Saturday, 11 February 2017

तुमची कुंडली आणि कुलदैवत

एखाद्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यास गंभीर असलेल्या जातकांसाठी प्रश्नकुंडली हे अचाट तंत्र आहे. एखाद्या विशिष्ट समस्येने पीडित असलेल्या व्यक्तीची इत्यंभूत माहिती प्रश्नकुंडलीतून मिळते. बऱ्याचदा व्यक्तीच्या समस्यांचे कारण हे त्यांच्या कुलदैवतासंबंधी असलेल्या अनास्था व अज्ञान ह्यात  दडलेले असते. यापूर्वीच्या लेखात आपण कुलदैवत उपासना कशी करावी, कुलधर्म-कुलाचार म्हणजे नक्की काय याविषयी जाणून घेतले.  ती  लिंक खाली देत आहे. 

कुलधर्म-कुलाचार

http://avinashpataskar.blogspot.in/2016/04/blog-post_30.html

आधी कुलदैवत म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजावून घेऊ. त्यासाठी साधारणतः १०० ते ५०० वर्षांपूर्वीचे  लोकजीवन कसे असेल याचा पुसटसा अंदाज घ्यावा लागतो. त्यावेळी मेडिकल सायन्स हे नव्हतेच. नवस करून मुले  होतात तर नवऱ्याची गरज काय असे आपले एक संतश्रेष्ठ म्हणून गेलेत, पण नवरा असूनही मुले होत नाहीत तेव्हा शेवटी लोक नवस करतात हेही मनोरंजक सत्य आहे.
 
तर सांगायचा मुद्दा हाच कि तत्कालीन लोकजीवनात कुलदैवत उपासना मेडिकल सायन्स इतकीच किंबहुना अधिक सर्वव्यापी होती. प्रत्येक कुलदैवत क्षेत्राबद्दल असंख्य कथा प्रसिद्ध आहेत,  तसेच कुलदैवताची निस्सीम भक्ती करणारे लोक हे त्या त्या गावात पंचक्रोशीत आजही ह्या कथांच्या रूपाने जिवंत आहेत. त्याकाळात लोकांना आपल्यापेक्षा अधिक समस्यांना तोंड द्यावे लागायचे असे म्हटले तर बऱ्याच वाचकांना ते पटणार नाही, पण अगदी वरवर नजर टाकली तरी तत्कालीन समस्यांची एक मोठी यादीच तयार होते,
१) सत्ताबदल,
२) परकीय आक्रमण,
३) दुष्काळ, दुषित अन्न व पिण्याचे पाणी,
४) साथीचे आजार, अनुवांशिक आजार,
५) विवाह, संतती न होणे, जातीजातीतील द्वेष,
६) चोऱ्या, दरोडे, लुट. 
७) कर्जबाजारीपणा, व्यवसाय नष्ट होते. पिढीजात व्यवसाय नष्ट होते ई. 
८) संपर्क व प्रवासाची अपुरी साधने.
अशा अनेक अडचणीतून आपले पूर्वज त्यावेळी जीवन जगत होते म्हणून आपण ह्या भूतलावर आज आहोत.
कुलदैवत ह्या सर्व समस्यांवर सर्वात स्वस्त व हमखास गुण येणारा उपाय होता. तसेच कुलदैवत उपासना करण्यास उच्च-नीच जातधर्म यांचे बंधन नव्हते.आजही कित्येक इतरधर्मीय लोक परंपरेने हिंदू कुलदैवत असलेल्या मंदिरात उपासना करताना दिसतात. 
 
कुलदैवत उपासना हि अतिशय सोपी उपासना आहे. हेही आधीच्या लेखात मी स्पष्ट केले आहे. कुलदैवत उपासनेसाठी अवघड मंत्र म्हणावे लागत नाहीत. मन हे अतिशय चंचल असते तेही एकाग्र ( हे कसे करतात हे मलाही माहित नाही) करावे लागते असे नाही. मनात भाव असला कि सगळे सोपे होऊन जाते. साधा नैवेद्य दाखवण्याचा विधी आपण करतो पण तोच मनातील भाव व्यक्त करून केला तर फरक पडतो. त्यासाठी खालील लेख वाचा.
 
आत्ता आपण एका मोठ्या बदलातून जात आहोत. वर यादीत नमूद केलेल्या अनेक समस्या आता कालबाह्य झाल्यात, पण समस्या संपल्या नाहीत. त्या दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने तोंड वर काढून आपल्यासमोर उभ्या आहेतच. आपण सुखी झालो आहोत असे वाटत असले तरी आपले पूर्वज आपल्यापेक्षा सुखी होते हे नीट विचार केल्यावर लक्षात येते. त्यावर मी वेगळे लिहिणार आहेच. 
 ह्या अशा अनेक समस्या, त्रास, पीडा आधी लाभ मग नुकसान, सुख-दुःख हे चक्र अव्याहतपणे चालूच असते. ज्यावेळी एखादा जातक असा पीडाप्रश्न घेऊन येतो तेव्हा प्रश्नकुंडली मांडून त्याचे नक्की काय चालले आहे हे कळते.  कधीकधी जातक हे कट्टर नास्तिक असतात, पण  त्यांच्याच आधीच्या २-३ पिढ्यातील लोक हे निस्सीम भक्त वगैरे प्रकारचे असतात व त्या पिढीने मोठी ऐहिक प्रगती साधून घेतलेली असते, कधीकधी जातक हे फक्त बुद्धिवादी व ग्रहांचा माणसावर काहीतरी परिणाम होतो इतकेच मानणारे म्हणून फक्त ग्रहांचे बोला देवाचे सांगू नका अशी मागणी करणारे असतात. 
तिसरे लोक हे विसराळू असतात, ते कुलदैवताचे बोललेले नवस, वार्षिक विधी विसरलेले असतात. 
 
चौथे लोक हे लबाड असतात, त्यातही दोनतीन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारचे लोक हे देवाचीच परीक्षा घ्यायचा उद्योग करतात ते सांगतात "मी नवस बोललो पण फळ मिळालेच नाही" खरेतर हे वेगळ्या कार्यासाठी नवस बोललेले असतात ते पूर्णही होऊन जाते पण नवस अर्धवट राहिल्याने दुसरीच समस्या निर्माण झालेली असते . त्यातले दुसऱ्या प्रकारचे लोक हे चारपाच देवांना एकदम साकडे घालतात कारण त्यांचा एकावर विश्वास नसतो. तिसरे लबाड लोक असे असतात कि ते उधारी चुकवणारे लोक जसे वागतात तसे देवाशी वागतात. काम तर झालेले असते पण देवाचे कार्य करायला हातातून पैसा सुटत नाही. 
पण हे जे जे काही उद्योग लोक करत असतात ते प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून बाहेर पडते. 
बरेच लोक असे सांगतात, कि आमच्याकडे आम्ही कुलदैवताचे काहीच पुजत नाही. तरीही आम्हाला कुलदैवत का त्रास देते? याची वेगवेगळी कारणे आहेत .
पहिले कारण म्हणजे हि जी पिढी असा प्रतिवाद करते ती बरेचदा आधीच्या पिढ्यांनी कुलदैवत उपासना करून सधनता प्राप्त करून घेतलेली आहे ती उपभोगत असते वर म्हणत असते कि आम्ही काहीच करत नाही तरीही त्रास का? 
दुसरे असेही लोक आहेत कि ज्यांचे जन्म नवससायास करून झालेले असतात पण ते काहीच मानत नसतात. 
तिसरे लोक हे दुटप्पी असतात, ते एकीकडे आम्ही देव मानत नाही असेही म्हणतात व दुसरीकडे पेचप्रसंग आला कि नाही-नाही ते उपाय करतात. 

बरेचदा असेही होते कि कुलदैवत संबंधित अतिशय साध्या-सध्या चुका किवा अनास्था लोक करीत असतात. घरात नवीन जन्म होणे किवा एखादी व्यक्ती मृत झाल्यावर जे कुलधर्म कुलाचार करायला हवेत त्याबद्दल लोक निरुत्साही असतात व समस्यांची मालिका सुरु होते.  तसेच नवस अर्धवट राहिले कि केलेली उपासना निष्फळ ठरू लागते.
स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात देवांना अजिबात शिवू नये त्यामुळे कोप होतो अशा गैरसमजामुळे बरेच लोक कुलदैवत उपासना करायचे टाळतात.   बायकोच नसेल तर काय करायचे कुलदैवत ही भीती बाकी काय !!
चुकून शिवले गेले तर काही आकाश कोसळत नाही. मुद्दाम परीक्षा बघायच्या हेतूने शिवले तर बहुतेक कुलदैवते कडक आहेत. दुष्परिणाम होतातच.
खालील लेख वाचा,

 विटाळ, सोयर, सुतक ह्यांचे गौडबंगाल 
 

प्रश्नकुंडलीनुसार पत्रिकेतील अष्टमस्थान हे पिडास्थान आहे, त्या स्थानात असलेले ग्रह हे संबंधित व्यक्तीला असलेल्या पिडा दर्शवितात. ह्या पिडा बरेचदा व्यक्तीच्या स्वतःच्या चुकांमुळे किवा आई, भाऊ, वडील चुलते ह्यांनी केलेल्या चुकांमुळे उद्भवतात. ते प्रश्नकुंडलीत स्पष्ट दिसते. अशावेळी त्या व्यक्तीचे आकाशस्थ ग्रहमान अतिशय चांगले असते पण बिचारा यशस्वी होत नसतो. कारण वेगळेच असते. ते बऱ्याचदा कुलदैवताशी संबंधित असते. कसे ते पुढील लेखात पाहू.