Saturday, 26 August 2017

देवघरातील मूर्ती.

देवघरातील मूर्ती: आपली जी वृत्ती असते त्याप्रमाणे आपले दैवत असते. फार पूर्वी आपला समाज स्त्रीला सन्मान देणारा होता. त्यामुळे स्त्री देवता ही प्रमुख असून तिने पुरुष देवतेवर विजय मिळवला अशी संकल्पना पूर्वी स्पष्ट दिसते. मधल्या काळात स्त्री हे नरकाचे द्वार आहे असा समज पसरला. बरेच देव-देवी समाजावर लादले आणि घुसडले गेले. त्यामुळे आज बरेच लोकांना आपली दैवते कुठली हा संभ्रम निर्माण झाला आहे.  
नवनवीन देव निर्माण होण्याची काही तात्कालिक व राजकीय कारणे आहेत. काही ठराविक वेळी रोगाच्या साथी येणे, पशु, प्राणी, पक्षी यांचा उपद्रव होणे यातून काही देवता आपल्यात दाखल झाल्या. एखाद्या समाजावर आधिपत्य करायचे असेल तर त्याची दैवते व अस्मिता नष्ट केल्या जातात ही राजकीय कारणे आहेत. हजारो विचारधारा आणि पंथ आपल्या देशात असल्याने ह्या राजकीय कुरघोड्या सतत चालूच होत्या. इतके असूनही बराच मोठा समज आजही त्यांच्या पुरातन देवीदेवतांना चिकटून आहे हे विशेष आहे. ह्या पुरातन देवता म्हणजेच  आपल्या कुलदेवता. आपला समाज  इतका लवचिक आहे कि नवनवीन देव स्वीकारताना त्याने आपल्या घरातील देव तितक्याच चिकाटीने सांभाळले आहेत हे विशेष. हे देव आपले कुलदैवत नेमके कुठले हे अचूकपणे दर्शवितात. नवीन देव लादण्यात आले नाहीत, कारण लादणारे परावलंबी होते व इथल्या समाजावर अन्न वस्त्र यासाठी अवलंबून होते. वेगवेगळ्या कथा निर्माण करून आहे त्या दैवतात संभ्रम निर्माण करणे, राजकीय मदतीने चालीरीती नष्ट करणे आणि नवीन देव घुसवणे हे होत गेले. पूर्वी पुरोहित नावाचा वर्ग अस्तित्वात असावा असे वाटत नाही. कारण पूर्वी लोकांना देवांचे व त्यांच्या चालीरीतींचे अचूक ज्ञान व अर्थबोध होता. डावा हात नव्हे उजवा, किवा नारळाची शेंडी देवाकडे अशा निरर्थक कर्मकांडांना महत्व देत ते घुसविण्यात आलेले लगेच लक्षात येत नाही. बरेच लोक त्यांचे कुलदैवत अमुक अमुक गावचे असे काहीतरी सांगत असतात, असे लोक एकतर कोणाच्यातरी बुद्धीभेदाला बळी पडलेले असतात किवा स्वतः बुद्धिभेद करणारे असतात. कुलदैवत हे सर्वत्र एकच आहे, त्याची मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहेत. हे यासाठी लक्षात घेणे गरजेचे आहे.

देवघरात टाक पुजण्याचे प्रयोजन: विवाहात नवीन देव करण्याची प्रथा आहे. तसेच मृत्यू  इत्यादींचे अशौच आले तर देव नवीन केले जातात. बरेचदा घासून देवांची झीज होते. त्यातील डोळे अलंकार इत्यादी बारकावे नष्ट होतात. कधीकधी तो देव नक्की कुठला आहे इतका संभ्रम निर्माण होतो. देव सदैव सुचीर्भूत असावेत. त्यांचे नित्य कुलधर्म कुलाचार केले गेल्याने ते जागृत राहतात व तत्काळ फलदायी बनतात. झीज झालेले तसेच मृतअशौच आलेले देव हे निष्प्रभ असतात. साधारणतः घरात मृत्यू, विवाह सारखेसारखे होत नाहीत व मधल्या काळात देवांची झीज होते. जेव्हा विवाह मृत्यू इत्यादी होतात तेव्हा दरवेळी आर्थिक स्थिती चांगलीच असते असे नाही. अशावेळी जर बदलायचे झाले तर टाक कमी खर्चात बदलून होतात. तेच जर मोठी मूर्ती असेल तर काम खर्चिक होते. मूर्तीतील बारकावे जसेच्या तसे निर्माण करता येत नाहीत. गणपतीचा मारुती होण्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक टाकांची पूजा करतात. 
मुख्य टाक हे आधीच्या भागात पाहिल्याप्रमाणे १) ग्रामदैवत जानाई किवा भैरवनाथ किवा दोघे. २) लक्ष्मीदेवी ३) खंडोबा ४) कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी ५) म्हसोबा- स्वतःची शेतीची/राहण्याची जागा असून त्या जागेत किवा  जवळपास म्हसोबाचे ठाणे असेल तर हा घरात आढळतो अन्यथा नाही. ६) देवांचा रक्षक वीर टाक. 
भैरवनाथ हा गावाचा रक्षक व कोतवाल आहे. भैरवाचे अनेक अवतार व रूपे आहेत. सर्व एकच असून आपल्या गावातील भैरवनाथाची पूजाअर्चा-कुलाचार केल्याने ते मूळ भैरवनाथाला पोचतात.भैरवनाथाची खास वैशिष्ठ्ये म्हणजे हा एकटा घोड्यावर स्वार असतो. सर्प हा जवळपास हमखास आढळतो. 




म्हसोबा हा दैत्य स्वरूपातील महादेव आहे. त्यामुळे अघोरी विधीसाठी त्याचा उपयोग केला जातो. रेडा हा प्राणी एकेकाळी संख्येने भरपूर व खूप उपद्रवमूल्य असलेला प्राणी होता. त्याची शक्ती अमर्याद असते, तसेच त्याला ताब्यात आणणे अशक्य बाब आहे हे लक्षात घेता महिषासुरमर्दन कथा ही तथाकथित काळाशी संबंधित आहे हे लक्षात येते.बरेचदा म्हसोबाला मांस, मद्य इत्यादींचा नैवेद्य करून प्रसन्न केले जाते व अघोरी प्रयोगातून सुटका किवा इतरांवर प्रयोग केले जातात.
वरील नमूद केलेले देव आहेत त्यांचे प्रत्येकाचे महत्व असून त्यांनी एक परस्पर संबंध निर्माण केलेला आहे. 
संसाराला लागणाऱ्या साध्यासुध्या बाबींची मागणी व पूर्तता या देवांकडून होते. म्हणजे ही काम्य दैवते आहेत. इच्छा पूर्तता करणारी दैवते आहेत. हे कुळाचे पूर्वापार चालत आलेले देव असल्याने यांना कुलदैवत अशी एकत्रित संज्ञा आहे. त्यातील एक लहान व दुसरे मोठे असे काही नाही. प्रत्येकाचे आपापले महत्व आहे. 
तुम्हाला सातबारा घ्यायचा असेल तर लाईटच्या कार्यालयात जाऊन उपयोग नसतो तसे कुटुंब व संसारी मागण्यासाठी ह्याच देवांची मनधरणी करावी लागते. 
सर्वात महत्वाचे म्हणजे हे देव अतिशय शीघ्र फळ देणारे असतात. आपल्या अनेक पिढ्यांना तसा अनुभव आलेला असतो म्हणून पूर्वापार आपण त्यांची पूजाअर्चा करीत आलेले असतो. 
पुढे आपण देवघरातील इतर देवांकडे वळू,
साती आसरा: आसरा हा शब्द अप्सराचा अपभ्रंश आहे. सात पाण्याजवळ असलेल्या अप्सरा (किवा यक्षिणी) असा सोपा अर्थ इथे अभिप्रेत आहे. 
इतिहासात जे जे अज्ञात व अद्भुत आहे त्याला यक्ष मानल्या गेले आहे. यक्ष हे विचित्र असतात. अनेक हात, प्राण्याचे शरीर किवा डोके असे यक्षांचे स्वरूप आहे. व्यावहारिक दृष्ट्या सातीआसरांचे महत्व हे तुमच्या मालकीच्या जागेतील विहिरी व पाण्याचे स्त्रोत यांच्याशी आहे. असे पाण्याचे स्त्रोत बुजवले किवा अडवले तर साती आसरा प्रकोप होतो असे मानले जाते. अशावेळी सती आसरा टाक करून घरात पुजला जातो. मोठे जमीनदार ज्यांच्या मालकीच्या जागेत भरपूर पाणी असलेली विहीर असेल तर साती आसरा टाक घरात हमखास असतो. पुढे जमीन मालकी गेली तरी टाक तसेच राहतात. असा टाक कसलेली उपद्रव करीत नसल्याने पुढे पूजन करीत राहिलेले योग्य असते. सातीआसरा प्रकोप झाला असता तीन शुक्रवारी वाहत्या पाण्यातील ७ खडे आणून त्यांना दहीभात व १ केळे यांचा नैवेद्य केला असता तात्पुरता त्रास टळतो.
विठ्ठल रुक्माई: वैराग्य हि उतारवयातील एक आवश्यक गरज आहे. नेटाने संसार केल्यावर मुलेबाळे स्थिरावली असता जग हे नश्वर आहे व समाधानी मोक्ष ही अंतिम गरज आहे हे जाणवायला लागते. कधीकधी नियतीचा फासा इतका निर्दय व अवकाळी पडतो कि माणूस तरुण वयात माझे माझे करायचे सोडून वैराग्य धारण करतो. अशावेळी वैराग्य हा उत्तम पर्याय असतो. काम-क्रोधादी टाकले कि ९०% प्रश्न मिटलेले असतात.  घरातील ज्येष्ठ हे विठुरायाचे भक्त असणे अगदी साहजिक आहे. त्यामुळे विठ्ठलरुक्मिणी यांचा देवघरात मानसन्मान ठेवणे क्रमप्राप्त आहे. विठ्ठल-रुक्मिणी ह्या उभ्या जोडमुर्ती अनेक पिढ्यानपिढ्या आपल्या घरात चालत आलेल्या आहेत. कमरेवर हात धरलेली दोघांची मुद्रा आता कर्म पुरे झाले हे दर्शविते. निष्काम कर्मयोग हे तत्व ह्या मुद्रेमागे आहे. कधीकधी संसारात राहून वैराग्य धारण करणे श्रेयस्कर असते.
सात्विक आहार, एकादशीला उपोषण, गळ्यात माळ हे विठ्ठल भक्तीचे महत्वाचे उपक्रम आहेत. आळंदी ते पंढरपूर आषाढीवारी हा उन्हपावसात शरीराचे कष्ट सोसून निर्वाणाचे भय दूर करणारा व मोक्षमार्ग दर्शविणारा आहे.
गणपती: शिवाचा पुत्र, उंदीर वाहन असलेला, हत्तीचे शीर व मानवाचे शरीर असलेला हा यक्ष (अद्भुत) रूपातील देव आहे. हत्ती हा बुद्धिमान प्राणी असून त्याचा मानवाबरोबर असलेला सहयोग बराच जुना आहे. मंदिर घरे बांधताना मोठमोठाले दगड हलविणे, जंगले कापणे यासाठी हत्ती मदत करीत आला आहे. दुसरीकडे उंदीर हा शेतीसाठी अतिशय उपद्रवी प्राणी असून त्यावर अंकुश ठेवणारा गणपती देव न बनला तरच नवल!
गणपती उपासना ही चतुर्थीला केली जाते. मोदक नैवेद्य गणपतीला प्रिय आहे.  परंपरागत पितळेची गणपतीची मूर्ती घरात आढळते. तिचा फोटो खाली दिलेला आहे.
भाद्रपद महिन्यात पिक उत्तम आलेले असते पण दुसरीकडे उंदरांचा सुळसुळात वाढलेला असतो. प्लेगसारखा आजार हा उंदरांच्यामुळे उद्भवतो. हे उंदीर सर्वांसाठी व शेतकर्यासाठी विघ्नकर्ते ठरतात. त्यांचा नायनाट करणारा विघ्नहर्ता गणेश म्हणून आपण ह्याकाळात पुजतो. गणेश चतुर्थीव्रत हे मातीचा गणपती करून त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे व्रत आहे. गणेशमूर्ती ही सौम्य असावी. नेत्र शांत असावेत. गणपतीला अभ्यासात, स्पर्धा परीक्षेत यश येण्यासाठी, नवीन कार्य आरंभ करण्यापूर्वी साकडे घातले जाते.
गणपती हा प्रभावी देव आहे. नवसाला पावणारा म्हणून विघ्नहर्ता असे याचे नाव आहे. सर्व तत्वज्ञ गणेशाला आपल्या बाजूला ओढायचा प्रयत्न करीत असतात. उदाहरणार्थ अथर्वशीर्षातील खालील श्लोक पहा.
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् || ६ ||

अर्थ: तूच ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आहेस. भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत.
हे अतिशयोक्तीपूर्ण किवा स्तुतीपर स्तोत्र आहे त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर गणपती म्हणजेच ब्रम्हा किवा विष्णू किवा रुद्र आहे का असा गोंधळ उडतो. पुढे इंद्र, अग्नी वायू हाही घोळ होतो. पण शब्दशः अर्थ घेणे चुकीचे आहे. कारण ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, वायू, अग्नी इत्यादी देवता पूर्णतः वेगळा गुणधर्म असलेल्या आहेत. इथे फक्त पराकोटीची स्तुती केल्याने सर्व देव व शक्ती म्हणजेच गणपती आहेत असे म्हटले आहे. हे बर्याचश्या मंत्रात आढळते. त्यामुळे देवाचे नक्की मूळ व पूजेचा उद्देश काय यात मात्र आपला गोंधळ उडतो.  

दुसरीकडे काही तत्वज्ञ गणेशाला सिंधू संस्कृतीतील देव मानतात. भाजलेल्या मातीचा २ इंच x २ इंच आकाराचा मुखवटा लोक तोंडाला लाऊन नृत्यादी करीत असा दावा करीत असतात.  पण २ इंच हा आकार फारच लहान आहे. हा गणपती कि हत्ती हेही स्पष्ट होऊ शकत नाही.



अन्नपूर्णा: वास्तविक ग्रामदेवता व लक्ष्मी ह्या धनधान्य व प्रदान करणाऱ्या देवी आहेत, त्यांच्याबरोबर बरेच घरात अन्नपूर्णा देवी आलेली आहे. अन्नपूर्णा देवीचा टाक असतो तसेच धातूची मूर्तीसुद्धा असते.
योगेश्वरी (जानाई) ही कृषीजीवनाशी संबंधित देवी आहे. पण शहरात शेती न करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी पर्याय हवा म्हणून अन्नपूर्णा ही देवघरात पुजली जाते. दक्षिणेकडील राज्ये विशेषतः केरळ, तमिळनाडूत ही पूजा केली जाते. केरळ राज्यात अतिवृष्टी होते तर तमिळ राज्यात अनावृष्टी होते. दोन्हीही ठिकाणी शेती फार अनुकूल नाही. त्यामुळे जानाई (योगेश्वरी) च्या जागी अन्नपूर्णा आलेली आहे. 
सांस्कृतिक देवाणघेवाणीत तसेच राजकीय बदल होत असताना संपूर्ण समाज एकाच देवीदेवतेचे पूजन करीत असेल तर त्यांना एकत्र आणणे सोपे असते. त्यामुळे विविध देव पुढे आपल्याकडे येत गेले. श्रद्धा एकटावल्या गेल्या तसेच विभाजित झाल्या. हे आणखी कोणते देव होते यांची आपण पुढे माहिती घेऊ.





 

Thursday, 17 August 2017

आपल्या देवघरातील देव

आपण गेल्या भागात आपली जात, गावे इत्यादी कशी निर्माण झाली हे पाहिले. त्याकाळी देवधर्म हेच जगण्याचे साधन होते, कारण विज्ञान प्रगत नव्हते. हे देवधर्म म्हणजे लोक काय करायचे. आपले देव कोणते हे आपण पाहू.

हा जानाई (योगेश्वरी अथवा जोगेश्वरी) देवीचा टाक आहे. जानाई ही भैरवनाथाची पत्नी. जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. त्यातले त्यात जानाई स्त्री दैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते. भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जाते पण ते अधिक कडक दैवत आहे. त्याचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पुजण्याचे प्रमाण कमी आहे.
ह्या देवीचे नीट निरीक्षण केले असता, एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पिक दिसते. म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते. दुसऱ्या बाजूला लहान मुल दिसते आहे. म्हणजे पुत्रपौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी गावाचे रक्षण करते. सोबत एक पशु दर्शविला आहे. म्हणजे दूधदुभते उत्तम देणारी ही देवता आहे. त्याचबरोबर घरातील भांडी दर्शविली आहेत. म्हणजे तुमचे संसार भांडीकुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना ह्या देवीकडे केली जाते. 
थोडक्यात ग्राम किवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाईदेवी आहे. 
चैत्र महिन्यात ग्रामदैवताची जत्रा असते तेव्हा व विजयादशमीला ग्राम्दैवातला नैवेद्य करावा असा कुलाचार आहे.


ही आहे लक्ष्मीदेवी. ऋग्वेदात असलेली श्री किवा लक्ष्मी आणि ही लक्ष्मीदेवी यात साम्य असले तरीही ही तीच रुग्वैदिक लक्ष्मी नाही. बरेच लोक ही पलंगावर बसलेली असल्याने हिला पलंगावरची देवी असे म्हणतात. लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ही बसलेल्या मुद्रेत आहे. तिच्या हातात शस्त्र असल्याने ती धन संपत्तीचे रक्षण करणारी अशी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी धन संपत्तीचे रक्षण करते.

पूर्वी देवीच्या रोगाची साथ आल्याने खूप लोक दगावले जात असत. नंतर लसीकरण केल्याने ही साथ आटोक्यात आली. पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्त्रोत दुषित होत असत व आजार पसरत असे. त्यामुळे बरेचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला आहे असा समज होता. ह्या देवीला मरीआई, महामारी, कडकलक्ष्मी असेही संबोधले जाते. आषाढ महिन्यात नैवेद्य करून  पुढे देवीचा  कोप होऊ नये पिक उत्तम यावे व संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते.  


म्हसोबा हा परिचित देव असला तरीही बराच गूढ असा देव आहे. ज्योतिबा फुले म्हसोबाला महसुलाचा अधिपती असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात एका ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा!
आता आपण टाकाचे निरीक्षण करू. यात एक रेडा दर्शविला आहे. हा रेडा म्हणजेच महिष! महिष म्हणजेच महेश! म्हणजे हा शंकराचा ग्राम्य स्वरूपातील टाक आहे. आता थोडे पुराण कथेकडे वळू. 
देवीने जेव्हा महिषासुर मर्दन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले. चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता. शेतकी जीवनात पशूचे महत्व खूप आहे. म्हसोबा हा खरेतर म्हैसोबाचा अपभ्रंश आहे हे टाकाचे चित्र पाहून लगेच लक्षात येते. 
म्हसोबा हा शेतात विहिरीजवळ असतो. त्याचे ठराविक क्षेत्र असते. त्या क्षेत्रात सर्प वावर करतो असा समज प्रचलित आहे. म्हसोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो हाही दुसरा अर्थ यातून निघतो. म्हसोबाला अमावास्येला नारळ फोडण्याची प्रथा आहे. म्हैस, सर्प व शेतात  निर्जन ठिकाणी वास्तव्य हे हा देव शिव-शंकर असल्याचेच पुरावे आहेत. 


 खंडोबा हे सर्वपरिचित लोकदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहेत. तरीही खंडोबाचा काळ व इतिहास बुचकळ्यात पाडणारा आहे. खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो. कारण शेळ्या-मेंढ्या, लोकर, धनगर, कुत्रा ह्यांना खंडोबाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपारिक भक्त आहे. जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्याकाळातील इतिहासाशी ह्या बाबी संबंधित आहेत. 
जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे. तर पालीचा (किवा इतर ठिकाणचे) खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना दर्शविला जातो. 
आता आपण टाकाचे निरीक्षण करू. टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो. खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे. पती-पत्नीचे सौभाग्य, एकमेकांवरील विश्वास ह्यात वृद्धी करणारी ही देवता आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्वाचे आहे हा संदेश इथे दिला  जातो. विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्व हेच आहे. पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो. 
खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व फार आहे. कुत्रा हा विश्वासाचा प्रतिक म्हणून या टाकात दिसतो. पती-पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याच्या यामागील उद्देश आहे. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो तो पाच दिवस असून चंपाषष्ठीला उठतो. तसेच सोमवती अमावास्या, श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात. भांडार व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे. हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीकारिता वापरला जातो. त्यामुळे पतीपत्नी यांनी स्वच्छ, सुंदर नीटनेटके राहावे हा संदेश मिळतो. 


 महिषासुरमर्दिनी हा टाक सर्वत्र आढळतो. स्त्रीसात्तक व मातृपुजक समाज एकेकाळी अस्तित्वात होता याचा हा पुरावा आहे. रेडा किवा महिष हा स्वतः शिव आहे. संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असता उन्मत्त बनतो तेव्हा स्त्री त्याला जाग्यावर आणते हा संदेश वरील प्रतिमा देत आहे.  
ही देवीची मुद्रा कधी चार तर कधी आठ हातांची असते. जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी. 
देवीने एका हाताने रेड्याची जीभ पकडली आहे. याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत हा संदेश दिला गेलेला आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी संसाराचे रक्षण करते असा अर्थ निघतो.
महिषासुर मर्दनाची कथा दुर्गा सप्तशती मंत्रात दिलेली आहे. 
देवीची अनेक रूपे आहेत. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत व या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक देवी घरात कुलदेवता म्हणून पुजली जाते. तथापि पूर्वी दळणवळणाची साधने अपुरी होती, जंगले इत्यादीमुळे गावाच्या जवळच आपापल्या कुलदेवीचे मंदिर स्थापन केले जात होते. लोक त्यालाच आपले कुलदैवत समजू लागले. तरीही आपले कुलदैवत माहित नसेल तर या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कुलदैवत मानून चालण्याने काहीही अनर्थ होत नाही. सोनारकामात इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्याने पूर्वी एकाच साच्यातून मूर्ती बनवल्या जात. पुढे कोल्हापूर, वणी, अंबेजोगाई, एकविरा असे वेगवेगळे टाक सहज बनविता येऊ लागले व आपले कुलदैवत नेमके कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागला. पण पूर्वी चार किवा आठ हात असलेली महिषासुरमर्दिनी हीच मूळ देवी  असल्याचे दिसून येते.
अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्वाचा कुलाचार आहे. तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे. विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे. 
जागरण गोंधळ हे ग्राम्य जीवनातील विवाहविधीच आहेत. आता वाजतगाजत लग्न करण्याच्या प्रथेमुळे हे विधी मागे पडत गेले. विवाह विधीत त्यामुळे अमुलाग्र बदल घडला आहे. आता लोकांना दोन्ही करावे लागते ही मोठी गम्मत आहे. 
हा देवांचा रक्षक अर्थात वीर. मंदिरात द्वारपाल तसा घराला जसा वॉचमन असतो तसे याचे स्वरूप. हा बरेचदा तलवार व ढाल धारण केलेला असतो. काही घरात हा धनुष्य-बाण धारण केलेला असतो. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र हा आपले व देवांचे रक्षण करते असा अर्थ निघतो. घरातील भांडी-कुंडी व चार फुल्या व गोल चित्रात दिसतात.  चार फुल्या व गोल म्हणजे आपले देव आहेत म्हणून हा आपल्या देवांचे रक्षण करतो.
तर असे आपले पूर्वापार चालत  आलेले देव आहेत.  याशिवाय बऱ्याच घरात  विविध प्रकारच्या मूर्ती व टाक आढळतात. ते खालीलप्रमाणे,
१) बनेश्वरी-वनशंकरी - समोरून सिंहावर आरूढ झालेली आठ हात असलेली देवी.
२) काळूबाई- फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेला.
३) अन्नपूर्णा- हातात पळी घेतलेली.
४) महिषासुरमर्दिनी- अष्टभुजा स्वरूपातील.
५) रेणुका- फक्त मुखवटा व दोन अर्धचंद्राचा मुकुट.
६) एकविरा-फक्त मुखवटा, एक बाण, व मोठे गोटे डोंगराचे प्रतिक.
७) अंबेजोगाई- फक्त मुखवटा, अडवा चेहरा व हनुवट वर गेलेली. 
८) अष्टभुजा सिन्हावरची.
९) यल्लम्मा- दहा हात व डोक्यामागे चक्र.
१०) जोखाई- जानाई सारखीच फक्त कणीस व मुल बरोबर नसते.
११) लक्ष्मी - मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना.
१२) ज्योतिबा- घोड्यावर स्वार, समोरून व हातात तलवार.
१३) नवनाथ- ९ देव.
१४) मुंजोबा- उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी.
१५) भैरोबा - घोड्यावर एकटा व हातात तलवार.
१६) अष्टभुजा वाघावारची वाघजाई.
१७) वीर- धनुष्य-बाणधारी 
१८) गणपती.
१९) शिव पार्वती. 
२०) वणी सप्तशृंगी १८ हात असलेली.
२१) औंधची देवी. 
२२) घोड्यावरची देवी. 
२३) कोल्हापूरची महालक्ष्मी 
२४) माता-पिता 
२५) साती आसरा- सात देवी व मगर किवा पशु.

वरील टाकांचे फोटो हवे असल्यास मला फेसबुकवर इनबॉक्समध्ये संपर्क करा.

मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी 

https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared 

गणपती बाप्पा मोरया 

जय शिवाजी जय भवानी  











Monday, 14 August 2017

जात व आडनावे..... पुढे चालू

तर मागील भागात आपण पहिले कि, शांततेच्या काळात भरभराट होती. ऐसपैस शेतजमीन होती, दूधदुभते मुबलक होते. सर्व लोक हे गुण्यागोविनादाने नांदत होते. 
इस पूर्ण तीनशे वर्षांपूर्वी जबर महत्त्वाकांक्षेने अलेक्झांडर बाहेर पडला त्यानंतर सहाव्या शतकात अखतात इस्लाम धर्म उदय झाला. नंतर इस्लामी शासक साम्राज्यविस्तार व लूट करण्यासाठी बाहेर पडू लागले. काही जीवनावश्यक गरजा पुढे ठेऊन या धर्माची मांडणी केलेली दिसते.  त्यामुळे मोठा जनसमुदाय एका छत्राखाली एकटवला. त्यात जाण्याच्या ह्या लेखाचा उद्देश नाही. पण पुढे ह्या धर्माचा प्रसार होत तो भारताच्या तात्कालिक सीमेपर्यंत पोचला. तसा भारतदेश हा हिमालयामुळे मंगोल आक्रमकांपासून सुरक्षित राहिला होता. वायव्येला असलेले डोंगराळ भाग, राजस्थानचे वाळवंट व महाकाय सिंधूनदी ह्यामुळे ह्या प्रदेशाकडे कोणाचे लक्ष लगेच गेले नाही. खैबरमार्ग जसजसा बनत गेला तसे परदेशी लोक भारतात येऊ लागले.

आक्रमक टोळ्या सुरवातीला रोखणे अशक्य झाले होते याची अनेक उदाहरणे देता येतील. सौराष्ट्र सोमनाथ मंदिर हे अगदी सर्वांच्या डोळ्यासमोर लुटले गेले. कारण एकच होते कि समाज हा शिथिल आणि सुस्त होता. अशी आक्रमणे काही महिने, काही वर्षे अशा अंतराने नेहमी होऊ लागली तेव्हा जनजीवन बदलू लागले. त्यात दोन महत्वाचे बदल झाले. पहिला बदल म्हणजे लोक स्थानांतर करू लागले. उत्तरेकडील लोक नेहमीच्या लुटीला कंटाळून कमी सुपीक अशा दक्षिणेकडे स्थानांतरीत होऊ लागले. दक्षिणेकडील प्रदेश हा अधिक डोंगराळ, जंगले असलेला, दुष्काळी असा होता. या काळाच्यापूर्वी मानवाने दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थलांतर केले होते असे पुरावे मिळतात. ते शांततेच्या काळातील आहेत.
दुसरा बदल म्हणजे समाज वरील आक्रमणांचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवू लागला. पहारा आणि रक्षण करण्यासाठी समाजातील एक फळी पुढे येऊ लागली. होणारी आक्रमणे तारीख/वार सांगून होत नसत त्यामुळे सदैव तत्पर राहणे गरजेचे होते. त्यामुळे एक नवीन जात  जन्माला आली. 
ती जात होती लढवैय्ये. हे लढवैय्ये लोक सर्व समाजातून पुढे आले. पूर्वीचे ४ वर्ण म्हणजेच ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शुद्र हे केव्हाच नष्ट झालेले होते. कारण  त्यांची कधी  गरजच पडली नव्हती. चतुर्वर्ण पद्धतीत जे चार वर्ण होते ते कधीच इतिहासजमा झाले होते. राहिले होते ते फक्त शेतकरी, पशुपालक आणि कारागीर! आता ह्याच समाजातून लढवैय्ये पुढे आणायचे होते. तेही मोठ्या संख्येने कारण समोर जो शत्रू उभा होता त्याच्यात जात नव्हती. 
समाज अशाप्रकारे स्वतःमध्ये बदल घडवून आणत होता. साहजिकच उत्तरेकडील प्रदेशात हा बदल आधी घडला. यादव आडनाव असलेले एक गाव असेल तर त्यात ७० ते ८० टक्के यादव लढवैय्ये बनले. शिल्लक राहिलेले २० ते ३० टक्के हे शेतकरी, कारागीर बनले. लढवय्या लोकांना अनेक मुभा समाजाने स्वतःहून दिल्या. शेतीच्या जमिनी कसायला इतर लोकांकडे असल्या तरी वंशपरंपरागत मालकी लढवैय्या माणसाची होती. संख्या वाढवण्यासाठी बहुपत्नीत्व, दासी अशा मुभा मिळाल्या. यापूर्वी एकपत्नी राम हा समाजाचा आदर्श होता हेही इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे. 
इतिहासाच्या गदारोळात हा मध्यकालीन समाजव्यवस्था इतिहास कायम गोंधळ निर्माण करीत राहतो. त्याचे नेमके स्वरूप काय होते हे तपासणे गरजेचे आहे. 
एक साधा विचार करा कि आज विज्ञान प्रचंड प्रगती करीत आहे, बऱ्याच अवघड बाबी आज विज्ञानाने साध्य करून दाखवल्या आहेत ज्या एकेकाळी अशक्य वाटत होत्या. त्यामुळे माणूस पूर्वी ज्या देवाला सर्वशक्तिमान समजून शरण जात होता तो आज विज्ञानाला शरण जात आहे. माणूस असा विचित्र प्राणी आहे कि स्वतःचा स्वार्थ असल्याखेरीज कशाला किती महत्व द्यायचे हे नेहमी ठरवत असतो. जेव्हा युद्धे अजिबात होत नव्हती तेव्हा आपल्या समाजाला चार वर्ण व त्यांच्या महत्तीची अजिबात गरज वाटली नाही. शांततेच्या काळात हे चार वर्ण नष्ट झाले. जेव्हा परकीय आक्रमणांच्या काळात लढणाऱ्या समाजाची गरज निर्माण झाली तेव्हा लढवैय्या जाती निर्माण झाल्या. त्यांनी मग आम्ही पूर्वीचे क्षत्रिय कुलीन आहोत इत्यादी मिथकांचा आधार घेतला. पण त्यात तथ्य नाही. 
दुसरा मुद्दा हा कि जेव्हा वर्णव्यवस्था होती तेव्हा चार वर्ण मानणारे यांची संख्या किती होती? तर भारतातील जैन, बुद्ध, शैव, शाक्त, वैदिक व इतर अनेक पंथांचा विचार केला तर फक्त वैदिक यज्ञ करणारे लोक चार वर्ण मानीत होते. म्हणजे हि संख्या फारच क्षुल्लक होती. त्यातही प्रत्यक्ष कृती व युद्धे करणारे क्षत्रिय फक्त एक चथुर्ताश! शत्रूच्या सैन्यासमोर ही क्षत्रियांची संख्या अगदीच तोडकी होती याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जेव्हा लुटालुटीचे अनेक फटके बसले व समाजात लुटीला विरोध करायची मानसिकता निर्माण झाली त्यावेळी वैदिक तत्वज्ञानाची नव्याने जाहिरात सुरु केली गेली. पुढे वर्ण व्यवस्थेतून जातीव्यवस्था निर्माण झाली हा भ्रम पसरला. 
आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळू. जेव्हा आपण मी कोण आहे, माझे पूर्वज कोण? माझे दैवत कोणते? या बाबींचा शोध घेतो तेव्हा वरील सर्व मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे आहे. एकाच आडनावाचे कुळ हे एकच असू शकते. त्यांचे मूळ गावही एकच असू शकते. एकच गाव व आडनाव असेल तर दैवत एकच असण्याची शक्यता फार जास्त असते. 
बऱ्याच अडनावांचा कुलवृत्तांत लिखित स्वरुपात आढळतो. ज्या ज्या पिढ्यात आर्थिक स्थिती सत्ता हातात होती तेव्हा ह्या आडनावाच्या लोकांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले. हिंदूंना देवांची कमी नाही. देवदेव करायला गेले तर एक जन्म अपुरा आहे. जागोजागी अनेक मंदिरे व त्यांचे अवशेष आज आढळतात. त्यांचा इतिहास हा काळाच्या अंधारात गायब झाला आहे. तर बरेच ठिकाणी त्यावर पुराणकथांचे थर जमा झाले आहेत. त्यात राम सीता, शिव-पार्वती ह्यांच्या एकसारख्या स्वरूपाच्या कथा बरेच ठिकाणी आढळतात. खंडोबा, शंकर, ग्रामदैवत भैरोबा, ग्रामदेवी किवा मातृदेवी जोगेश्वरी (जानाई), देवीची विविध रूपे, म्हसोबा, आषाढात पुजली जाणारी लक्ष्मी, जलदेवता असे अनेक देव ह्या मधल्या काळात आपल्या देवघरात दाखल झाले. देव पंचायतन म्हणजे सूर्य, देवी, शिव, विष्णू, आणि गणपती यांना मानणारा एक पंथ आहे. 
ह्या देवांचे कोडे उलगडण्यास आपल्याला आपला अंधारात दडलेला इतिहास तर्काच्या आधारावर घासून पहिला पाहिजे.त्यावर पुढील काही लेखात आपण चर्चा करू.
समाप्त.









  

Friday, 11 August 2017

जात व आडनावे

जातीवरून आडनाव शोधणारे लोक जागोजागी आढळतात. पण जातीचा आणि आडनावाचा तसा काहीही संबंध नाही. याचा रंजक इतिहास आपण थोडक्यात पाहणार आहोत. 
यासाठी आपल्याला इतिहासात फार मागे जावे लागेल. आद्य माणूस हा सर्वात पूर्वी पशुपालन करीत होता व भटके जीवन जगत होता. पशूंच्या मदतीने जंगले नष्ट करून मानवाने शेतीसाठी योग्य जमीन बनवायला सुरुवात केली. त्यावेळी मनुष्यवस्ती अतिशय तुरळक होती हे नक्की. पुढे लहान खेडी आणि गावे निर्माण झाली. पण मनुष्य मोठे अंतर कापून दुसऱ्या वसाहतीवर आक्रमण करू शकेल अशी प्रवासाची साधने त्याच्याकडे नव्हती. मोठे अंतर कापून केलेले सर्वात प्रथम आक्रमण हे ग्रीक राजा अलेक्झांडर याचे नोंदले गेले आहे. त्याच्या आधी १००० व नंतरच्या १२०० वर्षात अशा मोठ्या कुठल्याही आक्रमणाची नोंद इतिहासात नाही. 
असे आक्रमण का होते याचाही विचार इथे करणे गरजेचे आहे. आक्रमणाची दोन प्रमुख कारणे दिसतात

१) साम्राज्यविस्तार 
2) जीवनावश्यक वस्तू यांची लुट.

वरवर साम्राज्यविस्तार हे कारण जरी दिसत असले तरी मूळ उद्देश जीवनावश्यक वस्तू, स्त्रिया, पशू यांची लुट हेच आक्रमण करण्याचे कारण दिसते. मानवांची संख्या वाढत गेली कि जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा निर्माण होतो आणि आक्रमण करावे लागते.
असा आक्रमण करण्याचा प्रसंग २२०० वर्षाच्या प्रदीर्घ काळात फक्त एकदाच आला हे लक्षात घेण्यासारखे आहे. याचा अर्थ इतर सर्व काळात लोक आपापल्या जागी आहे त्या साधनसंपत्तीत सुखात जगत होते.

आता आपण रामायण महाभारत काळाकडे वळू. हा काळ नक्की कुठला हेही ठामपणे कुठेही सिद्ध होत नाही. हा बहुतेक शांततेचा काळ होता इतकेच आपण समजून पुढे जाऊ. रामायण काळात स्वतः राजा राम हा सूर्यवंशी राजा होता. तर श्रीकृष्ण हा यदुवंशी होता. रामाच्या सुर्यवंशाचे पुरावे पुढे सापडत नसले तरी श्रीकृष्णाच्या यदुवंशाचे पुढे आडनाव यादव व आत्ताचे नाव जाधव सर्वत्र आढळते.
श्रीकृष्णाने आपल्या यदुवंशीय लोकांचे नगर वसवले असे काहीसे इतिहासात सापडते. हे जर उलट तपासले तर असे लक्षात येईल कि एकाच वंशाचे लोक (एकच आई वडील असलेले) एका गावात स्थाईक झाले व त्या वंशाचे नाव त्यांनी सर्वांनी धारण केले. मग अशा अनेक लोकांचे नगर बनले इत्यादी. म्हणजे श्रीकृष्णाने अशा यादवांच्या गावांना एकत्र आणून नगर स्थापन केले असा अर्थ होतो.  नगरात गावात एकाच आडनावाचे लोक वेगवेगळे व्यवसाय करीत होते हेही पुढे ओघाने येतेच. वेगवेगळे व्यवसाय असल्याने त्यांच्या जाती सारख्या नव्हत्या.

रामायण व महाभारत हे ग्रंथ आपले श्रद्धास्थान आहे. पण नक्की ही युद्धे इतकी जोरदार लढली गेली का? त्यासाठी युद्धातील सैनिकांच्या संख्येचा विचार करू. श्रीकृष्णाचे "फार मोठे" यादव सैन्य कौरवांच्या बाजूने लढले. आज अगदी उत्तरप्रदेश बिहारचा विचार केला तरी यादव आडनावाची टक्केवारी एकूण लोकसंख्येच्या १५ ते २० टक्के इतकीही नाही. म्हणजे त्याकाळी हीच संख्या काही हजारात असेल इतकेच अनुमान निघू शकते. लोकसंख्या गेल्या शतकात झपाट्याने वाढली. महाभारत हे युध्द कुटुंबातील वादसदृश टोळीयुद्ध होते इतकेच. इतर आडनावाचे वंशाचे फार लोक त्यात सहभागी नव्हते.सहभागी होते ते फक्त कौरव व पांडव.
आता त्यावेळी वापरल्या गेलेल्या शस्त्रांचा विचार करू. धनुष्यबाण हे शस्त्र फारतर १० मीटर इतक्या लांबीवर मारा करू शकते. बाणाने मुंडके उडवणे हे शास्त्रीय दृष्ट्या तपासले तर हास्यास्पद आहे हे सहज लक्षात येईल. त्याने माणूस फक्त जखमी होऊ शकतो. चक्र हे अस्त्र फारतर एकदा फेकून मारल्याने जखमी करू शकते पण ते उडत जाऊन परत येऊ शकते हे शक्य शास्त्रीयदृष्ट्या तपासले तर शक्य नाही. पण तेच चक्र शत्रूच्या हाती लागले तर त्याचा उलटा प्रहर सहन करावा लागू शकतो. 
भाला-त्रिशूल ही अस्त्रे प्रभावी असली तरी एकावेळी फक्त एकाचाच संहार करू शकतात. व तत्कालीन धातुकामाचा विचार करता फार धार नसलेली शस्त्रे फक्त जखमी करू शकत असतील हे सत्य लक्षात येते. तलवारीचे सुद्धा तसेच आहे. 
थोडक्यात काय तर युद्धातील विजय हा शस्त्रांवर अवलंबून नसून सैन्याच्या संख्येवर अवलंबून आहे हे स्पष्ट होते. आता पुढचा प्रश्न हा कि तेव्हा खरेच हि भयंकर युद्धे झाली कि नुसते शक्तीप्रदर्शन केले गेले? 
युद्धे होऊन नष्ट झालेल्या रथ, शस्त्रे, मानवी सांगाडे यांचे कोणतेही अवशेष आजवर देशात कुठेही सापडले नाहीत. याचा अर्थ हि युद्धे इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली याला कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही. हारले कि मारले गेले हे निश्चित नाही. हारले पण मारले असा इतिहास लिहिला जेत्त्याकडून लिहिला जाऊ शकतो.त्यातअनेक वर्षांचा अपभ्रंश जोडला तर हे उघड होते.   
समाजाला जोवर जीवनावश्यक वस्तू अपुऱ्या पडत नाहीत तोवर तो युद्धाला उतरत नाही हे महत्वाचे तत्व इथे तपासून बघावे लागते. पिकपाणी उत्तम असताना सगळे मजेत जीवन जगत असताना ही युद्धे समजा झाली असतील तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या संपत्ती, पत्नी अधिकार यासाठी सर्वसामान्य माणूस या युद्धात स्वताच्या जीवावर उदार होऊन उतरणे शक्य आहे का? त्रयस्थ माणूस फारतर दोन्ही पक्षांची समजूत काढण्याइतपत सहभागी होऊ शकतो. त्यामुळे या युद्धांचा अन्वयार्थ एक सांस्कृतिक ठेवा जो पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगताना वाढत व अपभ्रंशीत होत गेला इतकाच आहे. 
दसरा हा सण साजरा करताना आपण तांदुळाचा दैत्य करून कापतो तसा काहीसा हा प्रकार आहे.

थोडक्यात सांगायचा मुद्दा हाच कि ह्या काळात व मागील व पुढील काळात जी युद्धे लढली गेली ती आपापसातील युद्धे होती. पण ती जीवनावश्यक वस्तूंची लुट करण्यासाठी केली गेलेली धाड-सदृश्य युद्धे नव्हती. सगळे समाज गुण्यागोविंदाने नांदत होते. ज्याची राजकीय आकांक्षा मोठी होती तो त्याच्या नगरातील सगळ्यांचेच (म्हणजे पगारी लढवैय्ये व कारागीर) सैन्य उभारून नुसता उभा राहिला तरी जो संख्येने मोठा तो विजयी व संख्येने कमी तो पराजित असा निकाल लागत होता. इतिहास हा नेहमी जेता लिहित असतो त्यामुळे पुढे ते युद्ध कसे अधिकाधिक भयाण होते हेही लिहिले गेले. पण ह्या युद्धाचा मूळ उद्देश काय हे लक्षात येतच नाही.

हा उहापोह करायचे कारण हेच कि युद्धामुळे जातीसंस्था निर्माण झाल्या. १) युद्धासाठी एकत्र केले गेलेले लढवैय्ये लोक यांची एक जात, 2) त्यांना अन्न पुरवणारे शेतकरी यांची दुसरी  जात व ३) इतर वस्तू व तांत्रिक सेवा देणारे हि तिसरी जाती, अशा प्राथमिक जाती निर्माण झाल्या.
याचा अर्थ आपला हा मध्ययुगीन समाज शांततेत धनधान्याची भरपूर रेलचेल असलेले जीवनमान जगत होता. त्याला कुठल्या आक्रमणाची कसलीही तोशीश लागली नव्हती. मग इतक्या कट्टर तेव्हा निर्माण झाल्या होत्या का?

आत्ता आपण पुढील काळाकडे वळूया. हा काल होता इस्लामी आक्रमणाचा. इस्लामी आक्रमणे सुरुवातीच्या फार मोठ्या काळात हि धाडी आणि लुटालूट करण्यासाठी केलेली असत. त्यांचा मुळ उद्देश जीवनावश्यक वस्तूंची लुट हाच होता. अशी लुट करण्यास सुरुवात मुहमद बिन कासीम याने केली. त्याने अनेक हल्ले करून मोठी संपत्ती, दागिने, पैसा, सोने चांदी, स्त्रिया, गुलाम पशु हे सगळे लुटून एकदा नव्हे तर अनेकदा नेले. पुढे गझनी, अब्दाली तैमुर यांनीही लुट केली व निघून गेले. इथे राज्य स्थापन केले नाही हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.
परकीय लुट करायला आले असता आपण आपले शांत जीवन जगात बसलेले होतो. असे संकट येणार आहे याची अजिबात खबर समाजाला लागलेली नव्हती. अचानक कित्येक लाखांचे सशस्त्र सैन्य थोड्या अंतरावर येऊन धडकते तेव्हा धावाधाव सुरु होई. 
आपला समाज अजगरासारखा पसरला होता. परकीय आक्रमणाला उत्तर देण्यास अजून त्याने काहीच पवत्रा घेतला नव्हता. 
पुढे आपल्या समाजाने कसा पवित्रा घेतला आणि जाती कशा निर्माण झाल्या हे पाहू.
तोवर शुभ रात्री!!
क्रमश:


मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी 

https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared 

गणपती बाप्पा मोरया 

जय शिवाजी जय भवानी