मागील लेखात आपण सेलिब्रिटी लोकांच्या कुंडल्या तपासल्या. सगळे ज्योतिषी अनेक कुंडल्या गोळा करून हेच करत असतात. "ये बहुत नाइंसाफी है" सामान्य जणांना काही किंमतच नाही मेली. म्हणून आता मी दोन सामान्य जातकांच्या कुंडल्या तुमच्यासमोर उघडणार आहे.
हे करायचे खरे तर मी टाळणार होतो कारण बरेच लोक मग आपली स्वतःची कुंडली काढणार. आजकाल कुंडलीचे गणित मांडणे खूप सोप्पे झाले आहे. अनेक apps फ्री मध्ये मोबाईल मध्ये लोड करता येतात. अगदी राजे-महाराजेंच्या निघत नव्हत्या त्या षडवर्ग कुंडल्या आज एका क्लिकवर काढता येतात. विंशोत्तरी, योगिनी, चर, चक्र दशा काय पायजे ते सेकंदात मिळते आहे.
आज बरीच मोठी माहिती अंतर्जालावर उपलब्ध होत आहे. मग एखादा जातक स्वतःची कुंडली मांडून अनेक तर्क करू लागतो आणि स्वतःची कुंडली अगदी टुकार प्रकारची आहे असे त्याला वाटू लागते. आणि त्यापुढे तो प्रयत्न करणे सोडून देऊ शकतो. हे सर्वात वाईट आहे.
आपण जेव्हा सेलिब्रिटी कुंडल्या तपासल्या तेव्हा काही मोजके ग्रह चांगले असल्याने ते लोक कसे खास बनले हे आपल्या लक्षात आलेच असेल. आज जगात प्रत्येक सेकंदाला कित्येक बालके जन्माला येतात पण सगळ्यांचे प्रारब्ध सारखेच असते असे नाही हेही विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे गणितात जसे अचूक उत्तर मिळते तसे ग्रह तारे भविष्य हे अचूक उत्तर देतात हे आधी डोक्यातून काढून टाकले पाहिजे.
उदाहरण द्यायचे झाले तर, समजा जोराचे वादळ-वारे सुटले आहे, त्यात जे उंच वृक्ष आहेत ते कोसळून पडतात पण लहान झाडे तग धरून राहतात. तसेच ग्रह तारे यांचे परिणाम मोठ-मोठ्या व्यक्तिंवर अधिक होतात, पण सामान्य लोक अशा स्थितीत तग धरून राहू शकतात.
दुसरे महत्वाचे असे कि, ग्रह ताऱ्यांचा प्रभाव हा सर्वत्र असतो. एखाद्या कढईत शेंगदाणे भाजायला टाकले तर काही शेंगदाणे खास आहेत म्हणून त्यांना कमी धग लागते असे होत नाही.नियतीचा मारा सगळ्यांना सहन करावा लागतो.
त्यामुळे ज्योतिष्य हे अचूक गणित नाही. ते फक्त एक शक्याशक्यता दर्शविणारे शास्त्र आहे. जो विश्वास ठेवतो त्याला काही चांगले वाईट संकेत नक्की मिळतात. ज्योतिष्य हे राजाला (नेतृत्व करणारा) विशेष महत्वाचे असते. शेतकरी, कष्टकरी ह्या लोकांना ज्योतिष्य महत्वाचे नाही असा एक प्रवाद केला जातो तो पूर्णतः चुकीचा आहे. चांगले वाईट संकेत, शकून अपशकून हा एक स्वतंत्र विषय आहे त्यावर आपण एका वेगळ्या लेखात चर्चा करू.
तूर्तास खाली दिलेल्या दोन पत्रिका पहा.
जातक क्रमांक -१ ह्याची जन्मकुंडली असामान्य दर्जाची आहे. चक्क ३ ग्रह उच्च राशीला आहेत. वयाची अडतीशी याने ओलांडली आहे. घर, गाडी संसार सगळे व्यवस्थित आहे. वास्तविक पाहता फक्त जन्मकुंडली पाहून हा कोणीतरी खास सेलिब्रिटी असावा असा भास कोणाही ज्योतिष्यास होऊ शकतो.
पण वस्तूस्थिती तशी नाही. याचे नोकऱ्या बदलणे सारखे चालूच असते. व्यवसाय की नोकरी ह्या तिढ्यात हा अजून अडकलेला आहे. हे असे का होते आहे हे जाणून घेण्यास ह्या जातकाची नवमांश कुंडली पाहणे महत्वाचे आहे.
वर जातकाची नवमांश कुंडली दिलेली आहे. ह्यात एकही ग्रह उच्च नाही. जो शुक्र जन्मकुंडलीत उच्च आहे तो नवमांश कुंडलीत नीच क्षेत्री गेलेला आहे.
याचे अगदी फसवणारे ग्रह आहेत. हे आपल्या सहजासहजी लक्षात येणार नाही.
पुढे आणखी महत्वाचे हे आहे कि, जे ग्रह ह्या जातकाला चांगली फळे देणार असे वाटते नेमके तेच ग्रह ती फळे देत नाहीत.
याउलट जे ग्रह अजिबात चांगले दिसत नाहीत तेच ग्रह ह्याचे भले करत आहेत. असा हा अजब प्रकार पाहायला मिळतो.
जातक क्रमांक -२ ह्याच्या जन्मकुंडलीत दोन ग्रह उच्च आहेत. म्हणजे ह्याला सेलिब्रिटी पत्रिका म्हणणे योग्य आहे. पण नवमांश कुंडलीत गुरु हा ग्रह अचानक उच्च बनला आहे. गुरु लग्नेश व दशमेश आहे हे विशेष. जातकाचे वय फक्त ३२ आहे. गुरु लग्नेश असल्याने तो जातकाचे व्यक्तिमत्व अजून घडवत आहे. दशमेश असल्याने जातकाने अजून तरी एखाद्या महान कार्याला झोकून दिलेले नाही. पण भविष्यात नक्कीच तसे होऊ शकते.
पुढे हा जातक चांगली नोकरी मिळवू शकतो.
वरील दोन जातक हे सेलिब्रिटी नाहीत. तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक आहेत. रोजचा स्ट्रगल करत जगत आहेत. सेलिब्रिटी होण्यासाठी काही ठसठशीत चांगले ग्रह असणे जसे आवश्यक असते तसे त्या ग्रहांच्या दशा आयुष्यात येणेही आवश्यक असते. बरेचदा असेही होते कि पत्रिकेत खूप चांगले ग्रह असतात पण त्यांच्या दशा वयाच्या ७० ते ८० व्या वर्षी येतात किवा व्यक्ती "उपरवाले के पास" गेल्यावर येतात.ते काही कामाचे नाही.
त्यामुळे समय से पहले और भाग्य से अधिक.......................... हा नियम मनी चिंतावा...
No comments:
Post a Comment