Wednesday, 13 January 2016

प्रतिकूल ग्रह: जप, शांती व दान

बऱ्याचदा जीवनात असे प्रसंग येतात कि अचानक प्रतिकूल गोष्टी घडू लागतात, अंगात उत्साहच राहत नाही, भयंकर निराशा येते. त्यामुळे पुढे देवावरचा विश्वास उडू लागतो. अश्या वेळी थोडे तपासले तर गोचरीचे ग्रह चांगले नसतात हे अनुमान निघते. पुढे दिलेले दाते पंचांगातील गोचरीच्या ग्रहांचे वर्णन वाचा,

सर्वात आधी गुरूचा विचार करूया, गुरु ज्या राशींना (चंद्र-राशी) ४-८-१२ वा येतो तेव्हा तो त्या राशीच्या लोकांना प्रतिकूल समजला जातो. सगळ्याच स्तरांवर अपयश येत राहते. अशा व्यक्तीला कसलाच उत्साह, इर्षा नसते मग अपयश येणे साहजिक आहे. गुरूचा अशुभस्थानी एकंदर वाईट परिणाम असतो व पीडा परिहारार्थ  जप, दान, पूजा इत्यादी करावे असे सांगितले आहे. त्यातले त्यात गुरूच्या राशींना गुरुबळ नसताना (म्हणजे ४-८-१२ स्थानी गुरु असताना) जास्त त्रास होतो. धनु राशीचा सचिन तेंडूलकर कधीकधी धावांचा पाऊस पाडत होता तर दुसरीकडे सलग कित्येकदा भोपळा देखील फोडू शकत नव्हता हे आपण पहिले. १-३-६-१० व्या स्थानात असणारा गुरुही इतका चांगला नसला तरीही जप, दान, पूजा यापैकी एक केल्याने आपली सुटका होऊ शकते असेही वर दिलेले आहे. 
आपण आत्ता सर्वात प्रतिकूल (४-८-१२) गुरुचाच अभ्यास करू. सगळ्यात सोपे म्हणजे काय तर दान करायचे. आता ह्या दानाच्या वस्तूमध्ये नेमका घोडा येतो. आता हा घोडा आणायचा कोठून? म्हणून मग मार्ग असा काढला जातो की, घोड्याच्या शेपटीचा केस किवा कणकेचा घोडा दान करावा. आहे कि नाही गम्मत. आजकाल गुरूच्या सुवर्णाची प्रतिमासुद्धा दिवसेंदिवस लहान होत चालली आहे. दानाच्या इतर वस्तू सामान्य माणूस कसातरी जमवू शकतो.  पण खऱ्या घोड्यासाठी कणकेचा घोडा हे काही त्याला पटत नाही.
आता पूजा/शांतीचा विचार करू, शांती करायची म्हणजे साहित्य लागते , दान/दक्षिणा आले त्याचा सगळ्याचा एकंदरीत खर्च ७ ते १० हजाराच्या घरात जातो. म्हणजे गाडी परत तिथे येउन थांबते. 
पुढचा मार्ग म्हणजे जप करायचा. पण जपाचा आकडा बघा किती आहे ते. सुमारे १९०००!. शिवाय हे पुढचे पान वाचा. हे धर्मशास्त्रीय निर्णय भाग -१ ह्या दाते पंचागावरील स्पष्टीकरणातील त्यांच्याच पुस्तकातील एक पान आहे. 

कलियुगात कुठल्याही मंत्राचा जप चौपट करावा असे सांगितले आहे. म्हणजे गुरु ग्रहाचा मंत्र १९००० x ४ = ७६००० वेळा म्हणायला हवा. कारण पंचांगातील मंत्रसंख्या ज्या ग्रंथांतून घेतली त्यात हाच आकडा दिलेला आहे, त्यामुळे पंचांगातील आकडा चौपट करून जप करायला हवा असा अर्थ होते. गुरु ग्रहाचा मंत्र खालीलप्रमाणे आहे,

 हा मंत्र व्यवस्थित म्हणायला १७ ते २० सेकंद लागतात. म्हणजे ७६००० वेळा म्हणायला ७६००० गुणिले २० = १५२०००० सेकंद लागतात,  म्हणजे ४२२३ तास, अगदी दिवसाला ८ तास मंत्रजप केला तर ५२८ दिवस लागतात. पण खरोखर गुरुजी तुमच्यासाठी असे जप करीत राहिले तर बाकीचे उद्योग कधी करणार?
मी हा प्रश्न अनेक गुरुजींना सहजच विचारला, तेव्हा दोन उत्तरे मिळाली. एक म्हणजे अम्ही जवळपास २०-२५ गुरुजी एकत्र बसतो, एकजण मंत्र म्हणतो व बाकीचे श्रावण करतात, म्हणजे तो २०-२५ वेळा जप केल्यासारखा होतो. ते तत्व पूर्वी खरे होते कारण मोठ्या संख्येने धार्मिक कृत्ये केली जात. पण आज पाहिले तर एका माणसाच्या शांतीसाठी रोज आठ तास याप्रमाणे २०-२५ गुरुजींना २३ दिवस बसावे लागेल. शक्य वाटते का? मंत्राजपाचा हजारी दर २५० ते ४०० रुपये आहे. तरीही हे गुरुजींना आत्ताच्या महागाईत परवडणार नाही. 
दुसरे म्हणजे एका गुरुजींनी सांगितले कि आम्ही सरळ एक लक्ष गायत्री मंत्र करून मोकळे होतो. एकतर गायत्री मंत्र हा ब्राम्हनाला पापक्षालनासाठी आहे. म्हणजे एखाद्याच्या जपासाठी दक्षिणा घ्यायची आणि ते काम प्रत्यक्ष केले नाही हे पाप झाले म्हणून १ लक्ष गायत्री करायचा!! यावर दुसरा प्रतिवाद गुरुजी हा करतात कि सूर्य हा ग्रहांचा राजा, सुर्य आणि गायत्री यांचा महत्वाचा संबंध. म्हणून सूर्यालाच प्रसन्न केले तरी चालते. आता ह्याला काय म्हणायचे? असो. 
तर ह्या सगळ्या पळवाटा आहेत, आपला व्यवसायही चालवा आणि लोकांना कार्य/शांती केल्याचे समाधानही लाभावे असा दुहेरी हेतू ह्यांत दिसतो. पण जो माणूस बुद्धिवादी असतो तो हे सगळे पाहून गोंधळून जातो. त्याला सगळे थोतांड वाटू लागते. किवा जे शक्य नाही ते करण्यात अर्थ नाही असा त्याचा मनाचा समज तो करून घेतो.

इथे मला थोडे पुढे जाऊन महत्वाचे सांगायचे आहे, मंत्र-जप हा मार्ग श्रद्धेशी निगडीत आहे. त्यामुळे तूर्तास मंत्राची संख्या गौण समजली तर आपण स्वतःही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. 
१) सरळ नेटवर जाऊन गुरु ग्रहाचा मंत्र डाऊनलोड करायचा, म्हणजे उच्चारात चूक व्हायला नको. 
२) हा मंत्र ज्या व्यक्तीला गुरु ग्रहासंबंधी अडचणी आहेत त्याच्या कोणत्याही नातेवाईकाने (जसे आई, वडील, भाऊ, बहिण) अथवा स्वतः संगीत माध्यमात चालू करून ऐकावा. जितके शक्य असेल तितक्या वेळा. मनात अमुक अमुक व्यक्तीचा त्रास कमी व्हावा हा संकल्प करावा. नाहीतरी गुरुजीही तसेच करून जप पूर्ण करीत असतात. उलट आपली श्रद्धा आणि भावना आपल्या नातेवाईकाशी जास्त उत्कट असते. 
शिवाय जे दान करायचे आहे त्यातील शक्य ते पदार्थ दान करावेत. गुरु ग्रहाच्यासाठी द्यावयाच्या वस्तू (घोडा सोडून) देऊन टाकावे. एखाद्या गरिबाला मंदिरात जाउन दान केले तर फारच उत्तम. (टीप १ वाचा)

हा उपाय मी आपणासर्वांबरोबर वाटतोय कारण याचा चांगला अनुभव अनेक लोकांना आलाय. बर्याचदा गरीब लोक अडचणीत असतात त्यांना काय उपाय सांगायचा, साधे साधे प्रश्न लोक घेऊन येतात, कित्येक लोकांचे घटस्फोट होण्याच्या मार्गावर असतात, पण कारणे कळत नसतात. उपाय करायला बर्याचदा येणाऱ्या खर्चामुळे आणि त्यामध्ये असलेल्या गोंधळामुळे लोक तयार होत नाहीत. पण थोड्या श्रमाने सगळे सुरळीत होते /होऊ शकते तसेच आत्ताच्या जीवनशैलीशी आपल्या प्राचीन शास्त्रांशी योग्य सांगड घातली तर त्यांची अप्रतिम फळे मिळतात, हे समजणे महत्वाचे आहे. 

 गुरु ग्रहाचे अशुभ स्थानातील दुष्परिणाम काय आहेत ते सांगतो,
१) विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होते, त्यांचे लक्ष न लागणे. आजारपण, मानसिक आजार तयार होणे. 
२) नोकरीत त्रास निर्माण होणे, नोकरी जाणे, व्यवसायात मंदी असणे. आळस निर्माण होणे. 
३) मुलींच्या बाबतीत विवाह न जुळणे, अपेक्षित किवा अजिबात स्थळे न येणे. 
४) विवाहीतांत वैवाहिक वाद, विसंवाद निर्माण होणे, संशय तयार होणे. 
शाळेत लक्ष लागत नाही म्हणून शाळा सोडून देणे, किवा पतीपत्नीत वाद झाले म्हणून घटस्फोट देणे/घेणे वाटते तितके सोपे नसते. ह्या तात्पुरत्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचे दूरगामी परिणाम फार भयंकर असतात. सगळ्यांची कारणे तितकीच गमतीची असतात.

आता थोडे शनीचे कारस्थान बघूया. शनि फक्त ३-६-१०-११ ह्या स्थानात शुभ असतो. तसेच १२-१-२ ह्या स्थानात असताना साडेसाती असते. २-४-५-७-८-९ ह्या स्थानात गोचरीचा शनि असताना फार शुभ फळे देत नाही. आपण आत्ता फक्त साडेसातीचा विचार करूया. 
१)साडेसातीत पूर्वी घडलेल्या घटनाचे परिणाम प्रकर्षाने दिसतात, जुनी, खुन्नस, मनातील आकस ह्यांनी प्रेरित होऊन इतर लोक साडेसाती असलेल्याला त्रास देतात. 
२)साडेसातीत माणसाचा चांगुलपणा, देव इत्यादींवरील विश्वास नाहीसा करणारी माणसे भेटतात, घटना घडतात. ३)माणूस खूप झटत असतो (व झटण्याची शक्तीही भरपूर असते जी विशेषतः गुरूच्या अशुभ वेळी अजिबात नसते) पण त्याला जे अपेक्षित असते ते होत नसते व दुसरेच काहीतरी घडत असते. ते चांगले किवा वाईटही असते, जरी चांगले असले तरी त्याला त्याची किंमत वाटत नाही. 
४)मनावर एक अज्ञात दडपण असते त्यामुळे तो निर्भीडपणे निर्णय घेत नाही. कोणावर सहजी विश्वास ठेवत नाही. कारण पूर्वी वाईट अनुभव त्याला आलेले असतात. एकूणच माणसाची सर्वच प्रकारची वाढ खुंटते. शनीला अनुकूल करण्यास म्हैस दान करावी लागते. तीही आजकाल कणकेची दान करतात !!. 

तर अशी असते साडेसाती, मानले तर भरपूर आणि देवावर श्रद्धा असेल तर काहीच वाईट होत नाही. 
शनीचा मंत्र देऊन हा लेख संपवतो. पुढे अशुभ जन्म-योग/करण/नक्षत्र ह्यांची शांती म्हणजे काय यावर आपण चर्चा करूया, अन्यथा दोन्हींचा एकत्रित विचार केला तर फारच मोठे बौद्धिक तयार होईल. त्यातही मोठ्या गमतीजमती आहेत ते पुढे आलेच!!
टीप-१: दान करताना ते सत्पात्री दान असावे असे म्हटले जाते. सत्पात्री म्हणजे चांगल्या माणसाला असा अर्थ होतो, भिकारी हा चांगला माणूस असतोच असे नाही. कारण भिकारी बनण्याआधी कदाचित त्याने अनेक पापे केलेली असू शकतात. म्हणून सत्पात्री दानाचा एक अर्थ विवेकाने वागणाऱ्या चांगल्या व्यक्तीला (ब्राम्हणाला) द्यावे असा होतो. दुसरा अर्थ ज्याला गरज आहे अशा माणसाच्या पात्रात दान करणे. ह्यात गरजू, भिकारी किवा ब्राम्हण हे सगळेच येतात. दुसरा अर्थ अधिक समर्पक वाटतो. 
टीप-२: कणकेची म्हैस किवा घोडा बनवून दान करणे ह्याला फक्त स्वतःचे समाधान इतकाच अर्थ आहे. नंतर ती कणकेची म्हैस किवा घोडा चक्क फेकून दिले जातात. त्याचा कोणालाही काहीही उपयोग होत नाही. 

No comments:

Post a Comment