Tuesday, 28 July 2015

मानवी मनातील ईश्वर

ईश्वराचा साक्षात्कार
सृष्टीतील दृश्य शक्ती म्हणजेच देव हि एक कल्पना प्रथम रूढ झाली. सूर्य, चंद्र, समुद्र, वायू, पाऊस, नद्या हेच देव असावेत असे मानवाला वाटू लागले. पण कधीकधी ह्या सृष्टीतील शक्ती ह्याच मानवाच्या जीवावर उठत असत. हा देव असा कसा ! त्याची किती स्तुती केली, धावा केला तरी तो कधी कोणासाठी हलत असे ना येत जात असे. त्याला करायचे तेच काम तो करत असे. मग त्या शक्ती देव कशा असू शकतील? पण प्रत्येक वेळी पराधीन मानवाला संकटकाळी कोणांतरी अज्ञात शक्तीचा धावा करण्याचा शेवटचा मार्ग शिल्लक असतो, इथेच देव ह्या संकल्पनेची सुरुवात  झाली. त्यावेळच्या लोकजीवनाची कल्पना केली तर लक्षात येते कि त्या मानवाचे जीवन निसर्गाशी फार सुसंगत होते. माणूस संख्येने फारच थोडा होता. त्यामुळे जीवन फारच शांत होते. रोजची आजारपणे, संघर्ष संकटे क्वचित येत असत. पण जो अशा संकट काळी मदत करतो तोच परमेश्वर, हा माणसाचा विश्वास धृढ होत होता. डोंगर हाच देव हीआदिम मानवाची सगळ्यात प्रथम कल्पना होती. डोंगरातच आदिम मानव लपून राहू शकत होता. डोंगरामुळे एक निसर्गसंस्था निर्माण होत असते. तिथेच जीवन असते पाउस पडतो, वनस्पती वाढतात, नद्या वाहतात.बरेच पर्वत हेच शिव (लिंगाकार) आहेत अशी संकल्पना तेव्हा अस्तित्वात आली असावी.
शिवलिंग म्हणजे पुरुष जननेन्द्रिय हा काहीसा अर्धवट विचार आहे. शिव ही संकल्पना मूलतः द्वीपकल्पीय भारतात निर्माण झाली. जिथे पर्जन्याचे महत्व वादातीत आहे. पाऊस प्रकट होण्यास पर्वतांचा सहभाग महत्वाचा आहे. म्हणून पर्वत ह्या संकल्पनेचे पूजन करण्यास शिवलिंग हे स्वरूप वापरले गेले असावे. शिवलिंग व त्याबरोबर असलेली शाळुंका (खालील भाग) हे पर्वत व त्याचे टोक अशा स्वरुपात दिसतात. 
पर्वत त्यातील गुहा ह्याच तात्कालिक मानवाला स्वताच्या जीवितासाठी अधिक जवळच्या होत्या. हा असा पर्वत व गुहा यांच्या आश्रयाला राहणारा सर्वात जुना मानवाचा पूर्वज होता. शिकार व शाकाहार हे सर्वात प्राचीन आद्य व्यवहार होते. 
विचारांची सुरुवात
प्रत्येक प्रदेशात आपल्या परमेश्वराच्या वेगवेगळ्या कल्पना तयार झाल्यात. त्यात शिव हे आदिदैवत आहे. आदिम आदिवासी सुद्धा शिवाला आदिदैवत मानतात. वेद्पुर्वी अनेक हजार वर्षे हा काळ बराच अंधारात राहिलेला काळ आहे. त्याकाळात प्रगल्भ अशी संस्कृती अस्तित्वात होती. शिवाने दिलेले ज्ञान हे आगम ग्रंथ ह्या स्वरुपात वेदांच्या पूर्वी अस्तित्वात होते. त्या ज्ञानापैकी एक असे वेद असावेत. जैन आणि श्रमण धर्म यांचीही पाळेमुळे आगम ग्रंथात आढळतात.
इसवी सन १९२०-३०च्या दशकात सिंधु नदीच्या खोऱ्यात म्हणजे हल्लीच्या पाकिस्तानांतील मोहोंजोदरो आणि हरप्पा येथे आणि भारत व पाकिस्तानात इतरत्रही  दहा ठिकाणी उत्खनन करून इतिहास संशोधकांनी ज्या 'सिंधुसंस्कृतीचा' शोध लावला ती संस्कृती कोणाची व कशी होती ते आपण आता पाहू या. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी 'हिंदू धर्माची समीक्षा' या त्यांच्या ग्रंथात 'वेदपूर्व भारतीयांचा धर्म' या शीर्षकाखाली दिलेली सिंधुसंस्कृतीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
अनार्यांचे स्थान सिंधुसंस्कृती?
'वैदिक आर्याच्या पूर्वी हिंदुस्थानात अस्तित्वात असलेल्या सुसंस्कृत समाजांचा हा धर्म होय. या धर्मात व इजिप्त-इराकमधील पुरातन धर्मात तसेच आशिया मायनर व भूमध्य समुद्रीय संस्कृतीमध्ये आणि तेथील मानववंशामध्येसुद्धा फार मोठे साम्य आढळते. त्यांच्यात समुद्रमार्गे दळणवळणही होते. ही आर्यपूर्व संस्कृती होय. इजिप्त, क्रीट व मेसापोटेमिया येथील संस्कृतीमध्ये स्त्री व पुरुष वाचक  शिव, विष्णू, काली यांच्याशी साधर्म्य असलेल्या देवता होत्या. तसेच त्या संस्कृतीमध्ये नागपूजा, लिंगपूजा, चंद्रपूजा, ग्रहपूजा, पितृपूजा व मातृपूजासुद्धा आहेत. नाईल, युफ्रेडिस, तेग्रिस आणि सिंधु नद्यांच्या तीरावर वाढलेल्या या प्राचीन संस्कृतीचा वारसा हिंदू समाजाकडे अजूनही चालू आहे. हीच वेदपूर्व भारतीय संस्कृती होय.
शास्त्रीजींनी इतरत्र असेही म्हटलेले आहे की, 'आजच्या हिंदू धर्मात आर्य संस्कृतीपेक्षा, आर्येतर किंवा अनार्य संस्कृतीचा सहभाग जास्त आहे.'.
भारतात आर्याचे आगमन होण्यापूर्वी आणि वर उल्लेखिलेल्या भूमध्य समुद्रीय लोकांचेसुद्धा भारतात स्थिरस्थावर होण्यापूर्वी, नेग्रिटो, प्रोटो, ऑस्ट्रेलाईड, मंगोलाईड, मुंड, मुखमेर वगैरे दुसरे अनेक वंश वेगवेगळ्या वेळी भारतात येऊन वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले होते आणि त्यांच्याही संस्कृतींचे विपुल अंश सध्याच्या हिंदू संस्कृतीत अंतर्भूत आहेत. तरीही मानववंश विस्तार आफ्रिकेतून इतर भागात झाला का हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. कारण अगदी म्यानमार व ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी फार जुने मानवी जीवाश्म सापडत आहेत. वर वर्णिलेली सिंधुसंस्कृती केव्हा आणि कशी नष्ट झाली ते आपण पुढे पाहू.

आपली पृथ्वी आपले विश्व

कुठलेही शास्त्र अथवा विज्ञान त्याची बौद्धिक तांत्रिक कारणीमिमांसा केल्याशिवाय आजकाल कोणीही मान्य करीत नाही. शे-दोनशे वर्षापूर्वी पृथ्वी, ग्रह तारे सृष्टी कशी बनली याची उत्तरे मजेशीर होती. आज आपण विविध मूलद्रव्ये, रासायनिक पदार्थ यांच्या आधारे पृथ्वी कशाची व कशी बनली आहे हे पाहू. 
विज्ञान आपल्याला सांगते की, अगणित सूर्यानी बनलेल्या आपल्या विश्वाचे वय सुमारे तेराशे कोटी वर्षे असून, त्यात आपला सूर्य सुमारे फक्त ५०० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे. त्यानंतर म्हणजे सुमारे ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या जन्मदात्या हय़ा सूर्यापासून आपली पृथ्वी बनलेली आहे, पण तेव्हा ती एक अतिउष्ण जळता गोळा होती. ती थंड आणि जलमय व्हायला सुमारे शे-सव्वाशे कोटी वर्षे लागली. त्या सुमारास केव्हा तरी म्हणजे सुमारे तीन-साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कुठे तरी काही रासायनिक प्रक्रिया निसर्गत: होऊन आधी अल्गी (शेवाळ) व नंतर केव्हा तरी अगदी साधे अमिबा, बॅक्टेरियासारखे जिवाणू किंवा एकपेशी सजीव निर्माण झाले. नंतरची सुमारे दोनशे कोटी वर्षे पृथ्वीवर फक्त असलेच प्राथमिक अवस्थेतील सजीव होते. तेव्हा आजच्यासारखी जंगले किंवा पशू-पक्षीसुद्धा पृथ्वीवर नव्हते. नंतर सुमारे साठ कोटी वर्षांपूर्वीपासून सुमारे वीस कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर बहुपेशीय पण कमी गुंतागुंतीची शरीरे असलेल्या सजीवांचे 'प्राचीन जीवयुग' होऊन गेले. पुढे वीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते पाच कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर सरपटणारे प्राणी व वेगवेगळे डायनॉसॉर आणि अनेक वनस्पती वगैरेंचे 'मध्यजीवयुग' होऊन गेले. त्यानंतर हय़ा शेवटच्या पाच कोटी वर्षांपूर्वी आज जगात दिसणाऱ्या सस्तन प्राण्यांचे 'नवजीवयुग' सुरू झाले. हय़ाच नवजीवयुगात सुमारे सव्वाकोटी वर्षांपूर्वी, मानवाचा पूर्वज असलेला बिनशेपटीचा, चतुष्पाद असलेला, पण दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करू लागलेला 'मानव-पूर्वज-मर्कट' पृथ्वीवर वावरत होता.
मानवाची उत्क्रांती
हय़ा उत्क्रांतीत त्याला निसर्गनियमाने तीन महत्त्वपूर्ण गोष्टी प्राप्त झाल्या. एक म्हणजे हाताचा आकार बदलला व एका बोटाचा अंगठा बनला, जो इतर बोटांना टेकवता येऊ लागला. दुसरे म्हणजे कंठ थोडा उत्क्रांत होऊन तो वेगवेगळे आवाज काढू लागला. ज्यातून पुढे 'काही शब्द' आणि नंतर 'भाषा' निर्माण झाली व तिसरे म्हणजे हाताने अन्नाचे लहान तुकडे करून खाणे शक्य झाल्यावर, त्याला मोठय़ा जबडय़ाची गरज उरली नाही, त्यामुळे जबडा लहान होऊ लागल्याने डोक्यात मेंदूची वाढ व्हायला जागा निर्माण झाली व तशी मेंदूची वाढ क्रमश: होऊ लागली.
जंगलात किंवा उघडय़ावर एकटय़ादुकटय़ाने स्वसंरक्षण करून राहण्यापेक्षा तो माणसांच्या टोळ्या व नंतर संघसमाज बनवू लागला, घरे बांधू लागला, समाजात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्याच्या आवाजाचे काही शब्द व हळूहळू त्याची भाषा बनू लागली. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की त्याचा मेंदू वाढू शकल्याने तो विचार करू लागला. भाषा आणि मेंदू एकमेका साहय़ करू लागले. स्मृती वाढली, विचार वाढले, आता काय झाले पाहा. मूलत: वन्य -प्राणी असलेला आदिमानव, उत्क्रांतीच्या त्याच्या पुढच्या पायरीवर तो आता स्वत:च्या हाताने स्वत:च आपली हत्यारे बनवू शकणारा, विचार करू शकणारा, एकमेकांशी गुंतागुतीचे संवाद भाषेद्वारे करू शकणारा, स्वत:ची घरे बांधू शकणारा, पशुपालन करणारा व नंतर मानवरूपात येऊन काही हजार वर्षे जीवन जगल्यावर शेवटच्या दहा-बारा हजार वर्षांत शेती करून धान्योत्पादन करून ते साठवूनही ठेवू शकणारा, हुशार मानव बनला. हय़ा इतक्या कुवती प्राप्त झाल्यामुळे ही द्विपाद मनुष्यजात पृथ्वीवरील इतर सर्व पशू-पक्ष्यांशिवाय वरचढ ठरली, समर्थ ठरली. बिनशेपटीच्या एका मर्कट जातीपासून अनेक टप्प्यांनी अखेर आजची बुद्धिमान, शहाणी, कुशल व सुसंस्कृत मानवजात बनायला त्याला एक-सव्वा कोटी वर्षांचा दीर्घ काळ मात्र घ्यावा लागला, हे खरे. ते असो.
याचा अर्थ असा होतो की ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाल्यापासून, सुमारे ४५९ कोटी वर्षेपर्यंत मानवच नव्हे तर मानवाचा कुणी पूर्वजही पृथ्वीवर नव्हता. म्हणजे मानव नवागत आहे, आदिमानवरूपात अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी व शहाण्या मानवरूपात तो पृथ्वीवर अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आलेला आहे.
दोन पायांवर चालणारा शहाणा माणूस हा इतर प्राणिसृष्टीहून वेगळा, अशी ईश्वराची खास निर्मिती आहे आणि त्याच्या इच्छेनेच सगळी जगरहाटी सुरू आहे. मानवाने असेही मानले की हे सर्व जग ईश्वराने माणसासाठीच निर्माण केलेले आहे. जगात वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठय़ा नद्यांच्या काठी वेगवेगळ्या मानवसमूहांनी आपापल्या संस्कृती आणि धर्म निर्माण केले. त्यातील काही टिकले व काही कालौघात नष्ट झाले.