Sunday, 28 May 2017

मी ज्योतिष्यशास्त्रात का घुसलो?

काळ झपाट्याने बदलत आहे, शिक्षणाने  समाजाचा शास्त्रीय दृष्टीकोन वाढत आहे. मी लहानाचा मोठा १९७० ते ९० च्या काळात झालो. त्याकाळी खेडोपाडी लाईट नुकतीच आली होती. इंटरनेट कम्प्युटर हे नव्हतेच,आत्ताचा सोशल मिडिया म्हणजे त्यावेळच्या पारावरच्या गप्पा!! पण तेही मोठी माणसे गप्पा मारत. आम्ही बच्चे कंपनी दिवस मावळला कि नाय नाय त्या विषयावर तारे तोडायचा प्रयत्न करत असू. तो बैलगाडीचा ग्रामीण समाज, कट्टर जाति-समाजव्यवस्था  ह्यामुळे त्यापूर्वी सुमारे ३००-४०० वर्षे लोक कसे असतील याचा साधारण अंदाज यायचा. शाळेत शिकवलेले विज्ञान हे रट्टा लावून शिकले जायचे. तकलादू इतिहास आणि देव-देवस्की, पुराण, आपला धर्म, भूत, प्रेत, चमत्कार यावरच चर्चेत जास्त वेळ जायचा. 
घराच्या बाहेर असताना मस्त चालायचे पण घरात आल्यावर काहीतरी गंभीर प्रकरण असल्याचा भास व्हायचा. व्यवसाय निट चालत नाही, कोणीतरी करणी केलेली असणार, मुलींची लग्ने जमत नाहीत म्हणजे काहीतरी बाहेरचा त्रास असणार. क्वचित वास्तुशास्त्र इत्यादीबाबत चर्चा चालू असायची. 
माझा गाव सासवड, एक तालुक्याचे गाव. एखाद्याच्या घरात काहीतरी अडचण आहे म्हटल्यावर गावातील लोक तोंड लपवत (कारण काही अडचण आहे हे सांगायची मोठ्या लोकांना लाज वाटते म्हणून) गावातील मांत्रिक, एखादा गुरु, अध्यात्मिक शक्ती प्राप्त झालेला बाबा, किवा ब्राम्हण गुरुजी यांच्या घरी अमावस्या पौर्णिमेला, गुरुवारी असे काही ठराविक दिवस हजेरी लावत. 
थोडी चांगली आर्थिक स्थिती असलेले लोक जिल्ह्याच्या ठिकाणी, किवा कोकणात, असे कुठे कुठे जात.
भूत-प्रेत बाधा याविषयी मी जे अनुभव घेतले ते पुढे कधीतरी विस्ताराने. आधी बाबा, गुरु आणि ब्राम्हण गुरुजींना निपटू. 
बाबा बरोबरच बाया सुद्धा असायच्या. अंगात येणे हा आपल्याकडील खास प्रकार. विशेषतः पौर्णिमेला अंगात येण्याच्या अनेक घटना मी प्रत्यक्ष पहिल्या आहेत. त्यानंतर अनेक लोक त्यांचे प्रश्न अंगात आलेल्या व्यक्तीला विचारतात. अशावेळी ती व्यक्ती वेगवेगळी उत्तरे देते. बहुतेक उत्तरे ज्या देवाशी-देवीशी संबंधित व्यक्तीच्या अंगात आले आहे त्याच्याशीच असतात.

अंगात आलेली व्यक्ती बरेचदा स्वतःचा मानसिक कंट्रोल विसरलेली असते व ती एका संमोहित अवस्थेत असते. प्रश्न विचारला असता जसे प्रश्न कुंडलीत उत्तरे मिळतात तशीच उत्तरे अंगात आलेली व्यक्ती देत असते. बरेचदा उत्तरांची भाषा सांकेतिक असते व ज्या व्यक्तीसंदर्भात उत्तरे दिली जातात त्यालाच त्यातील गुप्त बाबी माहित असतात. अंगात येणाऱ्या व्यक्ती ह्या खऱ्या व लबाडसुद्धा असू शकतात. अंगात येते हे दाखवल्यावर आपले महत्व वाढते असे वाटून बळेच अंगात आणणारे लोक भोंदू असतात. 
दिवसभर रांधा-उष्टी खरकटी काढा असे काम करणारी एखादी स्त्री जेव्हा तिच्या अंगात येऊन घुमू लागते तेव्हा तिचा त्यात काय स्वार्थ असू शकतो? 
सासवड येथे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात एक साधू आहेत. ते भिक्षा मागून पोट भरतात. पण विजयादशमीला जो भैरवनाथाचा उत्सव असतो त्यावेळी त्यांच्या अंगात येते. त्यानंतर ते तेथील दीड सेंटीमीटर जाडी असलेला लंगर (लोखंडी साखळी) एक किवा दोन झटक्यात तोडतात. त्यांचे हे अंगात येणे फक्त ५ ते १० मिनिटाचे असते. घुमने, लोकांची उत्तरे देणे असा प्रकार अद्याप झालेला नाही.
 
दुसरा प्रकार म्हणजे साधू, बाबा इत्यादी. हे लोक बरेच उपक्रम तुम्हाला करायला सांगतात. फलनिष्पत्ती काय हे त्या त्या काळानुसार ठरते. पण कोणी लक्षाधीश झाल्याचे आठवत नाही. तात्पुरते संकट दूर होते का हेही अनुभवास आलेले नाही. साधू बाबांचे महत्वाचे हे असते कि काही काळ ते खूप फिरत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथे लोकांना काय काय अनुभव आलेत व काय तोडगे सांगितले गेले याचा ते अभ्यास करतात. ते असे जे शिकेलेले असतात त्याचा उपयोग करून आपल्या भक्तांना मार्गी लावतात. 
बाबा, साधू हे साधारणतः मोठमोठी तीर्थे, कुलदैवताची पीठे अशा ठिकाणी फिरून येतात. एकतर  तिथे पोटाची सोय होते व ज्ञानंही मिळते. बहुतेक बाबा, साधू लोक त्यामुळे मुख्यता कुलदैवत, जादूटोणा, कारणी, भूतबाधा, पितृदोष, वास्तुदोष पैकी काहीतरी एक दोष आहेत हे सांगून मोकळे होतात. 
यातील कुलदैवत उपासनेकडे प्रवृत्त करणे हा एक चांगला उपक्रम आहे. अपघाती हा होईना तो हे बाबा/साधू सांगतात आणि बरीचशी संकटे दूर होतात. भूतबाधा/नजर लागणे हा विषय पुन्हा कधीतरी घेऊ. एखादा उतारा टाकून गरिबाचे किवा प्राणिमात्राचे पोट भरत असेल तर असा उतारा टाकून स्वतःची सुटका करून घेण्यात वाईट काहीच नाही. फेसबुकवर तुम्ही पंचपक्वान्न भरलेल्या ताटाचे फोटो टाकले तर कितीही श्रीमंत असलेल्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटतेच. त्यामुळे एखादे सुंदर मुल, जेवणाचे पदार्थ बाहेर खाणे इत्यादींना नजर लागू शकते.
 
तिसरा प्रकार म्हणजे गुरुजी. हा सर्वात महागडा आणि अवघड प्रकार आहे.समोर पत्रिका घेऊन ते बसलेले असतात. त्यातील अं-कि-ठं आपल्याला कळत नसतो. गुरुजींची गाडी ही एक्स्प्रेस-वे ला लागलेली असते. तिचे स्पीड १००-१२० चे असते. चंद्र-रास बघितली कि साडेसाती आहे का हे सर्वात प्रथम बघितले जाते. तिथे जर तुम्ही सापडलात तर तुमची रवानगी डायरेक्ट शनी मंदिरात तेही साडेसात वर्षांसाठी. काळे वस्त्र घाला, शनीला उडीद, लोह दान करा. मद्यपान, मांसाहार करू नका. चांगले कर्म करा वाईट काही करू नका.  च्यामारी... मग करू काय, कि काहीच करू नको कि काय? 

विवाह जमत/नोकरी लागत नसेल तर अमुक नक्षत्र/अमावस्या ई. ई. दोष आहे शांती करा. मग शांतीचा खर्च सुमारे ५००० व पुढे!!
 तुमचे सगळेच ग्रह बिघडले आहेत, सरळ नवग्रह शांती करून टाका. खर्च सुमारे १०००० व पुढे. गुरुजींची गाडी अफाट वेगाने सुटलेली असते. नको नको म्हणत तुम्ही खाली उतरायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट वरती जाल हे लक्षात ठेवा. 

समोरची पार्टी जर दांडगी असेल तर मग असे साधेसुधे उपाय करून चालत नाहीत. तिथे शत/सहस्त्र/लक्ष/कोटी चंडी/रुद्र याग करावा लागतो. खर्चसुद्धा दांडगा असतो. लाखभर रुपये खर्च करून चांगले होत असेल तर काय वाईट आहे हो?

ह्यात काहीतरी चुकतंय अस कुणालाच वाटत का नाही? श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको

डोळसपणे कधी पाहणार आपण? जुनी पोथी-पुराणे ह्यांना किती दिवस चिकटून राहणार? पोथ्या पुराणात जे दिलय, ते का दिलय हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारणार? ते किती कालबाह्य आहे हे आपण पाहणार कि नाही? कि बळेच सगळ्यांना एकच-एक नियम लाऊन ठोके घालणार?

वर्षफल/ क्षयदिन/करिदिन अनिष्ट दिवस, प्रतिकूल दिवस, शांती नक्षत्रे, शेतात नांगर धरण्यास मुहूर्त. साडेसाती, ग्रह कोणत्या पादाने आलाय, विषारी नक्षत्रे, गुरुबळ असणे नसणे, सोयर सुतक याशिवाय शास्त्रात बरेच काही आहे. पंचांग लिहिणारे नवीन काही बघणार आहेत कि नाही?

ज्योतिष्याची पुस्तके तर अफलातून असतात. जन्मकुंडलीत ग्रहांचे अंश न देता, गजकेसरी, लक्ष्मी चंद्र, चक्रवर्ती योग असे भारी योग असलेले लोक सायकलवर बिस्कीट विकत असतात. 
शनी-मंगळ अपघातयोग, गुरु-राहू चांडाळ योग असलेले लोक खरेतर मरण्याच्या लायकीचे असतात तरीही जगतात कसे बुवा? डॉक्टर लोक हे ना सगळ्या ढवळाढवळी करून लोकांना वाचवतात आणि आमचे शास्त्र फोल ठरवतात. हे बरोबर नाय. 

आम्ही अजिबात बदलणार नाही. जुने ते सोने. इंटरनेटवर आज सामान्य व मोठमोठ्या लोकांच्या कुंडल्या असतात त्यांचा संग्रह करून आम्ही अभ्यास करणार नाही. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी कधी व का झाल्या हे आम्ही लिहून ठेवणार नाही. जातक आला कि आमच्या मशीनमध्ये त्याला कोंबणार आणि सरळ करूनच बाहेर काढणार!! गोचर-एके गोचरचा पाढा आम्ही रट्टा लाऊन पाठ करणार!! 
त्यात प्रश्नकुंडली नावाचे एक हत्यार घेऊन बसलेले काही बाबाजी असतात. आला जातक कि मांड प्रश्नकुंडली. लग्नेश दशमेश योग जेव्हा होणार तेव्हा तुला नक्की नोकरी लागणार असे सांगून ते त्याला पाठवून देतात. अमेरिकेत आज बेरोजगार असलेला इंजिनिअर पेट्रोल पंपावर काम करतो, नोकरी मिळते सुद्धा. पण ती पेट्रोल पंपावरची!! तो जातक काही का करेना. माझी प्रश्नकुंडली तर बरोबर ठरली ना. ह्याचेच समाधान माणणारे महाभाग आपल्यात आहेत.  

परदेशात ग्रहगोल माणसावर काय परिणाम करतात याचा अभ्यास करण्याची जिज्ञासा आज उत्पन्न झालेली आहेच. माणसाचे जीवन संथ नसते. त्यात घडामोडी घडत असतात. म्हणजे त्याची काही कारणे आहेत हे आधी मान्य करायला हवे. अनेक प्रकारे माहिती जमवणे, ती व्यवस्थित प्रोसेस करणे आज सोपे झाले आहे. त्यावर निरीक्षणे करून नियम सिद्ध करणे हे कामही परदेशात चालू आहे. 
आपण विज्ञान क्षेत्रात असे संशोधन करत नाही तर ज्योतिष्य ह्या कर्मठ विषयात कधी संशोधन करणार? 
त्यातले त्यात श्री कृष्णमुर्ती  ह्यांनी नक्षत्र आधारित ज्योतिष्यावर  त्यांची पद्धत विकसित केली हे विशेष आहे. 
दुसरा एक गैरसमज असाही आहे कि ज्योतिष्यशास्त्र हे भारतीय सनातन बनावटीचे आहे, त्यामुळे ते इतर कर्मठ शास्त्राप्रमाणे कालबाह्य, थोतांड व जुनाट आहे. हा समज चुकीचा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पहिले तर पुरातन भारताचा ग्रीक  संस्कृतीशी जवळचा संबंध होता. सुमारे २००० ते २२०० वर्षापूर्वी  ग्रीक अलेक्झांडर भारतावर आक्रमण करून आला होता. त्यापूर्वी बरेच आधी हे शास्त्र आपल्याकडे ग्रीकांकडून आले. नंतर ते आमचेच अशी  मखलाशी आपण केली हा भाग पुढे येतोच. 
इतकेच काय इंडो-युरोपियन भाषा गट म्हणजे ग्रीक, लाटिन व संस्कृत ह्यात जे साम्य आहे तेही ह्याच सांस्कृतिक देवाण घेवाणीशी संबंधित आहे. त्यावर इतरत्र लेखन नक्कीच करेल. तूर्तास इतकेच!! 
तर असे हे आपले एक जागतिक दर्जाचे व पुरातन शास्त्र आहे, त्याच्या अभ्यासाची उत्कंठा निर्माण झाली आणि मी इकडे घुसलो. 


No comments:

Post a Comment