Tuesday, 16 January 2018

आधुनिक जीवनशैली व मंगळदोष.

मंगळदोष हा रोजच्या जीवनात सहजासहजी न दिसणारा दोष आहे. ज्यावेळी घनिष्ट मैत्री किवा विवाहासारखे नाते बनते तेव्हा प्रत्येकाच्या आवडीनिवडी प्राथमिकता इत्यादी बदलते व हा दोष प्रकर्षाने दिसायला लागतो.
एका पिढीतील ज्योतिषी अनेक अपवाद सांगून मंगळदोषाचा परिहार होतोय व विवाह निर्धास्तपणे करा असा सल्ला देताना दिसत होते. मुलगा मुलगी यांच्या शिक्षणातील विषमता, जात, धर्म, वय यामुळे असा परिहार सांगणे योग्य आहे असेही एकीकडे वाटते. पण तसे खरे आहे का किवा होते का हेही पडताळून पाहणे महत्वाचे आहे.
हा परिहार पूर्वी कसा सांगितला गेलाय याच्यावर थोडक्यात नजर मारू. दोष परिहाराचे निकष: मंगळ कर्क या त्याच्या नीच राशीचा, शत्रुगृही म्हणजे मिथुन व कन्या राशीचा, अस्तंगत म्हणजे सूर्याजवळ असताना, प्रथमात मेषेचा, चातृर्थात वृश्चीकेचा, सप्तमात मकरेचा, अष्टमात सिंहेचा व द्वादाशात धनु राशीचा मंगळ निर्दोष समजला गेला आहे. मंगळावर शुभ ग्रहाची म्हणजे गुरु व शुक्राची पूर्ण दृष्टी असता तोही निर्दोष समजला गेला आहे.
मंगळ वर दिलेल्या राशीत असताना निर्दोष म्हटले जाते. पण त्याचे नक्षत्र व अंश पहिले जात नाहीत. कारण काही ठराविक नक्षत्रात असलेला मंगळ दोषी असू शकतो तसेच काही ठराविक अंशावर असतानाच तो नीच किवा परम नीच असतो. इतर अंशावर असे असत नाही. बरेचदा प्रथमात मेषेचा ऐवजी सप्तमात मेषेचा मंगळही निर्दोष म्हणून सांगितला जातो. त्याला काय होतंय अशी वृत्ती असते. असे निर्दोष ठरवण्याचे मार्ग असले तरीही मंगळ हा मंगळच असतो त्याचे काही अक्रमक गुणधर्म तो सोडत नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
पुढे मंगळाच्या कुंडलीला प्रतिकारक कुंडली म्हणून काही नियम दिलेत त्याचा विचार करू. अशी कुंडली ज्याला मंगळ आहे त्याची नसून संभाव्य जोडीदाराची असावी असा नियम आहे पण अनेकजण हा नियम उमेदवारालाच म्हणजे ज्याची कुंडली आहे त्यालाच लाऊन टाकतात.
जोडीदाराच्या कुंडलीत १,४,७,८,१२ या स्थानी शनी असेल तर, पंचमात व दशमात शनी असेल तर, १ किवा ७ स्थानी बलवान गुरु किवा शुक्र असतील तर, १ किवा ७ स्थानी राहू किवा केतू असेल तर अशा जोडीदाराची कुंडली मंगळाच्या कुंडलीला प्रतिकारक असते.
आता यातील शनीचा प्रतिकारकतेच्या दृष्टीने विचार करू. एक जण जर अक्रमक असेल तर दुसरा शांत असणे असा याचा एक अर्थ निघतो, पण जोडीदाराचा मंगळ कुठे आहे याचा विचार इथे होत नाही. पंचमात आणि दशमात शनी असणे म्हणजे जोडीदार मुले, जबाबदाऱ्या व ध्येय यात अडकून पडलेला असतो त्यामुळे तो मंगळ असलेल्या आपल्या जोडीदाराच्या किरकीरीकडे फारसे लक्ष देत नाही. गुरुबद्दल म्हणायचे झाले झाले तर न्याय्य हक्कांसाठी गुरु-मंगळ योग अडून राहणारा ठरतो व भांडायला कमी करत नाही. शुक्र फक्त भोग भोगणारा असतो म्हणजे ते नाते भोगावर आधारित असते. शुक्र-मंगळ योग दोघे एकमेकांची अनैतिकता खपवून संसार करणारे असू शकतात. राहू-केतू म्हणजे जोडीदार फारच सोशिक असतो व ठेविले अनंते ... नुसार सहन करणारा असतो.
एकेकाळी समाज अपवादामुळे संसारात कितीही अडचणी आल्या तरी व एकमेकांचे पटले नाही तरीही काडीमोड करायचा विचार नवराबायको करत नव्हते. पण आज कायदेशीर हक्क, बदललेला समाज, स्त्रियांना नोकरीच्या संधी, उंचावलेले जीवनमान यामुळे घटस्फोट घेणे फारसे अवघड राहिलेले नाही.
या बदललेल्या काळात मंगळाच्या निर्दोषतेचे जुने निकष लाऊन उपयोगाचे नाही. बरेचदा निर्दोष समजला गेलेला मंगळ आयुष्यात कधीतरी नवराबायकोत वादळी घटना निर्माण करून जातो.
हे सगळे असेल तर नेमके करायचे काय? यावर उपाय काही आहे का? पुढच्या लेखात.