Friday, 12 February 2016

भविष्यकथन

भविष्यकथन हा ज्योतिषशास्त्रातला सर्वांना हवाहवासा वाटणारा विषय आहे. समोर ज्योतिषी दिसला कि जन्मकुंडली पुढे टाकून किवां हात पुढे करून प्रत्येक जण भविष्य विचारतो. ज्योतिष्य सांगणारा सुद्धा अशावेळी फॉर्मात येतो आणि आपले जे काही ज्ञान आहे त्याच्या जोरावर भविष्य सांगायला सुरुवात करतो.
ज्योतिष्यशास्त्र बदनाम होण्याचे एक कारण हेही आहे कि बऱ्याच ज्योतिष्यांना भविष्यकथन या प्रकारची पूर्ण माहिती नसते. त्यात नाडीज्योतिष्य, हस्तरेषा आणि जन्मपत्रिका यावरून असे भविष्य कथनाचे प्रकार आहेत. हात पाहून भविष्य सांगणे हा तसा सोपा प्रकार आहे पण त्यात अचूक कालनिर्णय (१-२ महिन्याच्या अंतराने) करता येणे शक्य नाही. कारण हातावरच्या रेषा साधारणतः ६० ते ७० वर्षांचे आयुष्य दर्शवितात त्यात १-२ महिन्याची अचूकता शोधणे म्हणजे १ मिलीमीटर लांबीच्या रेषेचा अभ्यास करून भविष्य सांगणे असा होतो व ते फारच अवघड काम आहे. आत्ता आपण हस्तरेषा किवा नाडीभविष्य याचा विचार न करता फक्त जन्मकुंडलीप्रमाणे भविष्यकथन याविषयी माहिती करून घेऊयात. 
बहुतेक लोकांचा असा समज असतो कि जसे आकाशातील ग्रह तारे बदलतात तसे माणसाचे नशीब बदलत असते, पण हे चुकीचे आहे. माणसाचे प्राक्तन हे खरेतर ग्रहदशेप्रमाणे बदलत असते. ग्रहदशा आणि त्यातील अंतर्दशा हि साधारणतः १ ते २ वर्षे टिकते. एका ग्रहाची महादशा ५ ते २१ वर्षे असते तर त्या अंतर्गत दुसऱ्या  किवा त्याच ग्रहाची अंतर्दशा १ ते २ वर्षे अशा स्वरुपात चाललेली असते. महादशेचे फळ हे विस्तृत असते. त्या काळात माणसाच्या आयुष्याचा ठराविक टप्पा अधोरेखित होतो. जसे बालपण, शिक्षणावस्था, नोकरी-व्यवसाय व अर्थार्जन, संसार व संतती-सुख, म्हातारपण हे सगळे महादशेचे टप्पे असतात. त्यात अंतर्दशा हि शिक्षणात होणारे बदल, नोकरीत होणारे बदल, संसार सुखात /संतती सुखात होणारे बदल दर्शवित असते. एका ग्रहदशेत साधारणतः एकंदर परिस्थिती स्थिर असते. फारश्या उलाढाली होत नाहीत. इतकेच काय एखादा माणूस मृत्यू पावला तरी त्याचे बँकेतील पैसे, त्याचे कुटुंब हे एका ठराविक स्थिर अवस्थेतच राहते. फार परिवर्तन होताना दिसत नाही. ग्रहदशेचे फलित अचूकपणे सांगणे फारच कौशल्याचे काम आहे. मूळ जन्मपत्रिकेतील त्या ग्रहाचे स्थान, त्याचे उच्च-नीचत्व, त्याचे नक्षत्र यावरून दशेचे फलित कळते. तसेच जन्मापासून काही ठराविक काळापर्यंत ग्रहांच्या दशेचे फळ मिळत नाही. मुल जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा त्याला चंद्रदशा म्हटले जाते. जन्माला आल्यापासून ५ वर्षे मातृदशा, तर १२ व्या वर्षापर्यंत पितृदशा, पुढे १६ व्या वर्षापर्यंत राष्ट्रदशा असते. नंतर त्यापुढे ग्रहदशा फळे द्यायला सुरुवात करते. मातृदशा, पित्रुदशा, किवा राष्ट्रदशा याचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर त्यांच्या आई, वडील आणि ज्या प्रदेशात ती व्यक्ती राहत असते त्यांचा परिणाम. 
मग माणसाच्या आयुष्यात चोरी, अपघात, विवाह, नोकरीचा लाभ अश्या अनेक घटना अचानक घडतात त्यांचे कारक कोण असते असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो. तर हा गोचरीच्या ग्रहांचा प्रभाव असतो. प्रत्येक गोचरीचा ग्रह व त्याची इतर ग्रहांबरोबर होणारी युती हि मानवाच्या आयुष्यात एक संधी, संकट, शुभ/अशुभ योग घेऊन येत असते. गुरु-चंद्र, गुरु-मंगळ, रवि-गुरु इत्यादी शुभ संधी असतात, तर शनि-मंगळ, शनि-रवि, शनि-राहू, राहू-मंगळ हे अशुभ योग होत. अशा संधींचा योग्य फायदा उठवणे व मिळणे हे माणसाच्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या गुणधर्मानुसार ठरते. एखादे संकट प्राणावर न बेतता सुटका होते तर दुसर्याचा बळी जातो असे गोचरीच्या ग्रहांमुळे सतत चढउतार होत राहत असतात. 
म्हणून भविष्यकथन हा मोठा गुंतागुंतीचा व कौशल्याचा प्रकार आहे. तरीही आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींचे अनुमान करण्यासाठी काही ठोकताळे आहेत त्यांचा आपण थोडक्यात विचार करूयात. 
पुरुषाच्या विवाहाचे वय: पुरुषाच्या विवाहाचा योग त्याच्या जन्मकुंडलीतील राहूच्या योगात ज्यावेळी गुरु येतो तेव्हा सुरु होतो. राहू-गुरु एकत्र असणे, किवा राहुपासून पासून गुरु चवथा, सातवा असणे असा हा योग असतो. ह्यावेळी जेव्हा-जेव्हा गोचरीत मुलाला गुरुबळ येते (गुरु २-५-७-९-११ व्या स्थानी असणे) तेव्हा विवाह घडून येतो. 
स्त्रीच्या विवाहाचे वय: स्त्रीच्या विवाहाचे वय हे पूर्णपणे गोचरीच्या गुरुप्रमाणे असते, गुरुबळ उत्तम असता (गुरु २-५-७-९-११ व्या स्थानी असणे) विवाह जमू शकतो. 
मूळ जन्मकुंडलीत खराब योग, करण, नक्षत्र असेल तर शांती/उपाय करून विवाह लवकर ठरतो. मंगळ असेल तर समोरचा मुलगा/मुलगी यांची पत्रिका अनुकूल असेल तरच योग येतो. तोवर विवाह जुळण्यात अडचणी व मनस्ताप सहन करावा लागतो. 
नोकरी लागण्याचा, प्रमोशन यांचा कालखंड लग्नेश-दशमेश यांच्या योगावर अवलंबून असतो. 
तर अशा प्रकारे भविष्यकथन केले जाते. आपण जे वर्तमानपत्रात भविष्य वाचतो ते खरेतर भविष्य नसून फक्त येणाऱ्या संधी किवा संकटे यांची चाहूल दिलेली असते, त्यावर कसे आपण कसे वागणार यावर खरे फळ अवलंबून असते. साडेसातीचेही तसेच असते. आपण एखाद्या संधीवर किवा संकटावर कसे व्यक्त होतो यावरच आपले खरे प्रारब्ध अवलंबून असते. याशिवाय काही ज्योतिष्यांना वाचाशक्ती वगैरे प्रकार असतो ते कदाचित अध्यात्मिक शक्तीच्या जोरावर किवा जातकाला काही दैवी उपाय सांगून हवे ते घडवून आणू शकतात. पण मला त्याविषयी फारसे माहित नाही. 

No comments:

Post a Comment