संकटसमयी जातक प्रश्न विचारण्यास आला असताना ज्योतिष्याने नेमके कायकाय तपासले पाहिजे हे आपण पाहू.
१) सगळे ठीकठाक चालले आहे, सरकारी किवा मोठ्या पगाराची नोकरी आहे. लग्न झाले आहे. संतती व कुटुंबासोबत आनंदी जीवन उपभोगत असलेला माणूस ज्योतिष्यांना भविष्य विचारायला जात नाही. यातील काहीतरी बिनसले की मगच माणूस शोधाशोध सुरु करतो.
हे असे असले तरी आधीच संकटात असलेल्या जातकाला काहीतरी शांती, जप, पूजा इत्यादी खर्चिक उपाय करायला सांगून स्वतःची खळगी भरून घेणे हे पाप आहे. सगळ्या जातकांना सरसकट एकच औषध देणारे ज्योतिषी निव्वळ महान आणि हुच्च असतात. लोकही भोळे बनून लुटले जातात हे दुर्दैव!! लुटालूट करायची ही साखळीच बनली आहे. जसे डॉक्टर आणि औषध दुकानदार करतात अगदी तसे. या पद्धतीमुळे लोकांचा या शास्त्रावरील विश्वास नष्ट होतो हे ह्या उपायवाल्या बाबांनी समजून घेणे आवश्यक आहे. ते याचमुळे.
२) जातकाची जन्मकुंडली पहिली कि नवमांश कुंडली पहावी. जन्मकुंडलीत जे ग्रह आहेत त्यांची नवमांश कुंडलीतील ग्रहांशी तुलना करावी. ग्रहबल हे नवमांश कुंडली प्रमाणे ठरते. जन्मकुंडलीत उच्च, स्वगृह, मित्र, सम राशीला असलेला ग्रह जर नवमांश कुंडलीत नीच, शत्रुगृह, समगृह असा होत असेल तर फळे नवमांश पत्रिकेप्रमाणे ग्रह बलाप्रमाणे मिळतात. याउलट जन्मकुंडलीत नीच, शत्रुगृह, समगृह राशीला असलेला ग्रह जर नवमांश कुंडलीत उच्च, स्वगृह, मित्र, सम असा होत असेल तर त्याची फळे हमखास नवमांश पत्रिकेत असलेल्या बलाप्रमाणे मिळतात.
३) काही ग्रहांच्या महादशा, अंतर्दशा ह्या काळात अडचणी वाढलेल्या असतात. विशेषतः अंतर्दशेत अडचणी फार वाढलेल्या असतात. आणि हमखास हा अंतर्दाषेचा स्वामी ग्रह नीच, शत्रुगृह, समगृह, अस्तंगत असताना हे होत असते. पण त्यातून निष्कर्ष काढून अमुक ग्रहाची शांती, जप, पूजा करा हे सांगणे तद्दन फसवाफसवीचे आहे.
असे होण्याचे कारण हेच आहे की दशा चांगल्या असताना कोणी ज्योतिष्याला विचारायला येत नाही.त्या बिघडलेल्या ग्रहांच्या असतात तेव्हाच जातक जागे होऊन प्रश्न विचारायला लागतात.
४) ह्यासाठी एक आणखी अतिमहत्वाची कामगिरी ज्योतिष्यांना करणे आवश्यक आहे. ती म्हणजे प्रश्नकुंडली. (Consultation chart) जातक जेव्हा सर्वात जास्त मागे लागून प्रश्न विचारतो ती वेळ व त्याची कुंडली ह्या सगळ्या प्रकारात अधिक प्रकाश टाकू शकते. यासाठी जातक गंभीर असणे आवश्यक आहे. उगाच दिसला ज्योतिषी म्हणून विचारले प्रश्न हे चुकीचे ठरू शकते. त्यासाठी ज्योतिष्याने जातकाला नेमका काय प्रश्न/संकट आहे हे विचारून मगच पुढचे काम करावे. नायतर टाईमपास करणाऱ्यांची आपल्याकडे कमी नाही.
५) लग्नेश अष्टमात/व्ययात, किवा अष्टमेश/व्ययेश लग्नात हि स्थिती असताना कुलदैवत, किवा आराध्य दैवत यांचे नवस चुकले आहेत हे स्पष्ट होते.
६) अष्टमात/व्ययात शुक्र, किवा चंद्र असल्यास जलदेवता प्रकोप आहे हे समजते.
७) अष्टमात/व्ययात सूर्य असता कुलदैवत कुलाचार अर्धवट राहिले आहेत हे स्पष्ट होते.
८) अष्टमात किवा व्ययात शनी/मंगल/गुरु/बुध असता पितृदोष आहे हे समजते.
९) अष्टम किवा व्ययात राहू किवा राहू शनी युती, राहू बुध, राहू चंद्र युती असता बाहेरील भूतबाधा, नजर लागणे इत्यादी त्रास आहे हे स्पष्ट होते.
यावर उपाय काय करायचे हे पुढील भागात आपण पाहू.