Sunday, 4 September 2016

अंशात्मक योग म्हणजे काय?

ग्रहांचे योग अंशात्मक असतानाच फळे देतात. एकाच राशीत दोन ग्रह असले तरी त्यांच्या योगाची एकत्रित फळे देत नाहीत. म्हणून आपण अंशात्मक योग म्हणजे काय हे आधी पाहू. 

दिप्तांश: प्रत्येक ग्रहाची तुमच्यावर प्रभाव करण्याची एक शक्ती असते. ती शक्ती तो ग्रह तुमच्यापासून किती जवळ आहे व त्याचा आकार किती मोठा आहे यावर अवलंबून असते. त्यातही जवळ असलेला ग्रह हा अधिक परिणाम करतो. पहिले कारण म्हणजे त्याचे अंतर व दुसरे कारण त्यांची व्याप्ती. खालील चित्र पहा,
 ह्या व्यक्तीच्या हातातील पेन्सिल आकाराने समोर असलेल्या ग्रहगोलाच्या मनाने फारच लहान आहे पण वेळप्रसंगी ती पेन्सिल पूर्ण ग्रह तुम्हाला दिसण्यापासून अडवू शकते. ह्या अडवू शकण्याच्या शक्तीला दिप्तांश म्हणतात. ग्रहांप्रमाणे दिप्तांश बदलत जातात. 
चंद्र= १२ अंश. 
सूर्य = ६ अंश. 
बुध = ४ अंश. 
शुक्र = ४ अंश. 
मंगळ = ३ अंश. 
गुरु = ३ अंश. 
शनी = २ अंश. 
राहू केतू = ह्या सूर्य चंद्राच्या छाया आहेत त्यांना दिप्तांश नसतो पण १ अंश धरणे सोईस्कर. 
हर्षल, नेपच्यून प्लूटो = १ अंश. 

दिप्तांशाचे महत्व: हा वर दिलेला दिप्तांश म्हणजे ग्रहांशी अंशात्मक योग करण्याची शक्ती आहे. दोन ग्रह एकमेकांच्या जवळ आल्यावर त्यातील अंशात्मक अंतर जेव्हा दिप्तांशाइतके होते तेव्हा दोन ग्रहांचा योग सुरु होतो. उदाहरणार्थ सूर्य १४ अंशावर आहे आणि शनी २० अंशावर आहे तेव्हा त्यांच्यातील अंशात्मक अंतर हे ६ अंश असते, तो सूर्याचा दिप्तांश आहे म्हणून शनी आणि सूर्याचा योग सुरु झाला असे म्हणतात. अशावेळी कमी दिप्तांश असलेल्या ग्रहाच्या दिप्तांशाचा विचार करण्याची गरज नसते. जसे शनीचा दिप्तांश जरी २ असला तरी फक्त सूर्यचाच दिप्तांश गृहीत धरायचा असतो. जसजसे ग्रहांची युती होते तसतसे परिणाम मिळायला सुरुवात होते, आणि दोन गृहातील अंशात्मक अंतर जेव्हा ० अंश असते तेव्हा सर्वात जास्त फळ मिळते. 

त्यातही सर्वात जास्त फळ हे युतीचे (० अंश) योगाचे असते. त्याखालोखाल ९० अंशांचा योग (केंद्र) हा फळे देतो. नंतर अनुक्रमे ३०, ६० अंशांचे लाभ व नवपंचम हे योग फळे देतात. 

दोन, तीन चार असे अनेक ग्रहांचे योग होत असताना त्यातील काही ग्रह शुभ तर काही अशुभ असू शकतात. अंशात्मक योग करणारे ग्रह विरुद्ध प्रकारचे असतील तर अगदी चांगली किंवा अगदी वाईट अशी फळे मिळत नाहीत. 

शनी, मंगळ, राहू, केतू, सूर्य, नेपच्यून हे पापग्रह आहेत. चंद्र, गुरु, शुक्र हे शुभ ग्रह आहेत. बुध, हर्षल, प्लूटो हे ज्या प्रकारच्या ग्रहाच्या बरोबर असतात तशी फळे देतात. बुध हा एक दलबदलू ग्रह आहे. अधिक प्रभावी ग्रहाच्या बरोबर तो आपले गुणधर्म बदलतो! विशेषतः रवीच्या अतिशय जवळ असलेला बुध हा रवीची व बुधाची एकत्रित फळे देतो. सूर्य कधीच अस्तंगत होत नाही. 
रवीबरोबर युतीत (० अंशात) असलेला ग्रह रवीच्या दिप्तांशाच्या आत आलेला असता अस्तंगत ग्रह समजला जातो. गुरु, शुक्रादि ग्रह अस्तंगत असताना प्रभाव दाखवीत नाहीत. म्हणून गुरु-शुक्र अस्तात बरीच शुभकार्ये वर्ज्य सांगितली आहेत. बुध हा एकच ग्रह असा आहे कि तो सूर्याच्या सर्वात जवळचा व त्याचा लाडका ग्रह आहे म्हणून बुध अस्तंगत असतानाही सूर्याबरोबर मिश्र फळे देतो. 
ग्रहांचे योग बघताना बरेच लोक एखादा प्रतिकूल योग बघून इतर चांगल्या योगांकडे दुर्लक्ष करतात हा साप समजून भुई धोपटण्याचाच प्रकार आहे.
पारंपरिक भारतीय पद्धतीने कुंडली पाहताना खालील प्रकारची कुंडली पाहणे आवश्यक आहे.




















उगाच काहीतरी पाहून काहीतरी अर्थ काढणे अतिशय चुकीचे आहे. 

वक्री ग्रह: वर आपण अस्तंगत ग्रह म्हणजे काय हे पहिले. आता वक्री ग्रह म्हणजे काय हे पाहू. 
खालील चित्र पहा. हे सूर्यमालेतील दोन ग्रह व सूर्य यांचे चित्र आहे.
मध्यभागी सूर्य आहे. निळ्या रंगात पृथ्वी दाखवली आहे व तपकिरी रंगात वक्री होणारा ग्रह दर्शिविला आहे. पृथ्वीसापेक्ष त्या ग्रहाची गती कमी असल्याने तो ग्रह आकाशात एकाच जागी थांबलेला दिसतो, तसेच उलट्या दिशेने प्रवास करताना दिसतो त्याला ग्रहाची वक्री स्थिती असे म्हणतात. वक्री स्थितीत असलेला ग्रह अधिक तीव्र फळे देतो. दोन ग्रह वक्री असताना त्यांच्या योगाची फळे अधिक तीव्र असतात. ग्रह जितका दूर तितका त्याचा वक्री असण्याचा कालावधी जास्त असतो. त्यात शनी वक्री असताना भल्याभल्यांचा घाम काढतो कारण तो बराच दूर आहे. सूर्य, चंद्र कधीच वक्री होत नाहीत. 

ग्रहांची गती: वक्री नसताना ग्रह एका साधारण गतीने प्रवास करत असतात. साधारणतः ३० अंशाच्या एका राशीत प्रत्येक ग्रह वेगवेगळा काळ वास्तव्य करतो. तो खालीलप्रमाणे,
चंद्र: एका राशीत अडीच दिवस (म्हणजे सुमारे ३० तास) ताशी गती १ अंश,
सूर्य: एका राशीत तीस दिवस, गती १ अंश प्रतिदिन,
बुध: एका राशीत तीस दिवस, गती १ अंश प्रतिदिन,
शुक्र: एका राशीत तीस दिवस, गती १ अंश प्रतिदिन,
मंगळ: एका राशीत दीड महिना (म्हणजे पंचेचाळीस दिवस), गती १ अंश प्रतिदीड दिवस,
गुरु: १३ महिने एका राशीत, गती अंदाजे २.३ अंश प्रतिमहिना,
शनी: ३० महिने एका राशीत, गती १ अंश प्रतिमहिना,
राहू-केतू: दीड वर्षे (म्हणजे १८ महिने) एका राशीत, गती १.६६अंश प्रतिमहिना,

आणखी एक महत्वाची गम्मत आहे. दोन ग्रहांची युती होताना एक ग्रह मंदगती असतो व दुसरा शिघ्रगतीचा असतो. जोवर युती करणाऱ्या दोन ग्रहांचे अंशात्मक अंतर ० पर्यंत होत जाते तोवर त्यांच्या योगाचा प्रभाव वाढत वाढत परमोच्च बिंदुला पोहोचतो. एकदा का शीघ्र ग्रह पुढे एखाद्या अंशाने सरकला कि योगाचा परिणाम चक्क निम्मा होतो. सुमारे दोन अंशानंतर प्रभाव जवळपास संपून गेलेले असतो. जसे लग्न व्हायच्या आधी खूप प्रेम असलेले प्रेमी एकदा नवरा बायको झाले कि तू-तू मै मै सुरु होते तशातला हा प्रकार आहे. प्रश्नकुंडली आणि गोचरीचे ग्रह यांचा कालनिर्णय करताना हे फार महत्वाचे असते.

तर अशा प्रकारे आपण पहिले कि ग्रह आकाशात भ्रमण करीत असताना अनेक प्रकार करतात. वक्री, अस्तंगत, योग करणारे असे अनेक प्रकार ग्रहांचे होत असतात. त्यामुळे काहीना काही प्रभाव मानवावर व सृष्टीवर होत असतो. या सगळ्या प्रकारात क्लिष्टता आहे पण काहीतरी तारतम्य सुद्धा आहे, ते नेमके हेरले कि होणाऱ्या घटना कशा असतील याचा अंदाज बांधता येतो. पुढे लग्नकुंडली व प्रश्नकुंडली ह्यात होणारे योग कशी फळे देतात हे पाहूया. तोवर गणेश प्रतिष्ठापनेचा अनेक अनेक शुभेच्छा!!
 








 

No comments:

Post a Comment