Saturday, 20 February 2016

जोगत्या-जोगतीण, वाघ्या-मुरळी

जोगत्या-जोगतीण, वाघ्या-मुरळी  ह्यांचे सामाजिक स्थान हा विषय तसा किचकट आहे, बहुजन समाजाच्या नाजूक भावना इथे गुंतलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रथा चाललेल्या आहेत त्या आपला समाज एका भीतीपोटी सोडायला तयार नसतो. देवाचा किवा देवीचा कोप होईल अशी भावना यामागे असते. तर हे नक्की काय समाजशास्त्र आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. ह्या प्रथांमागील समज गैरसमज ह्यांचा अभ्यास करणार आहोत. 
प्रामुख्याने तीन प्रकारचे पंथ आपल्या महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आढळतात.

१) वाघ्या-मुरळी:
२) तुळजापूरच्या भवानी देवीची माळ परडी असणारे; व जोगवा मागणारे:
३) यल्लमा देवीचे भक्त आराधी (जोगता, जोगतीण) जोगवा मागणारे:

१) वाघ्या-मुरळी: हे खंडोबा देवाचे भक्त होत. पूर्वी बरेच प्रयत्न करून ज्यांना संतान सुख मिळत नाही असे लोक खंडोबाला नवस बोलत आणि नवसाच्या पूर्ततेसाठी होणारे पहिले मुल, वाघ्या किवा मुरळी हे देवाला अर्पण करीत. देवाची कृपाच म्हणा कि ह्या मार्गाने अनेकांना मुले झालेली आहेत आणि ही प्रथा टिकून आहे. ह्या वाघ्या-मुरळीने आयुष्यभर ब्रम्हचारी राहून देवाची सेवा करणे अपेक्षित होते. देवाची स्तुतीपर गाणी गाऊन, तसेच जागरण गोंधळाचे कार्यक्रम करून आपला चरितार्थ चालवले आणि देवाच्या कार्याचा इतिहास लोकगीतांच्या माध्यमातून प्रवाहित ठेवणे असे दोन उद्देश ह्यामागे आहेत. 
खंडोबा जरी लगेच प्रसन्न होणारा देव असला तरी त्याचे नवस फार कडक आहेत, त्याचे प्रकार म्हणजे पायी वारी करणे (दर सोमवती अमावस्या, खंडोबाचे घट यांच्यावेळी आपल्या घरापासून पायी खंडोबाला जाणे), पाठीला लंगर (एक हुक) अडकवून देवाची प्रदक्षिणा करणे, अगीवरून चालणे, किवा वाघ्या-मुरळी सोडणे असे नवसाचे प्रकार आहेत. आत्ताच्या वैज्ञानिक युगात हे प्रकार अतिशय भयानक वाटतात पण आपल्या पूर्वजांना हे करण्याशिवाय पर्याय नव्हते हेही तितकेच खरे आहे. सर्वात जास्त सामाजिक परिणाम वाघ्या-मुरळी प्रथेचे आहेत. बळजबरीने ब्रम्हचारी व्हायला लागल्याने वाघ्याच्या जीवनातील अर्थ नष्ट झाल्यासारखा वाटतो, तर अविवाहित राहिलेली मुरळी म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असा एक समज एकेकाळी झालेला होता. त्यात दोन्ही बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे. एकतर एकटी स्त्री म्हणजे आपली भोगवस्तू अशी समाजातील सबळ घटकांची प्रवृत्ती असते. तसेच स्त्रीलाही काही शारीरिक गरजा असतात हा दुसरा भाग. 
त्यातील पहिला भाग जो आहे तो आपणच सामाजिक प्रबोधनाने टाळू शकतो. आधी आपण हे समजून घ्यायला हवे कि ती स्त्री एक स्वतंत्र नागरिक आहे, ती एकटी आहे आणि आपण आर्थिक, सामाजिक दृष्ट्या बलवान आहोत म्हणून तिला उपभोगुन सोडून देणे कितपत योग्य आहे. 
दुसरे असे कि वाघ्याचा घरवाघ्या नावाचा प्रकार असतो, तो घरात राहून संसारी जीवन जगतो, विवाह करू शकतो पण एकदा वारीस जाणे देवाची स्तुती करणे ही कामे करणे गरजेचे असते. तसेच मुरळीला का असू नये?
मुळात वाघ्या-मुरळी ह्यांचा उद्देश देवाची स्तुती करण्यासाठी आहे हे समजून घेतले तर पुढचे प्रश्न आपोआपच सुटतात. मुरळीही घरात राहून देवाची सेवा करू शकते. स्तुती गाऊ शकते. एका पुरुषास किवा स्त्रीस आपल्या देवाचा कोप न ओढवून घेता, सामाजिक अवहेलानेच्या दरीत लोटण्यापेक्षा हा मार्ग योग्य आणि समर्पक आहे. 
२) तुळजापूरच्या भवानी देवीची माळ परडी असणारे; व जोगवा मागणारे: बर्याच घरात वंशपरंपरेने माळ परडी, पोत इत्यादी चालत आलेले असते. ते टाकून कसे द्यायचे असा प्रश्न पुढे उभा राहतो. तसेच घरात माळ परडी असणे म्हणजे ते कडक नियम पाळायचे हे आलेच. 
छत्रपति शिवाजी महाराज हे कुलदैवत तुळजाभवानीचे परम भक्त होते. ते स्वतः गळ्यात कवड्यांची माळ घालून हातात परडी घेऊन देवीचा जोगवा मागत असत असे सांगितले जाते. जोगवा शब्द हा जोग-योग म्हणजेच योगी (वैराग्य) ह्या शब्दावरून साधला आहे. वैराग्याशिवाय योग साधणे अवघड आहे. योगी जे मागतो तो योगवा अर्थात जोगवा. ह्यामागे शिवाजींच्या व्यक्तिमत्वाची दोन वैशिष्ठ्ये स्पष्ट होतात.
१) संसारी जीवनात राहूनही ते योगीत्वात (वैराग्य) गेले होते.
२) जोगवा अर्थात भिक्षा मागणे ह्यामागे स्वतःला गर्व न होऊ देणे हा उद्देश आहे. 
तर सांगायचा उद्देश हाच कि तुळजाभवानी देवीचा जोगवा मागणे म्हणजे लाजिरवाणे असे काही नाही. त्यासाठी अराधीच असायला हवे असेही काही नाही. जोगवा मागणारे सगळेच भिकारी आहेत असा दृष्टीकोन ठेवणे हेही चुकीचे आहे. माळ परडी असणारे लाखो भक्त तुळजापूरला आढळतात, ते त्यांचे संसारी जीवन व्यवस्थित जगतात. नियम पाळायचे म्हणाल तर थोडा संयम व हट्टीपणा सोडला तर सगळे सुरळीत होते. 
पुढे बर्याचदा ज्यांच्या घरात माळ परडी आहे त्यांचा अंगात येते असाही समज आहे. हे थोडेफार खरे आहे असे म्हणावे लागेल. माझा असा अनुभव आहे कि माळ परडी असलेल्या घरात एक किवा अधिक संततीला मंगळ असतो, डोके तापट असते. संसारात अडचणी उत्पन्न होतात. पटत नाही. अशावेळी एक साधा उपाय करावा. आपल्याला अंगात आल्यासारखे वाटत असेल तर तुळजापूर देवीच्या मंदिरात जाऊन सरळ देवीला निवेदन करावे कि मला प्रापंचिक कारणांमुळे हे देवी तुझा हा संचार करवून घेणे सध्या शक्य नाही तेव्हा मला क्षमा कर. मी तुझी नित्यनेमाने सेवा करील. विशेष म्हणजे हे मला एका जेष्ठ पुजार्याच्या ८१ वर्षीय आईने सांगितले आणि हा खरेच परिणामकारक उपाय आहे.  
३) यल्लमा देवीचे भक्त आराधी (जोगता, जोगतीण) जोगवा मागणारे: इथे मात्र गंभीर प्रश्न आहेत, स्त्रीची जट (म्हणजे केसांचा गुंता) झाला कि तिला जोगतीण म्हणून सोडून द्यायचे, तसेच लैंगिकदृष्ट्या असमर्थ, लघवीतून रक्त जाणे इत्यादी कारणास्तव पुरुषास सोडून द्यायचे अशी ही प्रथा आहे.नवसाचा हि प्रकार इथे असतोच. आत्ता झालेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या काळात वरील कारणे उपाय करून दूर करता येतात. पण आपल्या समाजात अजून दूर खेड्यात प्रगती पोचलेली नाही. गरिबीमुळे मुले सोडून देणार लोकही आहेत. तर असो. 
मूळ उद्देश इथेही देवीचे भक्त बनून तिची स्तुती करणे हेच आहे. एखाद्या जोगत्याचा अनैसर्गिक लैंगिक छळ करणे हे चुकीचे आहे. आपल्या धर्माला समलिंगी संबंध मान्य नाहीत म्हणून आपण हिरहिरीने सांगतो पण आपल्याच समाजात ह्या आराधी लोकांबरोबर बीभत्स वागणारे लोक आहेत त्यावर आपण मुग गिळून गप्प बसतो हे चुकीचेच आहे. तसेच जोगतीण हिलाही देवीची सेवा करत असताना संसारी जीवन जगण्यात काहीच गैर नाही. कारण तसेही तिचा उपभोग समाज घेतो तो स्वार्थी उद्देशाने घेत असतो. तिथे जी शरीर क्रिया होणार आहे तीच संसारी जीवनात तिची नवऱ्याबरोबर होणार आहे. तसेच असा विचार करा की योगायोगाने समजा मोकळ्या समाजात फक्त एकच पुरुष तिला भेटला आणि त्याच्याबरोबरच संभोगाची क्रिया घडली तर ती वाईट का? आणि अनेकांबरोबर घडली तर चांगली? म्हणून जोगतीनीने संसारच करू नये हे म्हणणे चुकीचेच आहे.
एखादा आराधी ज्या हिडीसपणे वागत असतो त्याला समाजाने दिलेल्या अवहेलनेचे कारण आहे हे आपण समजून घेतले पाहिजे, तोही एक माणूस आहे त्यालाही जगण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा आवश्यक आहे हे समजून घेतले पाहिजे. शारीरिक सुख हे थोडा काळ अस्तित्वात असते नंतर सामाजिक प्रतिष्ठा गरजेची असते हे मुले मोठी करताना आपल्यासारख्या संसारी स्त्री- पुरुषांना वयाच्या चाळीशीत समजते.  

शेवटी सगळे प्रश्न पोटाकडे येउन थांबतात, एकेकाळी पोट भरण्याची साधने तुटपुंजी असताना व जन्माधारित व्यवसाय असताना वरील पंथ हे पोट भरून उपजीविका करण्यास बनवले गेले असे म्हटले तर वावगे ठरू नये. नंतर काही सामाजिक विकृती त्यात घुसल्या हेही स्पष्ट दिसते. अन्यथा ह्या संस्थेचा मूळ उद्देश पवित्र आहे, गीत  संगीताची उपासना करून एक लोककलेचा वारसा जपणारा हा पंथ आहे. तो एक संस्कृती म्हणून आपण जपणे त्यातील चुकीच्या आणि विकृत प्रथा छाटून टाकून हा वृक्ष जोपासणे नक्कीच आनंददाई आहे. 









Friday, 12 February 2016

भविष्यकथन

भविष्यकथन हा ज्योतिषशास्त्रातला सर्वांना हवाहवासा वाटणारा विषय आहे. समोर ज्योतिषी दिसला कि जन्मकुंडली पुढे टाकून किवां हात पुढे करून प्रत्येक जण भविष्य विचारतो. ज्योतिष्य सांगणारा सुद्धा अशावेळी फॉर्मात येतो आणि आपले जे काही ज्ञान आहे त्याच्या जोरावर भविष्य सांगायला सुरुवात करतो.
ज्योतिष्यशास्त्र बदनाम होण्याचे एक कारण हेही आहे कि बऱ्याच ज्योतिष्यांना भविष्यकथन या प्रकारची पूर्ण माहिती नसते. त्यात नाडीज्योतिष्य, हस्तरेषा आणि जन्मपत्रिका यावरून असे भविष्य कथनाचे प्रकार आहेत. हात पाहून भविष्य सांगणे हा तसा सोपा प्रकार आहे पण त्यात अचूक कालनिर्णय (१-२ महिन्याच्या अंतराने) करता येणे शक्य नाही. कारण हातावरच्या रेषा साधारणतः ६० ते ७० वर्षांचे आयुष्य दर्शवितात त्यात १-२ महिन्याची अचूकता शोधणे म्हणजे १ मिलीमीटर लांबीच्या रेषेचा अभ्यास करून भविष्य सांगणे असा होतो व ते फारच अवघड काम आहे. आत्ता आपण हस्तरेषा किवा नाडीभविष्य याचा विचार न करता फक्त जन्मकुंडलीप्रमाणे भविष्यकथन याविषयी माहिती करून घेऊयात. 
बहुतेक लोकांचा असा समज असतो कि जसे आकाशातील ग्रह तारे बदलतात तसे माणसाचे नशीब बदलत असते, पण हे चुकीचे आहे. माणसाचे प्राक्तन हे खरेतर ग्रहदशेप्रमाणे बदलत असते. ग्रहदशा आणि त्यातील अंतर्दशा हि साधारणतः १ ते २ वर्षे टिकते. एका ग्रहाची महादशा ५ ते २१ वर्षे असते तर त्या अंतर्गत दुसऱ्या  किवा त्याच ग्रहाची अंतर्दशा १ ते २ वर्षे अशा स्वरुपात चाललेली असते. महादशेचे फळ हे विस्तृत असते. त्या काळात माणसाच्या आयुष्याचा ठराविक टप्पा अधोरेखित होतो. जसे बालपण, शिक्षणावस्था, नोकरी-व्यवसाय व अर्थार्जन, संसार व संतती-सुख, म्हातारपण हे सगळे महादशेचे टप्पे असतात. त्यात अंतर्दशा हि शिक्षणात होणारे बदल, नोकरीत होणारे बदल, संसार सुखात /संतती सुखात होणारे बदल दर्शवित असते. एका ग्रहदशेत साधारणतः एकंदर परिस्थिती स्थिर असते. फारश्या उलाढाली होत नाहीत. इतकेच काय एखादा माणूस मृत्यू पावला तरी त्याचे बँकेतील पैसे, त्याचे कुटुंब हे एका ठराविक स्थिर अवस्थेतच राहते. फार परिवर्तन होताना दिसत नाही. ग्रहदशेचे फलित अचूकपणे सांगणे फारच कौशल्याचे काम आहे. मूळ जन्मपत्रिकेतील त्या ग्रहाचे स्थान, त्याचे उच्च-नीचत्व, त्याचे नक्षत्र यावरून दशेचे फलित कळते. तसेच जन्मापासून काही ठराविक काळापर्यंत ग्रहांच्या दशेचे फळ मिळत नाही. मुल जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा त्याला चंद्रदशा म्हटले जाते. जन्माला आल्यापासून ५ वर्षे मातृदशा, तर १२ व्या वर्षापर्यंत पितृदशा, पुढे १६ व्या वर्षापर्यंत राष्ट्रदशा असते. नंतर त्यापुढे ग्रहदशा फळे द्यायला सुरुवात करते. मातृदशा, पित्रुदशा, किवा राष्ट्रदशा याचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर त्यांच्या आई, वडील आणि ज्या प्रदेशात ती व्यक्ती राहत असते त्यांचा परिणाम. 
मग माणसाच्या आयुष्यात चोरी, अपघात, विवाह, नोकरीचा लाभ अश्या अनेक घटना अचानक घडतात त्यांचे कारक कोण असते असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो. तर हा गोचरीच्या ग्रहांचा प्रभाव असतो. प्रत्येक गोचरीचा ग्रह व त्याची इतर ग्रहांबरोबर होणारी युती हि मानवाच्या आयुष्यात एक संधी, संकट, शुभ/अशुभ योग घेऊन येत असते. गुरु-चंद्र, गुरु-मंगळ, रवि-गुरु इत्यादी शुभ संधी असतात, तर शनि-मंगळ, शनि-रवि, शनि-राहू, राहू-मंगळ हे अशुभ योग होत. अशा संधींचा योग्य फायदा उठवणे व मिळणे हे माणसाच्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या गुणधर्मानुसार ठरते. एखादे संकट प्राणावर न बेतता सुटका होते तर दुसर्याचा बळी जातो असे गोचरीच्या ग्रहांमुळे सतत चढउतार होत राहत असतात. 
म्हणून भविष्यकथन हा मोठा गुंतागुंतीचा व कौशल्याचा प्रकार आहे. तरीही आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींचे अनुमान करण्यासाठी काही ठोकताळे आहेत त्यांचा आपण थोडक्यात विचार करूयात. 
पुरुषाच्या विवाहाचे वय: पुरुषाच्या विवाहाचा योग त्याच्या जन्मकुंडलीतील राहूच्या योगात ज्यावेळी गुरु येतो तेव्हा सुरु होतो. राहू-गुरु एकत्र असणे, किवा राहुपासून पासून गुरु चवथा, सातवा असणे असा हा योग असतो. ह्यावेळी जेव्हा-जेव्हा गोचरीत मुलाला गुरुबळ येते (गुरु २-५-७-९-११ व्या स्थानी असणे) तेव्हा विवाह घडून येतो. 
स्त्रीच्या विवाहाचे वय: स्त्रीच्या विवाहाचे वय हे पूर्णपणे गोचरीच्या गुरुप्रमाणे असते, गुरुबळ उत्तम असता (गुरु २-५-७-९-११ व्या स्थानी असणे) विवाह जमू शकतो. 
मूळ जन्मकुंडलीत खराब योग, करण, नक्षत्र असेल तर शांती/उपाय करून विवाह लवकर ठरतो. मंगळ असेल तर समोरचा मुलगा/मुलगी यांची पत्रिका अनुकूल असेल तरच योग येतो. तोवर विवाह जुळण्यात अडचणी व मनस्ताप सहन करावा लागतो. 
नोकरी लागण्याचा, प्रमोशन यांचा कालखंड लग्नेश-दशमेश यांच्या योगावर अवलंबून असतो. 
तर अशा प्रकारे भविष्यकथन केले जाते. आपण जे वर्तमानपत्रात भविष्य वाचतो ते खरेतर भविष्य नसून फक्त येणाऱ्या संधी किवा संकटे यांची चाहूल दिलेली असते, त्यावर कसे आपण कसे वागणार यावर खरे फळ अवलंबून असते. साडेसातीचेही तसेच असते. आपण एखाद्या संधीवर किवा संकटावर कसे व्यक्त होतो यावरच आपले खरे प्रारब्ध अवलंबून असते. याशिवाय काही ज्योतिष्यांना वाचाशक्ती वगैरे प्रकार असतो ते कदाचित अध्यात्मिक शक्तीच्या जोरावर किवा जातकाला काही दैवी उपाय सांगून हवे ते घडवून आणू शकतात. पण मला त्याविषयी फारसे माहित नाही.