बलात्कार विनयभंग व स्त्रियांची प्रतारणा हा विषय ऐरणीवरचा आहे, पण इथे मला काहीतरी वेगळे सांगायचे आहे.
अनेक नेते, तज्ञ यांनी मजेशीर निष्कर्ष काढलेत पण सुसंगत आणि मनाला पटणारे काहीच हाती लागत नाही.
- मुली तोडके कपडे घालतात म्हणून अशा दुर्घटना होतात.
- मुली रात्री अपरात्री फिरतात, पार्ट्या करतात म्हणून!!
कायच्या काय तर्कट लावले जातात. अशी विधाने करणारे लोक इतका झापडबंद विचार करतात कि त्यांना आपला देश, संस्कृती, इतिहास, भूगोल काहीच माहित नाही कि काय अशी शंका येते. ह्या महाभागांच्या डोळ्यावर झापड कोण लावते ते आपण इतरत्र बघू.
आपल्या समाजातील मोठा भाग हा कित्येक वर्षे शेतात माळरानात निवारा करून राहत होता. त्यामुळे ७ च्या आत घरातला काहीच अर्थ नाही हेही मठात राहणारे गुरुजी विसरतात. असो तर आपण ह्या सगळ्या प्रकरणाचा वेगळ्या अंगाने विचार करू.
१) आनुवंशिक जडणघडणीत घडलेले स्त्री-पुरुष: प्राणी किंवा मानव वंश पुढे चालू राहण्यात पुरुषाचा (नराचा) वाटा क्षणिक आहे. स्त्रीला मात्र फार संयमाने मुलांना जन्म द्यावा लागतो व एका ठराविक वयापर्यंत मोठे करावे लागते. त्यामुळेच नर हा आधीपासून आक्रमक राहिला आहे व स्त्री ही आक्रमक बनायचे टाळते. त्यातही माणूस व इतर प्राण्यात एक भेद आहे. तो महत्वाचा आहे. मानव बुद्धिवान असल्याने त्याने टोळ्या सर्वात प्रथम बनवल्या. फार कमी प्राण्यात टोळ्या आढळून येतात. मानवाशी बुद्धिमत्तेने अधिक जवळचा प्राणी म्हणजे माकड हा काही प्रमाणात टोळ्या बनवतो. इतर प्राणी त्यात विशेषतः नर हे एकटेच राहतात.
ह्या टोळ्यांचा आनुवंशिक जडघडणीवर बराच प्रभाव पडतो. एकटे फिरणारे नर एखाद्या संघर्षात कामी येतात आणि दुसरा नर राजा बनतो. पण टोळीजीवनात असे होत नाही. एक टोळी हि अनेक नरांची बनलेली असल्यामुळे एक नर मेला तरी टोळी संपत नाही.
ह्या सगळ्या प्रकरणामुळे स्त्री (मादी) समोरील अस्थिरता आणि धोका यात दोन परिस्थितीत तफावत निर्माण होते. एकच नर असेल तर मादी त्याचा अनुनय करून आपली पिल्ले मोठी करू शकते. तिला घाबरायचे काही कारण नसते. पण टोळीजीवनात जी टोळी अधिक बलवान तिचा दबाव कायम राहतो. अशा टोळीच्या शक्तीचे विस्फोट होत राहतात तसेच शक्ती कमी अधिक होत राहते व त्यामुळे स्त्री (मादी) कायम अस्थिर व दबावाच्या स्तिथीत राहते. नंतर मग ती तिची सवयच बनून जाते. एखादी टोळी अधिक बलवान होण्याची काही भौगोलिक कारणे आहेत. नदीच्या जवळच्या प्रदेशात सुपीक जागी टोळ्या ह्या निरंतर मूळ धरून जिवंत राहतात. भले त्यांची शक्ती कमी-अधिक होत राहते.
पुरुष (नर) हा आपले प्रजननाचे कार्य संपले कि स्वतःचा घात करून घ्यायला मागेपुढे पाहत नाही. कित्येक शेतकरी आत्महत्या करतात. लोक व्यसने करतात व स्वतःचा अंत करून घेतात पण अशा स्थितीत स्त्री मात्र असे आततायी पाऊल उचलताना दिसत नाही. ह्याला स्त्रीचा उत्क्रांतीतील रोल कारणीभूत आहे.
जितके अस्थिर समाजिक व राजकीय जीवन तितक्या स्त्रिया जास्त सोशिक!! आपला सामाजिक व राजकीय इतिहास बघितला तर एक सुपीक व उत्तम हवामान असलेला प्रदेश असल्याने इथे लोक पूर्वीपासून येत गेले हे सत्य आहे. वेगवेगळी आक्रमणे हि टोळीयुद्धाचाच भाग होता. टोळी एका विशिष्ट गरजेपायी ( अन्न, स्त्रिया, सुपीक जमीन) ह्यासाठी आक्रमण करीत होत्या. ज्याला आपण या देशाचा इतिहास म्हणतो तो म्हणजे टोळीयुद्धेच होती. युरोप अमेरिकेत माणूस फार उशिरा पोचला. तिथे अशी राजकीय आणि सामाजिक उलथापालथ होत नव्हती. सगळे कसे संथ-संथ चालले होते. ह्या कारणास्तव आपल्याकडे विशेषतः स्त्रिया ह्या वयक्तिक स्वातंत्र्य इत्यादी संकल्पनेपासून दूरच राहिल्या तर तिकडे स्त्रिया स्वातंत्र्य इत्यादींबद्दल अधिक सजग उत्क्रांत झाल्या.
तर थोडक्यात काय कि आपल्या उपखंडातील स्त्रिया ह्या सोशिक व सहनशील आहेत आणि उत्क्रांतीनेच त्यांना असे बनवले. हेच मुळात सगळ्यात महत्वाचे कारण सगळे अत्याचार सहन करण्यात आहे.
पण आता पूर्वीसारखी मध्ययुगीन स्थिती नाही. मग तरीही स्त्रियांची मानसिकता का बदलत नाही? वरवर दिसायला जरी सगळे गार-गार समता, स्वातंत्र्य सामान संधी, सुरक्षितता असे दिसत असले तरी ते समाजाच्या सर्व थरात पोचेल आहे का? स्त्रीच्या मनातील भीती घालवण्यात आपण यशस्वी झालो का? तर उत्तर नाही हेच आहे.
समजा दोन शेजाऱ्याच्यात (पुरुष) हाडवैर आहे, त्याची "क्ष" काही कारणे आहेत. तरीही त्यांच्या घरातील स्त्रिया एकमेकींशी गोडीने राहायचा प्रयत्न करतात. कारण संघर्ष टाळणे स्त्रीला मिळालेली आनुवंशिक देण आहे.
तसेच बरेचदा घरातील आईवडील मुलींना सल्ला देताना सबुरीचा देत असतात. शाळा कॉलेजात एखादा मुलगा मुलीच्या मागे लागला असेल किंवा त्रास देत असेल तर मुलीला आपण दुर्लक्ष करायला सांगतो. आपण आपल्या असंख्य व्यापात अडकलेले असतो. ह्या व्यापांमुळे आपली आक्रमकता संपलेली असते. त्यामुळे त्या मुलाला समज देण्याच्या प्रयत्नात आणखी एक व्याप वाढवून ठेवायची आपली तयारी नसते. अशा वृत्तीचा आपल्या मुलीच्या मनावर दूरगामी परिणाम होत असतो.
अर्थात इथे शाळा-कॉलेजात मुला-मुलींनी एकमेकांशी अजिबात बोलू नये किंवा कसलाच संपर्क ठेऊ नये अशा कट्टर विचारांचा सल्ला मी कधीच देणार नाही.
मुला-मुलींचे मनमोकळे बोलणे व विचारांची देवाण-घेवाण व्हायलाच हवी. मुलीलाही मुलाचे चांगले गुण समजून घेण्याचा हक्क आहेच. पण त्यात थिल्लरपणा, कुत्सित चेष्टा करणारी मुले आणि मुलीही असतातच. त्यांना मात्र नो-एंट्री असली पाहिजे.
सध्या आपण मोठ्या सामाजिक व राजकीय बदलातून जात आहोत. ज्या ऐतिहासिक काळात आपण उत्क्रांत झालो त्याच्या खुणा अजूनही आपल्यात घट्ट रुजलेल्या आहेत. काही पुरुष अजूनही टोळीजीवनातील माकडे बनून वागत आहेत आणि स्त्रिया संयमी बनून सहन करीत आहेत.
जे राजकीय नेते, धर्मपंडित "मुली तोडके कपडे घालतात म्हणून अशा दुर्घटना होतात"
"रात्री अपरात्री फिरतात, पार्ट्या करतात म्हणून....."
असे प्रतिवाद करतात तेच ह्या राजकीय किंवा धार्मिक टोळ्या चालवत असतात. कुठला तरी नेता-साहेब ह्यांचा वरद हस्त आपल्या डोक्यावर आहे असे उगाचच वाटून अशा घटना करणारे करतात. न्यायव्यवस्था पुरावा मागते तो नेमका शोधून न्यायालयात जायला अनेक अडसर आहेत. एकतर पुरावा म्हणजे पंचनामा, जबाब यापलीकडे काही असते हेही आपल्याला माहित नाही व कधीकधी आपली व्यवस्था मुद्दाम माहित करून घेत नाही कारण मग तोडपाणी होत नाही.
शेवटी काय टोळीजीवन अजून संपलेले नाही!!
पुढे सांगायचे राहिलेच कि न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी स्त्री असो कि पुरुष अंगभूत आक्रमकता निर्माण होण्यास काही ग्रह कारणीभूत असतात, ते सर्वांच्या अंगी येवोत आणि थिजलेले टोळीजीवनातील संस्कार गळून पडोत.
No comments:
Post a Comment