Saturday, 9 January 2016

अंकशास्त्रीय लबाड्या आणि लूट

पुण्यात एक प्रथितयश अंकशास्त्री आहेत. शिवाय ते स्वतःला मानसोपचारतज्ञ, उद्धारक (मोटीव्हेटर) वगैरे मानतात. कुतुहूल म्हणून मी नेहमी त्यांचे लेख वाचतो. अंकाशास्त्रीय नियम स्वतःलाही लावून बघतो. प्रत्येक शास्त्रात काहीतरी गूढ दडलेले आहे ही माझी खुळी आशा. तर त्यांचा लेख त्यांचे नाव न देता इथे देत आहे. त्यानंतर त्यांचा व माझा संवाद झाला तोही इथे देत आहे, मग शेवटी आपण पाहूया की लबाड्या कशा केल्या जातात ते. 
.
.
छत्रपती शिवाजी महाराज अंकशास्त्राच्या नजरेतून
© त्यांचे नाव
९९९ त्यांचा मोबाईल नंबर९९९९ ,
९९९ त्यांचा मोबाईल नंबर९९९९
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे झाला. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख 'युनिक' प्रकारची आहे.
19 हा अंक अंकशास्त्रात 1+9=10=1+0=1 असा होतो. याला जन्मांक (Birth Number) असे म्हणतात. जे लोक कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मले त्या सगळ्यांचा जन्मांक 1 येतो.

अंकशास्त्रानुसार 1 हा अंक सर्वात चांगला व महत्वाचा अंक मानला गेला आहे. ज्यांचा जन्मांक 1 असतो त्या व्यक्ति स्वयंभू, दूरदृष्टीचे, महत्वाकांक्षी, प्रचंड नेतृत्वगुण असणारे, हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेणारे, दुय्यम स्थान न स्वीकारणारे, भावनांपेक्षा कर्तव्याला महत्व देणारे, शिस्तप्रिय असे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्यात हे सगळेच गुण एकवटलेले दिसतात.
अंकशास्त्रात जन्मांकाप्रमाणेच भाग्यांकाला (Life Path Number) देखील महत्व आहे. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज. महाराजाची जन्मतारीख 19.2.1630 आहे. यातील अंकांची बेरीज 1+9+2+1+6+3+0=22 अशी येते. 22 हा नंबर मास्टर नंबर मानला गेला आहे आणि तो फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येतो. शिवाय जन्मांक 1 आणि भाग्यांक 22 ही तर फारच दुर्मिळ गोष्ट.
जन्मांक आणि भाग्यांक हे दोन्ही त्या-त्या व्यक्तीच्या जीवनात घडणा-या घटनांवर प्रभाव टाकतात. तसेच पूर्ण जन्मतारखेत एखादा अंकगट दिसत असेल तर त्यातील अंकही घटनांवर प्रभाव टाकतात. 19.2.1630 या जन्मतारखेत 3,6,9 हे एका गटातील तीनही अंक आलेले दिसतात. तसेच 1630 यातील सर्व आकड्यांची बेरीज 1 होते. (बहुतेकांच्या बाबतीत त्यांच्या जीवनात कांही ठराविक तारखा रिपीट होत असलेल्या दिसतात).
आता आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना पाहिल्या तर त्या ज्या तारखेची एक अंकी बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसतात. पुढील घटना पहा:
(कंसातले अंक त्या त्या तारखेची/महिन्याची/सालाची अंकातली किम्मत).

जन्म: 19 (1) फेब्रुवारी 1630 (1)
जावळी ताब्यात घेतली: 15 (6) जानेवारी (1) 1656 (9)
रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9)
अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3)
प्रतापगडचे युद्ध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3)
कोल्हापूरचे युद्ध: 28 (1) डिसेंबर (3) 1659 (3)
मोगल सरदार करतलब खान याचा पराभव केला: 3 फेब्रुवारी 1661
सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी (1) 1664
सिंधुदुर्ग हा समुद्री किल्ला बांधला: 24 (6) नोव्हेंबर1664
औरंगजेबाच्या दरबारात: 12 (3) मे 1666 (1)
आग्र्याहून सुटका: 19 (1) ऑगस्ट 1666 (1)
राजाराम महाराजांचा जन्म: 24 (6) फेब्रुवारी 1670
तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला: 15 (6) मार्च (3) 1670
पुरंदर किल्ला पुन्हा घेतला: 24 (6) मार्च (3) 1670
सुरतेवर दुसरी स्वारी: 3 ऑक्टोबर 1670
राज्याभिषेक: 6 जून (6) 1674 (9)
दुसरा राज्याभिषेक: 24 (6) सप्टेंबर (9) 1674 (9)
जिजाउंचा मृत्यू: 18 (9) जून (6) 1674 (9)
महाराजांचा मृत्यू: 3 एप्रिल 1680 (6)

विशेष म्हणजे महाराजांचे वडील शहाजीराजे यांची जन्म तारीख 18 (9) मार्च (3) तर आई जिजाउंची जन्मतारीख 12 (3) जानेवारी (1) ही होती.
याशिवाय महाराजांच्या आयुष्यातील कांही महत्वाच्या घटना ज्यांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसत नाहीत, पण त्या ज्या साली घडल्या, त्या सालातील अंकांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते. त्या घटना अशा:
पुरंदर किल्ला घेतला: 1648=1+6+6+8=19=1+9=10=1+0=1
संभाजी महाराजांचा जन्म: 1657=1+6+5+7=19=1+9=10=1+0=1
सईबाई यांचा मृत्यू : 1659=1+6+5+9=21=2+1=3
पुरन्दरचा तह: 1665 = 1+6+6+5 = 18 =1+8 = 9
नेसरीची लढाई: 1674=1+6+7+4=18=1+8 =9
एकोजी राजांचा पराभव: 1677 =1+6+7+7=21=2+1=3

हेही वाचा:
शक्तिशाली मास्टर नंबर्स
मी: सर माफ करा पटत नाही, हे 28-2-1630 ह्या तारखेला बेरीज 10=1 व 22 येते. मूळ सिद्धंत चुकिचा ठरतो.
मी: जन्मांक (Birth Number) =1 व भाग्यांक (Life Path Number)=22, 28-2-1630 रोजीही येतात.
अंकशास्त्री: Yeu det kii mag. There are many other factors.
अंकशास्त्री: You have to study all thw basics of numerology before opposing it.
मी: Sorry. U felt it bad. I was just asking query.
अंकशास्त्री: That is not query because you did not asked it as a knowledge seeker.
 अंकशास्त्री:Doubts should be asked only at the end, not at start point. And you gave your conclusion that it is false.A true seeker will think why there is too much repeatation of the specific numbers. Without considering it you concluded.
नंतर एकमेकांना शिव्या देण्याचा मोठा कार्यक्रम झाला. ते असो. 
पण एक फसवी व्यापारी वृत्ती असते त्यात तो व्यापारी/माल-विक्या आंब्याची पेटी विकत असतो, पेटीच्या वरच्या भागात चार आंबे ठेवलेले असतात व खाली पेंढा भरलेला असतो. पण वर बसवलेले चार आंबेच जेव्हा नासके निघतात तेव्हा कोण मूर्ख यांची पेटी घ्यायला जाईल? पण आपल्याकडे लोक आयुष्याला इतके वैतागले आहेत कि ते खरेच काहीही विचार न करता अशा लोकांकडे जातात. आणि स्वतःची फसवणूक करून घेतात. 
ह्या अंकशास्त्रींनी जी तारीख दिली ती मी एमएस एक्सेलमध्ये टाकली गणित तयार केले तर ह्याच तारखेशी जुळणाऱ्या असंख्य तारखा मला मिळाल्या. इतकेच काय १९ फेब्रु १६३० ची सर्वात जवळची तारीख २८ फ्रेब्रू १६३० ही सापडली. मग ह्या प्रत्येक तारखेला शिवाजी का जन्माला आले नाहीत? आकाशातील ग्रह स्थिती तर १९ आणि २८ ला फारशी बदलत नाही. 
आणि पुढची गम्मत बघा अंकशास्त्री जे म्हणतात ना कि तुमचा अभ्यास कच्चा आहे, त्यांनी पुढच्या तारखा ज्या दिल्यात त्या मोठ्या गमतीशीर आहेत. जावळी जिंकली 15 (6) जानेवारी (1), 1656 (9) रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9), अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3), सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी (1) 1664, ह्या तारखा अंक शास्त्रींना कुठून मिळाल्या हे माहित नाही. कारण शिवजन्माच्या तारखेचाच वाद बरेच दिवस चालू होता. पण वरील तारखांवर नमूद केलेल्या घटना ह्या एकाच दिवसात घडणाऱ्या घटना नाहीत. सुरतेच लुट म्हणजे शिवाजी व त्यांचे सैन्य गेले सकाळी १० वाजता व सगळी लुट करून दुपारी ४ वाजेपर्यंत परत आले असे होणे अशक्य आहे. तिथे लुट केलेल्या संपत्तीने अखंड स्वराज्य सावरले गेले. जावळी म्हणजे ट्रेकिंगचा एक डोंगर नाही कि तो एका दिवसात तुम्ही सर करताय. त्या काळात  जावळी सर करणे म्हणजे नक्कीच एका दिवसाचे काम नव्हते. 
असो तर मूळ मुद्दा हा आहे कि असे हे अंकशास्त्री अश्या प्रकारचे ज्ञान आणि गैरसमज समाजात पसरवून काय साधतात? काही नाही फक्त आपल्या पोटाची व्यवस्था करतात. जो खरा अडचणीत असतो तो बिचारा तसाच मरतो. तुम्ही जेव्हा ज्ञानाची उपासना करता तेव्हा भलेही इकडचे तिकडचे उचला. त्यात काही वाईट नाही. पण आधी ते पडताळून तरी पहा कि खरेच हे बरोबर आहे कि झूट? नाहीतर आंब्याच्या पेटीचे उदाहरण तर आहेच

No comments:

Post a Comment