Saturday, 8 October 2016

भाग्यरेषा: पैसा, पैसा आणि पैसा

पैसे कुणाला नकोय, दात पडले असतील तरी माणूस चणे गोळा करतच असतो. पैसे प्रत्येकालाच हवे असतात. त्यातच स्थिर प्राप्ती होत असेल तर स्वतःची आणि प्रपंचाची काळजी करावी लागत नाही. आपण ह्या लेखात भाग्यरेषेचा विचार करूया, कारण भाग्यरेषा ही जवळ असणारा पैसा व पैसे कमावण्याची शक्ती दर्शविते. ही शक्ती परिस्थिती सापेक्ष असते. आजूबाजूची परीस्थिती हलवून सोडून पैसे मिळवण्याची क्षमता भाग्यरेषेवरून सूचित होते. 

त्याआधी हातावरील मुख्य रेषा कुठल्या हे खालील चित्रात पहा,
 

आपण भाग्यरेषेच्या काही मूलभूत बाबी समजावून घेऊ, केस-१
 ह्या व्यक्तीची भाग्यरेषा फार लवकर म्हणजे मनगटाजवळ सुरु झाली आहे. याचा अर्थ कुटुंबात ह्या व्यक्तीला लहानपणीच बरेच अधिकार मिळाले. थोरला असणे, लाडका असणे, एकुलता एक असणे, व्यवहारज्ञान अधिक असणे अशा कारणास्तव वयाच्या लहानपणीच असे अधिकार मिळतात. 


 वय वर्षे १५ च्या आधीच सुमारे १० वर्षे भाग्यरेषा ठळक आहे, म्हणजे ही व्यक्ती चांगले भाग्य अर्थात पैसा ह्याची मालक अगदी वयाच्या ५ व्या वर्षांपासून झाली होती. अर्थात ह्या व्यक्तीने स्वतःच्या करिअर कडे लक्ष दिले. स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे गेला. त्यामुळे भाग्यरेषा आयुष्यरेषेपासून दूर सुरु होतेय. आत्ता ह्या व्यक्तीचे वय ४५ च्या दरम्यान आहे. तोवरचा काळ उत्तम पदावर नोकरी करण्यात गेला. सांप्रतच्या काळात काही अडचणी निर्माण झालेल्या दिसत आहेत. ही व्यक्ती परदेशात स्थायिक आहे, परदेशी नागरिक आहे. चित्र झूम करून पहा. 

 आता थोडक्यात भाग्यरेषा काय काय दर्शविते ते बघू,
 १) भाग्यरेषेची सुरुवात: ह्यावरून व्यक्ती स्वकर्तृत्व करून पैसे मिळवणार कि वडिलार्जित व्यवसाय करून जगणार हे कळते. 
२) भाग्य रेषेची लांबी ही कर्तृत्वाचा काळ दर्शविते. ज्यावेळी भाग्यरेषा बोटाच्या मुळापर्यंत जाते तेव्हा ती व्यक्ती वयाच्या ८० -९० व्या वर्षापर्यंत कार्यरत असते. 
३) भाग्यरेषेला समांतर पण न छेदणाऱ्या रेषा इतर मार्गाने येणारे उत्पन्न व धन दर्शवितात. 
४) भाग्यरेषेला कट करणाऱ्या रेषा खर्च दर्शवितात. 
५) भाग्यरेषेवरील त्रिकोण दुधात साखर असल्यासारखे पैसे कमावण्याचा अधिक अनुकूल काळ दर्शवितात. 
६) भाग्यरेषेला वर जाणारा फाटा किंवा अनेक फाटे असल्यास तो योग पैसे द्विगुणित त्रिगुणित करणारा योग असतो. 
७) भाग्यरेषेला व्यत्यय किंवा छेद असेल तर उपजीविकेचा मार्ग बंद होऊन परत सुरु होतो. 
८) हातावर भाग्यरेषा नसेल तर तो माणूस कंगाल असतो असे नाही. पण तो कर्तृत्वहीन असतो. मोठ्या श्रीमंत घरात जन्मलेल्या व्यक्तीच्या हातावर कधी कधी भाग्यरेषा दिसून येत नाही. कारण धन असते ते नुसते ऐश आणि आरामासाठी वापरले जात असते. त्यात वाढ करायची वृत्ती दिसून येत नाही. 

तर अशी आहे भाग्यरेषा. हिचे बरेच बारकावे आहेत. 

केस-२ 
 दोन्ही हात पहिले असता व दोन्हीवर भाग्यरेषा सारख्याच प्रकारची असेल तर आर्थिक यश येण्याची खात्री पक्की होते. बऱ्याचदा एक व्यक्ती युरोपमध्ये बसून लाखो रुपये छापत असते आणि तेच शिक्षण, तोच अनुभव असलेली व्यक्ती मात्र एखाद्या खेड्यात तितकेच कष्ट घेऊन काही हजार कमावू शकते त्यातला हा प्रकार आहे. 

भाग्यरेषेच्या बाबत व्यक्तीची पार्श्वभूमीही पाहावी लागते.
 ह्या व्यक्तीच्या बाबतीत ह्याचे उत्तम सेव्हिंग झाले आहे, दुसरा जोड व्यवसाय करण्यासारखी स्थिती दिसत आहे, पण तसे वास्तवात नाही. याने त्याची सर्व संपत्ती पत्नीच्या नावे केलीये आणि ती संपत्ती ती मुलांसाठी वापरणार आहे. त्यामुळे तो ती संपत्ती स्वतःच्या मर्जीने वापरू शकत नाही. भाग्यरेषा १ व २ मध्ये अंतर आहे. त्याच जर एकत्र मिळाल्या असत्या तर संपत्ती तो वापरू शकला असता. 

तर असा हा भाग्यरेषेचा खेळ आहे. कोण लिहून ठेवते. कधी लिहून ठेवते. कोणास ठाऊक!!









Sunday, 2 October 2016

हस्तरेषा: चक्रावून टाकणारे शास्त्र-१

वाचकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 नियती नेहमीच प्रत्येक सजिवाशी संवाद साधायचा प्रयत्न करत असते. प्रत्येक सजीवाला जगण्याची एक अदभूत शक्ती विधात्याने दिलेली आहे. शिकार करायची व शिकार होण्यापासून वाचायची शक्ती अथवा कुत्रा, टिटवी सारख्या प्राण्यांना भूकंप, अशुभ यांची अचूक चाहूल लागणे हा त्यातलाच प्रकार आहे. माणूस त्यामानाणे मठ्ठ प्राणी आहे असे म्हणायला हरकत नाही. पण माणसाची बुद्धी हे त्याचे सर्वात बलवान शस्त्र आहे, त्याआधारे त्याने कायच्या काय वैज्ञानिक प्रगती केलीय. 

विषय नियतीशी संवादाचा चालू असल्याने नियती माणसाशी संवाद कसा साधते हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. ज्योतिष्यशास्त्र, हस्तरेषाशास्त्र ही अशी काही शास्त्रे आहेत कि जी वेळोवेळी पुढे काय मांडून ठेवले आहे, भूतकाळात काय घडून गेले व का घडून गेले, वर्तमानात काय घडत आहे ह्याचा पूर्ण आलेख मांडून ठेवणारी शास्त्रे आहेत. अर्थात ती समजून घेण्यासाठी एक विद्यार्थीभावना मनात असणे फार गरजेचे आहे. नुसती तर्कबुद्धी आणि ठोकताळे मांडून ओढून ताणून एखादा नियम एखाद्या घटनेला लावून चालत नाही. त्यात हात बघून गल्लोगल्ली फिरणाऱ्या भविष्य सांगणाऱ्यांनी मोठा झोल करून ठेवला आहे.  तो वेगळाच.

आता पाश्चात्य देशात कुंडलीचा प्रगत अभ्यास करणारे होरारी शास्त्र प्रगत होत आहे. हस्तरेषा शास्त्राचा अभ्यास पुरातन काळापासून चीन व पूर्व-दक्षिण आशियात होत आला आहे व आधुनिक काळात काही विशिष्ट प्रकारच्या हस्तरेषा (जसे सिमियन क्रीझ) सारख्या रेषांचा व्यक्तीच्या जनुकीय जडणघडणीशी संबंध असल्याचे शोध लागत आहेत. हस्तरेषा विषयावर प्रगत देशात मोठे संशोधन होत आहे. आपल्या देशात मात्र हस्तरेषा म्हटल्यावर काही खास लोक हातावरून कपाळावर उडी मारतात आणि म्हणतात कि "कपाळावर काय लिहिले असते का?" खरेतर कपाळावर काही लिहिले असते का हे मलाही माहित नाही. पण कपाळावर इतक्या मोजक्या रेषा असतात कि त्याआधारे इतके मोठे व वाकडे-तिकडे भविष्य कसे काय लिहिले असेल अशी शंका येते. तो विषय मी अजून अभ्यासलेला नाही.  म्हणून मी फक्त हस्तरेषा ह्याविषयी पुढे लिहितोय.

हस्तरेषा शास्त्राची सर्वात मोठी गम्मत हि आहे कि आपला हात अगदी लहान असतो पण त्यात ६० ते ७० वर्षाच्या आयुष्याचे भविष्य लिहिलेले असते. म्हणजे एखादे महिना किंवा वर्षाचे भाकीत वर्तविताना भारत देशाचा नकाशा समोर ठेऊन त्यात "३३० मनोहर  अपार्टमेंट, शाहू गल्ली सोलापूर" किंवा " ३८१ सत्संग निवास, शनिवार पेठ पुणे" कोठे आहे हे तपासण्यासारखे होते. अर्थात प्रश्न विचारणाऱ्याने आणि भविष्य कथन करणार्याने ह्याचे तारतम्य विचारात घेऊनच भविष्य सांगणे गरजेचे असते. 

व्यक्ती तितक्या  प्रकृती असतात तसेच अनेक अदभुत हस्तरेषा असलेले हात समोर येतात. प्रत्येक वेळी एखादा माहित असलेला नियम तिथे लागू होत नाही. एखादी रेषा कुठून सुरु होऊन कुठे जाते व त्या व्यक्तीच्या जीवनातील कुठला काळ कुठे चालला आहे, पूर्वी काय घडले आहे व पुढे काय घडणार आहे हे सर्व त्या  रेषेचा तरतम विचार करूनच सांगावे लागते. नसते ठोकताळे लावून तोंडावर पडायची वेळ येऊ शकते. 

हातावरील प्रत्येक जाड (मोठी) तसेच सूक्ष्म रेषा काहीतरी निर्देशित करीत असते. रेषांचे त्रिकोण, चौकोन, रेषा एकमेकांना मिळणे, काटून पुढे जाणे, ऊर्ध्वगामी उभ्या रेषा, आडव्या रेषा, रेषांचे जाळे, रेषांवरील चिन्हे ह्यांचे अर्थ ठरलेले आहेत. हातावरील उंचवटे, बोटांची परस्परसापेक्ष लांबी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अंगठा, त्याची लांबी बाक ह्यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात. 

हातावरून काय कळते? स्वभाव, मनस्वास्थ्य, समाधान, कष्ट, पैसा, कतृत्व करण्याच्या वेळा, खर्च होण्याच्या वेळा, बुद्धिमत्ता, डोक्याला होणाऱ्या इजा, शारीरिक व्याधी, अपघात, मित्र, संतती (किती व कधी) विवाह (कधी व वैवाहिक सुख कसे) , शिक्षण, खास कर्तृत्व गाजवण्याचा काळ, भाऊ बहीण व त्यांची मदत, परदेशगमन असे असंख्य गोष्टींचे ज्ञान हाताच्या अभ्यासावरून होते. 

बऱ्याच लोकांना अशी अपेक्षा असते कि ह्या महिन्यात मला अमुक सरकारी नोकरी मिळेल का किंवा लॉटरी लागेल का किंवा नुकसान होईल का हे सांगा. पण आधीच सांगितल्याप्रमाणे एका महिन्याच्या काय वर्षाच्या अचूकतेने कालनिर्णय करणे ह्या शास्त्रात कधीकधी अशक्य असते. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या व्यक्तीच्या भाग्यरेषेला मधोमध २ काटणाऱ्या रेषा आहेत व अंदाजे तो कालावधी त्या व्यक्तीच्या वय वर्षे २१ व ३५ ला येतोय. सध्या त्या व्यक्तीचे वय २५ चालू असेल तर तसा नुकसानीचा एक योग पूर्वी येऊन गेलाय व पुढे एक येणार आहे हे आपण सांगू शकतो. पण बऱ्याचदा अशा काटणाऱ्या असंख्य रेषा असतील तर बरेच योग येणार आहेत इतकेच काय ते आपण सांगू शकतो. काही लोकांच्या हातावर भाग्यरेषा नसतेच. ती एक वेगळी गम्मत आहे. असो. 

यापुढील ३ लेखात हे हस्तरेषा प्रकरण काय आहे हे उदाहरणासहित आपण विचारात घेऊ. नक्कीच हे तोंडात बोट घालायला लावणारे शास्त्र आहे हे म्हटल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.