Sunday, 29 May 2016

वंशवाद: किती खरा किती खोटा?

प्रत्येकाला आपल्या वंशाचा, त्यांच्या इतिहासाचा, पूर्वजांचा खूप अभिमान असतो. माणूस आपल्या शक्ती भूतकाळात शोधत असतो. माझ्या पूर्वजांनी हे केले ते केले हे आपण जोरात सांगत असतो. हे सांगतानाही आपण इतके हिंसक का होतो?
हिंसा आणि अहिंसा ह्यात काय चांगले ह्या वादात मी तूर्तास पडत नाही. फाशीची शिक्षा ही एक हिंसाच आहे, ही हिंसा करायला समाज का प्रवृत्त होतो ह्याची कारणे महत्वाची आहेत. तोही विषय तूर्तास बाजूला ठेऊ. 
आपला समाज एका मोठ्या बदलातून पुढे जात आहे हे आधी समजून घेणे महत्वाचे आहे. आपली १०० ते ११०० वर्षापूर्वीची पिढी ही मोठी गुलामगिरी भोगत होती. ह्या गुलामगिरीत समाजव्यवस्था पूर्ण भरडली गेलेली होती. अगदी साधे साधे मुद्दे विचारात घेतले तर सुरुवातीस परकीय आक्रमणांच्या काळात,
१) गोमांस खाणे/ न खाणे,
२) मूर्तीपूजा,
३) एकपत्नी प्रथा,
४) एकेश्वरवाद 
वंशवाद आणि जाती : इत्यादी मुद्द्यांचा आधार घेत आपल्या समाजाची आर्थिक आणि सामाजिक लुट करण्यात आली. ही लुट होत असताना समाजाचा जो पुरुष वर्ग असतो तोच सगळ्याला जबाबदार असल्यामुळे त्यावर काही मानसिक आघात होत होते. त्या आघातामुळे तो एकप्रकारे अतिरेकी विचार करू लागला होता. हे अतिरेकी विचार करणे पूर्णतः नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहेत. फाईट ऑर फ्लाईट (म्हणजे लढा किवा पळून जा) ह्या मानसिक अवस्थेत माणूस विचित्र मानसिक आघात झेलत असतो. आजही मुस्लिम राष्ट्रात अमेरिकेच्या दादागिरीबद्दल राग आहे तो याच कारणास्तव आहे. हा राग एकांगी असतो. समाज अशाच एकांगी प्रकारे घडत जात असतो. तसाच आपला समाज एकांगी पद्धतीने घडत गेला. भले आम्हाला आमच्या जातींच्या उच्च/नीचता चालतील पण आमच्या मूळ संकल्पांना हात लागता कामा नये असा विचार जुन्या समाजाने स्वीकारला. त्यातून जातीव्यवस्था जन्माला आली आणि मूळ धरू लागली.
७०० ते ८०० वर्षापूर्वी दळणवळणाची साधने अत्यल्प होती, त्यामुळे परकीय अक्रमने रोजच्या रोज होत होती असे नाही. इतिहास तपासला तर अशी अक्रमने परदेशात मोठी शक्ती उदयाला आली कि फारतर ५०-१०० वर्षातून एखादे मोठे आक्रमण होत असे. पण ते इतके भयंकर असे कि समस्त समाज अशा आक्रमणासाठी तयार होऊन बसत असे. कोणी हत्यार घेऊन, कोणी पोथ्या घेऊन, तर कोणी कारागीर व सेवक म्हणून. ह्याच त्या आपल्या जाती! 
बुद्धिबळाच्या खेळातील राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादी हे आपले सैन्य, बाकी राहिले ते युद्ध न करू शकणारे सर्व. हे आम्ही आपपसात ठरवून घेतलेले होते. 

तरीही शेतकरी समाजात वंशवाद एका वेगळ्या अर्थाने पुढे आला. चांगले बियाणे उत्तम पिक देते, चांगल्या दर्जाचा घोडा, बैल, शेळी, मेंढी इत्यादी चांगल्याच पिल्लांना जन्माला घालतात हे शेतकऱ्यांना समोर दिसत होते. हेच तत्व मानवाने स्वतःबद्दलही वापरले. काही राजकीय वंशांशी विवाहादी नाती जोपासणे हा त्यातीलच एक भाग होता. 
हे सगळे होत होते ते फक्त सवर्ण लोकांत, सामान्य मागासवर्ग असले छंद कधी जोपासत नव्हता, किवा त्याला ह्याची गरजही नव्हती. पण ब्राम्हण क्षत्रीयादी वर्णांना हा मात्र आपली शक्ती वाढविण्यासाठी उत्तम वंशाशी नाते जोडणे गरजेचे होते. संकराचे शास्त्र इतके पुढारलेले नसले तरी सामान्यतः चांगल्या बीजातून उत्तम संतती जन्माला येते इथवर लोकांना कळू लागले होते. 
मग इथूनच पुढे राजे-राजवाडे त्यांची मुले ह्यांची लग्ने करताना त्यांना उपवर मुलगा शोधताना वंशाचा विचार केला जाऊ लागला. उंचपुरा, राजबिंडा मुलगा नक्की त्याच्यासारखीच संतती देणार हि गृहीतके बनवली गेली. तसेच राजकीय घरातील मुलींचेसुद्धा झाले. तर अशी ही राजघराणी बनत गेली. हाच प्रकार राजाचे सरदार, सेनापती, सैनिक ह्यांनी पुढे चालू ठेवला. 
पण जनुकीय शास्त्र मात्र ह्या सगळ्या गोष्टी मानत नाही. संपूर्ण पांढरी आई व वडील असलेल्या पिल्लाचे रंग तपकिरी, करडा किवा आणि काही विचित्र असू शकतो. कारण ह्याआधी जी क्रोमोसोम ची असंख्य वर्षे मिसळ-सरमिसळ चालली आहे ती ह्याला कारणीभूत आहे. पिल्लू जन्माला आले तर ते आई-बाबांपेक्षा काही बाबतीत उजवे असू शकते किवा काही बाबतीत त्यात कमतरता असू शकते. हे पूर्णतया नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे. 
पण तरीही जेव्हा जेव्हा वंश वाद उफाळून आला तेव्हा आम्ही अमुक एका वंशाचे म्हणून श्रेष्ठ असे मानण्याशिवाय दुसरा पर्यायाच शिल्लक नव्हता.
विशेष म्हणजे हा वंशवाद जपण्यासाठी परदेशातून चांगल्या जाती मागवल्या गेल्या तेही काही वाईट नाही म्हणा . ह्यासंबंधी अनेक राजकीय दाखले वेळोवेळी मिळतात. 
तर वंशवाद हा जातीयवादाचा एक भाग आहे. यथा राजा तथा प्रजा ह्या ऊक्तीप्रमाणे जे कारागीर वर्ग व सेवक होते त्यांना हि पुढे ह्या वंशवादाची लागण झाली.
एकास एक युद्धात शक्तिशाली पुरुष आवश्यक होता. म्हणून चांगली प्रजाती निर्माण करणे गरजेचे होते. पण हे होत असताना युद्धाची शस्त्रे, कुटनीती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सैनिकांची संख्या इत्यादीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. आपल्याकडून काही जातीचे आणि वंशाचेच लोक युद्ध करीत होते तसे आपल्या शत्रूचे नव्हते ते सगळेच लढत असत, आणि संख्या ही एकास एक युद्धात फार महत्वाची होती. 
नुसते शरीर मोठे असून चालत नाही, मेंदूही तितकाच मोठा हवा. पण ह्या वंश आणि जातीयवादाच्या वेली आपल्याला इतके घट्ट जखडून टाकतात कि तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. समोर जो चेहरा दिसतो तो अमुक एक वंशाचा आहे म्हणून श्रेष्ठ असे मानून आपण गुमान जीवन जगतो. असे खरेच असते का?




 

Monday, 16 May 2016

जातीयता: फायदे व तोटे!

जातीयता हा विषय नेहमीच चर्चिला जातो, आणि नेमका "सैराट" च्या निमित्ताने हा विषय गाजतोय, जातीयतेवर पुरोगामी महाराष्ट्राला नेमके काय म्हणायचे आहे, हे विचारात घेणे महत्वाचे आहे. 
जातीयता सोडायला आपला समाज अजून घाबरतोय, चित्रपट पाहून सुन्न झाले तरी तो विषय तिथेच विसरून जायची आपली सवय आहे, त्याची काय कारणे आहेत, 
१) बऱ्याच लोकांना जातीयता कशी निर्माण झाली हेच माहित नाही. एकेकाळी मोठे जातीय हुद्दे असलेले बरेच लोक आता शेतात पाणी नाही म्हणून जीव देतात. साध्या नोकऱ्या करतात. पण जातीचा विषय आला कि हिरहिरीने भांडायला लागतात. जुने जातीय हुद्दे हे त्याकाळातील सामाजिक स्थितीमुळे त्यांना मिळाले होते, ती स्थिती आता राहिलेली नाही. फार थोडे लोक जे आहेत ते ह्या जातीय समीकरणांचा फायदा घेत अजून टिकून आहेत. पण बहुसंख्य समाजातून आता ते जातीय हुद्दे नामशेष झाले आहेत. त्यांचा फक्त इतिहास शिल्लक आहे पण त्या इतिहासावर वर्तमान चालत नाही. बहुसंख्य समाज हा पूर्वी जसा प्रतिकूल स्थितीत जगत होता तसाच आज जगत आहे. 
२)  बरेच लोक असे आहेत कि त्यांना आपल्या जातीच्या संस्कारांचा, त्यांच्या इतिहासाचा, त्यांच्या कुलदैवत, त्यांचे वंश ह्यांच्यात ढवळढवळ होण्याची भीती वाटते म्हणून ते जातीला सोडायला तयार नसतात. संस्कार म्हणाल तर ते चांगल्या शिक्षणाने प्राप्त होतात. इतिहास, वंश, ह्यांचे पुरावे ५००-६०० वर्षापूर्वीचे सापडत नाहीत. हे इतिहास, वंशश्रेष्ठत्व फक्त उच्च जातियच मानतात असे नाही, तर ह्या प्रथा सगळ्याच जातीचे लोक मानतात. सगळ्याच जातीत जतिअंत व्हावा असे न वाटणारी एक पिढी अस्तित्वात असतेच. 
३) पूर्वी एकतर स्त्रिया घरातून बाहेर पडतच नव्हत्या (हा बहुतेक एक गैरसमज आहे) कारण शेतकरी स्त्रिया पतीच्या खांद्याला खांदा लावून शेती करतात, शेतमजुरी करतात हे आजही आपण पाहतो. आतातर बहुसंख्य समाजाच्या स्त्रिया बाहेर पडताहेत, शाळा, कॉलेजात शिकत आहेत, अशावेळी इतर जातीच्या मुलांचा संपर्क त्यांच्याशी येणारच. तेव्हा त्यापैकी एखादा मुलगा/मुलगी जरा जास्त उद्योगी असेल तर तो दुसऱ्या एखाद्या मुलगा/मुलीवर इम्प्रेशन मारणार. कधीकधी फसवणूक सुद्धा करू शकणार. अशी फसवणूक होऊ नये म्हणून कायद्याने विवाहाचे वय हे निर्धारित केलेले आहे. हे विवाहाचे वय जागतिक निकष व अनेक देशांचे अनुभव त्यांचे कायदे यांचा अभ्यास करूनच ठरवले गेले आहे. त्यामुळे आपला मुलगा मुलगी घरातून बाहेर पडले म्हणजे त्यांची फसवणूक होणार हे समजणे चुकीचे आहे. उलट मुलांवर आपली मते लादण्यापेक्षा त्यांना योग्य ते निर्णय घेण्याचे ज्ञान आपण दिले तर ते योग्य निर्णय घेऊ शकतात. 
४) पूर्वीच्या जातीपाती जशा संपत चालल्या आहेत तश्या नवीन जाती समाजात निर्माण होत आहेत. एखाद्याची आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक स्थिती ह्यावरून नवीन वर्ग निर्माण होत आहेत. एखादा डॉक्टर, इंजिनियर असेल तर तो दुकानदाराला कमी समजतो, किवा राजकारणी (खरे तर हा व्यवसाय नाही पण) एखाद्या सामान्य मध्यमवर्गीयाला कमी समजतो, कोणी पोलिस, कोणी मिलिटरीमन, कोणी सरकारी नोकर, कोणी सफाई कामगार असे नवीन वर्ग निर्माण होत आहेत. कदाचित ह्या वर्गांचेही पूर्वीच्या जातीत रुपांतर होऊ शकते. जसे पूर्वी अशाच पद्धतीने जाती निर्माण झाल्या तसे आताही होऊ शकते. मग परत त्या जाती निर्मूलनाचे काम नव्याने करावे लागणार. 
५) अजूनही मोठा समाज जुने ते सोने समजतो, मी ७० वर्षे कुठलेही औषध न घेता कसा धडधाकट आहे हे सांगत असतो. आता पूर्वीसारख्या पटकी, प्लेगच्या साथी येत नाहीत हे ह्या धडधाकट लोकांचे नशीब! पूर्वी माणसाचे साधारण आयुर्मान २० ते ४० होते ते आता ६० वर्षांच्या आसपास आले आहे. तलवारी कधीच गेल्यात, त्याच्या जागी बंदुका येउन आता ड्रोन आकाशात उडताहेत. समुद्र ओलांडणे पाप हे समजणारे आता विमानाशिवाय जगू शकत नाहीत! स्वतः मोबाईल फोन वापरणारे शेतकऱ्याला मोबाईल इंटरनेट का वापरू देत नाहीत? 
कारण एकाला अडाणी ठेवण्यात आपल्या समाजाचा मोठा स्वार्थ दडलेला असतो, तो एका ठराविक जातीचा दुर्गुण नाही. पूर्वीचा वैश्य हा क्षत्रियाला लढायला पाठवून स्वतः घरात धन साचवत असे, आणि तर क्षत्रिय लढायला जातो म्हणून त्याच्या मुभा घेत असे. 
पण ह्याच देशावर संकटे आली तेव्हा सगळे वर्ण एकत्र येउन लढायला का उभे ठाकले नाहीत? एकावर संकट आले तर दुसरा म्हणतो तो त्याचा प्रश्न आहे तो ते बघून घेईल. 
बर शेजारच्या गावावर संकट आले तरी अजून माझ्या दारात आले नाही ना म्हणून मी शांत झोपतो. 
हे सगळे होण्यामागे आपला समाज लढवैय्या नाही असेही म्हणने चुकीचे होते, प्रत्येक जाती वर्णाचा, गावाचा माणूस हा स्वतःचे अस्तित्व जपण्याचा अटीतटीचा प्रयत्न करत असतो. पण कधी? जेव्हा त्याला योग्य वेळी, योग्य धोका लक्षात येण्याची संधी मिळाली तरच!
पूर्वी ही संधी सामान्य बहुसंख्य लोकांना मिळत नव्हती, आज पाकिस्तान, चीनने काही हालचाली, लफडी केली कि सगळे कान टवकारून उभे राहतात, ही आपली राष्ट्रवृत्ती आहे, लढायची वेळ आली तरीही सगळ्या जातीधर्माचे लोक मागे हटले नाहीत, कि घरात झोपून राहिले नाहीत. हे असे आत्ताच का होतेय, आणि पूर्वी का होत नव्हते? 
आता सार्वजनिक संवादाची साधने वाढलीत, लोकशाहीचा पाचवा स्तंभ हा जो मेडिया आहे तो घरोघर पोचतोय. हे असे पूर्वी होणे अशक्य होते, शिवाजींचे स्वराज्य (जे पेशवाईत लयास गेले), १८५७ चे बंड जे अयशस्वी झाले. हे आपल्या समाजात सुसंवाद नसल्यानेच घडले.  अजूनही शेतकरी समाज जुनाट कल्पना डोक्यात ठेऊन मोबाईलही वापरायला नकार देत असेल तर काय करायचे?
समाजात संवाद नव्हता त्याचा मुठभर लोक फायदा घेत राहिले. स्वतःचा बचाव करीत राहिले व मोठमोठे इमले उभारत राहिले. 
ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आत्ताही बरेच राजकीय लोक काही गुपिते सामान्य जनतेपासून लपवून मोठी माया जमा करतात. धरणातले पाणी कुठे गायब होते ते आपल्याला कळत नाही. अजूनही आपली पिढी जर जातीयतेत अडकली असेल तर आपण असे फसवले जाणारच, यात वाद नाही. पुढे जायचे असेल तर ह्यातून बाहेर यायलाच हवे. हजारो कोटींचे हिशेब/बेहिशेब बघून नुसते आ वासून बसण्यात काय अर्थ आहे.