनारा सुखवस्तूच राहतो. हे सगळे दशेप्रमाणे ठरते.

सावरकरांनां काळ्या पाण्याची शिक्षा हि १९१० ते १९२१ ह्या काळात झाली. तो काळ त्यांची जन्मतारीख-वेळ २१.५. १८८३ -२१.२५ (नासिक) गृहीत धरून बघितली असता गुरुदशेचा काळ येतो. गुरु सप्तम ह्या पत्नीच्या स्थानात आहे. गुरूसारखा महान लोभस व परोपकारी ग्रह आणि फळ काय देतोय तर काळ्या पाण्याची शिक्षा! अशक्य आहे. अशाने येड्यात काढतील मला सगळे. आता थोडा युक्तिवाद करू. काळ्या पाण्याची शिक्षा कशासाठी मिळाली तर स्वातंत्र्य ह्या मागणीसाठी. आमच्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर आहेत. कारण स्वातंत्र्य म्हणजे काय ह्याची व्याख्या त्यांनीच केली. बीज त्यांनींच रोवले. आज त्याचा वटवृक्ष झाला. पण आले का कोण त्यांच्याबरोबर शिक्षा भोगायला, कि शिक्षेला विरोध करायला. शेवटी त्यांनी जे केले तो प्रवाहाविरुद्ध पोहायचाच प्रयत्न होता. त्रास हा होणारच होता. पण त्यावेळी मात्र कुणाला त्यांच्या गुरुदशेचे काही पडले नव्हते. कोणी पुढे आले नाही. भित्रे लोक्स. आणि फळ म्हणजे हालअपेष्टा आणि तुरुंगवास ! म्हणून मला हि सावरकरांची जन्मवेळ अजिबात पटली नाही. 

आता काही ज्योतिषी असा युक्तिवाद करतात कि भविष्य हे आजूबाजूचे स्थळ-काळ-देश-सत्ता बघून करायचे असते. म्हणजे ब्रिटिशांची सत्ता होती म्हणून ते जरी चांगले काम करीत होते  तरी ब्रिटिशांच्या दृष्टीने ते वाईट होते म्हणून त्यांना वाईट फळे मिळाली. हि म्हणजे ओढूनताणून भविष्य घडवून आणायची हाईट झाली. हे असले नाय  पटत आपल्याला. छोड दो. काढिव भविष्य आपल्याला नकोच. 
तर आपण पुढे जाऊ. महापुरुषांचा नाद नाय करायचा. तोंडावर पडायचे नाही ना आपल्याला. आपली आपल्या आजुबाजीची साधी माणसेच बरी. 

आता हि सध्या माणसाची (बाईही असू शकते) पत्रिका बघा. 

वरील चित्रात ह्या व्यक्तीची राहू महादशा चालू आहे. राहू हा चतुर्थ स्थानाचा स्वामी (ज्यात हृदय, आई, स्थावर, राहते घर, मित्र ह्यांचा समावेश होतो) हा अष्टम ह्या पीडास्थानात आहे. बऱ्याच महाशयांना राहू कुठल्या राशीचा स्वामी हेही माहित नसते.असो. राहू हा कन्या (६) ह्या राशीचा स्वामी आहे. आता ह्या महादशेची दशेची फळे काय मिळाली ते बघा. ह्या व्यक्तीने २००१ ला नुकताच एक प्लॉट घेतला होता पण तो अजिबात डेव्हलप झालेला नव्हता. तरीही त्याने तिथे बांधकाम केले. त्याला घरातून विरोध झाला आईवडील वेगळे झाले. नंतर नोकरीत बदल्यांचे सत्र सुरु झाले,  त्यामुळे वास्तुसुख असे मिळालेच नाही. दरवेळी बिर्हाड पाठीवर घेऊनच फिरत राहिला. मित्र राहिले नाहीत. आणि विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी रक्तदाब सुरु झाला. तर असा हा मुख्य दशेचा परिणाम. तो आजतागायत चालू आहे. आता ह्या मुख्य दशेच्या अंतर्दशेत काय झाले ते पाहू. त्यासाठी खालील चित्र पहा. 
१.४.२००१ ते १२.१२.२००३ ह्या राहू महादाशेच्या व त्या अंतर्गत राहू अंतर्दशेच्या काळातच आई वडील वेगळे झाले. मोडकेतोडके घर झाले. रक्तदाब सुरु झाला. महादशेत त्याच ग्रहाची अंतर्दशा त्या त्या ग्रहाची तीव्र फळे देतो त्याचे हे उदाहरण. मग १२.१२.२००३ ते ७.५.२००६ हा गुरु ह्या लोभस ग्रहाची दशा सुरु झाली. गुरु सप्तम स्थानात स्वगृह सप्तमेश आणि दशमेश आहे. गुरु पुरुष ग्रह आहे. गुरूच्या अंतर्दशेत आल्या-आल्या जाने २००४ ला पुत्रसंततीचा लाभ झाला. मग पुढे पगार तिप्पट वाढून बदली झाली. हि झाली गुरूच्या वाऱ्याची झुळूक ! सगळे कसे गारगार झाले. २०१६ पर्यंत उत्पन्न वाढत गेले. पण बदल्या होत राहिल्या राहू प्रभाव होताच. रक्तदाब होताच आईवडीलही दूरच होते. 

हे सगळे ग्रहदशेप्रमाणे होत असताना काही गोचर ग्रह कार्यरत असतात, त्यांचे उद्योग जाणून घेणेही मनोरंजक असते. इंधन व ऑक्सिजन हे असले तरी आग पेटायला ठिणगीची गरज असते, गोचर ग्रह हे ठिणगीचे काम करतात. कसे ते पाहू. 
ठिणगीचे काम करणारा वरील व्यक्तीच्या कुंडलीत प्रभावी ग्रह आहे तो रवी. तो लाभस्थानात उच्चीचा आहे. (तो परम उच्च नाही हे दुर्दैव-नाहीतर वेगळेच चित्र असले असते). वरील व्यक्तीच्या चंद्रराशीप्रमाणे दरवर्षी रवी हा फेब्रु ते मार्च ह्या काळात ३ ऱ्या स्थानात येतो. ३ रा रवी लग्नकुंडलीच्या ६ व्या स्थानात असतो. दोन्ही स्थाने रवीला अनुकूल असल्याने ह्याच काळात हा व्यक्तीला बदली व पगारवाढीचा नोकरी मिळत आलेली आहे. हीच ती ठिणगी !
पुढे ह्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत व्ययस्थानात वृषभ राशीचा शनी आहे. तो शुक्राच्या वृषभ राशीला आहे. शुक्र आणि शनी हे मित्र असल्याने हा शनी व्ययस्थानातील चांगली फळे देतो. 
नेमका नोव्हे २०११ ते मे २०१३ ह्या काळात शनी तुळ ह्या त्याच्या उच्च राशीला होता. मूळ पत्रिकेत शनी वृषभेला आणि त्याचे तुळेतून भ्रमण चाललेल. म्हणजे व्ययाच्या व्ययातून भ्रमण चाललेले. व्यय स्थान हे खर्च व बचतीशी संबंधित आहे. ह्या काळात सदर व्यक्तीचे मोठी पगारवाढ मिळवून चांगली बचत करून ठेवली. तेही परदेशात. कारण व्ययस्थान हे परदेशाशी निगडित आहे.
तर गणिताचा फॉर्मुला लक्षात आला असेलच. आधी ग्रहदशेचे इंधन आणि ऑक्सिजन हे उपलब्ध असावे लागतात. त्यात गोचरीच्या ग्रहाची एक ठिणगी आवश्यक असते. ती पडली कि घटना घडून येतात. असे आपण ताळे-पडताळे घेत गेलो कि ग्रहांचे उद्योग काय ते समजून येते. 
इथे रवीचे त्रितिय स्थान, शनीचे व्ययाचे व्ययस्थान हे जरा अवघड शब्द आहेत. सामान्य अभ्यासकांना ते डोक्यावरून जात असतील. रवीचे लाभच (११) का नाही? ९ १० हि स्थाने सुद्धा रवीला अनुकूल असतात. शनीचे १२ स्थान का, १२ चे १२ वे का? तर हे केस स्टडीवर व गेलेल्या काळाचे सिंहावलोकन केल्यावर कळणारे सिक्रेट आहे. ते शोधावं लागत. 
पुढे आणखी २-४ केस स्टडी आपण बघूया. तिथे वेगळेच काहीतरी घडले आहे ते कसे व कुठल्या ग्रहांमुळे ते थोड्याच वेळात...










No comments:

Post a Comment