Tuesday, 20 September 2016

कालसर्पयोग असतो कि राव

प्रत्येक माणूस अनुभवातून शिकत असतो. तसेच माझेही चाललेले असते. मीही गेल्या आठवड्यात अशाच एका अनुभवातून शिकलो. 

त्याचे काय झाले ते सांगतो, मी माझ्या आधीच्या एका लेखात कालसर्प योग हे थोतांड आहे असे ठासून सांगितले होते पण ते चुकीचे असावे असा अनुभव मला आला त्याविषयी हा लेख. 

साधारण ९ महिन्यापूर्वी उत्तरांचल वरून एका महिलेचा फोन आला. (नाव इथे देत नाही) साधारण सुशिक्षित व विवाहित महिला आहे. तिची तोवर ७ बाळंतपणे झाली होती. बहुतेक मुली जन्माला आल्या पण एकही मूल ६ महिन्यापेक्षा जास्त जगले नाही. वेगवेगळ्या कारणांनी व अगदी गर्भातच आणि ६ महिने मोठी होऊन सगळी अपत्ये देवाघरी गेली. तिने नाना उपाय केले होते पण काही साध्य झाले नव्हते. मी लगेच प्रश्नकुंडली मांडली. त्यावरून थोडीफार अनुकूल वेळ बघून तोवर तिला काही उपाय करायला सांगितले. (उपाय हे फक्त वेळ काढण्यासाठी असतात असे प्रगत ज्योतिषांचे मत आहे पण मी सध्या त्या वादात पडत नाही असो). मग चान्स घ्यावा असे सांगितले. खरेतर असे चान्स घ्यायला सांगणे म्हणजे एक कायदेशीर महाचूक आहे कारण आधी तिचे बहुधा २-३ सीझर झालेले होते आता परत हे नवीन कांड करायला लावायचे म्हणजे एक अत्याचारच होता व तो करून घ्या म्हणून सांगणे हेही तितकेच चुकीचे होते, पण ती महिला मातृत्वाला आसुसलेली एक माता होती. आपला समाज संतानहीन स्त्रीला स्वीकारत नाही हे दुर्दैव आहे आणि नेमका तोच प्रश्न तिला अगदी सतावत होता. मी ते सगळे समजावण्याचा प्रयत्न केला पण ते व्यर्थ होते. शेवटी काय ते मी तिला सांगितले. हे सगळे करण्यासाठी मी एक रुपयाही तिच्याकडून आजवर घेतला नाही उलट वेळोवेळी स्वतः फोन करून कसे काय आहे हे विचारात राहिलो. 

साधारण तिचे गर्भारपणाचे ५ महिने उलटले असावेत. तेव्हा एका हेल्थ कॅम्प मध्ये तिने चेक केले तेव्हा डॉक्टरांनी तिचे रक्त लवकर गोठते असे सांगून निदान करून काही उपाय केले. तेही त्या महिलेने मला लगेच सांगितले. अर्थात मला ते पटले नाही कारण तिचे एक मूल ६ महिन्याचे होऊन दगावले होते त्याचा गर्भात रक्त गोठण्याचा काहीच संबंध नव्हता, कारण ते मूल छातीत पाणी झाल्याने गेले होते. उत्तर भारतात थंडी भयंकर असते तेव्हा छातीत कफ व पाणी होऊन मृत्यू होणे हे बरेचदा होते हा माझा विचाराचा मुद्दा होता. असो डॉक्टर आणि ज्योतिषी अशी तुलना सगळीकडे होती म्हणून हे लिहिले... 

नंतर त्या मातेचा फोन आला, जेव्हा डॉक्टरांनी सांगितले कि १ महिना आधी सीझर करावे लागेल तेव्हा. चांगली वेळ कुठली हा तिचा सामान्य प्रश्न होता. मी २-३ वेळा दिल्या, पण त्याप्रमाणे काहीच झाले नाही. आपल्या देशात जन्माला आणायची आणि मेल्यावर जाळायची प्रचंड घाई असते. नंतर पुढे ९ सप्टें २०१६ रात्री ११.१८ मिनिटांनी डॉक्टरांनी मूल बाहेर काढले. त्याची जन्मपत्रिका खाली दिलेली आहे.



वरील चित्रात त्या बिचार्या मुलाच्या कुंडलीत खालचा भाग अगदी महान ग्रहांनी खचाखच भरलाय पण वरचा भाग अगदी रिकामा आणि शुष्क आहे. तिथे एकटाच हर्षल राहिलाय, तोही खूप लांब आहे म्हणजे परिणाम इतके प्रभावी देत नाहीये. 
आणि विशेष म्हणजे राहू-केतू बघा. दोघेही १८ अंशावर आहेत. सगळे ग्रह त्यांच्यापेक्षा पुढे आहेत. म्हणजे राहू-केतूने सगळ्यांना एका बाजूला अडकवून ठेवले आहे. म्हणजे ह्यालाच कालसर्प योग म्हणतात हो भाऊ, ह्या सर्पाचे नाव आहे शंखपाल कालसर्प. गुगल करा. भरपूर साहित्य मिळेल. असो आता आपण पुढे जाऊ. 

तर झाले काय कि ७ बहिणींच्या पाठीवर हा कृष्ण, कान्हा जन्माला आलाय तो ह्या कालिया नागाच्या विळख्यात सापडला आहे. कालच त्याच्या आईने सांगितले कि त्याला उलट्या होताहेत. नतंर ती माता चक्क बेशुद्ध झाली. होणारच. आता दोघेही आयसीयु मध्ये आहेत. माझी फोनाफोनी झाली. डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत असणार.... पण हा कान्हा जगणार का? मला तर वाटते आहे कि नक्कीच जगणार. लगेच मी प्रश्नकुंडली मांडली आणि मला निर्णय मिळाला कि हा कृष्ण-कन्हैय्या जगणार आणि मोठा होणार... आता बघूया काळसर्पाला (कालियाला) तो मारतोय का हे.. नाहीतर आपले आहे ते रोजचे चालूच राहणार!!

त्या कृष्ण कन्हैयाचे पुढे काय काय होणार हे मी ह्याच लेखात टाकणार आहे... 

आजच कृष्ण कान्हैयांच्या आजोबांना (आईचे वडील) फोन लागला, दोघेही सुखरूप आहेत, धोका टाळलाय. आनंदाची बातमी म्हणजे उद्या घरी परतणार आहेत. आता पुढे काही अडचणी येऊ नयेत यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. एकंदर हे मुल कालसार्पला गिळणार असेच वाटते आहे. 
 
आज ३/१०/२०१६ ला त्याच्या आजोबांचा परत फोन आलेला. "पंडितजी प्रणाम" आता काय झाले असेल म्हणून मी हादरलोच. लगेच विचारले "लडका कैसे है?" ते म्हणाले "पंडितजी आपकी कृपा से बहुत बढिया है, माँ और बेटा बिलकुल तंदुरुस्त हो गये है" एकदाचा जीव भांड्यात पडला. मग आजोबाच बोलायला लागले. "ऊं क्या हैं ना कि हमरा बडा लडका मतलब xxx जी (त्यांची मुलगी व कन्हैयाची आई) का बडा भाई, वह बहुत पढालींखा है, एलएलबी किये है, लेकिन नौकरी नही मिल रही है, कुछ देखिये ना पंडितजी" मी जन्मतारीख वेळ ठिकाण लिहून घेतले आणि कामाला लागतो. मामाची कुंडली मांडली शिवाय प्रश्न विचारला होता तेव्हाची प्रश्नकुंडली मंडळी. प्रश्नकुंडलीत बिचारा मामा सापडला कालसर्पाच्या तडाख्यात. आता कसे सोडवावे काय करावे हा विचार करत होतो. 
 
अचानक आठवले कि महाराष्ट्रातील एका नामांकित पंचांगात कालसर्प योग झूट असतो, ते थोतांड आहे इत्यादी इत्यादी लिहिलेले होते. आणि परत विचाराची चक्रे सुरु झाली.



Sunday, 4 September 2016

अंशात्मक योग म्हणजे काय?

ग्रहांचे योग अंशात्मक असतानाच फळे देतात. एकाच राशीत दोन ग्रह असले तरी त्यांच्या योगाची एकत्रित फळे देत नाहीत. म्हणून आपण अंशात्मक योग म्हणजे काय हे आधी पाहू. 

दिप्तांश: प्रत्येक ग्रहाची तुमच्यावर प्रभाव करण्याची एक शक्ती असते. ती शक्ती तो ग्रह तुमच्यापासून किती जवळ आहे व त्याचा आकार किती मोठा आहे यावर अवलंबून असते. त्यातही जवळ असलेला ग्रह हा अधिक परिणाम करतो. पहिले कारण म्हणजे त्याचे अंतर व दुसरे कारण त्यांची व्याप्ती. खालील चित्र पहा,
 ह्या व्यक्तीच्या हातातील पेन्सिल आकाराने समोर असलेल्या ग्रहगोलाच्या मनाने फारच लहान आहे पण वेळप्रसंगी ती पेन्सिल पूर्ण ग्रह तुम्हाला दिसण्यापासून अडवू शकते. ह्या अडवू शकण्याच्या शक्तीला दिप्तांश म्हणतात. ग्रहांप्रमाणे दिप्तांश बदलत जातात. 
चंद्र= १२ अंश. 
सूर्य = ६ अंश. 
बुध = ४ अंश. 
शुक्र = ४ अंश. 
मंगळ = ३ अंश. 
गुरु = ३ अंश. 
शनी = २ अंश. 
राहू केतू = ह्या सूर्य चंद्राच्या छाया आहेत त्यांना दिप्तांश नसतो पण १ अंश धरणे सोईस्कर. 
हर्षल, नेपच्यून प्लूटो = १ अंश. 

दिप्तांशाचे महत्व: हा वर दिलेला दिप्तांश म्हणजे ग्रहांशी अंशात्मक योग करण्याची शक्ती आहे. दोन ग्रह एकमेकांच्या जवळ आल्यावर त्यातील अंशात्मक अंतर जेव्हा दिप्तांशाइतके होते तेव्हा दोन ग्रहांचा योग सुरु होतो. उदाहरणार्थ सूर्य १४ अंशावर आहे आणि शनी २० अंशावर आहे तेव्हा त्यांच्यातील अंशात्मक अंतर हे ६ अंश असते, तो सूर्याचा दिप्तांश आहे म्हणून शनी आणि सूर्याचा योग सुरु झाला असे म्हणतात. अशावेळी कमी दिप्तांश असलेल्या ग्रहाच्या दिप्तांशाचा विचार करण्याची गरज नसते. जसे शनीचा दिप्तांश जरी २ असला तरी फक्त सूर्यचाच दिप्तांश गृहीत धरायचा असतो. जसजसे ग्रहांची युती होते तसतसे परिणाम मिळायला सुरुवात होते, आणि दोन गृहातील अंशात्मक अंतर जेव्हा ० अंश असते तेव्हा सर्वात जास्त फळ मिळते. 

त्यातही सर्वात जास्त फळ हे युतीचे (० अंश) योगाचे असते. त्याखालोखाल ९० अंशांचा योग (केंद्र) हा फळे देतो. नंतर अनुक्रमे ३०, ६० अंशांचे लाभ व नवपंचम हे योग फळे देतात. 

दोन, तीन चार असे अनेक ग्रहांचे योग होत असताना त्यातील काही ग्रह शुभ तर काही अशुभ असू शकतात. अंशात्मक योग करणारे ग्रह विरुद्ध प्रकारचे असतील तर अगदी चांगली किंवा अगदी वाईट अशी फळे मिळत नाहीत. 

शनी, मंगळ, राहू, केतू, सूर्य, नेपच्यून हे पापग्रह आहेत. चंद्र, गुरु, शुक्र हे शुभ ग्रह आहेत. बुध, हर्षल, प्लूटो हे ज्या प्रकारच्या ग्रहाच्या बरोबर असतात तशी फळे देतात. बुध हा एक दलबदलू ग्रह आहे. अधिक प्रभावी ग्रहाच्या बरोबर तो आपले गुणधर्म बदलतो! विशेषतः रवीच्या अतिशय जवळ असलेला बुध हा रवीची व बुधाची एकत्रित फळे देतो. सूर्य कधीच अस्तंगत होत नाही. 
रवीबरोबर युतीत (० अंशात) असलेला ग्रह रवीच्या दिप्तांशाच्या आत आलेला असता अस्तंगत ग्रह समजला जातो. गुरु, शुक्रादि ग्रह अस्तंगत असताना प्रभाव दाखवीत नाहीत. म्हणून गुरु-शुक्र अस्तात बरीच शुभकार्ये वर्ज्य सांगितली आहेत. बुध हा एकच ग्रह असा आहे कि तो सूर्याच्या सर्वात जवळचा व त्याचा लाडका ग्रह आहे म्हणून बुध अस्तंगत असतानाही सूर्याबरोबर मिश्र फळे देतो. 
ग्रहांचे योग बघताना बरेच लोक एखादा प्रतिकूल योग बघून इतर चांगल्या योगांकडे दुर्लक्ष करतात हा साप समजून भुई धोपटण्याचाच प्रकार आहे.
पारंपरिक भारतीय पद्धतीने कुंडली पाहताना खालील प्रकारची कुंडली पाहणे आवश्यक आहे.




















उगाच काहीतरी पाहून काहीतरी अर्थ काढणे अतिशय चुकीचे आहे. 

वक्री ग्रह: वर आपण अस्तंगत ग्रह म्हणजे काय हे पहिले. आता वक्री ग्रह म्हणजे काय हे पाहू. 
खालील चित्र पहा. हे सूर्यमालेतील दोन ग्रह व सूर्य यांचे चित्र आहे.
मध्यभागी सूर्य आहे. निळ्या रंगात पृथ्वी दाखवली आहे व तपकिरी रंगात वक्री होणारा ग्रह दर्शिविला आहे. पृथ्वीसापेक्ष त्या ग्रहाची गती कमी असल्याने तो ग्रह आकाशात एकाच जागी थांबलेला दिसतो, तसेच उलट्या दिशेने प्रवास करताना दिसतो त्याला ग्रहाची वक्री स्थिती असे म्हणतात. वक्री स्थितीत असलेला ग्रह अधिक तीव्र फळे देतो. दोन ग्रह वक्री असताना त्यांच्या योगाची फळे अधिक तीव्र असतात. ग्रह जितका दूर तितका त्याचा वक्री असण्याचा कालावधी जास्त असतो. त्यात शनी वक्री असताना भल्याभल्यांचा घाम काढतो कारण तो बराच दूर आहे. सूर्य, चंद्र कधीच वक्री होत नाहीत. 

ग्रहांची गती: वक्री नसताना ग्रह एका साधारण गतीने प्रवास करत असतात. साधारणतः ३० अंशाच्या एका राशीत प्रत्येक ग्रह वेगवेगळा काळ वास्तव्य करतो. तो खालीलप्रमाणे,
चंद्र: एका राशीत अडीच दिवस (म्हणजे सुमारे ३० तास) ताशी गती १ अंश,
सूर्य: एका राशीत तीस दिवस, गती १ अंश प्रतिदिन,
बुध: एका राशीत तीस दिवस, गती १ अंश प्रतिदिन,
शुक्र: एका राशीत तीस दिवस, गती १ अंश प्रतिदिन,
मंगळ: एका राशीत दीड महिना (म्हणजे पंचेचाळीस दिवस), गती १ अंश प्रतिदीड दिवस,
गुरु: १३ महिने एका राशीत, गती अंदाजे २.३ अंश प्रतिमहिना,
शनी: ३० महिने एका राशीत, गती १ अंश प्रतिमहिना,
राहू-केतू: दीड वर्षे (म्हणजे १८ महिने) एका राशीत, गती १.६६अंश प्रतिमहिना,

आणखी एक महत्वाची गम्मत आहे. दोन ग्रहांची युती होताना एक ग्रह मंदगती असतो व दुसरा शिघ्रगतीचा असतो. जोवर युती करणाऱ्या दोन ग्रहांचे अंशात्मक अंतर ० पर्यंत होत जाते तोवर त्यांच्या योगाचा प्रभाव वाढत वाढत परमोच्च बिंदुला पोहोचतो. एकदा का शीघ्र ग्रह पुढे एखाद्या अंशाने सरकला कि योगाचा परिणाम चक्क निम्मा होतो. सुमारे दोन अंशानंतर प्रभाव जवळपास संपून गेलेले असतो. जसे लग्न व्हायच्या आधी खूप प्रेम असलेले प्रेमी एकदा नवरा बायको झाले कि तू-तू मै मै सुरु होते तशातला हा प्रकार आहे. प्रश्नकुंडली आणि गोचरीचे ग्रह यांचा कालनिर्णय करताना हे फार महत्वाचे असते.

तर अशा प्रकारे आपण पहिले कि ग्रह आकाशात भ्रमण करीत असताना अनेक प्रकार करतात. वक्री, अस्तंगत, योग करणारे असे अनेक प्रकार ग्रहांचे होत असतात. त्यामुळे काहीना काही प्रभाव मानवावर व सृष्टीवर होत असतो. या सगळ्या प्रकारात क्लिष्टता आहे पण काहीतरी तारतम्य सुद्धा आहे, ते नेमके हेरले कि होणाऱ्या घटना कशा असतील याचा अंदाज बांधता येतो. पुढे लग्नकुंडली व प्रश्नकुंडली ह्यात होणारे योग कशी फळे देतात हे पाहूया. तोवर गणेश प्रतिष्ठापनेचा अनेक अनेक शुभेच्छा!!