Wednesday, 13 January 2016

प्रतिकूल ग्रह: जप, शांती व दान

बऱ्याचदा जीवनात असे प्रसंग येतात कि अचानक प्रतिकूल गोष्टी घडू लागतात, अंगात उत्साहच राहत नाही, भयंकर निराशा येते. त्यामुळे पुढे देवावरचा विश्वास उडू लागतो. अश्या वेळी थोडे तपासले तर गोचरीचे ग्रह चांगले नसतात हे अनुमान निघते. पुढे दिलेले दाते पंचांगातील गोचरीच्या ग्रहांचे वर्णन वाचा,

सर्वात आधी गुरूचा विचार करूया, गुरु ज्या राशींना (चंद्र-राशी) ४-८-१२ वा येतो तेव्हा तो त्या राशीच्या लोकांना प्रतिकूल समजला जातो. सगळ्याच स्तरांवर अपयश येत राहते. अशा व्यक्तीला कसलाच उत्साह, इर्षा नसते मग अपयश येणे साहजिक आहे. गुरूचा अशुभस्थानी एकंदर वाईट परिणाम असतो व पीडा परिहारार्थ  जप, दान, पूजा इत्यादी करावे असे सांगितले आहे. त्यातले त्यात गुरूच्या राशींना गुरुबळ नसताना (म्हणजे ४-८-१२ स्थानी गुरु असताना) जास्त त्रास होतो. धनु राशीचा सचिन तेंडूलकर कधीकधी धावांचा पाऊस पाडत होता तर दुसरीकडे सलग कित्येकदा भोपळा देखील फोडू शकत नव्हता हे आपण पहिले. १-३-६-१० व्या स्थानात असणारा गुरुही इतका चांगला नसला तरीही जप, दान, पूजा यापैकी एक केल्याने आपली सुटका होऊ शकते असेही वर दिलेले आहे. 
आपण आत्ता सर्वात प्रतिकूल (४-८-१२) गुरुचाच अभ्यास करू. सगळ्यात सोपे म्हणजे काय तर दान करायचे. आता ह्या दानाच्या वस्तूमध्ये नेमका घोडा येतो. आता हा घोडा आणायचा कोठून? म्हणून मग मार्ग असा काढला जातो की, घोड्याच्या शेपटीचा केस किवा कणकेचा घोडा दान करावा. आहे कि नाही गम्मत. आजकाल गुरूच्या सुवर्णाची प्रतिमासुद्धा दिवसेंदिवस लहान होत चालली आहे. दानाच्या इतर वस्तू सामान्य माणूस कसातरी जमवू शकतो.  पण खऱ्या घोड्यासाठी कणकेचा घोडा हे काही त्याला पटत नाही.
आता पूजा/शांतीचा विचार करू, शांती करायची म्हणजे साहित्य लागते , दान/दक्षिणा आले त्याचा सगळ्याचा एकंदरीत खर्च ७ ते १० हजाराच्या घरात जातो. म्हणजे गाडी परत तिथे येउन थांबते. 
पुढचा मार्ग म्हणजे जप करायचा. पण जपाचा आकडा बघा किती आहे ते. सुमारे १९०००!. शिवाय हे पुढचे पान वाचा. हे धर्मशास्त्रीय निर्णय भाग -१ ह्या दाते पंचागावरील स्पष्टीकरणातील त्यांच्याच पुस्तकातील एक पान आहे. 

कलियुगात कुठल्याही मंत्राचा जप चौपट करावा असे सांगितले आहे. म्हणजे गुरु ग्रहाचा मंत्र १९००० x ४ = ७६००० वेळा म्हणायला हवा. कारण पंचांगातील मंत्रसंख्या ज्या ग्रंथांतून घेतली त्यात हाच आकडा दिलेला आहे, त्यामुळे पंचांगातील आकडा चौपट करून जप करायला हवा असा अर्थ होते. गुरु ग्रहाचा मंत्र खालीलप्रमाणे आहे,

 हा मंत्र व्यवस्थित म्हणायला १७ ते २० सेकंद लागतात. म्हणजे ७६००० वेळा म्हणायला ७६००० गुणिले २० = १५२०००० सेकंद लागतात,  म्हणजे ४२२३ तास, अगदी दिवसाला ८ तास मंत्रजप केला तर ५२८ दिवस लागतात. पण खरोखर गुरुजी तुमच्यासाठी असे जप करीत राहिले तर बाकीचे उद्योग कधी करणार?
मी हा प्रश्न अनेक गुरुजींना सहजच विचारला, तेव्हा दोन उत्तरे मिळाली. एक म्हणजे अम्ही जवळपास २०-२५ गुरुजी एकत्र बसतो, एकजण मंत्र म्हणतो व बाकीचे श्रावण करतात, म्हणजे तो २०-२५ वेळा जप केल्यासारखा होतो. ते तत्व पूर्वी खरे होते कारण मोठ्या संख्येने धार्मिक कृत्ये केली जात. पण आज पाहिले तर एका माणसाच्या शांतीसाठी रोज आठ तास याप्रमाणे २०-२५ गुरुजींना २३ दिवस बसावे लागेल. शक्य वाटते का? मंत्राजपाचा हजारी दर २५० ते ४०० रुपये आहे. तरीही हे गुरुजींना आत्ताच्या महागाईत परवडणार नाही. 
दुसरे म्हणजे एका गुरुजींनी सांगितले कि आम्ही सरळ एक लक्ष गायत्री मंत्र करून मोकळे होतो. एकतर गायत्री मंत्र हा ब्राम्हनाला पापक्षालनासाठी आहे. म्हणजे एखाद्याच्या जपासाठी दक्षिणा घ्यायची आणि ते काम प्रत्यक्ष केले नाही हे पाप झाले म्हणून १ लक्ष गायत्री करायचा!! यावर दुसरा प्रतिवाद गुरुजी हा करतात कि सूर्य हा ग्रहांचा राजा, सुर्य आणि गायत्री यांचा महत्वाचा संबंध. म्हणून सूर्यालाच प्रसन्न केले तरी चालते. आता ह्याला काय म्हणायचे? असो. 
तर ह्या सगळ्या पळवाटा आहेत, आपला व्यवसायही चालवा आणि लोकांना कार्य/शांती केल्याचे समाधानही लाभावे असा दुहेरी हेतू ह्यांत दिसतो. पण जो माणूस बुद्धिवादी असतो तो हे सगळे पाहून गोंधळून जातो. त्याला सगळे थोतांड वाटू लागते. किवा जे शक्य नाही ते करण्यात अर्थ नाही असा त्याचा मनाचा समज तो करून घेतो.

इथे मला थोडे पुढे जाऊन महत्वाचे सांगायचे आहे, मंत्र-जप हा मार्ग श्रद्धेशी निगडीत आहे. त्यामुळे तूर्तास मंत्राची संख्या गौण समजली तर आपण स्वतःही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. 
१) सरळ नेटवर जाऊन गुरु ग्रहाचा मंत्र डाऊनलोड करायचा, म्हणजे उच्चारात चूक व्हायला नको. 
२) हा मंत्र ज्या व्यक्तीला गुरु ग्रहासंबंधी अडचणी आहेत त्याच्या कोणत्याही नातेवाईकाने (जसे आई, वडील, भाऊ, बहिण) अथवा स्वतः संगीत माध्यमात चालू करून ऐकावा. जितके शक्य असेल तितक्या वेळा. मनात अमुक अमुक व्यक्तीचा त्रास कमी व्हावा हा संकल्प करावा. नाहीतरी गुरुजीही तसेच करून जप पूर्ण करीत असतात. उलट आपली श्रद्धा आणि भावना आपल्या नातेवाईकाशी जास्त उत्कट असते. 
शिवाय जे दान करायचे आहे त्यातील शक्य ते पदार्थ दान करावेत. गुरु ग्रहाच्यासाठी द्यावयाच्या वस्तू (घोडा सोडून) देऊन टाकावे. एखाद्या गरिबाला मंदिरात जाउन दान केले तर फारच उत्तम. (टीप १ वाचा)

हा उपाय मी आपणासर्वांबरोबर वाटतोय कारण याचा चांगला अनुभव अनेक लोकांना आलाय. बर्याचदा गरीब लोक अडचणीत असतात त्यांना काय उपाय सांगायचा, साधे साधे प्रश्न लोक घेऊन येतात, कित्येक लोकांचे घटस्फोट होण्याच्या मार्गावर असतात, पण कारणे कळत नसतात. उपाय करायला बर्याचदा येणाऱ्या खर्चामुळे आणि त्यामध्ये असलेल्या गोंधळामुळे लोक तयार होत नाहीत. पण थोड्या श्रमाने सगळे सुरळीत होते /होऊ शकते तसेच आत्ताच्या जीवनशैलीशी आपल्या प्राचीन शास्त्रांशी योग्य सांगड घातली तर त्यांची अप्रतिम फळे मिळतात, हे समजणे महत्वाचे आहे. 

 गुरु ग्रहाचे अशुभ स्थानातील दुष्परिणाम काय आहेत ते सांगतो,
१) विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होते, त्यांचे लक्ष न लागणे. आजारपण, मानसिक आजार तयार होणे. 
२) नोकरीत त्रास निर्माण होणे, नोकरी जाणे, व्यवसायात मंदी असणे. आळस निर्माण होणे. 
३) मुलींच्या बाबतीत विवाह न जुळणे, अपेक्षित किवा अजिबात स्थळे न येणे. 
४) विवाहीतांत वैवाहिक वाद, विसंवाद निर्माण होणे, संशय तयार होणे. 
शाळेत लक्ष लागत नाही म्हणून शाळा सोडून देणे, किवा पतीपत्नीत वाद झाले म्हणून घटस्फोट देणे/घेणे वाटते तितके सोपे नसते. ह्या तात्पुरत्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचे दूरगामी परिणाम फार भयंकर असतात. सगळ्यांची कारणे तितकीच गमतीची असतात.

आता थोडे शनीचे कारस्थान बघूया. शनि फक्त ३-६-१०-११ ह्या स्थानात शुभ असतो. तसेच १२-१-२ ह्या स्थानात असताना साडेसाती असते. २-४-५-७-८-९ ह्या स्थानात गोचरीचा शनि असताना फार शुभ फळे देत नाही. आपण आत्ता फक्त साडेसातीचा विचार करूया. 
१)साडेसातीत पूर्वी घडलेल्या घटनाचे परिणाम प्रकर्षाने दिसतात, जुनी, खुन्नस, मनातील आकस ह्यांनी प्रेरित होऊन इतर लोक साडेसाती असलेल्याला त्रास देतात. 
२)साडेसातीत माणसाचा चांगुलपणा, देव इत्यादींवरील विश्वास नाहीसा करणारी माणसे भेटतात, घटना घडतात. ३)माणूस खूप झटत असतो (व झटण्याची शक्तीही भरपूर असते जी विशेषतः गुरूच्या अशुभ वेळी अजिबात नसते) पण त्याला जे अपेक्षित असते ते होत नसते व दुसरेच काहीतरी घडत असते. ते चांगले किवा वाईटही असते, जरी चांगले असले तरी त्याला त्याची किंमत वाटत नाही. 
४)मनावर एक अज्ञात दडपण असते त्यामुळे तो निर्भीडपणे निर्णय घेत नाही. कोणावर सहजी विश्वास ठेवत नाही. कारण पूर्वी वाईट अनुभव त्याला आलेले असतात. एकूणच माणसाची सर्वच प्रकारची वाढ खुंटते. शनीला अनुकूल करण्यास म्हैस दान करावी लागते. तीही आजकाल कणकेची दान करतात !!. 

तर अशी असते साडेसाती, मानले तर भरपूर आणि देवावर श्रद्धा असेल तर काहीच वाईट होत नाही. 
शनीचा मंत्र देऊन हा लेख संपवतो. पुढे अशुभ जन्म-योग/करण/नक्षत्र ह्यांची शांती म्हणजे काय यावर आपण चर्चा करूया, अन्यथा दोन्हींचा एकत्रित विचार केला तर फारच मोठे बौद्धिक तयार होईल. त्यातही मोठ्या गमतीजमती आहेत ते पुढे आलेच!!
टीप-१: दान करताना ते सत्पात्री दान असावे असे म्हटले जाते. सत्पात्री म्हणजे चांगल्या माणसाला असा अर्थ होतो, भिकारी हा चांगला माणूस असतोच असे नाही. कारण भिकारी बनण्याआधी कदाचित त्याने अनेक पापे केलेली असू शकतात. म्हणून सत्पात्री दानाचा एक अर्थ विवेकाने वागणाऱ्या चांगल्या व्यक्तीला (ब्राम्हणाला) द्यावे असा होतो. दुसरा अर्थ ज्याला गरज आहे अशा माणसाच्या पात्रात दान करणे. ह्यात गरजू, भिकारी किवा ब्राम्हण हे सगळेच येतात. दुसरा अर्थ अधिक समर्पक वाटतो. 
टीप-२: कणकेची म्हैस किवा घोडा बनवून दान करणे ह्याला फक्त स्वतःचे समाधान इतकाच अर्थ आहे. नंतर ती कणकेची म्हैस किवा घोडा चक्क फेकून दिले जातात. त्याचा कोणालाही काहीही उपयोग होत नाही. 

Saturday, 9 January 2016

अंकशास्त्रीय लबाड्या आणि लूट

पुण्यात एक प्रथितयश अंकशास्त्री आहेत. शिवाय ते स्वतःला मानसोपचारतज्ञ, उद्धारक (मोटीव्हेटर) वगैरे मानतात. कुतुहूल म्हणून मी नेहमी त्यांचे लेख वाचतो. अंकाशास्त्रीय नियम स्वतःलाही लावून बघतो. प्रत्येक शास्त्रात काहीतरी गूढ दडलेले आहे ही माझी खुळी आशा. तर त्यांचा लेख त्यांचे नाव न देता इथे देत आहे. त्यानंतर त्यांचा व माझा संवाद झाला तोही इथे देत आहे, मग शेवटी आपण पाहूया की लबाड्या कशा केल्या जातात ते. 
.
.
छत्रपती शिवाजी महाराज अंकशास्त्राच्या नजरेतून
© त्यांचे नाव
९९९ त्यांचा मोबाईल नंबर९९९९ ,
९९९ त्यांचा मोबाईल नंबर९९९९
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे झाला. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख 'युनिक' प्रकारची आहे.
19 हा अंक अंकशास्त्रात 1+9=10=1+0=1 असा होतो. याला जन्मांक (Birth Number) असे म्हणतात. जे लोक कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मले त्या सगळ्यांचा जन्मांक 1 येतो.

अंकशास्त्रानुसार 1 हा अंक सर्वात चांगला व महत्वाचा अंक मानला गेला आहे. ज्यांचा जन्मांक 1 असतो त्या व्यक्ति स्वयंभू, दूरदृष्टीचे, महत्वाकांक्षी, प्रचंड नेतृत्वगुण असणारे, हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेणारे, दुय्यम स्थान न स्वीकारणारे, भावनांपेक्षा कर्तव्याला महत्व देणारे, शिस्तप्रिय असे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्यात हे सगळेच गुण एकवटलेले दिसतात.
अंकशास्त्रात जन्मांकाप्रमाणेच भाग्यांकाला (Life Path Number) देखील महत्व आहे. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज. महाराजाची जन्मतारीख 19.2.1630 आहे. यातील अंकांची बेरीज 1+9+2+1+6+3+0=22 अशी येते. 22 हा नंबर मास्टर नंबर मानला गेला आहे आणि तो फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येतो. शिवाय जन्मांक 1 आणि भाग्यांक 22 ही तर फारच दुर्मिळ गोष्ट.
जन्मांक आणि भाग्यांक हे दोन्ही त्या-त्या व्यक्तीच्या जीवनात घडणा-या घटनांवर प्रभाव टाकतात. तसेच पूर्ण जन्मतारखेत एखादा अंकगट दिसत असेल तर त्यातील अंकही घटनांवर प्रभाव टाकतात. 19.2.1630 या जन्मतारखेत 3,6,9 हे एका गटातील तीनही अंक आलेले दिसतात. तसेच 1630 यातील सर्व आकड्यांची बेरीज 1 होते. (बहुतेकांच्या बाबतीत त्यांच्या जीवनात कांही ठराविक तारखा रिपीट होत असलेल्या दिसतात).
आता आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना पाहिल्या तर त्या ज्या तारखेची एक अंकी बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसतात. पुढील घटना पहा:
(कंसातले अंक त्या त्या तारखेची/महिन्याची/सालाची अंकातली किम्मत).

जन्म: 19 (1) फेब्रुवारी 1630 (1)
जावळी ताब्यात घेतली: 15 (6) जानेवारी (1) 1656 (9)
रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9)
अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3)
प्रतापगडचे युद्ध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3)
कोल्हापूरचे युद्ध: 28 (1) डिसेंबर (3) 1659 (3)
मोगल सरदार करतलब खान याचा पराभव केला: 3 फेब्रुवारी 1661
सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी (1) 1664
सिंधुदुर्ग हा समुद्री किल्ला बांधला: 24 (6) नोव्हेंबर1664
औरंगजेबाच्या दरबारात: 12 (3) मे 1666 (1)
आग्र्याहून सुटका: 19 (1) ऑगस्ट 1666 (1)
राजाराम महाराजांचा जन्म: 24 (6) फेब्रुवारी 1670
तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला: 15 (6) मार्च (3) 1670
पुरंदर किल्ला पुन्हा घेतला: 24 (6) मार्च (3) 1670
सुरतेवर दुसरी स्वारी: 3 ऑक्टोबर 1670
राज्याभिषेक: 6 जून (6) 1674 (9)
दुसरा राज्याभिषेक: 24 (6) सप्टेंबर (9) 1674 (9)
जिजाउंचा मृत्यू: 18 (9) जून (6) 1674 (9)
महाराजांचा मृत्यू: 3 एप्रिल 1680 (6)

विशेष म्हणजे महाराजांचे वडील शहाजीराजे यांची जन्म तारीख 18 (9) मार्च (3) तर आई जिजाउंची जन्मतारीख 12 (3) जानेवारी (1) ही होती.
याशिवाय महाराजांच्या आयुष्यातील कांही महत्वाच्या घटना ज्यांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसत नाहीत, पण त्या ज्या साली घडल्या, त्या सालातील अंकांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते. त्या घटना अशा:
पुरंदर किल्ला घेतला: 1648=1+6+6+8=19=1+9=10=1+0=1
संभाजी महाराजांचा जन्म: 1657=1+6+5+7=19=1+9=10=1+0=1
सईबाई यांचा मृत्यू : 1659=1+6+5+9=21=2+1=3
पुरन्दरचा तह: 1665 = 1+6+6+5 = 18 =1+8 = 9
नेसरीची लढाई: 1674=1+6+7+4=18=1+8 =9
एकोजी राजांचा पराभव: 1677 =1+6+7+7=21=2+1=3

हेही वाचा:
शक्तिशाली मास्टर नंबर्स
मी: सर माफ करा पटत नाही, हे 28-2-1630 ह्या तारखेला बेरीज 10=1 व 22 येते. मूळ सिद्धंत चुकिचा ठरतो.
मी: जन्मांक (Birth Number) =1 व भाग्यांक (Life Path Number)=22, 28-2-1630 रोजीही येतात.
अंकशास्त्री: Yeu det kii mag. There are many other factors.
अंकशास्त्री: You have to study all thw basics of numerology before opposing it.
मी: Sorry. U felt it bad. I was just asking query.
अंकशास्त्री: That is not query because you did not asked it as a knowledge seeker.
 अंकशास्त्री:Doubts should be asked only at the end, not at start point. And you gave your conclusion that it is false.A true seeker will think why there is too much repeatation of the specific numbers. Without considering it you concluded.
नंतर एकमेकांना शिव्या देण्याचा मोठा कार्यक्रम झाला. ते असो. 
पण एक फसवी व्यापारी वृत्ती असते त्यात तो व्यापारी/माल-विक्या आंब्याची पेटी विकत असतो, पेटीच्या वरच्या भागात चार आंबे ठेवलेले असतात व खाली पेंढा भरलेला असतो. पण वर बसवलेले चार आंबेच जेव्हा नासके निघतात तेव्हा कोण मूर्ख यांची पेटी घ्यायला जाईल? पण आपल्याकडे लोक आयुष्याला इतके वैतागले आहेत कि ते खरेच काहीही विचार न करता अशा लोकांकडे जातात. आणि स्वतःची फसवणूक करून घेतात. 
ह्या अंकशास्त्रींनी जी तारीख दिली ती मी एमएस एक्सेलमध्ये टाकली गणित तयार केले तर ह्याच तारखेशी जुळणाऱ्या असंख्य तारखा मला मिळाल्या. इतकेच काय १९ फेब्रु १६३० ची सर्वात जवळची तारीख २८ फ्रेब्रू १६३० ही सापडली. मग ह्या प्रत्येक तारखेला शिवाजी का जन्माला आले नाहीत? आकाशातील ग्रह स्थिती तर १९ आणि २८ ला फारशी बदलत नाही. 
आणि पुढची गम्मत बघा अंकशास्त्री जे म्हणतात ना कि तुमचा अभ्यास कच्चा आहे, त्यांनी पुढच्या तारखा ज्या दिल्यात त्या मोठ्या गमतीशीर आहेत. जावळी जिंकली 15 (6) जानेवारी (1), 1656 (9) रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9), अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3), सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी (1) 1664, ह्या तारखा अंक शास्त्रींना कुठून मिळाल्या हे माहित नाही. कारण शिवजन्माच्या तारखेचाच वाद बरेच दिवस चालू होता. पण वरील तारखांवर नमूद केलेल्या घटना ह्या एकाच दिवसात घडणाऱ्या घटना नाहीत. सुरतेच लुट म्हणजे शिवाजी व त्यांचे सैन्य गेले सकाळी १० वाजता व सगळी लुट करून दुपारी ४ वाजेपर्यंत परत आले असे होणे अशक्य आहे. तिथे लुट केलेल्या संपत्तीने अखंड स्वराज्य सावरले गेले. जावळी म्हणजे ट्रेकिंगचा एक डोंगर नाही कि तो एका दिवसात तुम्ही सर करताय. त्या काळात  जावळी सर करणे म्हणजे नक्कीच एका दिवसाचे काम नव्हते. 
असो तर मूळ मुद्दा हा आहे कि असे हे अंकशास्त्री अश्या प्रकारचे ज्ञान आणि गैरसमज समाजात पसरवून काय साधतात? काही नाही फक्त आपल्या पोटाची व्यवस्था करतात. जो खरा अडचणीत असतो तो बिचारा तसाच मरतो. तुम्ही जेव्हा ज्ञानाची उपासना करता तेव्हा भलेही इकडचे तिकडचे उचला. त्यात काही वाईट नाही. पण आधी ते पडताळून तरी पहा कि खरेच हे बरोबर आहे कि झूट? नाहीतर आंब्याच्या पेटीचे उदाहरण तर आहेच