नवरात्र हा शेतकरी व आदिम संस्कृतीचा फार महत्वाचा कुलाचार आहे. असंख्य
वर्षे ही परंपरा कशी टिकून राहिली हे जाणून घेणे उद्बोधक आहे. त्यासाठी आपण
आधी आद्य-कुलस्वामिनीच्या तत्वाची ओळख करून घेऊ.
महिषासुरमर्दिनीचे स्वरूप: देवीचे स्वरूप हे नेहमी महिष म्हणजे रेड्याला मारताना दाखवले गेले आहे. ह्याचा काळाचा शोध घेतला असता आपण फार पूर्वी म्हणजे सुमारे २० ते ५० हजार वर्षे मागे जाऊन पोचतो. मानव शेती करायला लागल्याचा काळ हा सुमारे १०००० ते १५००० वर्षापूर्वीचा आहे. त्यापूर्वी कित्येक हजार वर्षे माणूस हा रानटी अवस्थेत होता. पशुपालन विकसित होत होते. हा काळ फार मोठा म्हणजे सुमारे ३० ते ४० हजार वर्षे चालला. पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात होती. सुमारे ७००० वर्षापूर्वीची पूर्व-सिंधु संस्कृतीतील खालील प्रतीके पाहिल्यावर हे लक्षात येते.
वरील चित्रातील ध्यानस्थ बसलेला पुरुष स्वतः आद्यपुरुष महिष (पृथ्वी पती म्हणजे महि+इष), अर्थात महेश म्हणजे शंकर आहेत. विशेषतः डोक्यावर दर्शविलेली शिंगे म्हणजे माणूस व महिष यातील संबंध दर्शवितात. पुढे माणूस शेती करत स्थिरावत होता तसे नागरी संस्कृतीची निर्मिती करावी लागली. रानटी अवस्थेत जशी पुरुषाची शक्ती महत्वाची असते तशी नागरी संघटीत समाजात स्त्रीची शक्ती व तिचे अधिकार महत्वाचे बनतात. इथे स्थिरता, निर्मिती ह्यांना महत्व आहे. स्त्रियाच शेतात पेरणी करीत असत असे संशोधक सांगतात. गाव निर्माण झाले तसे ग्रामदेव व ग्रामदेवी ह्या अस्तित्वात आल्या.
रानटी अवस्थेतील पुरुषाला (अर्थात महीषाला) सुसंस्कृत नागरी/शेती करणाऱ्या समाजात सामावून घेताना बराच संघर्ष झाला. ते कार्य आपली आद्य स्त्री म्हणजे कुलस्वामिनी पार पाडले हे वरील चित्रात दर्शविले आहे. आज नामशेष झालेला रेडा हा प्राणी पूर्वी समस्त भूमी व्यापून राहिलेला होता. त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी मानवाला मोठा उद्योग करावा लागला आहे. हा रेडा हटवूनच पुढे शेतीचा मार्ग प्रशस्त झाला होता. नक्कीच काहीतरी मोठी उलथापालथ ह्या रेडा प्रकरणात झालेली आहे. नवमीला दिला जाणारा पशुबळी याचेही इथे काहीतरी तारतम्य आहे. पुढे तो बळी प्रतीकात्मक म्हणजे इतर प्राणी जसे बोकड इत्यादींचा द्यायला सुरुवात झाली. आता पशुबळी प्रथा गरज नसल्याने बंद होत आहे.
तर अशाप्रकारे आपण देवीच्या आद्य स्वरूपाचा विचार केला. आता आपण नवरात्र ह्या कुलाचाराचा अभ्यास करू,
घटस्थापना: "पेरले तर उगवते" अशी म्हण प्रसिद्ध आहे. आद्य समाजात प्रत्येकाची थोडीफार शेती होतीच. ह्या शेती उद्योगाचे स्मरण करून देणारा जो कुलाचार आहे तो म्हणजे घटस्थापना. हे व्रत नाही हा कुलाचार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शास्त्रात केलेले आहे. आपण जे अन्न बनवतो ते अन्न ज्या शक्तीने निर्माण होते तिच्या पूजनाचा हा विधी आहे. हा विधी साधा सरळ असून आपण स्वतः सहज करू शकतो.
१) सर्व देव स्वच्छ धुवून नागिणीच्या पानावर ठेवले जातात. पानांचा देठ देवाकडे असतो. देवांना हळद-कुंकू, अक्षता अर्पण करून धूप, दीप दर्शवून अत्तर लावावे. दीप, घंटा इत्यादींचे पूजन करावे.
२) देवघरात सर्व देवांच्या समोर एक पाण्याचे चौकोन मंडळ काढून त्यावर थोड्या अक्षता टाकाव्यात. तिथे एका पत्रावळीवर वावरी (म्हणजे शेतातील काळी किंवा तपकिरी माती) सुमारे पाच बोटे खोल अंथरून त्यावर एक मातीचे मडके (सुगडी) सरळ राहील असे मातीत दाबून ठेवावे. हे मडके सच्छिद्र असावे. ते पाण्याने पूर्ण भरून त्यात तांदूळ टाकावेत. त्यावर ५ नागिणीची किंवा आंब्याची पाने लावून शेंडी वरच्या दिशेला करून नारळ ठेवावा. ह्या नारळ व घटाचे हळद-कुंकू, अक्षता अर्पण करून, धूप, दीप दर्शवून पूजन करावे. काही ठिकाणी वरील नारळाला वस्त्र घालण्याची पद्धत असते. हे वस्त्र लाल रंगाचे असावे. आपल्याला माहित नसेल तर कापसाला थोडे हळद-कुंकू लावून ते वस्त्र अर्पण करावे. जे सौभाग्यअलंकार पूजा साहित्याबरोबर मिळतात ते घटाच्या (सुगडीच्या) गळ्याजवळ घालावेत. ते नसतील तर विविधरंगी नाडा असतो तो बांधावा. तोही अलंकार स्वरूपच असतो.
त्यानंतर जी सप्तधान्य मिळतात ती आजूबाजूच्या मातीत बोटभर माती बाजूला काढून धान्य पसरल्यावर त्यावर ती माती टाकावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. यात प्रामुख्याने गहू तांदूळ, ज्वारी, बाजरी, जव, डाळी हे धान्य असते.
३) पहिली माळ ही नागिणीच्या पानांची किंवा फुलांची असते. अशा नऊ माळा नऊ दिवस घटाच्यावर खिळ्याला टांगून खाली घटावर येतील अशा प्रकारे सोडाव्यात. प्रत्येक दिवशी एक माळा अर्पण करीत जावे. माळेतील फुले/पाने संख्येने विषम असावीत. बरेच घरात ७ व्या माळेला कडाकणी व वेणी फणी अर्पण केली जाते. तीही नैवेद्य करून देवघरात वर खिळ्याला टांगून ठेवली जाते. रोज कपूर जाळून देवीची आरती करावी.
हि सर्व पूजा व घटस्थापना सकाळी १० च्या आत संपन्न झालेली उत्तम.
नित्यविधी: एकदा घटस्थापना झाली असता देव हलवू नयेत. रोज एक फुलांची माळ अर्पण करीत जावे. रोज पेरलेल्या धान्यावर थोडे पाणी शिंपडावे.
बरेच घरात एक व्यक्ती नवरात्रात उपवास करते. फळभाज्या (लाल भोपळा, काकडी इत्यादी) सुद्धा उपवासाला चालतात. इतर नेहमीचे उपवासाचे पदार्थ चालतात.
उपवास हा पहिल्या माळेला सुरु होतो व नवव्या माळेला त्याचा पारणा म्हणजे तो सोडला जातो. उठता-बसता केलेला उपवास हा फक्त पहिल्या व नवव्या माळेला केला जातो. म्हणजे सकाळी धरलेला उपवास रात्री सोडता येतो. काही लोक नऊ दिवस पायात पादत्राणे घालत नाहीत. पण तसा नवस असेल तरच ते करणे ठीक आहे.पादत्राणांचा नियम किवा कुलाचार नाही त्याऐवजी उपवास केलेला चालतो.
नवरात्र पूजाविधी स्त्री व पुरुष असे दोघांनी करायचा असतो. नवरात्राचा क्षय करून चालत नाही. कडाकणी व वेणी फणी सातव्या माळेला करता अली नाहीत तर नवव्या माळेला करावीत. बरेच लोक गावाची सीमा न ओलांडण्याचा उपक्रम करतात. उद्देश हाच आहे कि गावाबाहेर गेल्याने नवरात्रातील ९ दिवस देवीची सेवा करण्यात व्यत्यय येऊ नये.
नंदादीप/समई: समई व वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हा पूर्वीच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते हे विसरून चालणार नाही. नवरात्रात नंदादीप अखंड प्रज्वलित ठेवावा असा कुलाचार आहे. त्यासाठी काही काळजी घेणे महत्वाचे आहे. बरेचदा तेल संपल्याने किंवा काजळी जमा झाल्याने नंदादीप विझतो. त्यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी नंदादीपात (समईत) पुरेसे तेल आहे का हे तपासत जावे. सहसा २ किंवा ३ वाती असाव्यात. एकएक करून त्यांची काजळी लहान काडीने साफ करावी. वाती फार जाड नसाव्यात पण साधारण ६ इंच लांब असाव्यात म्हणजे ९ दिवसात वात बदलावी लागत नाही. असे केल्याने नंदादीप सदैव तेवत राहतो. चुकून एखादी वात काजळी काढताना विझली तरी दोष लागत नाही.
घट उठवणे: हा विधी नवमी म्हणजे नवव्या माळेला सकाळी केला जातो. १, ३ किंवा ५ पुरुष व स्त्रिया यांनी तळी भरायची असते. पुरुषांबरोबर स्त्रियाही तळी भरू शकतात. दिवटी असल्यास ती पेटवली जाते. एका ताटात हळद-कुंकू, कोरडे खोबरे, सुपारी व पाने घेतली जातात. डोक्यावर टोपी घालून सर्वजण गोलाकार बसतात. आई-राजा उदे उदे म्हणून तळी उचलतात. पानसुपारी ताटाखाली ठेऊन बाकीची प्रत्येकाला दिली जाते व हळद-कुंकू प्रत्येकाच्या कपाळाला लावले जाते. तसेच ते ताट हातात घेऊन एकाने घटाला स्पर्श करून व त्याच्या हाताला सर्वांनी स्पर्श करून उदो-उदो (म्हणजे उठ-उठ) म्हणून घट हलवला जातो.
आता परत तळी भरण्याच्या जागी येऊन कडाकणी ताटात घेऊन पुन्हा एकदा तळी भरली जाते. खोबरे व कडाकणी सर्वांना वाटली जातात. दशमीला घट त्यावर उगवलेले धान्य झाकून ठेवले जाते. बरेच जण नवमीला कुमारिका पूजन करतात. देवी कुमारिका स्वरुपात प्रकट झाल्याची कथा असल्याने कुमारिकेचे पाय धुवून तिला भोजन व भेटवस्तू दिली जाते.
दसरा/ विजयादशमी: नवरात्र उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. सीमोल्लंघन, शस्त्रपूजन, औजारांची पूजा केली जाते. गावाची वेस ओलांडून शमीच्या वृक्षाचे दर्शन घेतले जाते. नंतर गावात भैरवनाथ व मारोतीचे दर्शन घेण्याचा रिवाज आहे. सीमोल्लंघन करून घरी आल्यावर औक्षण केले जाते. नंतर तांदुळाचा महिषासुर बनवून त्याला कापण्याची प्रथा आहे. आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोने लुटले जाते.
असा एकूण आपला हा नवरात्र व महत्वाचा कुलाचार आहे. वेळोवेळी त्यात बदल होत गेलेला असणार हे नक्की. तरी मूळ विधी हा शेती व सृजन या तत्वाशी जोडला गेलेला आहे. काही व्यावहारिक तत्वांची धर्माशी सांगड घालताना अनेक कथा निर्माण झाल्या त्याचे स्वरूप जाणून घेणे आज अपरिहार्य आहे.