Saturday, 24 October 2020

दुर्गा सप्तशती सारांश भाग -३ अंतिम भाग

 दुर्गा सप्तशती सारांश भाग -३ 

अध्याय ६, ७, ८, ९ व १०

शुंभ निशुंभाचा दूत परत आला व त्याने विस्तारपूर्वक देवीशी झालेले बोलणे शुंभ निशुंभाना सांगितले. त्यावेळी ते दोन्ही राक्षस भयंकर चिडले. त्यांनी त्यांचे लाखो हजारो सेनापती कोटीच्या कोटी सेनेसोबत देवीला बंधक बनवून  आणण्यासाठी रावाना केले . त्या सेना देवीजवळ पोहोचताच थांब थांब असे देवीला उद्देशून ओरडू लागल्या. तेव्हा देवीने फक्त हुंकार देऊन त्यातील अनेक असुरांना संपवले. देवीचा सिंह त्या असुरसेनेत घुसला व त्याने जंगलात जसा वणवा पेटतो तसा हाहाकार दैत्यसेनेनेत माजवला. देवीने स्वतःचे मुख विस्तीर्ण केले आणि अनेक असुरांना गिळंकृत केले. अनेकांना गदेने चूर्ण केले. खड्गाने कित्येकांना मधोमध चिरले तर कित्येकांना विनाशीर करून टाकले. 

देवीच्या शरीरातून तिच्या अनेक प्रतिभूती निर्माण झाल्या व त्यांनी दैत्यसेनेचा प्रचंड संहार सुरु केला. हे सर्व पाहून दैत्यसैन्य पुन्हा शुंभ निशुंभाकडे गेले तेव्हा त्याने महाहनू नामक दैत्याला सेनेसह देवीशी युद्ध करण्यास पाठवले. त्यालाही देवीने सहज मारले. 

त्यानंतर शुंभ निशुंभाने रक्तबीज नावाच्या असुराला देवीशी लढण्यास पाठवले. देवीने रक्तबीजावर चक्र व खड्गाने प्रहार केले पण जेव्हा जेव्हा रक्तबीजाचे रक्त जमिनीवर सांडले तेव्हा तेव्हा त्यातून नवीन असुर जन्माला येत होते व लढत होते. त्यांच्याशी लढताना देवीच्या चेहऱ्यावर किंचितही दमल्यासारखे दिसत नव्हते. 

देवीने आपल्या शरीरातून काली नावाची प्रतिभूती निर्माण केली. आणि तिला तिचे मुख विस्तीर्ण काण्यास सांगितले. तसेच हेही सांगितले कि जेव्हा जेव्हा रक्तबीजाचे रक्त जमिनीवर सांडत असेल त्याआधीच ते तू पिऊन टाक.

त्याप्रमाणे कालीदेवीने रक्तबीजावर देवीने वार करताच जे रक्त सांडत होते ते चटकन पिऊन घेतले तसेच त्यातून जे असुर जन्माला येत होते त्यांनाही गिळंकृत करून टाकले. असे करता करता रक्तबीजाचे रक्त वाहून तो क्षीण झाला व देवीच्या एका प्रहरात मृत्युमुखी पडला. 

हि बातमी ऐकून शुंभ निशुंभ भयंकर चिडले व राहिलेले राखीव सैन्य घेऊन देवीशी लढण्यास पोहोचले. देवीने शक्तीच्या एका प्रहरात मागे उभ्या असलेल्या शुम्भाला खलास केले. ते पाहून निशुंभ भयंकर प्रक्षुब्ध झाला. त्याने प्रथम मायावी युद्ध सुरु केले. वेगवेगळ्या रूपात तसेच कधी आकाशात तर कधी जमिनीवर असे तो देवीवर प्रहार करू लागला. तसेच त्याचा अनेक प्रतिकृती निर्माण होऊन त्या देवीबरोबर लढू लागल्या. हे पाहून ब्रम्हा, विष्णू महेश व अन्य देवता देवीच्या मदतीस आल्या. ब्रम्हाची शक्ती ब्राह्मणी, शिवाची शक्ती वृषभारूढ चंद्रलेखा, विष्णूची शक्ती वैष्णवी, इंद्राची शक्ती ऐंद्री, कार्तिकेयाची शक्ती मोरावर स्वार  होऊन देवीच्या शरीरात मिळाली तसेच वेळप्रसंगी वेगवेगळ्या प्रतिभूती बनून मायावी निशुंभाषी वेगवेगळ्या मोर्च्यावर लढू लागल्या. तुंबळ युद्ध चालू होते. तेव्हा भगवान शिवशंकर देवीस म्हणाले हे देवी तू या असुरांचा नाश कर! तेव्हा देवी म्हणाली हे महादेव आपण माझे दूत बनून असुरांना जाऊन सांगा कि तुम्ही पाताळात  निघून जा. देवांना त्यांचे राज्य परत द्या . यामुळे देवीस शिवदूती नावाने ओळखले जाते. पण असुरांनी महादेवाचे म्हणणे  ऐकले नाही. उलट निशुंभ देवीस म्हणू लागला कि तू स्वतः अहंकारी आहेस व अनेक स्त्रियांची मदत घेऊन माझ्या एकट्याशी लढत आहेस. त्यावर देवी म्हणाली ह्या  सर्व देवी माझ्याच प्रतिभूती आहेत त्यानंतर त्या सर्व देवी देवीच्या शरीरात समाविष्ट झाल्या. त्याचवेळी निशुंभाने देवीवर प्रहार केला पण त्याचा किंचितही परिणाम देवीवर झाला नाही. उलट देवीने बाणाने त्याची ८ चंद्र असलेली ढाल व तलवार नष्ट केली. देवीच्या सिंहाने निशुंभावर हल्ला केला तेव्हा तो आकाशात जाऊन लढू लागला मग देवी सुद्धा आकाशात त्याच्याशी लढू लागली. देवीचा एक खड्गप्रहार वर्मी लागून तो असुर जमिनीवर कोसळलेला व तिथेच गतप्राण झाला त्यावेळी मोठा भूकंप झाला.  त्यानांतर अशुभ उल्कापात बंद झाले, ग्रह व नद्या आपल्या मार्गावर चालू  /वाहू लागले . हे युद्ध व  निशुंभाचा वध  झालेला पाहून देव प्रसन्न झाले व देवीची स्तुती करू लागले. 

अध्याय ११ 

देवांनीअग्नीला पुढे करून देवीची स्तुती सुरु केली. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।। हा अध्याय ११ व्या मंत्रातील भाग आहे. देवी तू सनातन आहेस. तुझे शरीर दिव्य असून चेहरा व सूर्यसमान तेजस्वी आहे. तुझे स्तन त्यात अधिक शोभून दिसतात. तू मोहरूपिणी असून निर्सगचक्र चालवण्याचे महान कार्य करीत असते. तू जल, अन्न,काष्ठ इत्यादी आहेस तसेच तहान भूक ह्या सर्व मानवांच्या गरजा निर्माण करणारी आहेस. तसेच मोक्ष  बुद्धी कला काष्ठा प्रदान करणारी मंगलमयी देवी आहेस. उत्पत्ती पालन संहारकरणारी तूच आहेस.  शरणागताची पीडा दूर करणारी तूच आहेस. 

चाप खड्ग शंख गदा धारण करणारी देवी तुला नमस्कार असो.  त्रिनेत्रा सुलक्षणी श्रद्धा मेधा सरस्वती ईशा विद्या तूच आहेस तू आदिवाक्य प्रमाण आहेस. विश्वपिडा,महामारी,चोर,लुटेरे,समुद्रातील वादळ, जंगलातील वणवा मोठ्यात मोठे संकट दूर करणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे? देवीची स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली व तिने देवांस वर मागण्यास सांगितले. तेव्हा देव म्हणाले हे देवी जेव्हा जेव्हा त्रिलोकांवर संकट येईल तेव्हा तेव्हा तू ते नष्ट कर. तेव्हा देवी म्हणाली  वैस्वत मन्वंतराच्या  २८व्या  युगात शुंभ निशुंभ नावाचे अन्य दानव निर्माण होतील त्यांचा संहार करण्यासाठी मी यशोदेच्या पोटी जन्म  घेऊन विंध्य पर्वतावर जाऊन राहील व त्या राक्षसांचा नाश करील त्यानंतर विप्रशक्ती नावाच्या दैत्यांचा मी अतिशय भयंकर रूप धारण करून नाश करील त्यावेळी माझे दात हे डाळिंबाच्या दाण्यासारखे लाल होतील म्हणून लोक मला  रक्तदन्तिका नावाने ओळखतील. त्यानंतर पुढे १०० वर्षे पाऊस पडणार नाही तेव्हा मी शाकंभरी रूपात येऊन माझ्या फांद्या (शाखा) च्या द्वारे सर्व लोकांचे पोषण करील.  दुर्गम नावाच्या राक्षसाचा नाश करून मी दुर्गा नावाने प्रसिद्ध होईल.  हिमालयातील राक्षसांना मारून मी भीमादेवी नावाने प्रसिद्ध होईल . अरुं नामक दैत्याला मारण्यासाठी मी सहा पायांच्या भुंग्याचे रूप धारण करील त्यामुळे लोक मला भ्रामरी नावाने ओळखतील. 

अध्याय १२ फलश्रुती 

सर्व संकटात देवीचे स्मरण केले असता ती त्वरित धावून येते. तिचे यज्ञ दान पूजा इत्यादी प्रकारे पूजन केले असता ते स्थान ती कधीही सोडत नाही. सज्जनांचे ती मंगल करून त्यांना सुखी व ऐश्वर्यवान करते तर दुर्जनांना दरिद्री बनवते. जे तिच्या शरणी जातात त्यांची पीडा ती निश्चित दूर करते यात तिळमात्र शंका नाही. भयंकर संकटात ती भक्तांचे रक्षण करते. ती भक्ताचे सर्व दिशांनी, सर्व ग्रहांपासून , सर्व संकटांपासून रक्षण करते. 

अध्याय १३ राजा सुरथ व समाधीला देवीचे वरदान 

तर अशाप्रकारे देवीचे चरित्रमाहात्म्य मेधाऋषींनी राजा सुरथ व समाधीला सांगितले. त्यानंतर देवीची  व्रतपूर्वक उपासना करण्यास त्या दोघांना सांगितले. त्यांना सप्तशती मंत्र प्रदान केला. तेव्हा ते दोघे नदीच्या कधी जाणून देवीची मातीची मूर्ती बनवून व्रतपूर्वक उपासना करू लागले. सहा महिन्यानंतर त्यांनी आहार कमी कमी केला व शेवटी निराहार राहून देवीची उपासना करू लागले. तेव्हा देवी प्रत्यक्ष तिथे अवतीर्ण झाली व त्या दोघांस वर मागण्यास सांगितले. तेव्हा राजा सुरथने आपले राज्य परत मिळावे तसेच आपल्याला कधीच नष्ट न होणारे राज्य मिळावे अशी इच्छा प्रकट केली तेव्हा देवीने तथास्तु म्हटले व राजास सांगितले कि तू चैत्रवंशात सूर्याच्या पोटी जन्म घेशील व महान राजा होशील. त्यानंतर सुरथ राजाला त्याचे राज्य परत मिळाले व पुढील  जन्मात तो महान सम्राट व वैवस्तर मनू बनला. समाधीला देवीने तुला काय हवे ते माग असे म्हटले. त्यावर समाधी म्हणाला कि माझे मन संसारापासून अनासक्त झाले आहे त्यामुळे देवी तू मला मोक्ष दे . त्यासुमार देवीने त्याला मोक्षमार्ग दर्शविला व देवी अंतर्धान पावली.

 समाप्त    

Friday, 23 October 2020

दुर्गा सप्तशती सारांश थोडक्यात भाग -२

 दुर्गा सप्तशती - सारांश. भाग २ 

अध्याय २,३,४ 

मेधामूनी सांगतात : महिषासुर राक्षसाच्या सेनेचे देवांशी सुमारे १०० वर्ष युद्ध चालू होते आणि महिषासुर त्यात विजयी होत होता. त्याने देवांचे सर्व  अधिकार ताब्यात घेतले होते व देव सामान्य मनुष्याप्रमाणे मृत्युलोकात फिरत होते. 

यास्थितीत देवराज इंद्र इतर देवांसहित कैलास पर्वतावर श्रीशिव यांच्याकडे  गेले तेथे विष्णूही विराजमान होते. देवांनी सांगितलेले पराभव ऐकून श्रीशिवाचें व विष्णूंचे रागाने मुख वाकडे झाले भुवया वक्र झाल्या. तत्क्षणी शिवाच्या शरीरातून एक शक्ती बाहेर पडली व तिने स्त्रीच्या मुखाचे रूप धारण केले. श्रीविष्णूच्या शक्तीमुळे तिचे हात उत्पन्न झाले. चंद्र वरून वायू अग्नी, सूर्य कार्तिकेय इत्यादी देवतांच्या शक्तीने तिचे पूर्ण शरीर निर्माण झाले. समुद्राने रत्ने, नागाने मणिहार, कुबेराने वस्त्रे , तसेच अनेक देवांनी अनेक शस्त्रे  देवीस दिली. पिनाकधारी शंकराने एक त्रिशूल आपल्या धनुष्यातून निर्माण करून देवीला दिला. इंद्राने सिंह भेट दिला. 

अशाप्रकारे शस्त्रसज्ज होऊन महादेवी महिषासुराशी युद्ध करण्यास निघाली दोघांचे तुंबळ युद्ध झाले. महिषासुर मध्येच रेड्याचे रूप घेऊन पृथ्वी उध्वस्त करीत होता तर मध्येच हत्तीचे रूप घेऊन देवीवर हल्ला करीत होता. तर पुन्हा मानवी  लढत होता. एकदा त्याने रेड्याचे रूप घेतले असता देवीने त्यावर खड्ग प्रहार केला तेव्हा तेव्हा तो मानवी रूपात येण्याचा प्रयत्न करीत असता फक्त त्याचे मुख मानवाचे झाले होते त्यावर देवीने त्रिशूल प्रहार करून त्याला संपवले. 

सर्व देव देवीची स्तुती करू लागले. तेव्हा देवी प्रसन्न होऊन म्हणाली देवांनो तुम्हाला जे हवे असेल ते मागा. तेव्हा देव म्हणाले देवी आपण महिषासुराला मारून आम्हाला संकटमुक्त केले आहे तेव्हा आणखी काय मागायचे? पण एकच मागणे आम्ही मागतो आणि ते म्हणजे जेव्हा जेव्हा मानवावर / देवांवर संकट येईल तेव्हा तुम्ही प्रकट व्हावे हीच इच्छा. देवी तथास्तु म्हणून अंतर्धान पावली. 

पुढे शुंभ आणि निशुंभ राक्षस जन्माला आले व त्यांनी संपूर्ण पृथ्वी, स्वर्ग यांचा ताबा मिळवला देवांचे सर्व अधिकार घेऊन ते आपले कार्य करू लागले. 

त्यावेळी सर्व देव कैलास पर्वताकडे निघाले. त्याचवेळी पार्वतीदेवी स्नानासाठी एका तलावाजवळ आल्या होत्या. त्यांना पाहताच देवांनी त्यांची स्तुती सुरु केली. तेव्हा देवीने विचारले कि देवांनो तुम्ही इथे कशासाठी  आला आहात व कोणाची स्तुती करीत आहेत तेव्हा देवीच्याच शरीरातून एक प्रतिकृती प्रकट झाली  व म्हणाली देवी पार्वती हे देव शुंभ निशुंभ राक्षसांपासून स्त्रासलेले आहेत व आपलीच स्तुती करीत आहेत. तेव्हा देवीने राक्षसांचा नाश करण्याचे वचन देऊन देवांना परत पाठविले. 

त्यानंतर देवीने अलौकिक रूप धारण केले व हिमालयायच्या एका शिखरावर जाऊन बसली. तिचे ते  अलौकिक रूप पाहून शुंभ व निशुंभच्या दूतांनी त्यांना हि माहिती दिली व त्या स्त्रीस प्राप्त करावे असा सल्ला दिला. 

अध्याय ५ 

यानंतर शुंभ निशुंभ राक्षसाने आपला दूत सुग्रीव यास देवीकडे पाठवले दूताने देवीस सांगितले कि शुंभ निशुंभ तिन्ही  लोकांचे स्वामी आहेत देवांची सर्व अमूल्य संपत्ती, शस्त्रे , त्यांनी प्राप्त केले आहे. तेव्हा तुही शुंभ निशुंभ यांच्या आश्रयाला ये व त्यांच्यापैकी एकाची पत्नी हो. यावर देवी म्हणाली तुम्ही म्हणताय ते खरे आहे शुंभ निशुंभ महापराक्रमी आहेत. पण काय करू मी अल्पबुद्धीने व अज्ञानाने प्रतिज्ञा करून बसले कि जो कोणी पुरुष मला यद्वत हरवेल त्याच्याशीच मी लग्न करेल. यावर दूत म्हणाला देवी मूर्खता करू नकोस शुंभ निशुंभ जेव्हा तुला ओढत नेतील तेव्हा तुझा अहंकार व प्रतिज्ञा नष्ट होईल. पण तरीही देवीने पुन्हा आपली प्रतिज्ञा दूताला सांगितली व तो परत गेला.

क्रमश: 

दुर्गा सप्तशती सारांश थोडक्यात

दुर्गा सप्तशती
ह्या पूर्ण मंत्राचे एकूण १३ अध्याय आहेत व एक मुख्य कथा आहे त्याचा सारांश अतिशय थोडक्यात देत आहे. 
प्रथम अध्याय:
फार वर्षांपूर्वी सुरथ नावाचा राजा भूमंडळावर राज्य करीत होता. त्याचे सामर्थ्य उत्तम होते व तो अतिशय न्यायी राजा होता. पण त्यातच कोलाविध्वंसी नामक राजा त्याचा शत्रू बनला. राज्यविस्तार करण्यासाठी कोलाविध्वंसीने सुरथ राजावर आक्रमण केले. व दुर्दैवाने युद्धात सुरथ राजाचा पराभव झाला.  त्यातच सुरथ राजाचे मंत्रीसुद्धा कोलाविध्वंसीला मिळाले. आता सुरथ राजा फक्त त्याच्या नगरापुरता राजा राहिला होता. तेव्हा शिकार करण्याचे कारण सांगून तो जंगलात निघून गेला. घनदाट जंगलात गेल्यावर तो भटकत होता तेव्हा त्याला तिथे एक समाधी नावाचा वैश्य (व्यापारी) दिसला. राजाने त्याला विचारले कि तू या जंगलात काय करीत आहेस? त्यावर समाधी म्हणाला मी एका धनवान कुटुंबात जन्मलेला व्यापारी आहे. पण माझ्या मुलांनी,पत्नीने, व भावांनी माझी सर्व संपत्ती हडप करून मला घराबाहेर काढले आहे. 
दोघांचा वार्तालाप झाल्यावर दोघे आपल्या दुःखावर व जुन्या आठवणी आठवून स्तब्ध आणि उद्विग्न झाले. त्यात राजा सुरथ म्हणाला अरे समाधी तुझ्या कुटुंबातील लोकांनी तुला इतका त्रास दिला तरी तू त्यांची आठवण काढून दुःखी का होत आहेस? तेव्हा समाधी म्हणाला राजा मी काय करू माझे मन अजूनही माझ्या कुटुंबाची काळजी करीत आहे. राजा सुरथ सुद्धा मनातल्या मनात आपले राज्य, प्रजा, खजिना, आपला प्रिय हत्ती यांची आठवण काढून व्याकुळ होत होता. 
फिरत फिरत दोघे त्या जंगलात एका आश्रमाजवळ गेले. तिथे अनेक शांत आणि हिंसक जीव एकत्र गुण्यागोविंदाने राहत होते हे पाहून दोघांना आश्चर्य वाटले. तो आश्रम मेधामुनी नामक गुरुजींचा होता. 
तिथे अनेक शिष्य मेधा मुनींची सेवा करण्यात मग्न होते. राजा व समाधी आश्रमात गेले व विनयपूर्वक मेधामुनींना नमस्कार करून समोर  बसले व बोलू लागले. त्यांनी अपआपली परिस्थिती मेधामूनींना सांगितली. 
तेव्हा मेधामुनी म्हणाले विषयमार्गाचे ज्ञान सर्व प्राण्यांना असते. ते कसलीही अपेक्षा न करता आपल्या पिल्लांना तोंडात घास खाऊ घालतात. मनुष्य प्राणी बुद्धिमान आहे पण तोही विषय व आसक्तीमुळे अंधकारात फेकला गेला आहे. निसर्गाची स्थिती नित्य ठेवण्यासाठी हि आसक्ती व मोहमाया निर्माण करणारी महान परमेश्वरी देवी आहे. तीच नित्य या आजनमा आहे. तिच्याच कृपेने सर्व निसर्ग चक्र चालू आहे व निर्माण उत्कर्ष भोग व संहार हि तीच करते.
आम्ही अनेक मुनिजन तिच्याच चरित्राचा अभ्यास करीत असतो.   
हे ऐकून राजा व समाधी म्हणाले मुनिश्रेष्ठ हि देवी नक्की आहे तरी कोण आणि तिचे चरित्र काय आहे हे विस्तारपूर्वक कृपया सांगा. 
त्यावेळी मेधामूनी म्हणाले फार फार वर्षांपूर्वी भगवान विष्णूच्या कानातील मळापासून मधू आणि कैटभ राक्षस उत्पन्न झाले होते. त्यांनी सगळीकडे उत्पात माजवला होता. ते ब्रम्हाऋषींना मारण्यासाठी सरसावले. तेव्हा ब्रम्हाऋषीं श्री विष्णूंना शरण गेले. पण पाहतात तर काय महाविष्णू हे योगनिद्रा घेत होते व महादेवीच्या प्रभावाने ती योगनिद्रा असल्याने ब्रम्हादेवांनी महा योगनिद्रेचे स्मरण करून स्तुती सुरु केली. विविध अक्षरे उच्चार, ओंकार, उद्या स्थिती अंत , मोह आसक्ती हे सर्व महामोहमाया परमेश्वरी देवीकडून घडवले जाते तेव्हा देवी तू भगवान विष्णूंना योगनिद्रेतून मुक्त कर अशी प्रार्थना ब्रह्मदेवांनी केली. त्यावेळी ती स्तुती ऐकून परमेश्वरीदेवी विष्णूंच्या योगनिद्रेतून बाहेर अली व विष्णू भगवान जागे झाले. त्यावेळी मधू आणि कैटभ यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्ष युद्ध झाले व थे थांबेना तेव्हा परमेश्वरी योगेश्वरी देवींने मधू आणि कैटभ यांच्यात ममता उत्पन्न केली. तेव्हा ते भगवान विष्णूला म्हणु  लागले कि देवा आम्ही तुझ्या युद्धकौशल्यावर खुश झालो आहोत कृपया वरदान मागा. तेव्हा विष्णू म्हणाले कि मला इतर वर नकोत फक्त तुमचा वध माझ्या हातून व्हावा हीच इच्छा आहे. तेव्हा ते दोन राक्षस म्हणाले जिथे जल नसेल अशा ठिकाणी आमचा वध करावा. तेव्हा श्रीविष्णूने त्यांना आपल्या मांडीवर घेऊन मारले. 
अशाप्रकारे संपूर्ण देव, प्राणी पक्षी निसर्ग त्या दोन राक्षसांच्या उपद्रवापासून मुक्त झाले. 
हे ऐकून राजा व समाधी यांचे समाधान झाले पण त्यांनी देवीची अधिक माहिती सांगण्याचा आग्रह केला. 
क्रमश: